फॉलोअर

१७ जुलै २०२१

रेठरे बुद्रुक आणि रेठरे खुर्द

 *निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !

१७ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आज पंढरीची वारी असती तर वेळापूरला येऊन पोहोचली असती. आज वेळापूर उद्या भंडीशेगाव परवा सोमवारी वाखरी आणि मंगळवारी पंढरपूर . मात्र प्रत्यक्षात यंदा वारी होणार नाही. मात्र आमची निसर्ग वारी आज पोहोचली आहे सहकार पंढरीमध्ये! सहकार पंढरी रेठरे बुद्रुक गावांमध्ये जाण्यासाठी सकाळी साडेसहा वाजता वाठार येथील पेट्रोल पंपावर वाहन उभे करून हरिपाठ म्हणत चालू लागलो. वाठार गाव पास करून आम्ही पुढे आल्यानंतर रस्त्याकडेला शेतामध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले. गेल्या दोन महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे त्या पावसामुळे महामार्गावरील अनेक शेतांमध्ये पाणी अजूनही साचलेले आहे. वाठार ते रेठरे दरम्यान अशाच प्रकारे शेतात असलेले पाणी पाहायला मिळाले.
रेठरे खुर्द येथे पोहचलो. रेठरे बुद्रुक आणि रेठरे खुर्द ही दोन गावे कृष्णाकाठची अतिशय सुंदर गावे आहेत. या गावात आल्यानंतर ओळखीचे काही ग्रामस्थ भेटले. आम्ही इतक्या लांब चालत आलेले आहेत हे ऐकून त्यांना अप्रुव वाटलं. त्यांना निसर्ग वारीची कल्पना सांगून राम कृष्ण हरी करत आम्ही पुढे निघालो.
रेठरे खुर्द गाव पार केल्यानंतर रस्त्याकडेला राधाकृष्ण मंदिर आहे तेथे आम्ही थांबलो. या मंदिरात अतिशय सुंदर देखणी अशी मूर्ती आहे. हे मंदिर एका मोठ्या झाडाखाली आहे. प्रथमदर्शनी हे झाड वडासारखे वाटले मात्र आज आमच्या सोबत सहभागी झालेले वाठार येथील माझे स्नेही प्रभाकर पाटील यांनी या झाडाबाबतची माहिती दिली. या झाडाला कळंब किंवा कदंबचे झाड म्हणतात. हा वृक्ष अनेक वर्षे जगतो, तो वडा सारखा उंच असतो. सातारा जिल्ह्यात फक्त एकमेव रेठरे खुर्द येथेच कळंब वृक्ष आहे. या वृक्षाच्या परिसरात राधाकृष्णाचं वास्तव्य असते.
भागवत पुराणात श्रीकृष्ण आणि कदंब यांचे अद्वैत ठायी ठायी निदर्शनास येते. 'बाळकृष्णा'च्या गोकुळातील सर्व लीलांचा कदंब साक्षीदार आहे. कालिया मर्दनाच्या वेळी याच झाडावरून 'देवकीनंदना'ने डोहात उडी घेतली, याच्याच फांद्यांमध्ये दडून गोपिकांची वस्त्र पळवली आणि याच झाडावर लपवून ठेवली. कर्णफुले म्हणून उपयोग करतानाच याची चेंडूसारखी कठीण फुले गोपाळांबरोबर खेळण्यासाठीही वापरली.
हे झाड धनंजय मारूती पाटील (तात्या) यांच्या शेतात आहे.या वृक्षाची माहीती समोर आल्यानंतर या वृक्षाखाली श्रीकृष्णाचे मंदिर बांधावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. धनंजय पाटील यांच्या पत्नीने या ठिकाणी एक नवस बोलला,त्यानुसार त्यांचा मुलगा उच्च पदावर जाऊन पोहचला आणि त्यानंतर या अमेरिकास्थित मुलाने पाठवलेल्या द्रव्यातून हे मंदिर उभे केले. या कदंब वृक्षाला आणि राधा कृष्णाला नमस्कार करून आम्ही पुढे आलो.
डाव्या बाजूला भारती विद्यापीठाचे जाई मोहिते हायस्कूल होते. तिथून पुढे आल्यानंतर कृष्णा नदीला समांतर असणारा रस्ता, या रस्त्याच्या बाजूलाअसणारी विस्तीर्ण शेती आणि उजव्या बाजूला कृष्णा नदी पाहून मन प्रफुल्लित झाले. या ठिकाणी पुढे असणाऱ्या एका कट्ट्यावरती यशवंतराव मोहिते भाऊ हे आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असतं .राजकिय निवृत्तीनंतर भाऊ रोज संध्याकाळी या रस्त्यावर चालायला येत आणि या ठिकाणी बसत, या ठिकाणाला पुढे पेन्शनर चा कट्टा म्हणून नाव पडलं.
थोर विचारवंत यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या.रेठरे बुद्रुक या गावाचे नाव संपूर्ण राज्यभर आहे ते यशवंतराव मोहिते यांच्या विचारांमुळे. भाऊंसारखा ज्येष्ठ विचारवंत, समाजवादी व्यक्ती रेठरे बुद्रुक या गावात जन्माला आला,कराड तालुक्याला भाऊंचा सहवास लाभला आहे, हे आपल्या तालुक्याचे मोठे भाग्यच आहे. यशवंतराव मोहिते यांच्या विधानसभेतील अभ्यासू भाषणांचा विक्रम आजही अबाधित आहे. त्यांनी सामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनाची फळे आज आपण चाखत आहोत. सहकारातील उत्तुंग मनोरे यशवंतराव मोहिते आणि त्यांचे बंधू जयवंतराव भोसले यांचे गाव म्हणून रेठरे बुद्रुक या गावाला देशभर ओळख मिळाली आहे.
2002/3 च्या दरम्यान यशवंतराव मोहिते भाऊ यांची मुलाखत घेण्यासाठी प्रकाश देसाई यांच्यासमवेत मी रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी गेले होतो. भाऊंची मुलाखत आम्ही तीन भागात पुढारीमध्ये छापली होती. सुमारे तीन तास ही मुलाखत चालली होती. भाऊ बोलत होते आणि तेव्हा माझ्यासारख्या नवीन वार्ताहर हे सर्व ऐकत होता,भारावून गेला होता. भाऊंच्या मुलाखतीची टिपणे घेण्यासाठी आम्ही एक सोबत डायरी (पॅड) घेऊन गेलो होतो. त्या डायरीची सर्व पाने संपली तरी भाऊंची मुलाखत संपत नव्हती. भांऊचे विचार संपत नव्हते, भाऊ मनापासून, अंतःकरणापासून बोलत होते, एक वेगळा विचार मांडत होते आणि आम्ही तो टिपून घेत होतो. माझ्या आयुष्यातील भाऊंची मुलाखत ही एक सुंदर आठवण आहे.
माननीय जयवंतराव भोसले(आप्पा ) यांच्यासोबत माझ्या खूप आठवणी आहेत. आमचे बाबरमाची येथील काका दामू अण्णा पाटील यांच्या समवेत मी पहिल्यांदा जयवंतराव भोसले आप्पा यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. 98 साली माझ्या पत्नीला कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नोकरी मिळावी म्हणून मी आप्पांना भेटायला गेलो होतो. दामू आण्णा हे ओगले काच कारखान्याचे प्रसिद्ध कामगार नेते. दामू अण्णा यांचे जयवंतराव आप्पा यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. आप्पांच्या आणि अण्णांच्या शिफारशीवर माझ्या पत्नीला कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 1998 साली सहा नोकरी मिळाली होती. पुढे बीएडला ॲडमिशन मिळाल्यानंतर तीला ही नोकरी सोडावी लागली.आप्पांच्या समवेत झालेली माझी ही पहिली अतिशय सुखद अशी भेट.
2001 झाली पुढारीमध्ये काम सुरू केल्यानंतर जयवंतराव भोसले आप्पा यांच्या अनेक प्रेस कॉन्फरन्सला मी ट्रस्टवर गेलो होतो. माझ्यासोबत कराडचे निवडक चार पाच पत्रकार असायचे. प्रेस कॉन्फरन्सचा विषय फक्त पंधरा-वीस मिनिटांचा असायचा मात्र त्यानंतर जयवंतराव आप्पा यांच्या समवेत आमच्या तासभर गप्पा रंगायच्या. यादरम्यान कृष्णा ट्रस्ट निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील याचे योगदान, अत्यंत कमी कालावधीत उभारलेलली कृष्णा हॉस्पिटलची इमारत, ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज देताना पुण्या-मुंबईतील उच्चभ्रू लोकांनी दिलेला त्रास याबातच्या आठवणी आप्पा दिलखुलासपणे सांगत.
जयवंतराव भोसले आप्पा यांनी लिहिलेल्या जीवनयात्री या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या अगोदर आम्ही त्यांना भेटलो होतो. या पुस्तकामध्ये आप्पांनी जीवन मृत्यू,कर्तव्य, व्यवसाय,अध्यात्म, लोक, देश,परदेश आदी विषयावर प्रकाश टाकला आहे, हे पुस्तक संग्रही असे आहे. यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याबाबत मी काय लिहीणार? त्यांचे कार्य फार मोठे आहे. या दोन्ही महामानवांचा सहवास मला लाभला हे माझे भाग्य आहे.
बावीस डिसेंबर या आप्पांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आप्पांची पुढारीसाठी घेतलेली एक मुलाखत मला आठवते. या मुलाखती दरम्यान त्यांनी एक विचार बोलून दाखवला होता, तो आजही माझ्या स्मरणात आहे. आप्पा म्हणाले होते, 'तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कोणतेही काम करा. पण ते काम करताना तुम्ही ते करिअर म्हणून करा, वेळ घालवण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी करू नका. शेती असो किंवा राजकारण असो, ते काम करताना जशी तुम्ही नोकरी करता तसा तुम्ही शेतीसाठी खूप पूर्ण वेळ दिला पाहिजे. तुम्ही जर राजकारण करत असाल तर राजकारणाकडे तुम्ही करिअर म्हणून पाहिले. तुम्ही जर सहकार क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही सहकार क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. आपल्या नोकरी अथवा व्यवसायाकडे करिअर म्हणून पाहतात ते नक्कीच यशस्वी होतात' असे आप्पां मुलाखती दरम्यान बोलले होते.
जयवंतराव भोसले आप्पा आणि यशवंतराव मोहिते यांच्या आठवणीच्या प्रवासात चालत चालत आम्ही पुढे कृष्णा नदी पुलावर पोहचलो. या पुलावरून रेठरे बुद्रुक गावाचे अतिशय सुंदर असे चित्र दिसते. या परिसरात कृष्णा नदीचे पात्र विस्तीर्ण असे आहे. हा पुल रेठरे बुद्रुक आणि रेठरे खुर्द या गावांना जोडणारा आहे. हा पुल नव्हता तेव्हा कायलीतून प्रवास केला जायचा. अशा प्रकारची काईल नदीमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. या पुलावरून पुढे जात असताना अनेक ओळखीचे भेटले, त्यांना नमस्कार केला, फोटो आठवणी टिपल्या आणि आम्ही सहकार महर्षी जयवंतराव भोसले स्वागत कमानी मधून रेठरे बुद्रुक गावात प्रवेश केला. या ठिकाणी रेठरे बुद्रुक येथील वार्ताहर दिलीप धर्म आणि त्यांचे सहकारी आमची वाट पाहत होते. रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर आणि मान्यवरांच्या उपस्थितांच्या समवेत आम्ही कापूरकर स्मारकाशेजारी एक वडाचे झाड लावले. त्यानंतर स्वर्गीय मारुती रावजी कापूरकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठलचा जयघोष केला. या ठिकाणी ज्योतिर्लिंग मंदिराचा ग्रामस्थांच्या सहकार्याने विनायक भोसले यांनी पुढाकार घेऊन नुकताच जीर्णोद्धार केला आहे. पूर्वीचे ज्योतिर्लिंग मंदिर आणि आत्ताचा परिसर पाहिला तर पटणार नाही इतका मोठा बदल झाला आहे. अतिशय नियोजनपूर्वक या मंदिराचा परिसर फुलवण्यात आलेला आहे. मंदिराच्या खाली लाॅन तयार करून बाग तयार केली आहे, आकर्षक पद्धतीने मंदिराची सजावट केली आहे. खुप दिवसानंतर या मंदिरात आज जाण्याचा योग आला. यापूर्वी जेव्हा या मंदिरात गेलो होतो तेव्हा वरती जायचा रस्ता साधा होता. मात्र आज पायरी वरून आम्ही वरती जात होतो. दोन्ही बाजूला हिरवळ तसेच वेगळ्या प्रकारची फुले झाडे आणि आकर्षक बाग पाहून खूप आनंद झाला. ज्योतिर्लिंग देवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि या मंदिराच्या परिसरात काही थांबलो. रेठरे गावचा परिसर मंदिराच्या उंचावरून पाहिला.अतिशय सुंदर असा हा नजारा होता. त्यानंतर सहकार महर्षी आबासाहेब मोहिते घाट कमानीतून खाली येऊन स्मशानभूमी परिसरात आम्ही वडाची चार झाडे लावली.अतिशय भावभक्तीपूर्ण वातावरणात कृष्णा काठावर आम्ही ही वडाची झाडे लावली. यावेळी स्मशानभूमी परिसरात पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचा आवाज घुमला. सर्व ग्रामस्थांना आम्ही धन्यवाद दिले आणि आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
रेठरे बुद्रुक हे माझे आजोळ असल्यामुळे या गावात मी अनेकदा गेलेलो आहे. पूर्वी कृष्णा नदीवर पूल नव्हता. तेव्हा आम्ही शेणोली मार्गे रेठरेला जायचो. उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी लागली की माझे वडील मला कराड स्टॅंडवर कराड रेठरे बुद्रुक एसटीमध्ये बसवायचे, बस मधून या गावात जाण्याचा आनंद काही औरच होता. बसमधून दिसणारी शेतं, झाडं, कधीकधी झुकझुक गाडी, कृष्णा कारखाना पाहताना खूप मजा यायची.
माझ्या शालेय जीवनातील अनेक गोड आठवणी रेठरे बुद्रुक येथील आहेत. 1982 च्या दरम्यान अमिताभ बच्चन यांचा कुली चित्रपटपटाच्या सेटवर झालेला अपघात आणि त्यानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडताना अमिताभ बच्चन यांनी केलेला संघर्ष वृत्तपत्रांमध्ये छापून येत होता. अमिताभ बच्चन लवकर बरे होण्यासाठी अनेकांनी नवस केले होते, मी रेठरे बुद्रुक या गावातील मंदिरात जाऊन अमिताभ बच्चन लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली होती. यावेळी मी रेठरे बुद्रुक येथे आजोळी मुक्कामी होतो. आमच्या मामाची मुले हा पेपर मला दाखवत. अमिताभ बच्चन मला लहानपणापासूनच आवडतो. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या अपघाताची वाचलेली बातमी मला अजूनही आठवते.
या गावांमध्ये सुट्टीमध्ये जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारी टुरिंग टॉकीज. माझ्या मामाच्या मुलीचा मुलगा रवींद्र शिंदे आणि मी सुट्टीत रेठरे गावात नक्की असायचो. आमच्या दोघांचा एक नित्यक्रम असायचा, रोज रात्री दहा वाजता रेठर्याच्या टूरिंग टाॅकिजमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा. चित्रपट पहायला कधी मामाला विचारून तर कधी न विचारता जायचो.चित्रपट पाहायला न सांगता गेलो तर रात्री एक वाजता परत आल्यानंतर मामांच्या घराच्या पाठीमागील दारावरून वरती चढायला एक वाट होती, त्या वाटेतून आम्ही वर यायचं आणि शेजारच्या दुसऱ्या मामांचा टेरेस वरती जाऊन झोपायचं,अशा या माझ्या रेठरे बुद्रुक गावच्या आठवणी आहेत.
या गावात माघ पौर्णिमेला एक वेगळी लिंबाची यात्रा असते. घरातील ज्येष्ठ पुरुष लिंब नेसतात.लिंबाचा पाला शरीराभोवती गुंडाळून देवाची पूजा केली जायची. माझ्या मामाला लिंब नेसलेले मी पाहिले आहे. या यात्रेच्या निमित्ताने रेठरे बुद्रुकला देवाला नारळ द्यायला जायचे जाणे व्हायचे.
आजची वारी आठवणींच्या हिंदोळ्यावर होती. मामा- मामीने माझ्यावर केलेले निखळ प्रेम,आजोळी केलेली मज्जा, मामीच्या हातची खाल्लेली तूप रोटी अजूनही आठवते. पूर्वी आमच्या घरात कधीतरी भात खायला असायचा. पण रेठरे बुद्रुक येथे गेल्यानंतर दोन्ही वेळेला भात खायला मिळायचा. या भातामध्ये दोन-तीन चमचे तूप वाढणारी माझी मामी मला अजूनही आठवते. आजच्या मुलांना आजोळी राहायचे सुख मिळते का ? आपण खुप नशीबवान आहोत ना?
झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

१६ जुलै २०२१

निसर्गवारी आज होती कालवडे गावात.

 *निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१६ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
निसर्गवारी आज होती कालवडे गावात. आम्ही नेहमीप्रमाणे एकत्र आलो आणि वाठार गाव सोडून पुढे कालवडे फाट्यावर आमची वाहने पार्क केली. आज आमच्या सोबत सुधीर एकांडे हे माऊली सहभागी झाले होते, त्याचबरोबर सुनील शेवाळे उंडाळेहुन खास आमच्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. साडेसहाच्या सुमारास आम्ही येथून चालावयास सुरुवात केले. जरा पुढे गेल्यानंतर आमचे वाहन पुढे नेण्यासाठी त्या ठिकाणी माझे सहकारी बालीश थोरात आले. ते वाहून गेल्यानंतर मी पुन्हा एकदा गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
कालवडेला जाणारा रस्त्याच्या दोन्ही कडेला उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. ऊसाला पाणी पाजण्यासाठी अनेक मोटारी सुरू होत्या, हा परिसर भाजीपाला पिकासाठी (माळवे )प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी टोमॅटो दोडका मिरची याचे प्लाॅट दिसले. महामार्गापासून कालवडे पर्यंत तीन किलोमीटर अंतर आम्ही अर्धा तासातच पार केले. गावात प्रवेश केला गावातून चालत असताना लोक आम्हाला भेटले, अनेक जुने वाडे पाहायला मिळाले तसेच एका जुन्या वाड्यात असलेले सुंदर राम मंदिर पाहायला मिळाले. कालवडे गावातून बाहेर पडल्यानंतर नांदगावला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आम्ही चालू लागलो. आज पहिल्यांदाच या रस्त्याने जात होतो. हा रस्ता पुढे नांदगावला जातो.
कालवडे गाव हे अतिशय समृद्ध आहे. या गावात कल्याणी समूहाची सुमारे चारशे एकर जमीन आहे. या जमिनीवर अत्याधुनिक शेती प्रयोग केले जातात, त्यांचा पोल्ट्री उद्योग आहे, नारळाच्या बागा आहेत. गावाबाहेर आल्यानंतर आता चढाचा रस्ता सुरू झाला. पुढे डोंगर होता आणि या डोंगरावरील महादेवाचे मंदिर आम्हाला लांबून दिसत होते आणि त्या डोंगरावरच आम्हाला जायचे होते. या रस्त्यावरून चालताना दोन्ही बाजूला डोंगराच्या कडेला ऊस शेती खरंच पाहण्यासारखी आहे. डोंगरावर सामाजिक वनीकरणाने मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यामुळे हा परिसरात अतिशय सुंदर दिसतो. या झाडावर मोरांची वस्ती आहे. पुढे तीन किलोमीटर आल्यानंतर आम्हाला उंचावर उंडाळे प्रादेशिक योजनेची पाण्याची टाकी दिसली. आम्ही त्या डोंगराच्या पायथ्याशी आलो आणि उजवीकडे वळून पुढे चालू लागलो. येथे आम्हाला एक मंदिर पहावयास मिळाले. या मंदिरातील देवी गाईवर बसलेली होती, गाईवर बसलेली ती रुक्मिणी माता होती. अशा प्रकारचे मंदिर पहिल्यांदाच पाहायला मिळाले. त्या माउलीला नमस्कार करून पुढे आम्ही डोंगराकडे चालू लागलो.पावणे आठच्या सुमारास आम्ही या डोंगरावर पोहोचलो.
डोंगरावर सुळागिरी महादेव मंदिर आहे. हे अतिशय जुने मंदिर असून गावातील युवकांच्या प्रयत्नातून त्याचा जिर्णोद्धार अतिशय प्रयत्नपूर्वक सुरू आहे. मंदिर छोटेखानीअसलले तरी परीसर सुंदर आहे. या डोंगरावरून कराड आणि वाळवा तालुक्यातील कासेगाव, वाठार, बेलवडे, कालवडे, काले या गावांचे दर्शन होते. समोर मच्छिंद्रगड आणि चौरंगीनाथचा डोंगर दिसतो. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे हा.या मंदिरात पोहोचल्यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही पाच वडाची झाडे लावली.
सुळागिरी महादेव मंदिराचा उल्लेख पांडवप्रताप या ग्रंथामध्ये आहे. शंकराला प्रसन्न करुन शिवभक्त रावणाने शिवलिंग मिळवले होते. ते शिवलिंग गणपतीने बालक रूपातून रावणाच्या हातातून काढून घेतले आणि जेव्हा रावण लघुशंकेला गेला तेव्हा ते शिवलिंग जेथे ठेवले ते गोकर्ण महाबळेश्वर.या घटनेनंतर संतप्त झालेला रावण वणवण फिरू लागला आणि तो कालवडे परिसरात आलेला होता. त्याच्या हातातील मळापासून शिवलिंग तयार झाले आहे अशी अख्यायिका आहे.
गेल्या काही वर्षापासून कालवडे ग्रामस्थ, शिवभक्त आणि युवकांच्या मदतीने या मंदिराच्या परिसरात जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तसेच वर्गणीतून येथे अनेक कामे झाली आहेत. या मंदिरापासून पुढे काही अंतरावर निळागिरी मंदिर असून मंदिराकडे जाण्यासाठी पाऊलवाट आहे. सुळागिरी मंदिर आणि निळागिरी मंदिर ही दोन्ही ठिकाणी अतिशय सुंदर आहेत. कराडपासून जवळ पाहण्यासाठी हीअतिशय निसर्गरम्य ठिकाणे आहेत. आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी झाडे लावली आणि परत आमचा प्रवास सुरु केला.
गावात आल्यानंतर गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर तसेच चिलाई देवीचे दर्शन घेतले. पुरातनपासून धार्मिकतेचा वसा जपणाऱ्या कालवडे नगरीमध्ये अनेक देव-देवतांची मंदिरे पूर्वजांनी सुसज्ज अशी बांधलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक जागृत देवस्थाने आहेत त्यामध्ये कालवडे गावच्या चिलाई देवी या जागृत देवस्थानचा उल्लेख केला जातो. म्हणून या देवस्थानचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कालवडेकर करत आहेत. कालवडे गावातील ग्रामस्थ व सासरी गेलेल्या माहेरवाशिणी तेवढ्यात धार्मिकतने या जागृत देवस्थानचा वसा जपत आहेत.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चौरस आकार असणाऱ्या दगडाच्या विहिरीमध्ये उत्तरेच्या बाजूस ईशान्य कोपऱ्यामध्ये विहिरीत सुमारे दहा फूट खोलीवर चिलाई देवी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. तर बाजूला सात दोऱ्या आहेत यामध्ये सात सुवासिनींची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. सुमारे ५० फुट खोल असणाऱ्या चौरस आकाराच्या पारंपारिक विहिरीची कलात्मक बांधणी भाविकांना परंपरेचे दर्शन घडवते. विहिरीत उतरण्यासाठी रुंद दगडी पायर्या व बाजूचे बांधकाम कित्येक पिढ्यानी पाहिले आहे. ते बांधकाम आज अखेर तसेच आहे. सुमारे सात फूट रुंद व 50 फूट लांब विहिरीच्या तिन्ही बाजूनी तिन्ही बाजूने कार्यक्रम पाहण्यासाठी चबुतरा तयार करणे केला आहे.
या विहिरीतील पाण्याचे महत्व सांगावयाचे म्हटले तर पावसाळ्यामध्ये कितीही पाऊस पडला तरी देवी चिलाई देवी मातीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंतच पाणी भरले जाते. मूर्तीपासून वरती सुमारे दहा फूट उंच विहीर असून सुद्धा पाणी मूर्तीच्या गळ्यापासून वर आज आखेर आलेले नाही.
चिलाई देवीच्या जागृत देवस्थान विहिरीचे महात्म्य परंपरेपासून आजही अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहे. म्हणूनच गावातील प्रत्येक कुटुंबातील व सासरवासिनी यांना होणारे पहिले अपत्य या विहिरीत पाण्यावरती पाळण्यामध्ये बसवून फेऱ्या काढून सोडण्याचा कार्यक्रम केला जातो. ही परंपरा गावातील प्रत्येक कुटुंब अखंडितपणे जपत आहेत. ही परंपरा जपताना होणाऱ्या आर्थिक खर्चाचा विचार न करता आपल्या हातून होणाऱ्या अन्नदानाचा विचार करून हजारोंच्या संख्येने नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ यांना स्नेहभोजन देतात.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला व मामांना ही नवीन वस्त्रे तसेच सात सुवासिनींची परिस्थितीनुसार खणा-नारळाने ओटी भरली जाते. पाळण्यात सोडण्याच्या कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे पहाटे चिलाई देवीच्या मूर्तीला पाणी घालून साडीचोळी अर्पण केली जाते. सकाळी नऊ वाजता सात सुवासिनींना पान विडा व हळदीकुंकू देऊन भोजनाचे निमंत्रण दिले जाते. सकाळी दहा वाजता कार्यक्रम केला जातो . त्यानंतर सकाळी 11 वाजता सात सुवासिनींची मंडपामध्ये पूजा केली जाते. कुटुंबातील सर्वजण या नवीन वस्त्रे परिधान करतात या कार्यक्रमासाठी त्याचे आई-वडील आपत्ती व सात सुवासनी आदल्या रात्री बारा वाजल्यापासून ते सोडण्याचा कार्यक्रम होऊन पाद्यपूजन होईल तोपर्यंत पाणी सुद्धा ग्रहण करत नाहीत. ज्या कुटुंबामध्ये कार्यक्रम आहे ते कुटुंब व सुवासिनी पायात चप्पल घालत नाही. त्या सर्व कार्यक्रमांमध्ये देवीचे पूजन व भोजन याला फार महत्त्व आहे, जोपर्यंत सात सवासनी भोजन करत नाही तोपर्यंत कोणीही भोजन करत नाही. त्यानंतर मात्र सर्वजण भोजन करतात.
चिलाई देवी आणि विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला आणि कराडात पोहचलो.आजच्या निसर्ग वारीमध्ये नवीन ठिकाण पाहायला मिळाले. सुळागिरी आणि निळागिरी या देवस्थान ला जाण्यासाठी एक दिवसाची छोटी सहल अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आपण नक्की जा.
सामाजिक कामासाठी आज एका ठिकाणी जावे लागले, या कामाबाबत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आलेल्या अनुभवाबाबत मी लवकरच स्वतंत्र लिहिणार आहे. ज्या ठिकाणी गेलो होतो तिथेही मी आणि रणजीत पाटील यांनी पाच वडाची झाडे लावली, हा एक आनंदाचा क्षण तुम्हाला शेअर करावासा वाटतो. यामुळे आजचा ब्लॉग झाला उशीर झाला आणि सविस्तर लिहू शकलो नाही उद्या सविस्तर देत आहे.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

१५ जुलै २०२१

निसर्ग वारी नांदगाव ते उंडाळे

 *निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१५ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आमची निसर्गवारी गेली चौदा दिवस माऊली कृपेने अखंडपणे सुरू आहे. आज आमची निसर्ग वारी नांदगाव ते उंडाळे आयोजित होती. या वारीचे जेव्हा मी वेळापत्रक तयार केले त्यावेळी मला कसलीही कल्पना नव्हती की याच दिवशी म्हणजे १५ जुलैला ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचा जन्मदिवस आहे. दोन दिवसापूर्वी आमचे पुढारी प्रतिनिधी वैभव पाटील यांच्याशी चर्चा करताना १५जुलै काकांची जयंती आहे, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर या ज्येष्ठ नेत्यांच्या गावात आपण जातोय तर एक झाड लावण्याऐवजी १५ झाडे लावूया असे वाटले. हा विचार उदयसिंह पाटील (दादा) यांना फोनवरून बोलून दाखवला.त्यांनी या गोष्टीला तात्काळ सहमती दर्शवली. कोरोनामुळे जयंती मोठ्या प्रमाणात होणार नाही. निसर्ग वारीच्या माध्यमातून उंडाळे ज्या ठिकाणी विलासराव काका यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथेच आपण एक झाड लावू या आणि उरलेली झाडे गावात इतरत्र लावावी,असे सुचवले. त्यानुसार आम्ही आजच्या वारीचे नियोजन केले होते.
सकाळी सहा वाजता आम्ही कोल्हापूर नाक्यावर एकत्र आलो. आमच्या वाहनातून कालेटेक येथील नर्सरी मध्ये गेलो. याठिकाणी पत्रकार सुहास पाटील आणि सुनिल शेवाळे आमच्या स्वागतासाठी येऊन थांबले होते. नर्सरीमधून आंबा, वड, जांभूळ रोपे विकत घेतली. त्यानंतर ही रोपे यातील पंचवीस रोपे आम्ही नांदगाव पोलीस चौकीत नेऊन ठेवली, पुन्हा वाहन घेऊन नांदगाव फाट्यावर आलो. एका ओळखीच्या कार्यकर्त्यांच्या घरी वाहन उभं केलं आणि नांदगाव पासून उंडाळे पर्यंत पायी वारीला सुरवात केली.
आज वातावरण अतिशय प्रसन्न होतं. पाऊस येऊन गेला होता. सात वाजता ओंड येथे पोहोचलो. पुढे सवादे फाट्यावर आम्हाला तुळसणचे दिलिप पाटील आणि.. येऊन मिळाले. सर्व सहकार्यांसोबत आम्ही आमची वारी सुरू केली. आज बाबा महाराज सातारकर यांचा हरिपाठ आम्ही ब्लूटूथ स्पीकरवर लावला होता.वेगळ्या चालीतील हरिपाठ तितक्याच शांत वातावरणात ऐकच आम्ही आम्ही चालत राहिलो. या राज्य मार्गावर चालताना एक वेगळा फिल येत होता. रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे आम्हाला आरामात चालत जाता येत होते.आमच्यासोबत माझे पत्रकार शिक्षक मित्र सुहास पाटील होते. सुहास पाटील यांच्याकडे पाहिल्यानंतर उंची छोटी मात्र कीर्ती मोठी असे त्यांचे एका ओळीत वर्णन करता येईल. सुहास यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा समतेचा विचार जपला आहे. ते प्राथमिक शिक्षक आहेत. विलासकाका उंडाळकर यांचेविषयी दैनिकामध्ये आलेल्या सर्व बातम्यांची कात्रणे त्यांनी जपून ठेवलेली आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांनी नवीन घर बांधले या घराची वास्तुशांती त्यांनी संविधान पूजन करून केली होती. त्यांचे दुसरे सहकारी सुनील शेवाळे आमच्या सोबत चालत होते. ते उंडाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेचे क्लार्क आहेत. शेवाळे यांनी विलासकाकां समवेत अनेक वर्षे काम केले आहे. काकांच्या निधनानंतर प्रत्येक महिन्याच्या चार तारखेला एक झाड आपल्या घराच्या परिसरात किंवा शेतात लावायचे असा त्यांनी संकल्प केला आहे आणि गेली नऊ महिने त्यांनी ९ झाडे लावलेली आहेत. काकांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने चार तारखेला एक तरी झाड लावावे असा त्यांचा आग्रह आहे आणि तसे आवाहन त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींना केले आहे. शेवाळे यांचा हा संकल्प पुरा करण्यासाठी उंडाळकर प्रेमीनी विचार केला तर वर्षभरात अनेक झाडे लावू शकतात.
आता आम्ही उंडाळेच्या नवीन पुलावर पोहचलो. हा पूल नुकताच बांधून (ठेकेदाराच्या चुकीमुळे तीन जणांचे बळी घेऊन) पूर्ण झाला आहे. काही दिवसापूर्वी वाहनांसाठी खुला करण्यात आला, या पुलावर काही काळ थांबून पुढे चालत राहिलो. पावणे आठच्या सुमारास आम्ही उंडाळे येथे पोहोचलो. गावाच्या अलीकडे अर्धा किलोमीटर कृष्णाजी बुवा उंडाळकर यांनी यांच्या स्मरणार्थ बांधलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. कृष्णाजी बुवा हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. कृष्णाजी बुवा हे विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पणजोबा.या मंदिराच्या पाठीमागे शेतातच विलासकाका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याच जागेत एक झाड लावावे असा माझा आग्रह होता. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी थांबलो. विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले.या मंदिरात आज एक सन्मान आम्हाला मिळाला. आज पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणी देवाची पूजा करण्याचा मान माझ्याकडे होता. माऊलीची पूजा केली. विठ्ठल देवाची पूजा करण्याचा मान हे फार मोठं शुभसंकेत आहेत असे मी समजतो. विठ्ठल रुक्मिणी पूजा होईपर्यंत त्या ठिकाणी उदयसिंह पाटील उंडाळकर पोहोचले होते. पुन्हा त्यांच्या सोबत आम्ही विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतले. औषधी काढा घेतला आणि मंदिराच्या बाहेर आलो.
विलासकाकांवर प्रेम करणारे अनेक जण त्याठिकाणी उपस्थित राहिले होते. उंडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासहित परिसरातील ग्रामस्थ काकांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी जमले होते. या सर्वांचा उपस्थित काकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंदिरा शेजारी एक झाड लावले आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष केला. एक वेगळ्याच वातावरणात आम्ही रंगून गेलो.
त्यानंतर आम्ही सर्वजण चालत गावातील मुख्य चौकात पोहचलो. उंडाळे पोलीस चौकी समोर असणाऱ्या भव्य जागेत पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही उरलेली १४ झाडे लावली. काकांच्या जयंती दिवशी १५ झाडे लावण्याचा आमचा संकल्प आज उंडाळे ग्रामस्थ आणि उंडाळकर कुटुंबाच्या सहकार्याने पूर्ण झाला. आज या निमित्ताने अनेक उंडाळकर प्रेमी, कार्यकर्ते भेटले. त्यांच्याशी बोलून, त्यांना भेटून खूप आनंद झाला. पुढे आम्ही सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयात आलो. या ठिकाणी दिवंगत काकांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली वाहिली.
आमचे पत्रकार मित्र वैभव पाटील यांनी निसर्गवारीच्या उपक्रमाचे कौतुक करताना काकांना अपेक्षित अशी ही वारी आहे,असे सांगितले. यावेळी बोलताना काकांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. उंडाळकर काकांच्या राजकीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली तेव्हा खा. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते काकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. यावेळी काकांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना 'मी आयुष्यभर लोकामध्येच विठ्ठल पाहिला. जनतेमध्येच देव पाहिला. माझी जनता हाच माझा पांडुरंग' असे भावनाविवश उद्गार काढले होते. काकांच्या भाषणातील ती वाक्ये माझ्या कानावर पडत होती.आम्ही प्रत्येक झाडांमध्ये एक देव आहे असे समजून २२१ झाडे लावण्याचा एक वेगळाच संकल्प केलेला आहे.
काकांनी जनतेसाठी केलेले काम फार मोठे आहे.जनमानसात मिसळणारा, गावागावातील सर्व घटकांची जिव्हाळ्याचे संबंध असणारा, खेडोपाड्यातील शेवटच्या घटकासाठी वैयक्तिकरित्या काही ना काही मदत करणारा, त्याला नावाने ओळखणारा, सामान्य घरातील व्यक्तीला मोठ्या पदावर पदावर बसवणारा, साध्या माणसाला मोठ्या संस्थेचे चेअरमन करणारा, सतत वाचत रहा शिकत रहा असा सल्ला देणारा,पुरोगामी विचारांची पेरणी करणारा, जनजागृतीसाठी साहित्य संमेलने घेणारा,जनसामान्यांची नाडी ओळखणारा असा नेता पुन्हा होणे नाही.
काकांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आम्ही परत उंडाळकर स्मारक कार्यालय मध्ये जाऊन सुहास पाटील यांनी तयार केलेले कात्रण संग्रह पहिले. यावेळी महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार सुहास पाटील उपस्थित होते. आठवणीतील काकांच्या बातम्या वाचून काकांच्या कार्याला उजाळा दिला. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार केला, धन्यवाद दिले आणि आम्ही आमच्या मार्गाने परत निघालो.
येताना नांदगाव पोलीस चौकीत पोहोचलो. नांदगाव पोलीस चौकीच्या मालकीची पावणेदोन एकर जागा आहे, येथे वृक्षारोपण करा असे पोलिस उपअधीक्षक रणजीत पाटील, कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरणे आणि कराड शहरचे पोलिस निरीक्षक बी. आर पाटील यांनी काल आम्हाला सुचवले होते. नांदगाव पोलीस चौकी इंग्रज कालीन आहे. चौकीची फार जुनी कौलारू इमारत आहे. या इमारतीत समोर इंग्रज अधिकाऱ्यांचे घोडे बांधले जात असत असे आम्हाला समजले. याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्वांनी १२मिळून झाडे लावली. उर्वरित १३ झाडे त्या ठिकाणी ठेवून ही झाडे लवकरच लवकर लावा अशी विनंती पोलिसांना करून आम्ही या पोलिस चौकीच्या इमारतीसमोर काही काळ आराम केला. या इमारती समोर वडाची चार झाडे आहेत. या झाडाखाली बसल्यानंतर एक वेगळा आनंद मिळाला. नांदगाव पोलीस चौकीच्या मालकीची मोकळ्या जागेचे नंदनवन करण्यासाठी नांदगाव ग्रामस्थांनी तसेच तेथील सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, याकामी झाडे लावण्यासाठी कसल्याही प्रकारचे सहकार्य लागले तर निसर्गवारी ग्रुपच्या वतीने दिले जाईल असे रणजीत पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना सांगितले. पोलीस मित्रांचा निरोप घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
माझे जवळचे मित्र आणि सकारात्मक विचार करणारे साम टीव्ही ब्युरोचिफ संभाजी थोरात यांच्या धोंडेवाडी फाटा येथील मैत्रीपार्क या हॉटेलचा आज आठवा वर्धापन दिन होता. संभाजी थोरात यांना मी या भागात येणार आहे याची माहिती होते, काही कामानिमित्त ते कोल्हापुरात अडकून पडले होते. मात्र हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या हॉटेलसमोर वृक्षारोपण करावे अशी इच्छा थोरात यांनी काल रात्री माझ्याशी बोलून दाखवली होती. संभाजी थोरात यांच्या इच्छेनुसार आम्ही मैत्री पार्क हॉटेल समोर थांबलो. थोरात कुटुंबीयांनी आमचे स्वागत केले ,येथे दोन झाडे लावली. त्यानंतर थोरात बंधुनी गत वर्षी सुरू केलेल्या शिवनेरी शाकाहरी हाॅटेलमध्ये जाऊन आम्ही नाश्तावजा जेवणच केले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू केला.
आज आमचे निसर्ग वारीत थोडी धावपळ झाली. आम्ही ठरल्याप्रमाणे सहा किलोमीटर अंतर चालून झाले पण कोणताही थकवा जाणवला नाही. विलासकाका उंडाळकर यांच्या गावात गेल्यानंतर काकांच्या आठवणीला उजाळा मिळाला. काकांच्या नियोजित स्मारका शेजारी आमच्यानिसर्ग़वारीतील १ झाड लावता आले. काकांनी उभ्या केलेल्या अनेक वास्तूमध्ये काही काळ व्यथित करता आला. ज्या स्वातंत्र्यसैनिकाच्या पंढरीमध्ये देशभरातील अनेक मान्यवर येऊन गेले आहेत त्याठिकाणी जाऊन एक नवी प्रेरणा मिळाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

१४ जुलै २०२१

आमचा वारीचा प्रवास उंडाळे विभागात

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१४ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
निसर्गवारी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे.आज आमचा वारीचा प्रवास उंडाळे विभागात सुरू झाला आहे.गेल्या वर्षी आम्ही मनमंदिर वारी केली होती, त्यातील गावे आम्ही टाळली आहेत.गाववातून प्रवास रिपीट झाला असेल पण संपूर्ण नवीन वारी मार्गावरून आम्ही निसर्गाचा आनंद घेत आहोत.
आम्ही पाचवड फाट्यापासून चालायला सुरुवात केली. काल सांगीतल्या प्रमाणे वारी आणि पावसाचा खूप जवळचा संबंध असतो,आहे.आज सकाळी पावणे सहा वाजता घरातून बाहेर पडलो तेव्हा धो धो पाऊस सुरू होता. छत्री जॅकेट तयारी करून असे सर्वजण सव्वा सहाच्या दरम्यान पाचवड फाट्यावर पोहचलो. तिथे एका पेट्रोल पंपासमोर गाडी पार्क केली आणि भर पावसात आम्ही धोंडेवाडी गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आज पावसाने आमची परीक्षा घ्यायची ठरवले होते. एक सारखा पाऊस सुरू होता मात्र तरीही ब्ल्यूटूथवर मोठ्या आवाजात हरिपाठ लावून आम्ही चालू लागलो. रस्त्यावर गर्दी कमी होती मात्र भर पावसात चालणे एक अवघड काम होते. माऊलींचा आशीर्वाद आमच्या सोबत असल्यामुळे आम्हाला काही अडचण नव्हती.डोक्यावर छत्री धरून सुद्धा आमच्यातील काहीजण भिजले होते,बुटांमध्ये पाणी शिरले होते. एव्हाना कालेटेक येथे पोहोचलो होतो.या दरम्यान मला पंढरीच्या वारीतील एका पावसातील प्रवासाची आठवण झाली. २०१५/१६ ची वारी असेल.सासवड येथे मुक्काम करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो.त्या दिवशी मी मुख्य पालखी सोहळ्यातुन चालणार होतो. सकाळी सात वाजता सासवड गाव सोडल्यानंतर अचानक इतका जोरदार पाऊस सुरू झाला. वारकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र माऊली पालखी सोहळ्याची शिस्त कोणी सोडली नाही.भर पावसात सर्वजण चालत होते, पावसाला कुणीही जुमानले नाही. उलट पावसात वारकऱ्यांचा उत्साह अजून वाढला होता. सासवड दिवे घाटामध्ये एकदा पावसातील पंढरीच्या वारीचा आनंद घेतला होता. भरपावसात सासवड ते जेजुरी केलेला प्रवास मी कधी विसरू शकणार नाही आणि आज त्या प्रवासाची मला आठवण झाली.
कालेटेकच्या दरम्यान आल्यानंतर थोडा पाऊस कमी झाला, पूर्ण पाऊस थांबला आणि निसर्गाचे दुसरे रूप आम्हाला पाहायला मिळाले. मुनावळे गावाच्या बाजूला असणाऱ्या पावसाचे ढग जमिनीवरून डोंगरावर वाहत होते, हे निसर्गरम्य चित्र पाहत असताना या डोंगरदऱ्यातून मोरांचा जोरात आवाज ऐकू येत होता. पाऊस थांबला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा झपाझपा पावले टाकत धोंडेवाडी फाट्यावर पोहोचलो. आणि गावाकडे जायला निघालो.
धोंडेवाडी फाटा ते धोंडेवाडी गावा दरम्यान दीड किलोमीटरच्या अंतरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला खचाखच पाण्याने भरलेल्या विहीरी आणि उसाच्या जोमाने वाढलेल्या लागणी पहायला मिळाल्या. या भागातील शेतकरी प्रयोगशील आहेत.गावात पोहोचेपर्यंत या गावातील माझे मित्र आणि पुढारी चे जुने सहकारी प्रभाकर पवार आमचे वाहन घेवून गावात यायला लागले होते. धोंडेवाडी गावातून आम्ही पुढे जायला निघालो. धोंडेवाडी गाव पार करून पुढे गेल्यानंतर उजवीकडे पुनर्वसित डिचोली गावाकडे जायला एक फाटा आहे तिकडे आम्ही वळालो.
कोयनानगर भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बाधित झालेले डिचोली गाव कराड तालुक्यात धोंडेवाडी आणि बाबरमाची येथे वसले आहे. बाबरमाची येथे यापूर्वी अनेकदा जायचा प्रसंग आला आहे, मात्र धोंडेवाडी डिचोलीला आज पहिल्यांदाच गेलो होतो. साधारण अर्धा किलो चालल्यानंतर डिचोली गावाचे प्रवेशद्वार दिसू लागले. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हे डिचोली धोंडेवाडी गाव पंचवीस-तीस घराचे आहे, या गावाची लोकसंख्या चारपाचशेच्या आसपास आहे. सध्या हे गाव धोंडेवाडी गावाच्या ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली आहे. या गावात प्रवेश केल्यानंतर शिस्तबद्ध प्लॉटिंग केलेली घरे, मोठे बंगले पाहायला मिळाले. काही साधी घरे पण होती. गावात एसटी बस निवारा उभारण्यात आले आहे, मात्र हा निवारा मुख्य रस्त्यापासून आत अडगळीच्या जागी का उभे केले आहे याचे कोडे आम्हाला कळले नाही.
पुढे गावातील मुख्य चौकात पोहोचल्यानंतर ग्रामपंचायत समोर चौकात आम्ही थांबलो. वृक्षारोपण करण्यासाठी आमचे साहित्य येणाऱ्या गाडीमध्ये मागे असल्यामुळे आम्ही एका घरात टिकाव मागण्यासाठी गेलो. तो एक टुमदार बंगला होता. त्या घरातून दोन माऊली बाहेर आल्या आणि त्यांनी आमची आस्थेने चौकशी केली.आम्ही आमचा संकल्प व वारीची माहिती दिल्यानंतर ते लोक आमच्याशी एकरुप झाले आणि लगेच त्यांनी शेजारच्या लोकांकडून टिकाव आमच्याजवळ दिले. झाड कुठे लावायचे याबाबतची माहिती घेताना सदर व्यक्ती बाळासाहेब कोळेकर आहेत असे आम्हाला समजले. बाळासाहेब कोळेकर हे या गावचे मोठे प्रस्थ आहे. अतिशय मनमिळाऊ असे हे व्यक्तिमत्त्व आहे. डिचोली गावात यांना मोठा सन्मान आहे. बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला ग्रामपंचायत समोरील खुल्या जागेत झाड लावण्यासाठी जागा दाखवली. दरम्यान प्रभाकर पवार आमची गाडी घेऊन तिथे दाखल झाले. आम्ही खड्डा काढायला सुरुवात केली, दहाच मिनिटात गावातील आणखीन तीन चार लोक त्याठिकाणी आले. त्यांनी आम्हाला खड्डा काढायला मदत केली. या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आम्ही त्या ठिकाणी वडाचे झाड लावले. या झाडाला बाजूला लावण्यासाठी विटा बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या. उपस्थित दगडू बावधाने, राजाराम मिरजेत, जगनाथ कोळेकर लक्षमण शेळके या ग्रामस्थांनी त्याच झाडाच्या आसपास एक काट्यांचे कंपाउंड तयार केले. दरम्यान कोळेकर यांच्या घरातून आलेला चहा आम्ही घेतला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल च्या जयघोष केला, झाडाला पाणी घातले. पुनर्वसित हे गाव अतिशय सुंदर आहे आणि गावातील ग्रामस्थ अतिशय मनमिळावू आहेत. अजूनही त्यांच्या भाषेत एक वेगळेपण जाणवते. डिचोली गाव आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसित झाले आहे. या गावातून गडावर जाण्यासाठी अतिशय चांगला मार्ग आहे.या परिसरातील अनेक ग्रामस्थ याच मार्गे गडावर जातात. गावातील खुल्या जागेत मैदानावर वृक्षारोपण करण्यासाठी आम्हाला जागा द्याल का अशी विनंती रणजीत पाटील यांनी केल्यानंतर बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या सर्व मंडळी सोबत फोटो काढून अतिशय गोड आठवणी साठवत आम्ही परत धोंडेवाडी गावात आलो.
धोंडेवाडी हे अतिशय जुने गाव आहे. गावाची लोकसंख्या ४५००च्या सुमारास आहे. या अगोदर मला मला मिळालेल्या माहितीनुसार हे छोटे गाव असावे असा मी समज केला होता. १९८४ सालापर्यंत या गावात पाण्याचे फार मोठे दुर्भिक्ष्य होते. मात्र कृष्णा साखर कारखान्याची पाणी योजना आल्यानंतर हे गाव सुजलाम सुफलाम झाले आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि शेती पूरक उद्योग हाच आहे. या गावात प्रामुख्याने धनगर समाजातील लोक जास्त आहेत, त्यांच्या जमिनीही जास्त आहेत. गावात अतिशय जुने बिरोबा देवस्थान आहे. या हे मंदिर अतिशय प्रसिद्ध असून काले, काले टेक, मुनावळे नारायणवाडी या गावांचे श्रद्धास्थान आहे. या गावात प्रवेश केल्यानंतर प्राथमिक शाळेसमोर आम्ही झाडे लावण्यासाठी थांबलो. या ठिकाणी अगोदरच गावचे सरपंच सुरेखा काकडे यांचे पती सचिन काकडे ,श्री सुरेश जाखले, श्री माणिक गंगावणे, माजी पोलीस पाटील, ग्रामपंचायत सेवक श्री सुहास गडाळे, दीपक काकडे, शिवाजी मोटे आले होते. त्यांनी अतिशय आदराने आमचे स्वागत केले. शाळेच्या प्रांगणात एका बाजूला आम्हीच वडाचं एक झाड लावले. पुंडलिक वरदेव असा जयघोष केला आणि आम्ही प्राथमिक शाळेच्या इमारतीत जाऊन थांबलो.
या शाळेची अतिशय रंजक माहिती बोलताना आम्हाला मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ साली पहिल्यांदा या गावात शाळेची स्थापना केली आहे. काले या गावात रयत ची पहिली शाळा स्थापना केली गेली असे सांगितले जाते मात्र येथील ग्रामस्थांच्या मते काले गावाच्या अगोदरच धोंडेवाडी गावात कर्मवीरांनी ही पहिली प्राथमिक शाळा काढली. या शाळेच्या उद्घाटनासाठी कर्मवीर भाऊराव पाटील स्वतः गावात आले होते. यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा या गावास भेट दिली होती.गावात आनंदराव पाटील विद्यालय आहे.आनंदराव पाटील हे स्वातंत्र सैनिक होते. काले येथै हायस्कूल असतानाही या गावापासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर धोंडेवाडी येथे रयत शिक्षण संस्थेने आणखी दुसरे हायस्कूल सुरू केले यामागे या गावाची कर्मवीर भाऊराव पाटलांवर असणारी श्रद्धा हे कारण आहे,असे आम्हाला ग्रामस्थांनी सांगितले.
सुनील काकडे यांनी यादरम्यान बोलताना गावातील रूढी परंपरा विषयी खूप चांगली माहिती दिली. या गावात लोक अतिशय सहकारी वृत्तीचे आहेत. बिरोबा मोठे देवस्थान आहे. या गावात असणारा वेताळबा परिसरातील चार गावांचं श्रद्धास्थान आहे. बिरोबाचे यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात. नवसाला पावणारा बिरोबा देव आहे. बिरोबा देवाला केलेले नवस फेडण्याची एक वेगळी पद्धत या गावात आहे. त्याला गुगळ असे म्हणतात. ज्याने देवाला नवस केले आहे तो डोक्यावर एक मडके घेतो, त्याच्यामध्ये वातीचा दिवटा ठेवून पेटवला जातो. हे गुगळ डोक्यावर घेऊन ती व्यक्ती अनवाणी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून बिरोबा मंदिरासमोर जाते आणि त्यानंतर ते नवस फिटते, प्रत्येक वर्षी पाडव्याला या देवाची फार मोठी यात्रा असते. पाडव्यादिवशी नवस फेडण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात .
सुनील काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यां समवेत गप्पा मारताना या गावा विषयी माहिती मिळालीच शिवाय आणि परंपराही कळाल्या. चहापाणी करून आम्ही आमच्या परतीचा प्रवास सुरू केला.
आजची वारी भर पावसात झाली खरी पण आम्हाला खूप आनंदाची वाटली. चालण्याचा कुठलाही त्रास आला वाटला नाही. जिवाभावाची नवीन माणसं भेटली, डिचोली गावाची माहिती मिळाली, आगाशिवगडला जाण्यासाठी नवीन रस्ता पाहायला मिळाला. अतिशय आनंदात वारी संपन्न झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

१३ जुलै २०२१

घारेवाडी फाटा ते धुळोबा मंदिरा

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१३ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आजही आमची निसर्गवारी होती घारेवाडी फाटा ते धुळोबा मंदिरापर्यंत. मात्र शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व माझे सहकारी चंद्रजीत पाटील यांनी धुळोबा मंदिरानजीक असणाऱ्या डोंगरावरील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करु या,असे सुचवले.आम्ही सकाळी सहा वाजता एकत्र येऊन साडेसहापर्यंत धुळोबा मंदिरासमोर पोहोचलो. जाताना घारेवाडी गावातील अतिशय सुंदर अतिशय सुंदर मंदिर पाहिले. या मंदिर परिसरात असणारा उंच पिंपळवृक्ष आणि त्याशेजारी ग्रामस्थांनी तयार केलेला पार ,बाग, वृक्षारोपण खरंच पाहण्यासारखे आहे.आम्ही शिवम अध्यात्मिक केंद्राच्या रस्त्याने पुढे निघालो,आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे दुरूनच इंद्रजीत देशमुख यांनी तयार केलेल्या भव्य अध्यात्मिक स्मारकाला आम्ही दुरूनच नमस्कार केला आणि वर मंदिरात पोचलो.
कोरोना संकटामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीनिमित्त आळंदी ते पंढरपूर या पायी वारीस राज्य शासनाने परवानगी नाकारली आहे. आळंदी ते पंढरपूर हे अंतर सुमारे २२१ किलोमीटर इतके आहे. त्यामुळेच तालुक्यातील विविध भागात दररोज ६ किलोमीटर पायी चालत जाऊन २ जुलै ते २० जुलै या कालावधीत २२१ वडाच्या झाडे लावण्याचा संकल्प माझ्या सहीत, सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील (नाना), कराड नगरपालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, युवा उद्योजक गौतम करपे, डॉ. अमित खाडे, संदीप सूर्यवंशी,अभिजित सुर्यवंशी यांनी केला आहे.
१ जुलैला सह्याद्रि कारखान्यावर वृक्षारोपण करून सुरूवात केल्यानंतर निसर्ग वारीचे मंगळवारी सकाळी धुळोबा डोंगर येेथे आगमन झाले. या परिसरात आज मी खूप दिवसांनी गेलो होतो.अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर असून तिथे गेल्यानंतर खाली डोंगराच्या कुशीत दिसणारे शिवम केंद्र,भव्य पाझर तलाव आणि निसर्गाने उधळण केलेली रंगसंगती पाहून खूप आनंद झाला.
श्री धुळोबा डोंगरावर १६ मोठी झाडे लावायची होती, ती खाली उतरवली. महादेव मंदिर केवळ अडीच किलोमीटर आहे असे आम्हाला सांगण्यात आले, मात्र हे मंदिर कुठेही दिसत नव्हते. धुळोबाला नमस्कार करून आम्ही चालावयास सुरुवात केली, हरिपाठ सुरू केला.अतिशय सुंदर असा हा ट्रेक होता. निसरड्या रस्त्यातून, घनदाट झाडीतून तर कधी पठारावरुन चालताना मजा येत होती.
दोन दिवसांपासून सुरू झालेला पाऊस आणि त्यामुळे निसरडी बनलेली पायवाट तुडवत शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे रणजित शिंदे, ब्रिजेश रावळ, मुकूंद पोतदार उर्फ बंटी भैय्या, नंदू खडतरे, गणेश पवार यांच्यासह मदतीसाठी आलेले किल्ले सदाशिवगडचे दुर्गसेवक आबासाहेब लोकरे, संदीप मुळीक, राहुल जाधव, पकंज पांढरपट्टे, नरेंद्र मुळीक, चंद्रजीत पाटील यांनी अडथळ्यांवर मात करत सर्व झाडे धुळोबा डोंगर पायथ्यापासून डोंगरावर नेली.या कामी कराडमधील खांबे वॉच कंपनीचे विश्वास खांबे आणि कराडमधील श्रीकृष्ण एंटरप्रायझेसचे हरेश पटेल, महेंद्र पटेल, अशोक पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले होते. पटेल बंधू तर सर्वात अगोदर सकाळी सहा वाजताच घारेवाडीत पोहचले होते.
सर्व मावळे वरती मंदिरापर्यंत पोहचले होते मात्र ट्रेकिंगचा अनुभव नसल्यामुळे आम्ही राम कृष्ण हरी ,छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशी घोषणा देत हळू वरती मार्गक्रमण करत होतो.आज आमच्या सोबत ओगलेवाडी येथील व्यापारी माझे मित्र धनंजय राजमाने सहभागी झाले होते. आम्ही प्रत्येकाने सोबत एक झाड,पाण्याचा कॅन घेतलेला होता. दम लागला की अनेक वेळा थांबावं लागलं. मधूनच रिमझिम पाऊस येत होता. रस्ता घसरटी असल्यामुळे एकमेकाला शाब्दिक आधार देत आम्ही चालत राहिलो. पुढे विस्तीर्ण पठारावर आल्यानंतर संपूर्ण परिसर अतिशय सुंदर दिसू लागला. कोळेवाडी, शिंदेवाडी, तुळसण, तारुख ही गावे इवलीशी दिसत होती. समोर असणारा आगाशिवगड, वसंतगड आम्हाला वाकुल्या दाखवत होता. मधूनच बारीक पाऊस येत होता. डोंगरावर धुके येत होते.या निसर्ग वारीतील हा पावसाचा आमचा पहिला अनुभव. प्रत्येक वर्षी वारीमध्ये पाऊस येतोच, मात्र गेली काही दिवस आला नव्हता. आज मात्र आम्हाला पावसाने गाठलेच. रिमझिम पावसात मधूनच सूर्यप्रकाश दर्शन झाले आणि हा परिसर अजूनच खुलून दिसायला लागला.
आठच्या सुमारास आम्ही महादेव मंदिरासमोर पोहचलो. मंदिरा समोर मोठ्या दिमाखाने फडकत असलेल्या भगव्या झेंड्याला आम्ही वाकून नमस्कार केला. त्या ठिकाणी अगोदरच गेलेले शिवराय ट्रेकिंगचे मावळे वृक्षारोपणाची तयारी करत होते. आमचे रणजीत नाना पाटील त्यांना मदत करत होते. डोंगरावर पोचल्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. छोटेखानी मंदिरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही जाऊन उभे राहिलो. पाऊस थांबत नसल्याने पावसात सर्व मावळ्यांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केले. आज वृक्षारोपण करण्याचा आनंद फार वेगळाच होता. डोक्यावर जोरदार पाऊस पडत होता, हवा वाहत होती. सगळे पावसात भिजत असुनही कुणाचे लक्ष पावसाकडे नव्हते, सगळ्यांचे लक्ष्य एकच होते झाडे लावायची, झाडे लावायची आणि झाडे लावायची. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणून आम्ही याठिकाणी आणलेली पाच वडाची झाडे लावली तर शिवराय ट्रेकिंग ग्रूपने इतर अकरा झाडे लावली.
*आता शिवराय ट्रेकिंग ग्रुप कराडबद्दल थोडसं*
... हा ग्रुप सन २०१२ साली अस्तित्वात आला. किल्ले लिंगाणा, कळसुबाई शिखर यांच्यासह राज्यातील गडकोटांची भ्रमंती व संवर्धन कार्यात हा ग्रुप अग्रेसर आहे. कराड तालुक्यातील सह्याद्रीच्या विविध डोंगर रांगा तुडवत असताना हा ग्रुप धुळोबा डोंगरावर गेला होता. त्यावेळी तेथील श्री शंभू महादेव मंदिराची अवस्था पाहून या ग्रुपच्या मावळ्यांना खूप वाईट वाटलं आणि या ठिकाणी नव्याने मंदिर उभारण्याचा निर्धार शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या मावळ्यांनी २०१९ साली केला होता. केवळ निर्धार न करता ग्रुपमधील मावळ्यांनी स्वतःच्या खर्चातून मंदिराची उभारणी करण्याचे ध्येय बाळगत १९ नोव्हेंबर २०१९ रोजी मंदिराच्या जिर्णोद्धारास प्रारंभ केला होता. धड पायी चालता येत नाही अशा अवघड पायवाटेने २० ते २५ किलोचे ओझे वाहून विटा, वाळू, खडी, सिमेंट पायथ्यापासून डोंगरवर नेत शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या मावळ्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानसह दुर्गसेवकांना शिवराय ट्रेकिंग ग्रुप नेहमीच मोलाची मदत करतो. किल्ले सदाशिवगड दुर्गसेवकही शिवराय ट्रेकिंग ग्रुपला धुळोबा डोंगरावरील शंभू महादेव मंदिर परिसराच्या विकासासाठी श्रमदान करून मोलाची मदत करतात आणि मंगळवारी हेच पहावयास मिळाले. सर्वांचे परिश्रम पाहून अवाक् झाल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही.
मंगळवारी निसर्ग वारीसाठी निवडलेल्या एका एका झाडाचे वजन जवळपास १५ ते १६ किलो इतके होते. इतके वजन अंगावर घेत निसरड्या वाटेवरून पावसात भिजत पायथ्यापासून सर्व मावळ्यांनी झाडे डोंगरावर नेल्याने आम्हाला मावळ्यांच्या अथक परिश्रमाची जाणीव झाली. कारण पायवाटेने मोकळे असूनही आम्हाला धड चालता येत नव्हते. एकमेकांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळेच शिवराय ट्रेकिंग ग्रुपसह किल्ले सदाशिवगड दुर्गसेवकांच्या परिश्रमाला कोणत्या शब्दात दाद द्यायची ? हेच आम्हाला उमजत नव्हते.
झाडं लावून आम्ही सर्वांनी जय शिवाजी...जय भवानी, राम कृष्ण हरी असा जयघोष करत मोठ्या उत्साहात फोटोमध्ये आठवणी टिपल्या. या ठिकाणी शिवराय ट्रेकिंग ग्रुपने वृक्ष संगोपनासाठी किल्ले सदाशिवगड दुर्गसेवकांच्या मदतीने ठिबक सिंचन केले आहे. त्यामुळे आम्ही लावलेल्या ५ वडाच्या झाडांसह अन्य १६ झाडांचे नक्की संगोपन होणार याचा आम्हाला विश्वास आहे.
ही झाडे लावून परत येताना जो प्रवास होता तो आयुष्यात कधीही न विसरण्यासारखा आहे. गड, टेकडी चढून जाणे एकवेळ सोपे असते मात्र उतरणे फार मोठे दिव्य असते. उंच टेकडीवरून खाली येताना आम्हाला खुप काळजी घ्यावी लागली. नुकताच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. अशा या निसरड्या रस्त्यातून एकमेकाचा हात धरत आम्ही खाली उतरू लागलो. आज शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे मावळे आमच्यासोबत नसते तर घसरगुंडी करत, जखमी होऊन आम्हाला खाली यावे लागले असते. मात्र या मावळ्यांनी आम्हा सर्वांना हात दिला,आमची काळजी घेतली आणि सुखरूप आम्हाला खाली आणले. माऊलींनी आमच्या सर्वांसाठी ही अतिशय चांगली व्यवस्था केली होती. हा अर्धा तासाचा प्रवास खरंच अविस्मरणीय असा होता.
साडेनऊच्या सुमारास आम्ही धुळोबा मंदिरात पोहचलो. सारे पावसात चिंब भिजलेले होतो, कपडे सुकवली. येथे बसून थोडा आराम केला. सभागृहात बसून आम्ही भडंग चहा घेतला आणि सर्वांचा निरोप घेऊन आम्ही परत यायला लागलो.
येताना चचेगांव येथील कुमार पाटील आटकेकर यांच्या फार्म हाऊस मध्ये आम्ही इडली सांबर प्रसाद घेतला. कुमार पाटील यांनी आमचे अतिशय आनंदाने स्वागत करत पाहुणचार केला. माऊलींना नमस्कार करून आम्ही अकरा वाजता कराडात परत आलो.
आजची वारी ट्रेकिंग वारी होती. आज खुप आॉक्सिजन आणि आनंद मिळाला. धुळोबाच्या डोंगरावर खरंच एकदा गेले पाहिजे आणि या डोंगरावरून पुढे अडीच किलोमीटर असणाऱ्या महादेव मंदिराकडे पण आपण नक्की जाऊन या. हा ट्रेक करताना आपल्यासोबत हा भाग माहित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाणे हे आपल्या हिताचे ठरेल.
जय शिवाजी...
जय भवानी
जय धुळोबा.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

१२ जुलै २०२१

विंग गाव

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१२ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आजच्या आमच्या निसर्ग वारीला सुरुवात झाली ढेबेवाडी खोऱ्यातील विंग येथून. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने सुरली घाट,शामगाव घाट, मसूर परिसर,उंब्रज परिसर ,तळबीड परिसर तसेच विजयनगर तांबवे परिसर करत आम्ही आज कराड-ढेबेवाडी रस्ता परिसरात आलो होतो. विंग फाट्यापासून ६.३० वाजता चालायला सुरुवात केली. या ठिकाणी आमच्या स्वागतासाठी नवीन ओळख झालेले अमोल खबाले पाटील आले होते. त्यांच्यासोबत आम्ही गावात निघालो.
विंग गाव राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. कराड दक्षिणमधील सर्व निवडणुकीचा शुभारंभ विंगच्या मारुती समोर नारळ फोडून केला जातो. मारुती मंदिरासमोर ७ वाजता पोहचलो. या चौकात वडाचा वृक्ष आहे, त्या समोर अनेक सभा झाल्या आहेत संपूर्ण नवीन गावाला प्रदक्षिणा घातली अन पूढे निघालो.
विंग गावातील अनेक लोक माझ्या ओळखीचे आहेत मात्र पंढरीच्या वारीच्या निमित्ताने माझ्या आणि रणजित पाटलांच्या ओळखीचे झालेले बारा नंबर दिंडीतील अनेक वारकरी आमचे जीवाभावाचे आहेत. वर्षभर त्यांच्याशी आमचा संपर्क असतो. आळंदी ते पंढरपूर माझी जेव्हा पहिली वारी झाली निवास खबाले पाटील यांचा एम एस 94 95 नंबरचा एक ट्रक माझा वारीतील सोबती होता. निवास खबाले हे अनेक वर्षापासून बारा नंबर दिंडीसाठी आपला ट्रक घेऊन वीस दिवस सहभागी असतात. या ट्रक मधून वारकऱ्यांचे सर्व साहित्य नेले जाते. विंग मध्ये आल्यानंतर निवास खबाले यांची आठवण झाली आणि तेवढ्यातच निवास खबाले आमच्यासमोर आले. याला योगायोग म्हणायचा की माऊलीची कृपा हेच मला कळले नाही.राम कृष्ण हरी म्हणून त्यांची चौकशी करून आम्ही पुढे निघालो.
मघाशी सांगितल्याप्रमाणे या पालखी सोहळ्यात मिळालेले विंग गावातील आणखीन 3 सहकारी म्हणजे बाळासाहेब कुराडे आणि पांडुरंग होगले,संजय खबाले. या वारकऱ्यांसोबत माऊलीच्या सोहळ्यातील अनेक आठवणी आहेत. गावातून आम्ही पुढे जात असताना टप्प्याटप्प्याने आम्हाला हे तिन्ही सहकारी येऊन मिळाले.
अमोल खबाले सुरुवातीपासून आमच्यासोबत दिंडीमध्ये सहभागी झाले होते, गावातून बाहेर आल्यानंतर विंग खिंड येथे वृक्षारोपण करण्याचे आमचे नियोजन होते, त्यानुसार आम्ही हरिपाठ करत पुढे चालत राहिलो.
खिंडीच्या जवळ आल्यानंतर डावीकडे वळून आम्ही कानिफनाथ मंदिराकडे जायला निघालो. या मंदिराकडे जाणारा रस्ता कच्चा, चिखलाचा होता. विंग फाटा ते खिंड तीन किलोमीटर अंतर आम्ही डांबरी रस्त्यावरून आलो होतो,आता चिखलातून जायचे होते. पाऊस पडून गेला होता .या रस्त्यातून शेतकरी येताना आम्ही पाहिले. अशा चिखलातून सुद्धा एक शेतकरी सायकलवरून उसाचे ओझे कसेबसे घेऊन निघाला होता, त्याचे हे कष्ट पाहून आम्हाला या रस्त्याचे काहीच वाटले नाही. त्या शेतकऱ्याला भेटल्यानंतर त्याने 'हे आमचं रोजचंच काम आहे असे सांगून सगळे दर वाढतात मात्र दुधाचे दर का वाढत नाहीत आणि दुधाचे दर वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात तेवढे पैसे का मिळत नाहीत' असा सवाल करून तो तिथून निघून गेला. शेतकऱ्यांच्या समस्या बाबत बोलावं तेवढं कमी आहे. यावर चर्चा करत आम्ही पुढे आलो.
एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर पुढे डांबरी रस्ता आला आणि तिथे श्रीकृष्ण सिटी हा बोर्ड पाहिला. तेथून पुन्हा डावीकडे कानिफनाथ मंदिराकडे जाण्याचा रस्ता ओढ्यातून होता. ओढ्यात संथ पाणी वाहत होते आणि अतिशय सुंदर असा तो नजराणा होता.ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्यात माशासारखी बेडकांची पिल्ले विहार करत होती. बेडकांच्या जीवनक्रमामध्ये पाण्यात पोहणारी छोटीची पिल्ले माशासारखे असतात, त्यानंतर त्यांचे शेपूट निघून जाते व ती पिल्ले मोठी होऊन जमिनीवर येतात, असे आम्हाला उपस्थित अमोलनी सांगितले. पाण्याच्या प्रवाहात अनेक छोटे छोटे जलचर होते. त्यापैकी सर्वांच्या ओळखीचा एक जलचर म्हणजे निवळी. निवळी हा जलचर पाण्याच्या पृष्ठभागावर झिगझँग सारखा पोहत असतो. अस्वच्छ झालेले पाणी पाच मिनिटात तो स्वच्छ करतो. अशा ओढ्याच्या ओघळीच्या रस्त्यावरून चालताना आम्हाला खूप मजा येत होती.
निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा आनंद शेतकरी दररोज घेतात मात्र आज आम्ही घेत होतो. तेवढ्यात डोक्यावर मक्याचे ओझे घेऊन येणारा एक शेतकरी आम्हाला भेटला, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही कुणीतरी अधिकारी आहे अशा भीतीने तो आमच्याशी न बोलता तिथून निघून गेला. पुढे आलो उजव्या बाजूला कानिफनाथ मंदिराकडे जायला रस्ता होता. मंदिरासमोर पोहचलो. हे एक छोटेसे मंदीर आहे. या कानिफनाथांच्या नावानेच विंगातून प्रत्येक वर्षी पंढरपूरला दिंडी जाते, ही दिंडी फक्त कार्तिकी एकादशीला असते. नाथांना नमस्कार करून आम्ही परत आलो. येताना नाथपंथातील गुरुशिष्य परंपरेविषयी माहिती घेतली. नाथपंथातील शेवटचा अनुग्रह निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिला आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सर्व जगाला ज्ञानरूपी अनुग्रह दिला,असा नाथपंथाचा इतिहास आहे.
पुन्हा त्याच रस्त्याने विंग खिंडीत पोहोचलो. या खिंडी जवळ गावचे श्रद्धास्थान असणारे म्हसोबाचे मंदिर आहे. खूप जुने छोटेखानी हे मंदिर आहे. या मंदिरासमोर आम्ही सर्व मान्यवर वारकऱ्यांच्या उपस्थित खड्डा काढला आणि वडाचे झाड लावले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष केला.
दरम्यान पांडुरंग होगले माऊलींनी सर्वांच्या डोक्यावर गंध अबीर लावला. खूप दिवसातून हा गंध डोक्यावर लावायचा संधी मिळाली. दोन वर्षापूर्वी पंढरीच्या वारीत डोक्यावर गंध लावला होता. वारकरी संप्रदायाची ती परंपराच आहे. गंध बुक्का टिकली लावण्याचे सर्व साहित्य माळकरी, वारकऱ्यांच्या बॅगेत असते. तो सकाळची नित्य पूजा करून डोक्यावर गंध लावतोच. आमच्यासारख्या वारकऱ्यांच्या डोक्यावर गंध लावण्यासाठी संपूर्ण वारीत अनेक जण भेटतात. गंध लावणारे छोटे व्यावसायिक आहेत,या माध्यमातून वारीत मोठा व्यवसाय होतो. विंगच्या खिंडीत झाड लावून झाल्यानंतर आम्ही गावात येऊन बाळासाहेब कुराडे यांच्या घरात चहा पाणी घेतले. आणि विंग खिंडीतून धोंडेवाडी मार्गे कराडला परत आलो. येताना काले टेक नर्सरीत वडाचे व इतर झाडांची चौकशी केली. या नर्सरीमध्ये एक खूप मोठी गोगलगाय पहिली. एवढी मोठी गोगलगाय मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली.
निसर्ग वारीमध्ये आम्ही आज निसर्गाचा पुरेपूर आनंद लुटला. डांबरी रस्ता,चिखलाचा रस्ता आणि ओढ्याचा रस्ता या तिन्ही मार्गावरून आम्ही चाललो. अतिशय सुंदर असा अनुभव होता.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...