दिनांक 7 जुलै
फलटण सतीश मोरे
तरडगाव
मुक्काम करून पहाटे तीन वाजता तेथून फलटण कडे जायला निघालो. हे अंतर 19
किलोमीटर आहे. लवकर निघाल्याने वेग कमी होता. माऊली नानाचा जयघोष करीत
आमचा माऊली ग्रुप चालला होता. रस्त्यावर खुप गर्दी होती. आज पहिल्यांदा
एक वेगळा आवाज ऐकला. या माऊली या. पाणी आहे, शौचालय आहे, गर्दी पण
नाही, बादली पण आहे. बाटली शोधायची गरज नाही. या! त्या दिशेने गेलो.
चार पाच युवक वारकर्यांना विनंती करत होते. त्याचे पाठोपाठ गेलो.
भारतीयजनता पक्षाचे युवा मोर्चाचे पुणे शाखेने ही सोय केली होती. चांगली
व्यवस्था, स्वच्छता होती. खरंच योग्य ठिकाणी ही सोय होती. महत्त्वाचे
म्हणजे युवक लोकांना बोलावून घेते होते. या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
पुढे
चालू लागलो. सुरुवातीला काही अंतर दुहेरी मार्ग होता. दुहेरी मार्ग असला
की चालायला सोपे पडते, सुरक्षित पण असते. उजव्या बाजूला वाहने जातात,
त्यामुळे चालणे सुकर होतो. सातारा पोलीस सज्ज होते. काळज गाव आले. या
गावात ऐकेरी रस्ता होता. गडबड होऊ नये म्हणून पोलिसांनी मध्ये रोप बांधले
होते. पहिल्यांदाच हे दिसले. खरं तर अशा सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त
तैनात करताना रोप बांधणे सोयीचे होईल.
गावाबाहेर
आलो, पुन्हा चालू राहीलो. चढाचा रस्ता पार करून कडेला थांबलो. चार वाजले
होते. रस्त्या कडेला विसावलो. बाजूला सगळी कडे खडी टाकली होती. बसायला
हीच जागा होती, पुढे जायची इच्छा नव्हती. तिथेच अनेकांनी प्लॅस्टिक कागद
अंथरून अंग टाकून दिले. मी पण बसलो, खडी टोचत होती, पाय पसरले. बाजूला
पाहिले अनेक वारकरी तशा जागेत निवांत झोपले होते. मला पण कंटाळा आला
होता, शेवटी कागद टाकला आणि आडवा झालो. काय सांगू राव किती मस्त वाटले,
अंग खडीवर दाबून निघाले. तासभर तिथेच होतो. आता उजाडू लागले, सारे
उठलो. आंघोळीला जायचे होते, चालत चालत जागा शोधून काढली. . पेरू बागेत
मोठी विहीर होती. मालकाने पाईपला उंच टी लावून पाणी सोडले होते. खुप
गर्दी होती, मात्र सारा चिखल झाला होता. सर्वानी आंघोळ केली, दरम्यान
अनेकदा पाईप टी निसटला, त्यामुळे गडबड झाली. वेगळा आनंद होता.
पुढे
निघालो. निंबोरे गाव आले. येथे माऊली पालखी भोजन विसावा होता. आम्ही
आमच्या जागेकडे निघालो, दरम्यान स्मशानभूमी शेड दिसले. याठिकाणी वारकरी
विसावले होते, नाश्ता करत होते. काही जण तेथील नळावर आंघोळ करत होते.
विचार आला, या जागे कडे आपण पहात नाही, लांबून निघून जातो. खायचे सोडा
तिथे बसत पण नाही. तिथे वारकरी बिनधास्त बसले होते, त्यांना काही तमा
नव्हती. एकजण म्हणाला, काय भिती नसते स्मशानात, तिथे कोण नसते, उलट
बाहेर जिवंत भुताची जास्त भिती असते.
निबोरे
गावाच्या रणवरे टेकडीवर आमचे जेवण होते. आमची दिडी आकरा वाजता येणार होती.
तोपर्यंत बाळासाहेब रणवरे यांच्या घरी जाऊन मोबाईल बॅटरी चार्ज
करण्यासाठी लावली. तिथे दुसरी एक दिंडी अगोदरच उतरली होती. एक युवक
किर्तनकार भेटले. MSc दुसर्या वर्षाला शिकत होते. त्याचे सर्व कुटुंब
शिकलेले आहे, तीन पिढ्या वारी परंपरा आहे. त्याचे सोबत गप्पा मारल्या.
विंग
गावचे नामदेव कुंभार यांनी पुरण पोळी जेवण आणले होते. आदल्या दिवशी तीन
वाजता 25 किलो डाळ शिजवून पुरण केले. गावातील, परिसरातील 50 महिला रात्री
बारा पर्यंत पोळ्या लाटत होत्या. पहाटे चार वाजता पोळ्या, आमटी , दुध घेऊन
ट्रक निघाला. साडे आठला जागेवर होता. साडे आकार वाजता पंगती पडल्या.
जेवण
झाल्यावर माहीती घेत फिरलो. दरम्यान सारे सहकारी पुढे गेले त्यामुळे
खबाले पाटील ट्रकात बसलो. पाच किलोमीटर ट्रक प्रवास केला, चालक मालक निवास
खबाले यांचे नजरेतून वाहन चालवताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. फलटण
मध्ये विमानतळावर दोन वाजता पोहचलो. ट्रक मध्ये झोप काढली. उठून टॅबवर काम
केले. पाच वाजता कोल्हापूर येथील आमचे बच्चन वेडे ग्रुपचे मित्र आले.
ट्रकमध्ये बसूनच गप्पा मारल्या. ते सात नंबर कोल्हापूर दिडीसाठी प्रसाद
घेऊन आले होते . किरण पाटील, आनंद पराडकर, प्रकाश इंगवले, संतोष जाधव,
गोपाल पाटील आणि ट्रक चालक निवास थोरात आम्ही वारी विषयावर बोलत बसलो.
समाज आरतीसाठी सहा वाजता सारे गेले. खुप म्हणजे 25 वर्षे नंतर मी ट्रकवर
चढलो. लहानपणी लग्न वराडातून जाताना ही जागा मिळायला धडपड असायची. टपावर
बसून फोटो काढले.
साडे सात वाजता पंगती पडल्या.
जेवण करून वारी लिहायला बसलो. वारी वाचणारे अनेक जण आहेत. अनेकांनी फोटो
पाठवा अशी मागणी केली. माझी पण खूप इच्छा असते, दिवसभरात सारखे फोटो
पाठवावेत. पण नेट बंद पडलेले असते. त्यामुळे रात्री उशिरा किंवा सकाळी
मी पोस्ट करतो..
आज सुंदर दिवस होता. अजिबात पाऊस नव्हता इकडे.
- सतीश मोरे
9881191302
माऊली माऊली










