फॉलोअर

०४ नोव्हेंबर २०१६

विस्कळीत आघाड्यांतील सेटलमेंट

विस्कळीत  आघाड्यांतील "सेटलमेंट'

27 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी कराड शहरात ओढून-ताणून एकत्र आलेल्या, वैयक्तिक द्वेषापोटी वेगळ्या झालेल्या नेत्यांच्या आणि विरोधाला विरोध म्हणून तयार झालेल्या आघाड्यांमध्येच सामना रंगणार आहे. 5 वर्षे गुण्यागोविंदाने सुख - दु:खाच्या वाटणीत एकत्र राहिले, तेच आता लोकशाही नव्हती एकाधिकारशाही होती असे म्हणत जनशक्तीचा नारा देत विरोधात उभे ठाकले आहेत. केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गोळाबेरीज नेत्यांनी भविष्यातील सत्तेचा लाभ डोळ्यासमोर ठेवून एकत्र येण्याचा देखावा केला आहे. शिवसेनेनेही आम्ही "संपलोय पण संपलेलो नाही' असा केविलवाणा प्रयत्न करत कसेबसे उमेदवार जमवले आहेत. एम आय एम , बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, कराड शहर नागरी विकास या पार्ट टाईम आघाड्या नाही म्हणायला उभ्या आहेत ! माजी मुख्यमंत्र्याचा वैयक्तिक करिश्मा वगळता कॉंग्रेस शून्य आहे.



नगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी लोकशाही आघाडीने नगराध्यक्ष पदासहीत अन्य 22 जागांवर उमेदवार दिले आहेत. आ. बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व मानणारी लोकशाही आघाडी शहरातील सर्वात मोठी आघाडी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात ज्येष्ठ नेते पी.डी. पाटील यांना मानणारा आणि निवडणुकीतही त्याच्या पाठीशी राहणारा 35 टक्के मतदार आहे. हा मतदार संपूर्ण शहरात विभागलेला आहे.

2001, 2006, 2011 मध्ये  झालेल्या सर्वच निवडणुकीत लोकशाही आघाडीने कोणाची तरी साथ घेत सत्ता काबिज केली आहे. 2001 साली थेट जनतेतून शारदा जाधव नगराध्यक्षा झाल्या.  मात्र लोकशाही आघाडी आणि नगरविकास आघाडीक  एकत्र येऊन 16 जागांवर विजयि झाले होते. 2006 मध्ये लोकशाही आघाडी स्वतंत्र लढली आणि 12 जागांवर विजयी  झाली. डॉ. अतुल भोसले यांच्या 3 आणि एका अपक्षांचा पाठींबा घेऊन ही आघाडी अडीच वर्षे सत्तेत राहिली. 2011 मध्ये जजनशक्ती आघाडीमध्ये  फुट पडून राजेंद्रसिंह यादव यांचा गट लोकशाहीला मिळाला आणि 21 जागा जिंकून ही आघाडी पुन्हा सत्तेत आली. या तिन्ही निवडणुकींचा विचार करता सत्तेत येण्यासाठी आवश्यक 15 ते 20 टक्के मतांचा आधार लोकशाही आघाडीला इतरांकडून घ्यावाच लागला आहे.

5 वर्षांचा सुखाचा संसार सोडून लोकशाही आघाडीतून राजेंद्रसिंह यादव आणि जयवंत पाटील ययांचा गट आज पुन्हा जनश्नतीला जाऊन मिळाला आहे. 2011 साली 18 जागांवर उमेदवार उभे करून लोकशाहीचे 16 उमेदवार विजयी झाले होते. तर याच आघाडीच्या बॅनरखाली राजेंद्रसिंह यादव यांना मानणारे 5 सदस्य विजयी झाले होते. आज लोकशाही आघाडीने 22 जागांवर उमेदवार देताना तडजोडी स्विकारल्या आहेत. धक्कादायक निकालापेक्षा सन्मानाने थांबण्याचा निर्णय घेताना सुभाषराव पाटील यांनी किंगमेकरची भूमिका स्विकारली आहे.

ताकद असूनही किंवा वर्षानुवर्षे त्याच्या गटाशी एकनिष्ठ अनेक कुटुंबे असतानाही प्रभाग क्र. 6 आणि 10 मध्ये  त्यांनी उमेदवार दिलेले नाहीत. प्रभाग क्र. 8, 9 आणि 11 प्रभागात  एक-एकच उमेदवार दिला आहे. यादव आणि पाटील यांनी 5 वर्षे हेवा वाटेल असा संसार केला आहे. मनाने एकत्र असलेले हे दोन्ही गट पाच वर्षांत सर्वच चांगल्या - वाईट गोष्टीत समान भागीदार होते. तत्याच्यावर लक्ष ठेवायला किंबहुना सुख-दु:खाच्या भागीदारीत जयवंत पाटील हे  सोबत होते. सुभाषराव पाटील, राजेंद्रसिंह यादव, जयवंत पाटील या तिघा नेत्यांनी भांडणे न करता कारभार केला. आज प्रभाग 10 मध्ये राजेंद्रसिंह यादव तर प्रभाग 8 मधून जयवंत पाटील उभे आहेत. या दोन प्रभागांत लोकशाही आघाडीला सक्षम उमेदवार देता आला असता पण का दिला नाही ? याची कारणे कराडकरांना चांगलीच ठाऊक आहेत.

जयवंत पाटील आणि राजेंद्रसिंह यादव लोकशाही आघाडीला कदापिही सोडून जाणार नाहीत, अशी खात्री सुभाषराव पाटील यांना होती. त्यामुळेच बेरजेचे राजकारण करत सुभाषकाकांनी दोघांशीही चांगले संबंध ठेवले. शेवटच्या टप्प्यात जयवंत पाटील आणि सुभाषकाका यांचे संबंध फारच ताणले. मात्र यादव आणि सुभाषकाका यांचे सलोख्याचे संबंध राहिले. भविष्ङ्माकत राजेंद्रसिंह यादव यांच्या  ताकदीचा फफायदा घेता यावा. नगराध्यक्ष एका गटाचा आणि बहुमत दुसऱ्या गटाचे अशी परिस्थिती निर्माण झाली तर यादव-पाटील युती पुन्हा करणे सोपे व्हावे या दृष्टीने राजेंद्रसिंह यादव यांच्या  विरोधात लोकशाहीने उमेदवारी न ददिल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्र. 6 मधून उभ्या असलेल्या शारदा जाधव यांचा पाठींबा, जुने संबंध आणि ताकद विचारात घेऊन लोकशाहीने येथे  थांबणेच पसंत केले आहे. राजेंद्रसिंह यादव आणि अरुण जाधव  यांच्या  गटानेही प्रभाग क्र.4  आणि 1 मध्ये  लोकशाही आघाडीच्या उमेदवाराविरोधात त्यामानाने सक्षम उमेदवार दिलेले नाहीत. यादव -जाधव आणि सुभाषकाका यांच्या  पडद्यामागील  तडजोडीची कराडात चर्चा सध्या आहे. प्रभाग 4 मधून आप्पा माने यांच्या  उमेदवारीसाठी जयवंत पाटील यांचा  आग्रह होता. पण अशोकराव पाटील यांचे नाव पुढे आले.आप्पा माने यांना उमेदवारी न दिल्यास जबाबदारी घेणार नाही, असा पवित्रा जयवंत पाटील यांनी घेतला होता. अशोक पाटील यांच्या उमेदवारीमुळे जयवंत पाटील मोकळे झाले आहेत. ते आता चार मध्ये फार लक्ष घालणार नाहीत. प्रभाग क्र. 8 मधून लोकशाही आघाडीला सागर बर्गे यांच्या रुपाने मनसेचा उमेदवार आयात करावा लागला. जयवंत पाटील यांच्या विरोधात  सक्षम उमेदवार न मिळाल्याने लोकशाहीला हा निर्णय घ्यावा लागला, अशी चर्चा शहरात आहे.

प्रभाग क्र. 11 मध्ये जनशक्ती आघाडीच्या स्मिता हुलवान यांच्या  विरोधात लोकशाहीने उमेदवार दिलेला नाही. प्रभाग क्र. 5 प्रमाणेच 11 मध्येही लोकशाहीला उमेदवार आयात करता आला असता. मात्र  स्मिता हुलवान यांच्या मुळे गेल्या 5 वर्षांत झालेला त्रास पाहता त्यांना पराभूत करण्यासाठीच सुभाषराव पाटील यांनी आताचे विरोधक (15 दिवसांपूर्वीचे लोकशाहीचे घटक) आणि जनशक्तीकधील घटकांशी जुळवून घेत हुलवान यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली नाही. यादव आणि पाटील यांचा 5 वर्षांच्या संसारातील कडू-गोड आठवणींचा उमेदवार देताना विचार केला गेला आहे, असे कराडकर उघडपणे बोलत आहेत.

"धरलं तर चावतंय.. सोडलं तर पळतंय..' अशी अवस्था माजी मुख्यामंत्री पृथ्वीराज चव्हाण  गटाची झालेली आहे. वास्तविक कराड शहरात पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा, त्याच्यावर प्रेम करणारा फार मोठा वर्ग  आहे. पण हा वर्ग म्हणजे कॉंग्रेस पक्ष नव्हे . कॉंग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर असणारे आठ- दहा जे लोक आहेत, ते फक्त  पृथ्वीराज चव्हाण यांचा फायदा घेण्यासाठीच आहेत, हे कटू सत्य आहे. राज्यभर कार्यकर्ताचा उपयोग ( वापर ) करून घेणारे हजारो लोकप्रतिनिधी आहेत.  पण लोकप्रतिनिधी (पृथ्वीराज चव्हाण) यांचा वापर करून घेणारे अनेक जण कराडात आहेत. या लोकांनी बाबा मुख्यमंत्री असताना त्याचा फायदा घेतला. पण कॉंग्रेस पक्ष वाढीचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळेच इच्छा असूनही पृथ्वीराज चव्हाण यांना कॉंग्रेस चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे  घ्यावा लागला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या  नेतृत्वाखाली जनशक्तीतच्या झेंड्यावर  अरुण जाधव, राजेंद्रसिंह यादव आणि जयवंत पाटील एकत्र आले आहेत. या तिघांनाही बाबांच्या नेतृत्वाखाली एकत्र यायला कधीच अडचण वाटत नाही. मात्र कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आलो तर बाबांचे सोडून इतरांचेच ऐकावे लागेल. पालिकेचा कारभार नको त्यांच्या  हातात जाईल. याची पूर्ण जाणीव असल्यानेच कॉंग्रेसच्या चिन्हावर लढण्यास या तिघांनीही नकार दिला. दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्व निवडणुका हाताच्या चिन्हावरच लढाव्यातत, असा आग्रह आणि दबाव कॉंग्रेस श्रेष्ठींकडून वाढत होता. पृथ्वीराज चव्हाणांनी तो निर्णय घेण्याचे निश्चितही केले. मात्र त्यावेळी त्याच्यासोबत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक राहिले (छाननीवेळी त्यांची नावे कळली ). पृथ्वीराज बाबा चालतात मात्र चिन्ह नको, असा विचार असणाऱ्या जाधव-यादव-पाटील यांच्या आघाडीने पुन्हा एकदा दुसरीकडे बोलणी सुरू केली आणि मनात नसतानाही पृथ्वीराज चव्हाण यांना जनशक्ती आघाडीसोबत फरपटत जावे लागले. वास्तविक मुख्यमंत्री असताना त्यांनी भरपूर  निधी दिला.  मात्र  कॉंग्रेस पक्ष वाढविण्यासाठी  कधीच लक्ष दिले नाही. ही जबाबदारी त्यांनी बगलबच्च्यांवर सोपविली. मात्र या बगलबच्च्यानी स्वत:चा फायदा करून घेतला. विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेस पक्षावर असलेल्या प्रेमापोटी नव्हे तर पृथ्वीराज चव्हाण ययांनी दिलेल्या भरभरुन निधीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कराडकरांनी हाताला मतदान केले. मात्र तो हात पालिकेच्या निवडणुकीत आणण्याची संधी पृथ्वीराज चव्हाण यांना बगलबच्च्यानी केलेल्या चुकांकुळे गमवावी लागली.
कराडात डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगांवकर आणि विक्रम पावसकर यांच्या रुपाने दिलेल्या सत्ताकेंद्रांच्या माध्यमातून फिडबॅक घेण्यासाठी पहिल्यापासूनच  भारतीय जनता पक्षाने पक्षचिन्हाचा आग्रह धरला. पक्षाचे चिन्ह डॉ. अतुल भोसले यांच्या  उमेदवारीने विधानसभेवेळी दक्षिणेत पोहोचले होते. मात्र शहरात कमी पडले होते. तरीही शहरातून मिळालेली 10 हजारांच्या घरातील मते भाजपसाठी जमेची बाजू होती. मनात नसुनही मन न जुळणारे भाजपचे नेते कराडात एकत्र आले. नगराध्यक्ष पदासहित 15 जागांवर त्यांनी उमेदवार कसेबसे उभे केले आहेत. मात्र या पक्षांलाही जनशक्ती आणि लोकशाही आघाडीप्रमाणेच अंतर्गत तडजोडी केल्याचे उमेदवारांवरून लक्षात येते.  ब्राम्हण बहुल्य प्रभाग क्र. 4  व 5 मध्ये  ब्राम्हण समाजाचा  उमेदवार न देता प्रभाग क्र. 1 मध्ये या समाजाचे दोन-दोन उमेदवार देऊन भाजपाने काय साध्य केले ? हे न कळण्याइतपत कराडकर नकीच खुळे नाहीत.

भारतीय जनता पार्टी कराडचे नाव पावसकर जनता पार्टी द्यावे लागेल.  लोणंदमध्ये भाजपचा झेंडा लावणाऱ्या जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना जिल्ह्यात भाजप सक्षम करण्याची द्वारे खुली असताना ते कराडात का अडकले आहेत? हा प्रश्न पडतो. भाजपाच्या जुन्या निष्ठावंताना टाळून जवळच्या लोकांना जवळ करताना भाजपानेही कॉंग्रेसच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे काय ? असे संघप्रेमी बोलून दाखवत आहेत. एकाच घरातील 4 जणांना तिकिट देऊन भाजपने आमच्याकडे सक्षम माणसे नाहीत हेच जणू मान्य केले आहे. नाही म्हणायला 13 आणि 14 प्रभागात सोशल इंजिनिअरिंगचा भाजपने प्रयत्न केला आहे. नगराध्यक्ष पदासाठीही चांगला उमेदवार दिला आहे. वास्तविक नगराध्यक्ष पद जिंकणे हाच भाजपचा अजेंडा आहे.

एकंदरीतच कराड शहरात बिघडलेल्या आघाड्यांतील विस्कटलेल्या नेत्यांचे एकत्रिकरण यातून सत्ता मिळविणे हाच अजेंडा सध्या तरी दिसतोय . जनशक्ती आणि लोकशाही आघाडीला एकमेकांविरोधात बोलायला सध्या तरी कोणताच मुद्दा दिसत नाही. रेंगाळलेली कामे, रखडलेला विकास या गोष्टीला या दोन्ही आघाडीतील तीन नेतेच जबाबदार आहेत. लोकशाही आघाडीसमवेत सुखाने संसार केलेले राजेंद्रसिंह यादव आणि जयवंत पाटील आज एकत्र येऊन जाधवांच्या जनश्नती आघाडीच्या झेंड्याखाली बाबांना येऊन मिळाले आहेत. त्यामुळे जनश्नती आघाडी सत्ताधारी लोकशाही आघाडीचीच झेरॉक्स कॉपी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

भाजपाच्या आघाडीत असणारे कारभारी पाच वर्षे अनेक महत्वाच्या आणि लाभाच्या प्रसंगी सत्ताधाऱ्या सोबतच होते, हे कराडकरांना चांगलेच ठाऊक आहे. "एकाला बाजूला काढायचा आणि दुसऱ्याला उभा करायचा तर दुसराही पहिल्यासारखाच निघाला, असे म्हणायची वेळ सध्या आली आहे.   
                         
(पूर्वार्ध)

२९ ऑक्टोबर २०१६

पाणाडे पाणी कसे ओळखतात

*सुख समाधान नांदो आपल्या घरी*
      *शुभ दिपापली*
*सतीश मोरे, विद्या मोरे आणि कुटुंबीय*
karawadikarad.blogspot.in

〰〰〰〰〰〰〰〰〰


* मनातील प्रश्न....*
*पानाडे पाणी कसे ओळखतात..*
*कृषी दर्पण.....*
*☑विहीर – कूपनलिके करिता*
*महत्वाची जागा कशी शोधाल..!!!*
〰〰〰〰〰〰〰〰〰
_भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे – कसे साठविले जाते, हे विहीर – कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर – कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. या साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळेल. नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर विचर्स किंवा पाणाडे म्हणतात. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात._

जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते. मातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते. जमिनीची धूप; ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे. पाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व त्यामुळेच झरे, कूपनलिका, विहिरी यांना पाणी मिळते.

*पाणाडे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात, ते आपण पाहू.*
*▪1) भूगर्भ व नैसर्गिक वनस्पतींचा अभ्यास –*
डोंगराळ, उंच – सखल भाग, पाण्याने माती वाहून गेलेले खडक, दगड – रेती उघडी पडलेली ओसाड जमीन; तसेच जिथे मातीची साठवण होते ती सुपीक जमीन पाण्याची गती किंवा अडवणुकीप्रमाणे तयार होते. पाणी, अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेप्रमाणे त्या भागात झाडे – वनस्पती उगवत असतात. चुकीच्या जागेवर उगवलेल्या वनस्पतीची वाढ समाधानकारक होत नाही. विशेषतः औदुंबर, ताड, सिंदी, वासन, मंदार, शमी, हरियाली, लव्हाळ, जामून इत्यादी झाडे – वनस्पती पाण्याच्या आश्रयाने चांगल्या वाढतात. म्हणून अशा झाडांजवळ पाणी निश्‍चित असते. मुंग्यांची वारुळेसुद्धा पाण्याच्या जवळपास असतात.

माळरानात सहसा झिरोफाइट्‌स जसे निवडुंग, काटेरी झुडपे, कोरफड, खुरटे गवत अशा प्रकारच्या कमी पाण्याची गरज असणाऱ्या वनस्पती उगवतात. या भागात पाणी नसते याची जाणीव पाणाड्यांना असते.

*2) “वाय’ आकाराच्या झाडाच्या फांदीचा प्रयोग –*
पेन्सिलच्या जाडीची, लवचिक, ताजी, “वाय’ आकाराची विशेषतः उंबर, जामून, मेंदी या झाडांच्या फांदीचा उपयोग पाणी शोधण्यासाठी होतो. पाणाड्या ही फांदी दोन्ही हातांनी छातीजवळ धरून “वाय’चे खालचे टोक समोर करून जमिनीवर चालतो. चालताना एखाद्या ठिकाणी फांदी विशिष्ट धक्का देते, या धक्‍क्‍यांची जाण ठेवून जमिनीतील भरपूर पाण्याचे ठिकाण ठरविता येते.
*3) लोलक –*
लोलक पाच ग्रॅम वजनाचा कोणत्याही धातूचा बनविलेला असतो. याच्या वरच्या बाजूने एक- दोन फूट लांबीचा दोरा बांधलेला असतो. त्याची खालची बाजू अणकुचीदार असते. लोलकाचा दोरा हातात धरून पाणाडे शेतात सावकाश चालतात. लोलक पाण्याची दिशा दाखवितो, त्या दिशेनेच चालताना एखाद्या ठिकाणी लोलक गोलगोल फिरतो. या ठिकाणी पाणी असते. दोऱ्याची लांबी व लोलकाची फिरण्याची गती यावरून पाण्याची खोली व पाण्याचे प्रमाण निश्‍चित करता येते. हा प्रयोग कमी खर्चाचा; पण अनुभवावर आधारित आहे.
*4) नारळाचा प्रयोग –*
प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा व त्याचे डोळे बंद करून घ्यावेत. दुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते. फिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते.
प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो. फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो. ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते, त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो.
जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्‍चित होते. जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे.
*5) पाणी आवडणारे प्राणी प्रयोग –*
याकरिता मोठे बेडूक, खेकडे वापरतात. हे प्राणी बहुसंख्येने आणून सूर्यास्तानंतर शेतीच्या मध्यभागी मोकळे सोडावेत. ते रात्री पाण्याच्या शोधात जमिनीवर हिंडतात, सूर्योदयापूर्वी हे प्राणी जिथे एकत्रित होतात, ती जागा निश्‍चित पाण्याची असते. खेकडे पाणी असलेल्या ठिकाणी जमीन कोरण्यास सुरवात करतात. शेतीत पाणी नसल्यास हे प्राणी इतरत्र पळून जातात. कोरड्या विहिरीत भरपूर खेकडे व त्यांचे अन्न पुरवल्यास हे खेकडे या विहिरी सजल करतात, असा अनुभव आहे.
*6) आकाशातील वीज –*
उच्च दाबाची कडाडणारी वीज ओल्या जमिनीकडे प्रकर्षाने आकर्षित होते. पावसाळ्याच्या सुरवातीला ज्या ठिकाणी जमिनीवर वीज पडते, त्या ठिकाणी जमिनीत भरपूर पाणी असते. जमिनीवर धातूचा साठा, उंच झाड, उंचवटा याचा विचार करणे गरजेचे आहे.
*7) स्ट्रेटा रेजिस्टीवीटी मीटर –*
हे विजेच्या बॅटरीवर चालणारे यंत्र आहे. या यंत्रात चार धातूचे इलेक्‍ट्रोड, बॅटरी, मायक्रो व्होल्ट मीटर, मायक्रो ऍमीटर व इलेक्‍ट्रोड जोडणारी इन्सुलेटेड वायर, पाणी, एक तंत्रज्ञ व चार- पाच मजूर लागतात. प्रथम ऍमीटर, बॅटरी व इलेक्‍ट्रोड वायरने जोडतात. इलेक्‍ट्रोड जमिनीत खोचून पाणी घालून मातीचा व इलेक्‍ट्रोडचा संबंध पक्का करतात. त्याप्रमाणे ऍमीटर प्रवाह दाखविते. ऍमीटर इलेक्‍ट्रोडच्या अगदी मध्यभागी 10-20 फूट अंतरावर दोन इलेक्‍ट्रोड जमिनीत खोचून पाणी दाब दाखविते, त्याची नोंद करतात. नंतर ऍमीटर इलेक्‍ट्रोड मधील अंतर बदलून ऍमीटर व व्होल्ट मीटरच्या अंतराप्रमाणे अनेक नोंदी करतात. जसजसे ऍमीटर इलेक्‍ट्रोडचे अंतर वाढते तसातसा वीज प्रवाहास अडथळा होतो; पण ज्या ठिकाणी भरपूर पाणी असते तेथे वीज प्रवाहास अडथळा येत नाही. कारण वीज पाण्यातून सहज वाहते. जेथे वीजप्रवाह खंडित होतो तेथे विनापाण्याचा अभेद्य खडक आहे, असे मानण्यात येते. हा प्रयोग महागडा असून जमिनीतील खनिज संपत्ती, लोखंडी पाइप लाइन चुकीचे मार्गदर्शन करतात.

*पाणी शोध हा बहुधा तार्किक असतो म्हणुन भोंदू लोकांना पैसे देउन होणारी फसवणूक टाळावी. म्हणून तज्ज्ञ व्यक्तीकडून व यंत्र प्रमाणित करूनच वापरावे.*
〰〰〰〰〰〰〰〰〰


२१ ऑक्टोबर २०१६

कराड पत्रकार भवन : प्रवास आणि प्रवासी भाग 1

ठिकाण...
वर्षा मुख्यमंत्री निवासस्थान
दिनांक... 22 मे 2013.

कराडच्या पत्रकारांचे माझ्या वाटचालीत फार मोठ्ठे योगदान आहे,
तुम्ही लोक कधीच माझ्या कडे काहीच मागायला येत नाही.
पण मला तुमच्या साठी काहीतरी करायची इच्छा आहे. 
काहीही सार्वजनिक काम घेऊन या .....  ना. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

या दिवशी सहकुटुंब सहपरीवार आम्ही मुंबईला गेलो होतो, निमित्त होते माझ्या  लग्नाचा वाढदिवस. बाबांसमवेत फोटोसेशन, चर्चा झाली. या दरम्यान माझ्या सोबत बोलताना झालेला बाबांचा वरील संवाद मला आठवतोय.

बाबा मुख्यमंत्री होऊन तीन वर्षे झाली होती. मुख्यमंत्री पद कराडला मिळाल्याने कराडचे नाव तर उंचावले होतेच, पण आम्हा कराडच्या पत्रकारांचे काम आणि सन्मान पण वाढला होता. माझे मुंबई दौरे तर वाढले होतेच शिवाय आमच्या संपादक साहेबाच्या सुचनेनुसार कार्यालयीन कामानिमित्ताने कोल्हापूरला येणेजाणे पण वाढले होते. जेथे जाईल तेथे या मुख्यमंत्याच्या गावचे पत्रकार म्हणून सन्मान मिळायचा. या बाबांच्या जवळचे पत्रकार म्हणून वेगळी ट्रिंटमेंट मिळत होती. माझ्यासहित कराडच्या कोणीही पत्रकारांनी या सर्व बाबींचा कधीच  फायदा घेतला नाही. 

मुख्यमंत्री दौरा कराडला सारखा असायचा, पण या दरम्यान बातमी विषय सोडला तर आम्ही पत्रकार कधीच बाबांकडे गेलो नाही, जात नव्हतो. कधीच त्याना काही मागीतले नाही. कदाचित हीच गोष्ट बाबांना जास्त आवडली असावी आणि त्यामुळेच मी जेव्हा सहकुटुंब  वर्षावर गेलो तेव्हा बाबांनी मला वेळ दिलाच, कुटुंबाची चौकशी केलीच आणि कराडच्या पत्रकाराविषयी काही तरी करायची इच्छा बोलून दाखविली.

मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई 


आमचे मित्र सचिन शिंदे पंढरीची वारी करून आले होते, या निमित्ताने त्याचा सत्कार, वारी अनुभव कथन अशा संयुक्त कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पत्रकार कराड विश्रामगृहात जमलो होतो. यावेळी मुख्यमंत्री म्हणून बाबांनी माझा समोर व्यक्त केलेली इच्छा मी सर्वांना सांगीतली. देवदास मुळे, सचिन देशमुख, सचिन शिंदे, शशिकांत पाटील, गोरख तावरे आम्ही सारे जण या विषयावर बोललो. बरीच चर्चा झाली काय मागावे बाबांना यावर उवापोह झाला . शहरातील पत्रकारांना घरे मिळाली पाहिजेत, प्लाॅट हवा आहे, पत्रकार काॅलनी उभी राहिली पाहिजे, पत्रकार भवन पाहिजे, असा मतप्रवाह आला.

पत्रकार काॅलनी किवा नगर असाव असा विचार पुढे येऊन जागेचा शोध सुरू झाला. शहरात कुठेच शासकीय भुखंड उपलब्ध नसल्याची माहिती कळल्यावर लगतच्या गावात शोध घेतला. तहसीलदार कार्यालयातील अधिकार्यसोबत जवळचे संबंध असलेले  हेमंत पवार यांनी माहिती काढली. सैदापूरात आय टी आय शेजारी शासकीय जागा पहायला आम्ही सारे जण गेलो. जागेचे उतारे काढले, मागणी प्रस्ताव तयार केला.  त्यावेळी पुण्या मुंबईच्या धर्तीवर  शहरातील सर्व पत्रकारांचा क्लब असावा अशी कल्पना पुढे आली.  प्रेस क्लब ऑफ कराड असे नाव मी सुचविले, प्रस्ताव पत्र तयार केले. 


मुख्यमंत्री कराड दौर्‍यावर आल्यावर विश्रामगृहात आम्ही सारे जण पुन्हा त्यांना भेटलो. सोबत गृहराज्य मंत्री सतेज पाटील,  आनंदराव पाटील, ओएसडी धनाजी तोरस्कर होते. आम्ही जागेची मागणी केली. स्पष्टता, पारदर्शकता आणि सडेतोडपणा हा बाबांचा स्थायी स्वभाव आहे, हे आम्हाला माहीत होते. यावेळी त्याचा अनुभव आला. राज्यात कुठेही,  कुणालाही, खाजगी संस्थांना शासकीय जागा द्यायच्या नाहीत, असा मी आणि माझ्या मंत्री मंडळाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे,  त्यामुळे तुम्हाला मी ही जागा देऊ शकत नाही, असे स्पष्ट करून बाबांनी आम्हाला नकार दिला. थोडे वाईट वाटले, पण झुलवत ठेवणारा हा नेता नाही, याचा आनंदही झाला. पत्रकार काॅलनीचा विषय संपला. काही दिवस हा विषय थंड पडला.


कराड विश्रामगृह येथे मुख्यमंत्यासोबत चर्चा 


परत आम्ही सारे एकत्र आलो. आता पुढे काय करायचे, आम्ही पुन्हा विचार सुरू केला. पत्रकार भवनाचा मुद्दा पुढे आला.  कराडात स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर प्रिंट आणि  इलेक्ट्राॅनिक्स मिडिया मधील सुमारे 80 लोक काम करतात , या सर्वाना  एकत्र येण्यासाठी,  प्रेस घेण्यासाठी, खाजगी कार्यक्रम घेण्यासाठी तसेच मिडियातील घडामोडी वर चर्चा करण्यासाठी एखादी जागा असावी ,असा विचार पुढे आला. शहरातील सर्व प्रमुख पत्रकारासोबत चर्चा सुरू केली. दोन्ही बाजूने विचार पुढे आले. काहींनी नाके मुरडली,  अनेकांनी पाठिंबा दिला, पुढे जायचा सल्ला दिला.

पत्रकार भवन कुठे बांधायचे, जागा हवी , तसा प्रस्ताव सादर करायला हवा, याचा विचार करून आम्ही सर्व जण बसलो तेव्हा कराड शहरात नगरपालिकेच्या अनेक जागा आहेत, तिथे आपल्याला जागा मिळेल, असा विचार पुढे आला. याबाबत लोकशाही आघाडी अध्यक्ष सुभाषराव पाटील, तत्कालिन उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी खुप सहकार्य केले.  सचिन देशमुख यांनी या कामी पालिका पदाधिकारी आणि अधिकारी याचा पिच्छा धरला, कामासाठी खुप वेळ दिला. सुभाषकाकानी पालिका अधिकारी वर्गाला बोलावून माहिती मागितली, जागा आम्हाला सुचवल्या, दाखवल्या.

छत्रपती संभाजी महाराज मार्केट मध्ये दुसर्‍या मजल्यावर असणारी जागा पसंत पडली . सर्व शासकीय कार्यालये, दैनिकाची ऑफिसेस तसेच मध्यवर्ती ठिकाण  आणि मुबलक पार्किंग याचा विचार करता ही जागा सर्वोत्तम होती. आम्ही  पालिकेकडे रितसर मागणी केली, सर्वसाधारण सभेत त्याला एकमताने  मंजुरी मिळाली.  त्यानंतर सर्व बाजूंनी विचार करून प्रस्ताव तयार केला आणि तयारीनिशी आम्ही पुन्हा बाबांकडे गेलो. सोबत मुख्याधिकारी प्रशांत थोडे सर्व कागदपत्रे, ठराव, प्लॅन घेऊन आले होते.  बाबांनी माहिती घेतली,  त्या पत्रावर हिरव्या पेनने शेरा मारून मी हे काम मंजूर केले आहे, असे बाबांनी सांगितले.


आम्ही खुप खुश झालो. चला आपले काम झाले म्हणून आनंद झाला. एक महत्त्वाचा टप्पा पार पडला होता,  पण खरे काम यापुढे होते. फक्त सही होऊन चालत नाही,  पुढे पाठपुरावा खुप करावा लागतो, मुंबईला जावे लागते, असा सल्ला काहीनी दिला. धनाजी तोरस्कर यांनी या कामी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. विधानसभा अधिवेशन काळात आम्ही काही जण मुंबईत असायचोच. पुन पुन्हा बाबांना भेटलो. या दरम्यान गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी खुप सहकार्य केले. सचिव,  प्रधान सचिव,  वित्त विभाग आदी वरिष्ठ अधिकार्याना स्वत फोन करून हे बाबांच्या गावचे काम आहे. लवकर पुढील कार्यवाही करा, बजेट तरतुदी साठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना बंटी साहेबांनी दिल्या. आमदार बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा हे काम लवकर व्हावे यासाठी मंत्रालय पातळीवर सहकार्य केले. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी कुठे, कसे जायचे, कुणाला भेटायचे याचे सतत मार्गदर्शन केले.

ऑगस्ट 2014 मध्ये सरकारला निवडणुकीचे वेध लागले होते. लवकर निधी वर्ग होण्यासाठी आम्ही हेलपाटे वाढवले.  सुदैवाने मला पुढारीच्या कामा निमित्ताने या काळात खुप वेळा मुंबईला जावे लागले होते. त्यामुळे वेळ मिळत गेला. माझे  सहकारी सचिन देशमुख,  देवदास मुळे आणि प्रमोद सुकरे कराडात बसून सुत्रे हलवत होते,  तर गोरख तावरे,  शशिकांत पाटील आणि मी मुंबईत तळ ठोकून होतो. खुप मोठ्या घडामोडी होत होत्या. मंत्रालयात, विधानभवनात, वर्षा वर जिथे भेटेल तेथे बाबांकडे पाठपुरावा सुरू होता. 

सरकार मध्ये हालचाली गतीमान झाल्या होत्या. आम्हाला  आमची काळजी लागली होती.  पुढारीच्या कामासाठी सलग 19 दिवस मी मुंबईत मुक्कामी होतो. अधून मधून तावरे येत राहिले.  माझ्या कामाचा पाठपुरावा झाला की लगेच बाबांना पत्रकार भवनाचे निधीची आठवण करून देत होतो. मुख्यमंत्य्याचे ओएसडी तोरस्कर,  प्रमोद शिंदे आणि खाजगी सहायक गजानन आवळकर यांना भेटून फाॅलोअप चालूच ठेवला.

कराड पत्रकार भवनासाठी 55 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, या आशयाचा जी आर 5 सप्टेंबर 2014 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर अपलोड झाला आहे, अशी माहिती फोनवरून तोरस्कर साहेबांनी कळवली. हा निधी जिल्हाधिकारी साताराकडे वर्ग झाल्याचा उल्लेख त्यात होता. याच दरम्यान  आम्ही मुंबई येथे होतो. मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन बाबांची भेट घेतली, आभार मानले.  जी आरची प्रिंट काढली. सर्वाना कळवले, आणखी महत्वाचा एक टप्पा पार पडला होता   .

              .........पुर्वार्ध (2013-2014)

            (दुसरा भाग उत्तरार्ध 2014 -2016 लवकरच )


अत्यंत महत्वाचं :
कराड शहरातील सर्व पत्रकार मित्रानी
या कामी खुप मोठे सहकार्य, पाठबळ दिले आहे.
तुम्ही करताय, करत रहा, असा विश्वास दिला.
किंबहुना सर्वामुळेच हे शक्य झाले आहे.

               .....सतीश मोरे


२० ऑक्टोबर २०१६

कधीकधी मी खुप हळवा होतो !





                            कधी कधी मी खुप हळवा होतो
                            तुझ्या आठवणीत खोलवर गुंततो
                            मग आपली पहीली भेट स्मरतो
                            गुंतलेल्या ह्दयात खोल गुरफटतो
                            कधीकधी मी खुप हळवा होतो !


                  आठवते का ती आपली भेट ?
                  आठवतो का तो पहीला स्पर्श
                  स्मरतो का तुला धडधडता श्वास ?
                  आठवणीने त्या मन व्याकुळ होते
                  कधीकधी मी खुप हळवा होतो !


                               पहाटेचा गार वारा
                               अंगाला फार  झोंबतो 
                               स्पर्श तुझा मज आठवतो 
                               मग श्वास ही थबकतो
                               कधीकधी मी खुप हळवा होतो !


                     तुझ्या रुपाचं कौतिक 
                     वारा कानी माझ्या सांगतो 
                     मी ही मग वेडा होतो
                     वाऱ्याकडे पुन्ह स्पर्श तुझा मागतो 
                     कधीकधी मी खुप हळवा होतो !


                       ........सतीश मोरे






१९ ऑक्टोबर २०१६

सत्प्रिया



             विद्युलता तु
             तुच सहचरिणी
             सखी तुच
             साथी तु ही रे

 उठता बसता मला 
 होतात तुझे भास
 कानामागे जाणवतात 
 तुझे गरम श्वास.

             तुझी साथ सावली मज 
             हवी क्षणोक्षणी
             तुझ्याच सोबतीत 
             बहरतील गुजगाणी


            तुझा विचार करता करता 
            चहा बनवून घेतो 
            जुन्या आठवणी स्मरताना 
            साखर विसरुन जातो.

खिडकी मध्ये बसतो
कप ओठास लावतो 
मग चेहरा तुझा आठवतो 
आणि चहा गोड होतो

                            ......... सतीश मोरे.



११ ऑक्टोबर २०१६

अमिताभ बच्चन

🎉🎊💐☄🎂☄💐🎊🎉
〰〰〰〰〰〰〰〰〰
*☑बच्चन तो बच्चन है!*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*🔺मुंबई बी-टाऊन बुक्समध्येही ‘बिग बी’ अग्रेसर*

‘बच्चन तो बच्चन है साब. इसलिये उनकी किताबें हम सबसे उपर रखते है. उनका बार्गेनिंग भी ज्यादा नहीं होता. क्यो की लेनेवाले को भी पता होता है की, वो बच्चन साथ ले जा रहे है. सब से ज्यादा डिमांड बच्चन साब की ही होती है,’ हे उद्गार आहेत, हुतात्मा चौकात रस्त्यालगत पुस्तके विकाणाऱ्या एका विक्रेत्याचे. आज मोठमोठाल्या मॉल्समध्ये पुस्तकांची एसी दुकाने उभी राहिली आहेत.
🔲🔲🔲
*‌दिलीपकुमारांपासून चेतन भगतपर्यंत अनेक पुस्तके आली. _पण बिग बींच्या पुस्तकांची मागणी कधीच कमी झाली नाही,_ हेच या विक्रेत्यांशी बोलताना जाणवते.*
🔲🔲🔲
या रस्त्यांवर बहुतांश सेकंड हँड पुस्तके विकली जातात. त्यात काही नवी कोरी पुस्तकेही असतात. पुस्तकांची आवड असलेले मुंबईतले तरुण इथे येऊन स्वस्तात पुस्तक खरेदी करतात. या तरुण वाचकांमध्येही बिग बींना प्रचंड मागणी आहे.
🔲🔲🔲
हुतात्मा चौकसमोर असलेल्या सर्वांत मोठ्या ओपन बुक मार्केटमध्ये एक फेरफटका मारल्यानंतर पुस्तकांचे गठ्ठे दिसतात. या गठ्ठ्यांमध्ये, प्रत्येक विक्रेत्याकडे उठून दिसतात ती अमिताभ बच्चन यांचे फोटो असलेली पुस्तके. ‘बिग बींच्या पुस्तकांना इथे प्रचंड मागणी आहे. अनेक विक्रेते दिवसाला बच्चन यांची डझनावारी पुस्तके विकतात,’ अशी माहिती मुंबई नॉवेल बुक वेल्फेअर असोसिएशनचे खजिनदार राजेंद्र चंडेल यांनी दिली. आजही दिवसाला विकल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये किमान चार पुस्तके बिग बींची असतात, अशी माहिती फोर्टमधल्या एका पुस्तक विक्रेत्याने दिली.
🔲🔲🔲
या पुस्तकांची किंमत आठशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामध्ये विशेषतः खालिद महोम्मद लिखित 'टू बी ऑर नॉट टू बी : अमिताभ बच्चन', भावना सोमय्या लिखित 'अमिताभ बच्चन: द लिजंड' आणि जेसिका हाईन्स लिखित 'लूकिंग फॉर द बिग बी' या तीन कॉफी टेबल बुक्सच्या पठडीत मोडणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. खालिद यांनी लिहिलेले पुस्तक ‘बिग बीं’च्या ६०व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आले होते. यात बच्चन यांचे दुर्मिळ फोटो आहेत. तर सोमय्या यांनी त्यांच्या पुस्तकात बच्चन यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. ‘बिग बीं’च्या खालोखाल दिलीपकुमार, देवानंद, रजनीकांत यांच्या पुस्तकांना मागणी असल्याचे चंडेल सांगतात.
〰〰〰〰〰〰〰〰〰
🎉🎊💐☄🎂☄💐🎊🎉

*महानायक श्री अमिताभ बच्चन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*
~~~~~~s~~~~~~~~

11 Oct 2016

अमिताभ @ ७५

मोठा ‘माणूस’ 

----------------


अमिताभ बच्चनच्या वागण्या-बोलण्यात, वावरण्यात एक खानदानी आदब दिसते. अलाहाबादच्या श्रीवास्तवांचे संस्कार लख्ख दिसतात. पिता थोर कवी आणि साहित्यिक असल्याचा सर्वाधिक परिणाम अमिताभच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला स्पष्ट कळून येतो. अमिताभ अभिनेता म्हणून किती श्रेष्ठ आहे किंवा महान आहे, यावर कदाचित एक वेळ चर्चा होऊ शकेल. मात्र, तो एक उत्तम ‘माणूस’ आहे, याबद्दल दुमत होण्याची शक्यता नाही. आजच्या काळात हे माणूसपण दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेलं असताना अमिताभसारख्या बुजुर्ग कलाकाराचं आपल्या आसपास असणं हे किती सुखावह आणि आश्वासक आहे!

अमिताभच्या तरुणपणी जेव्हा तो ‘अँग्री यंग मॅन’ साकारत होता, तेव्हा त्याला प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही. आम्ही कळत्या वयाचे झालो, तेव्हा अमिताभच्या कारकि‍र्दीचा पूर्वार्ध संपून गेला होता. त्याचं पडद्यापलीकडचं अस्तित्व तेव्हा फार काही जाणवायचं नाही. त्या काळात माध्यमेही मर्यादित होती. शिवाय अमिताभ तेव्हा काही फार मीडिया-फ्रेंडली नव्हता, म्हणे. ते काही असो... अमिताभमधलं हे सुसंस्कृत माणूसपण भावलं ते त्याच्या उतारवयात! दुसऱ्या इनिंगमध्ये म्हणजे साधारणतः ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभला आपण पाहिलं, तेव्हा मात्र त्याच्यातला हा गुणविशेष सर्वांच्याच प्रकर्षानं लक्षात आला. एक तर तेव्हा तो जवळपास ५६-५७ वर्षांचा झाला होता. या वयात येणारी एक गोड परिपक्वता त्याच्या अंगात ठायी ठायी भिनली होती. या कार्यक्रमातला त्याचा वावर बघण्यासारखा होता. अमिताभ तेव्हा ऑलरेडी ‘महानायक’ पदाला पोचला होता. सामान्य लोकांना थेट त्याच्याशी संवाद साधण्याची मिळालेली संधी आणि स्वतःच्या प्रतिमेची जाणीव असूनही अमिताभचं त्या सर्वसामान्य लोकांशी वागणं खूप सहज होतं. अमिताभच्या वागण्या-बोलण्यातली नम्रता, आदब कमालीची मोहवणारी होती. थोडं यश मिळालं, की माणसं बहकल्यासारखी वागतात. डोक्यात हवा गेल्यासारखी उडायला लागतात. अमिताभसारखं उत्तुंग यश तर फारच थोड्यांना मिळतं. या पार्श्वभूमीवर त्याचं हे सार्वजनिक कार्यक्रमातलं वागणं खूपच आपुलकीचं आणि संस्कारशील होतं. कुणी म्हणेल, अशा कार्यक्रमांत मोठे लोक मुद्दाम तसे वागतात-बोलतात. हे काही अंशी खरंही आहे. मात्र, अमिताभच्या वागण्यात-बोलण्यात कुठेही हा बेतीवपणा दिसला नाही. तो सुसंस्कृतपणा त्याच्या रक्तातच होता; असला पाहिजे. सर्वसामान्य लोकांशी, विशेषतः महिलांशी बोलताना, त्यांना त्या खुर्चीवर बसवताना, त्यांच्याशी हास्य-विनोद करताना अमिताभ कुठंही अॅक्टिंग करत होता वा त्याचा हा सगळा बेतीव सभ्यपणा होता, असं कुठंही वाटलं नाही. किंबहुना अशा कार्यक्रमात यजमानानं कसं वागावं-बोलावं याचा वस्तुपाठच त्यानं घालून दिला. अमिताभच्या या आदबशीर वागण्यानं घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीविषयी वाटतो तसा आदर त्याच्याविषयी सर्वांना वाटू लागला हे निश्चित. 

अमिताभच्या आयुष्याकडं नीट पाहिलं, तर लक्षात येतं, की एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याप्रमाणेच त्याच्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले. सुख-दुःखाचे प्रसंग आले, आशा-निराशेचे क्षण आले. अमिताभचं कुटुंब म्हणजे अलाहाबादमधलं एक प्रतिष्ठित कुटुंब. वडिलांची कीर्ती केवळ त्या शहरातच नव्हे, तर देशभरात पसरलेली. शिवाय इंदिरा गांधी आणि एकूणच नेहरू-गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध. राजीव गांधी आणि अमिताभ हे बालमित्र. अशा वेळी अमिताभचं आयुष्य सर्वसामान्यांसारखं असणार नव्हतं, हे उघडच होतं. पण एका वेगळ्या पातळीवर अमिताभलाही संघर्ष टळला नाहीच. त्याचं आयुष्य यशापयशाच्या रोलरकोस्टर राइडसारखं भासतं. त्याला सुरुवातीला रेडिओवर मिळालेला नकार, नंतर लंबूटांगा नट म्हणून होणारी हेटाळणी, मग एकदम मोठं यश, सुपरस्टारची बिरुदावली, मग प्रेमाचा त्रिकोण, नंतर अचानक झालेला जीवघेणा अपघात, नंतर राजकारणात प्रवेश, तिथली अपयशी खेळी, मग पुन्हा खासदारकीचा राजीनामा, नंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन, चुकीच्या चित्रपटांची निवड, मग पुन्हा काही चित्रपटांना यश, मग दीर्घकाळ विश्रांती, मग कंपनीची दिवाळखोरी, मग पुन्हा त्यातून सावरण्यासाठी राजकीय मित्रांची मदत, नंतर पुन्हा सेकंड इनिंग, ‘कौन बनेगा करोडपती’चं तुफान यश आणि त्यात एक से बढकर एक चांगल्या भूमिका साकारण्याची संधी...

अमिताभच्या या सर्व प्रवासात सर्वसामान्यांना आपल्याही आयुष्याशी असलेलं साम्य जाणवतं. अमिताभकडं असलेलं वलय आणि पैसा यांची तुलना सामान्यांशी होत नसली तरी हे साम्य त्यांना जाणवतं, हे विशेष! याचं कारण अमिताभनं स्वतः कधी आपल्या या स्थानाचा आणि वलयाचा सामान्यांसमोर गवगवा केलेला नाही आणि हेच त्याच्या ‘मोठा माणूस’ असण्याचं गमक आहे. 

बिग बी...!
महानायक .....!!
सुपरस्टार .....!!!
पद्मभूषण!!!
The Star Of The Millennium!!!
अनेक पुरस्कारांचे धनी....!!!!
एक सुसंस्कृत भारतीय अभिनेते!!!!

मा श्री अमिताभ बच्चन साहब यांचा आज वाढदिवस!

आजही आम्हाला बालपण आठवतयं!

चित्रपट काय असतो हे समजण्याच्या आतच आम्ही मा. अमिताभ बच्चन जी यांचे चाहते झालेलो; कारण त्यांच्या अभिनयाची आणि आवाजाची जादूच अशी होती की, आम्हालाही कळले नाही की आम्ही अमिताभजी यांचे चाहते झालोत!
अमिताभ जी जणू अगदी घरातलीच कुणी व्यक्ती आहे असे मानायला लागलो होतो! इतक्या भारावलेल्या अवस्थेतच त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने त्यांना "कुली" चित्रपटाच्या शुटिंगसमयी अपघात झाला!

झाले!

आमचेच काय पण अखिल भारताचे प्राण कंठाशी आलेले अशी हतबलता!

विशेष म्हणजे तो काळ हा प्रसार माध्यमांचा नव्हताच मूळी! रेडिओ आणि वृत्तपत्रांतून काय त्यांच्या प्रकृतीविषयी जुजबी माहिती मिळायची.. तेवढीच!
अमितजींची तब्येत लवकरच बरी व्हावी म्हणून नवस-सायास, उपवास करणारे केवळ आम्हीच होतो असे नव्हे तर भारतातील अगणित चाहते आमच्यासोबत होते! वेळीच उपचार झालेत आणि सोबत अखिल भारतीयांच्या दुवा...
अमितजी ठिकठाक झालेत तेव्हाच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडल्याचे आजही स्पष्ट आठवतयं, इतकी ही घटना मनावर कोरली गेलीय!

विशेष म्हणजे मनमोहन देसाई यांच्या या "कुली" चित्रपटाच्या मूळ कथानकात अमितजींचे इक्बाल नावाचे पात्र मरण पावते असा शेवट होता; पण अपघाताने संपूर्ण भारतातून आलेल्या प्रतिसादाद्वारे अमितजींबद्दलचे प्रेम पाहुन दस्तुरखुद्द मनमोहन देसाई जी ही गहिवरले आणि त्यांनी कुली चित्रपटाचा दुखांत शेवट हा सुखांतात केला!
~~~~~s~~~~~~~~

*अमितजींविषयी...!*

अमिताभ बच्चन जी (मूळ नाव- अमिताभ हरिवंश राय बच्चन,
जन्म: ११ ऑक्टोबर १९४२) हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत.
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण (एंग्री यंग मॅन) अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते.

अमितजींबद्दल आणखी बोलायचे तर अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद , उत्तरप्रदेश येथे एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या.

अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ यांच्या वडिलांचे २००३ मध्ये तर आईचे २००७ मध्ये निधन झाले.

डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले.

अमितजी अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले.
"सात हिंदुस्थानी" या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले तेव्हा अमितजींची उंच अंगकाठी बघून आणि घोगरा आवाज ऐकून या सात हिंदुस्थानी चित्रपटाचे हक्क ही कुणी विकत घ्यायला तयार नव्हते!

मात्र मा. प्रकाश मेहेराजींचा "जंजीर" चित्रपट आला आणि
अमितजींनी संथ हिंदी चित्रपटांच्या जंजीर मधून हिंदी चित्रपटसृष्टीला
बंधनमुक्त केले!
या जंजीर नंतर मात्र अमितजींनी मागे वळून पाहिलेच नाही... ते अगदी आजतागायत!

चित्रपट, दूरचित्रवाणी, जाहिराती यातून ते आजही काम करीत आहेत !
त्यांचे कष्ट आणि कार्यामागची भावना पाहिली असता उर भरुन येतो!

आदरणीय अमितजींना....,
श्री ईश्वर सदैव सुख-समृध्दी, यश, किर्ती, भरभराट आणि निरोगी दीर्घायुष्य देवो ही ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना !

आदरणीय अमितजी ...!

आपणांस पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

.

अमिताभ बच्चन लेख

बच्चन...
लिहायला घेतलं की त्याच्याबद्दल काय लिहिणार असा प्रश्नं मला नेहमी पडत आलाय. न कळत्या वयात त्यालाच पहिल्यांदा पाहिल्यामुळे असेल पण त्याचा अमिट ठसा एकदा उमटला तो उमटलाच. त्याच्या अभिनयबद्दल काय बोलणार, आता कंटाळा येईल इतकं बोलून झालंय. त्याची जादूच वेगळी आहे. पण तो नुसता उंचीनीच मोठा नाहीये. गुणांनी पण मोठा आहे. जिवंत दंतकथा. सुसंस्कृत, नम्र. एक प्रामाणिक माणूस, सगळी कर्तव्यं पार पाडणारा, कुणाचाही रूपया न बुडवणारा, संकटांना सामोरा जाणारा आणि हरलेली बाजी जिंकणारा. नम्रता आणि कृतज्ञता हे त्याचे सर्वात मोठे गुण आहेत. या सगळ्यासाठी तो मला जास्ती आवडती आणि आदरणीय आहे. लोक सगळ्या बाजूनी बोलतात पण सगळ्या बाजूंवर बोलत नाहीत. 'हत्ती आणि सहा आंधळे' या बोधकथेसारखा तो प्रत्येकाला वेगळा दिसू शकेल. त्यामुळे मला ज्यासाठी आवडला तसाच दुस-यांना आवडेल असं नाही.
माणूस एकदा प्रेमात पडला की  दोष दिसत नाहीत किंवा दिसले तरी खुपत नाहीत. व्यक्तिपूजा हा आपला राष्ट्रगुण आहे. तरीपण त्याचा 'मृत्यूदाता' पहाताना मी काळझोप लागल्यासारखा झोपलो होतो, 'मर्द',  'गंगा जमना सरस्वती', 'आज का अर्जुन' बघताना तुफान हसलो होतो, 'इन्सानियत' बघताना लाजून काळवंडलो होतो. 'जादूगर', 'अजूबा', 'तुफान' मी अजून पूर्ण बघू शकलेलो नाही. 'द लास्ट लिअर' मी पाहिलेला नाही. तसे त्याचे बरेच नविन चित्रपट मी पाहिलेले नाहीत. त्यामुळे माझं काही अडलेलंही नाही. त्याचे 'डॉन', 'मुकद्दर का...'. 'अमर अकबर...', 'चुपके चुपके', 'मिली', 'अभिमान', 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'फरार', 'दिवार', 'सत्ते पे सत्ता', 'अग्नीपथ', 'आखरी रास्ता' 'सौदागर', 'मजबूर' आणि एक छोटासा हिट 'शोले' पुरेसे आहेत. 'सुहाग', 'कस्मे वादे',  'कालिया', 'शहेनशाह', 'देशप्रेमी', 'हम', 'खुदा गवाह', 'दोस्ताना', 'हेरा फेरी' चॅनल बदलताना दिसले तर क्षणिक घुटमळायला बरे आहेत. (लिस्ट थांबवण्यात येत आहे, किती लिहिणार ना).
त्याची माणुसकी अफाट आहे जी मला कायम मोह घालत आली आहे. कुठेही वाच्यता न करता चांगलं काहीतरी करत रहाणं अवघड असतं. 'इन्सानियत' टिटो टोनीचा ('राम बलराम', 'दो अंजाने' त्याचेच) होता. ८९ ला सुरु झालेला सिनेमा नूतन, विनोद मेहरा गेल्यामुळे तसाही रखडलाच होता. तो, सनी, चंकी, सोनम, रविना, जयाप्रदा अशी एकदाच एकत्रं आलेली स्टारकास्ट होती. तेंव्हा बच्चनचा वाईटकाळ होता. तरीपण ९४ ला फिल्म रिलीज झाली. आपटणार हे कन्फर्म होतं. पण बच्चनचा सिनेमा एक आठवडा भारतभर चालला तरी कॉस्ट वसूल होते म्हणून त्यानी  फिल्म पूर्ण केली. त्याच्या करिअरला फटका बसलेलाच होता, हा रिलीज करून अजून खपली निघणार होती पण तरीही त्यानी मान्यता दिली. निर्माता आयुष्यातून उठला नाही त्यामुळे. रस्त्यावर आलेल्या नरिमन इराणीला नफ्यात आणण्यासाठी तो, झीनत आणि चंद्रा बारोटनी डॉन कसा केला हे सांगून झालंय म्हणून इथे पोस्ट वाढवत नाही.
आई बाप सुसंस्कृत असले म्हणजे मुलं असतीलंच असं नाही. सुनील दत्तनी 'यादें' मधे दिलेला पहिला रोल तो आजपर्यंत विसरलेला नाहीये. 'रेश्मा और शेरा' मधे ऐनवेळी रोल अदलाबदली झाले आणि बच्चन मुका झाला आणि विनोद खन्ना बोलका पण सुनील दत्तच्या शब्दावर तो काही बोलला नाही. संजय दत्तच्या पाठीशी परतफेड म्हणून तो कायम उभा असतो. 'नाम' (सलीमचा एकट्याचा 'दिवार') रिलीज झाल्यावर त्याने त्याला सोन्याची साखळी आणि पत्रं दिलं होतं. 'सात हिंदुस्थानी'मध्ये संधी देणा-या ख्वाजा अहमद अब्बास यांच्या आजारपणात त्यानी त्यांची काळजी घेतली होती. पंकज पराशरच्या पहिल्या मोठ्या चित्रपटासाठी ('जलवा') त्यानी दोस्तीत स्पेशल अपिअरन्स केला होता. रजनीकांतच्या हिंदीत एंट्रीसाठी 'अंधा कानून' केला. माणूस भिडस्तं असणार त्याशिवाय कर्जबाजारी नसता झाला. बोफोर्स प्रकरणात एकदाही आक्रस्ताळं तो बोलल्याचं मला आठवत नाही.
दुर्धर 'मायस्थेनिया ग्रेव्हीस', पुनीत इस्सारबरोबरची फायटिंग, टी.बी.सगळ्यातून तरला, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परत आला. रेखा, परवीन, माधवी अनेक नावं जोडून झाली, तो एक शब्दंही कधी बोलला नाही. 'बावर्ची'च्या सेटवर तो जयाला घ्यायला जायचा तेंव्हा खन्ना त्याच्याशी बोलणं लांब, ओळख सुद्धा द्यायचा नाही पण तो एक शब्दंही कधी बोलला नाही, उलट त्याला कायम पहिला सुपरस्टार म्हणून वंदत आला. बोफोर्स मधून निर्दोष सुटला म्हणून 'जितं मया' करत बोलत सुटला नाही. पेशंस पाहिजेत बॉस. मला त्याला बघितलं की एक शेर आठवतो, 'अपने खिलाफ बातोंको अक्सर मैं खामोशी से सुनता हूं ... क्योंकी...जवाब देनेका हक मैंने वक्तको दे रखा है'! आदर्श असे गल्लोगल्ली मिळत नसतात. आपल्याला सोयीस्कर असतो तो आदर्श नसतो, त्याच्यासारखं वागणं, जगणं आपल्याला जमणार नाही असं वाटून जातं तो माणूस 'आदर्श' असतो.
त्याच्या सुसंस्कृतपणाचा एक फारसा प्रसिद्ध नसलेला किस्सा आहे. खूप वर्ष झाली. प्रसिद्ध गोगटे कुटुंबियांकडून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेल मधे त्याचा सत्कार झाला होता. कसला तरी पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम होता. सत्कार झाला, भाषणं झाली. सगळ्यांना मंत्रमुग्ध करून तो निघाला. मग मागे मुख्यमंत्री, गोगटे कुटुंबीय व इतर मान्यवर गप्पा मारत उभे होते. उत्सवमूर्ती गेल्यामुळे काही लोक बाहेर गप्पा मारायला आले. बघतात तर काय, तो पार्किंग मधे गाडीला टेकून उभा. एकजण अचंबित होऊन पुढे गेला (ज्यानी मला हा किस्सा सांगितलाय तो). कारण विचारलं, काही राहिलंय का, कुणी येणार आहे का? नाहीतर आत चला, मी थांबतो कुणी येणार असेल तर.त्यानी दिलेलं उत्तर वेड लावणारं  होतं. "नाही, तसं काही नाही, पण मुख्यमंत्री हे राज्याचे प्रथम नागरिक आहेत, त्यांनी गेल्यावर आपण जायचं हा शिष्टाचार आहे. म्हणून थांबलोय." बातमी वा-यासारखी पसरली. मग मुख्यमंत्री गेले मग हा गुणांनी पण उंच असलेला माणूस गेला.  बारा फुटी फ्लेक्स लावून उपयोग नाही अशी उंची गाठण्यासाठी मुळात असावं लागतं ते. 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मधे (चू.भू.दे.घे.) बाळ कोल्हटकर फार सुंदर म्हणून गेले आहेत - "नियतीने उत्कर्षाच्या प्रत्येक क्षणी एक घसरण्याचा क्षण ठेवलेला असतो". उंचीवर पोचलेला माणूस म्हणजे सतत स्लीपर घालून तेल सांडलेल्या जमिनीवरून चालणारा माणूस. एक क्षण पुरतो पतन व्हायला. म्हणून त्याच्याकडे बघून मी एवढंच शिकलोय आणि लक्षात ठेवलंय की 'मान वर हवी ती अजून किती उंची गाठायची आहे ते बघण्याकरता, नाहीतर ठेच आहेच'.
आमची पिढी सगळ्यात नशीबवान. आम्ही लता, आशा, सचिन, द्रविड, मार्शल, रिचर्ड्स, अमिताभ, प्राण, आरडी, किशोर पाहिले, ऐकले. चौ-याहत्तर वर्षांचा झाला तो आज. तो अमर नाही, आपणही नाही. पण तो अजरामर आहे.
पुढली अनेक शतके थेटरात अंधार होईल, डोअरकीपर दरवाजे लावेल, टायटल्स संपतील आणि मग त्याचा संमोहनाचा खेळ सत्तर एमएमवर चालू होईल. त्याच्या चेह-यावर हलणारी नस, डोळ्यांपाशी होणारी मायक्रो हालचाल, गळ्याशी ताणल्या जाणा-या शिरा, तो अंगावर काटा आणणारा आवाज, कुठल्याही भूमिकेतला तो सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण वावर - काय बोलू, तुझे ऋणको आहोत आम्ही. 
जयंत विद्वांस

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...