फॉलोअर

१९ मे २०२६

भेटी लागे जीवा लागलीसे आस


भेटी लागे जीवा… विठ्ठल भेटीची तळमळ 

संत तुकाराम यांचे अभंग म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते जीवनाचे अनुभव आहेत. संसारातील दुःख, संकट, उपासमार, अपमान, संघर्ष आणि त्यातून मिळालेली परमेश्वराची अनुभूती या सर्व गोष्टी त्यांच्या अभंगातून व्यक्त होतात. म्हणूनच तुकोबांचे शब्द हे थेट मनाला भिडतात.

मी दहावीला असताना कुमारभारती अर्थात मराठीच्या पुस्तकात शिकवला जाणारा “भेटी लागे जीवा लागलीसे आस…” हा अभंग माझ्या मनाला लहानपणापासून स्पर्श करून गेला. काळ बदलला, आयुष्य पुढे सरकलं, अनेक गोष्टी बदलल्या; पण हा अभंग ऐकला की मन पुन्हा भक्तीच्या त्या शांत विश्वात जाऊन पोहोचतं. अनेकदा हा अभंग मी टीव्हीवर किंवा मोबाईलवर लावतो आणि डोळे बंद करून या अभंगाचे प्रत्येक शब्दाचे अर्थ जाणून घेतो 

खरंचदेव असो, एखादी व्यक्ती असो किंवा आपलं एखादं ध्येय असो त्याची आपण वाट ज्या पद्धतीने पाहतो ती वाट किती कष्टदायी असते याची मला या अभंगातून अनुभूती येते.

अभंग

भेटी लागे जीवा लागलीसे आस ।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥

पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन ।

तैसे माझे मन वाट पाहे ॥

दिवाळीच्या मूळा लेकी आसावली ।

पाहतसे वाटुली पंढरीची ॥

भुकेलिया बाळ अति शोक करी ।

वाट पाहे परी माउलीची ॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।

धावूनि श्रीमुख दावी देवा ॥


अभंगातील भक्तीची तळमळ

संत तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे परमेश्वराच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या भक्ताच्या मनाचा आवाज आहे.

“भेटी लागे जीवा लागलीसे आस…” या पहिल्याच ओळीत तुकोबा सांगतात की, माझ्या जीवाला आता तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी दिवस-रात्र फक्त तुझीच वाट पाहतो आहे.ही केवळ भक्ती नाही; ही भक्ताच्या अंतःकरणातून निघालेली हाक आहे.

चकोर आणि पावसाची प्रतीक्षा

तुकाराम महाराजांनी चकोर पक्ष्याचे उदाहरण दिले आहे. लोकमान्य समजुतीनुसार चकोर हा पक्षी पावसाच्या थेंबांची वाट पाहतो. त्याच्यासाठी तो पाऊस म्हणजे जीवन असतं.

त्याचप्रमाणे तुकोबांचं मन विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलं आहे.ज्याप्रमाणे चकोराला पावसाशिवाय चैन पडत नाही, त्याचप्रमाणे भक्ताला देवाशिवाय समाधान मिळत नाही.

माहेराची वाट पाहणारी लेक

“दिवाळीच्या मूळा लेकी आसावली…” ही ओळ मनाला फार स्पर्शून जाते. लग्न झालेली मुलगी दिवाळीत माहेरी जाण्यासाठी जशी आपल्या वडिलांची वाट पाहते, तशीच अवस्था भक्ताची असते.“माझे बाबा मला न्यायला येतील…” या आशेवर ती दिवस मोजत असते.तुकाराम महाराज म्हणतात —देवा, मीही तुझी तितक्याच आतुरतेने वाट पाहतो आहे.

आईची वाट पाहणारं भुकेलेलं बाळ

भुकेलेलं लहान मूल आईशिवाय शांत होत नाही. बाकी कुणीही काही समजावून सांगितलं तरी ते बाळ गप्प बसत नाही.आई येईपर्यंत त्याचं रडणं थांबत नाही. कारण त्याला माहीत असतं की, माझं समाधान फक्त आईजवळच आहे.तुकाराम महाराजांनी हाच भाव देवासाठी व्यक्त केला आहे.“देवा, तुझ्या दर्शनाशिवाय माझं मन शांत होणार नाही.”

संत तुकारामांचे जीवन आणि भक्ती

संत तुकाराम यांनी आयुष्यात अनेक संकटं पाहिली. दुष्काळ, कर्ज, संसारातील दुःख, समाजाचा विरोध — या सर्व गोष्टी त्यांनी अनुभवल्या. पण या संकटांमध्येही त्यांनी विठ्ठलाचं नाम सोडलं नाही.त्यांच्यासाठी विठ्ठल ही केवळ देवाची मूर्ती नव्हती; तर तो त्यांचा मित्र, आधार, आई-वडील आणि सर्वस्व होता.त्यामुळे त्यांच्या अभंगात कृत्रिमता नाही.जे अनुभवलं, जे जगलं, तेच त्यांनी शब्दांत उतरवलं.


हा अभंग आजही का भावतो?

आजच्या धावपळीच्या जगात माणूस खूप काही मिळवतो; पण मनःशांती हरवतो. अशा वेळी तुकोबांचे अभंग मनाला शांत करतात.“भेटी लागे जीवा…” हा अभंग आपल्याला सांगतो की —ज्याप्रमाणे माणूस आपल्या जवळच्या व्यक्तीची आतुरतेने वाट पाहतो, त्याचप्रमाणे भक्ताने देवावर प्रेम करावं.ही भक्ती भीतीची नाही, तर प्रेमाची आहे.

तुकाराम महाराजांचा हा अभंग मी जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा मन भक्तीने भरून येतं. लतादीदींच्या आवाजात हा अभंग ऐकताना हृदय दाटून  येतं. डोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा वाहू लागतात. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या विरहात आपण जेव्हा हा अभंग ऐकत राहतो तेव्हा त्या अभंगाची खरी खोली आणि उंची आपल्याला जाणवते. हा अभंग केवळ शब्दांचा नाही; तर भक्ताच्या हृदयातील तळमळीचा आहे.देव भेटावा, त्याचं दर्शन व्हावं, त्याच्याशी मन मोकळं करावं — ही जी ओढ आहे, तीच या अभंगात प्रत्येक ओळीतून प्रकट होते.

आणि म्हणूनच —“भेटी लागे जीवा लागलीसे आस…”

हा अभंग काळ बदलला तरी मनातून कधीही जात नाही.



सतीश मोरे सतिताभ 

9881191302

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...