फॉलोअर

०७ एप्रिल २०१६

लेखक आणि मनुष्यप्रिय अधिकारी






काल संध्याकाळी कराड येथील निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम झाला. शासकीय  अधिकारी येतात, जातात, पुन्हा नवीन  अधिकारी येतो,  कार्यकाल संपला की त्याची पण बदली होते. बदली झाली की लोक त्यांना विसरून जातात. बदली होते तेव्हा त्याना निरोप दिला जातो, कार्यक्रम होतो. गोड गोड बोलले जाते,  कारण तो अधिकारी पुन्हा कुठे तरी उपयोगी पडणार  असतो.

नवीन अधिकारी येतो परत त्याचे स्वागत होते, पुन्हा तेच. ही परंपरा मी गेल्या वीस वर्षांत पहात  आलो आहे. पण
शासकीय अधिकारी सेवानिवृत्त होतो आणि त्याचा मोठ्ठा कार्यक्रम होतो, त्याला कलेक्टर येतात, तालुक्यातील सर्व स्तरावरील लोक येतात, तलाठी, सर्कल, कोतवाल, पोलीस पाटील,  चळवळीवाले, आंदोलनवाले, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, पत्रकार सारे जण येतात, हे पहील्यादाच  पहायला मिळाले.


बी. एम. गायकवाड हे काय फार मोठ्ठे अधिकारी नाहीत, नायब तहसीलदार पद फार  उंचीचे नाही तरी पण लोक का आले याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांची काम करण्याची पद्धत हे उत्तर द्यावे लागेल. तहसीलदाराकडे जाण्यापुर्वी काम घेऊन नायब तहसीलदार कडे जातात.  तिथे काम झाले नाही, समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मग पुढे जातात.  पण कराडात गायकवाड साहेब  आल्या पासून असे झालेच नाही. आलेल्या प्रत्येक माणसाला बोला काय सेवा करू आपली, असे म्हणणारा नायब तहसीलदार बहुधा हे एकमेव असावेत . आता  हे वाक्य  कानावर पडल्यावर काम घेऊन आलेला सामान्य माणूस निम्मा थंड व्हायचा. मग त्याचे काम काय आहे,  येथे होणार आहे का, नसेल तर काय करावे लागेल, कोणाकडे जावे लागेल, कागदपत्रे कोणती अपुरी आहेत, ती कुठे मिळतील, किती दिवस लागतात,  आदी सर्व माहिती त्याला देऊन खुश करण्याची हातोटी गायकवाड यांच्या कडे होती.

तलाठी,  सर्कल किंवा गावपातळीवर अन्याय झालेला, रागाने लालबुंद माणुस इथे आल्यावर या बसा असे म्हणून पाणी प्यायला द्यायचे, वर चहा सांगायचा, ही माणसे थंड करण्याची त्याची पद्धत खरंच सर्व ऑफीसमध्ये काम करणारांसाठी अनुकरणीय आहे .

एखाद्या शासकीय अधिकारी बाबत कौतुकास्पद लिहायला मिळतंय हा पण सुखद अनुभव आहे. या कार्यक्रमात गायकवाड यांच्या पत्नीची एक समर्पित बाजू पहायला मिळाली आणि याच कारणामुळे मी आज हा ब्लॉग लिहायला घेतला.

एक वर्षापुर्वी बी एम गायकवाड यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याच्या वर  उपचार सुरू झाले. एक किडनी असेल तर मनुष्य जगू शकतो मात्र दोन्ही फेल झाल्याने किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. किडनी दात्यांचा शोध सुरू झाला. एकच रक्तगट  आणि इतर अनेक बाबी जुळायला लागतात. तपासणी दरम्यान त्याच्या पत्नीची किडनी मॅच होत असल्याचे लक्षात आले. पत्नीने तात्काळ होकार दिला,उगीच नाही तिला अर्धांगिनी म्हटलं जातं.  ऑपरेशन झालं, किडनी प्रत्यारोपण झालं. अतिशय किचकट ऑपरेशन असल्याने डाॅक्टरांनी त्यांना सहा महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

महीनाभर त्यांनी आराम केला. रोज सकाळी दहा ते रात्री दहा दरम्यान माणसे पहायचा,  त्याच्यासोबत बोलायचे, वादविवाद सोडवायचे , गोरगरीब निराधार लोकांना मदत करायची , त्याचे प्रश्न सोडवायचे या आणि याच कामात, लोकसेवेत 35 वर्षे कार्यरत असलेल्या  गायकवाड यांना आता घरात बसु वाटेना, करमेना. त्याना ऑफिसला जाण्याचे वेध लागले. दिड महिन्यानंतर गायकवाड साहेब पुन्हा कराड तहसीलदार कार्यालयात हजर झाले. कामाला सुरूवात केली. हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली, ते ठणठणीत बरे झाले. काम करणार्‍या माणसाला कामात व्यस्त असले तरच बरे वाटते. त्या वातावरणातच, छंदात, कामात असेल तर  तो प्रत्येक गोष्टीवर, संकटावर, अडचणीवर मात करू शकतो. हेच यातून सिद्ध होते.



या कार्यक्रमात मला बोलायची संधी मिळाली .
गायकवाड यांचा वरील अनुभवाला जोडून एक गोष्ट सांगितली.
ही गोष्ट मी महाविद्यालयीन काळात वाचली होती.



गोष्ट आहे एका लेखकाची

एक खुप मोठ्ठे प्रतिभावंत लेखक होते.  साहित्य क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. मुंबईतील  एका चाळीत ते रहात होते. लोकसंपर्क आणि संवाद ही त्या लेखकाची जमेची बाजू होती.  त्याच्या नावावर चार पाच पुस्तके प्रसिद्ध झाली.  हळूहळू परिस्थिती पण सुधारली.  साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला.  पुरस्काराची मोठ्ठी रक्कम त्यांनी पत्नीकडे सुपुर्त केली. तुला जे हवं ते कर, तु साथ दिलीस म्हणुनच हे दिवस आले असे त्यांनी कृतज्ञतापुर्वक सांगितले.  पत्नीचे पतीवर खुप प्रेम होते.  आपल्या नवर्‍याने घेतलेले कष्ट, गाजवलेल्या रात्री याची तिला जाणीव होती.  चाळीतल्या घरात नवर्‍याला  एकांत मिळत नाही , दंगा असतो हे तिने पाहिले होते. त् एकांतपणा मिळाला तर नवरा आणखी लिहू शकेल, या उद्देशाने तिने उपनगराबाहेर एक जागा घेतली, टुमदार बंगला बांधला.  एक वर्षानंतर नवर्‍याच्या वाढदिनी तो बंगला त्याला गिफ्ट म्हणून दिला.

आता आपण या बंगल्यात राहू. तुम्ही निवांत बसून लिहा, पत्नीने लाडात येऊन सांगितले.
कुटुंब तिकडे रहायला गेले. महिना आनंदात गेला. पण त्या लेखकाला काही लिखाण करणे शक्‍य झाले नाही, तो कागद घेऊन बसायचा पण शब्द काय कागदावर  उतरत नव्हते. एकांत होता पण वातावरण नव्हते,  बुद्धीमत्ता होती मात्र बाहेर पडत नव्हती.  प्रतिभा खुप सारी होती पण  व्यक्त होत नव्हती.  त्या लेखकाला वेड लागण्याची वेळ आली.

त्याने पत्नीला विनंती केली,  आपण जुन्या घरात रहायला जाऊ या.  येथे एकांत  आहे पण त्याचा मला काही उपयोग नाही.  माझी पात्रे चाळीत राहणाऱ्या लोकांमध्ये  आहेत, लोकल ट्रेन मध्ये  आहेत, रस्त्यावर आहेत.
मी तिथेच राहीलो तर लिहू शकतो, असे त्यांनी पत्नीला सांगितले. पुन्हा ते जोडपे चाळीत रहायला गेलं.
या गोष्टीचा मतीतार्थ आणि शासकीय सेवेत काम करत असलेल्या गायकवाड यांच्या सारख्या  कार्यक्षम  अधिकारी, कर्मचारीचा अनुभव सारखा आहे . माणूस हा मनुष्य प्रिय प्राणी आहे,  असं म्हणतात. माणसात राहीला तरच त्याला माणुसकी पहायला, शिकायला आणि अनुभवायला मिळेल. बरोबर आहे ना !

सुज्ञ अर्धागिनींने बंगला दिला, आराम दिला. 
किडणी दिली , आयुष्य दिले
तरीही जीव वाचवला, 
खुलवला, वाढवला.......मनुष्य सोबतीनेच !


गुण दोषासहीत स्वीकारणे म्हणजे प्रेम


प्रेम, लव,  इष्क,  मोहब्बत, प्यार
आणखी खुप खुप नावे आहेत, समानार्थी शब्द आहेत.
प्रत्येक शब्दात खुप गोडवा आहे, आनंद आहे, हुरहुर आहे, जवळीक आहे, आपलेपण आहे, काळजीवाहूपणा आहे, वात्सल्य आहे .

सर्व नात्यांना प्रेम या एका शब्दाने मोठ्ठा अर्थ मिळवून दिला आहे.
प्रेमाबाबत, प्रेमाखातर, प्रेमामुळे, प्रेमापोटी
बरेच जण बरेच काही करत आले आहेत,करत राहतील.
प्रेम म्हणजे काय हे मात्र कोणी पटकन सांगू शकणार नाही !
खुप अर्थ आहेत.. प्रेम आणि प्रेमाचे



 
कुणीतरी आपली काळजी घ्यावी असं वाटणं म्हणजे प्रेम,
आपल्यावर जीव ओवाळून टाकणे म्हणजे प्रेम
हवं तेव्हा जवळ येणे,वेळ देणं म्हणजे प्रेम की
वाट्टेल ते आणून देणं,गरजा पूर्ण करणे म्हणजे प्रेम

सकाळी सकाळी गुड मॉर्निंग म्हणणे म्हणजे प्रेम
उठल्या उठल्या गरम चहाचा कप आणून देणं म्हणजे प्रेम
दिवसभरात एकदातरी भेटणं, बोलणं म्हणजे प्रेम की
आयुष्यभर साथ सोबत देणं म्हणजे प्रेम

लाॅग ड्राईव्हला फिरायला जाणे म्हणजे प्रेम
सोबत देणं, चार पावलं चालणं म्हणजे प्रेम
एकमेका जवळ बसणं म्हणजे प्रेम की
दूर असूनही एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम

हातात हात घालून सिनेमा पहाणे म्हणजे प्रेम
आम्हाला विसरू नको वाटणं म्हणजे प्रेम
खोटं खोटं रागावणं म्हणजे प्रेम की
रागाऊनही जवळ जाणं, रूसणं फुगणं म्हणजे प्रेम

मित्रासाठी शाळेला दांडी मारणं म्हणजे प्रेम
मैत्रिणीसाठी दिवसभर घिरट्या घालणं म्हणजे प्रेम
एका लुकसाठी बस तासनतास बसणं म्हणजे प्रेम की
एकही शब्द न बोलता तिच्यासाठी झुरणं म्हणजे प्रेम

सकाळी उठून मुलांचे आवरणं म्हणजे प्रेम
त्याच्यासाठी रोज कॅडबरी आणणं म्हणजे प्रेम
स्कूल बस पर्यंत पोरांना सोडणं म्हणजे प्रेम की
रोज त्याचा होमवर्क करून घेणं म्हणजे प्रेम

बायकोला छान दिसतेस म्हणणं म्हणजे प्रेम
तिला चहा करून देणं म्हणजे प्रेम
तिच्या साठी गिफ्ट आणणं म्हणजे प्रेम की
आज भाजी मस्त केली आहे म्हणणं म्हणजे प्रेम

भाजी निवडायला मदत करणं म्हणजे प्रेम
दळण आणून देणं म्हणजे प्रेम
तिच्या कामाचं कौतुक करणं म्हणजे प्रेम की
तिच्या साडीच्या निर्‍या नीट करणं म्हणजे प्रेम

आईवडिलांची काळजी घेणे म्हणजे प्रेम
त्याच्या इच्छा पुर्ण करणं म्हणजे प्रेम
आईला रोज नमस्कार करणं म्हणजे प्रेम की
आईच्या कुशीत शिरून मिठी मारणं प्रेम

बाबांचा आदर करणं म्हणजे प्रेम
त्याचे नाव मोठ्ठ करणे म्हणजे प्रेम
बाबांच्या भावना समजून घेणे म्हणजे प्रेम की
बांबाना सतत आनंद देणं म्हणजे प्रेम

बहीणीसाठी जेवायला वाट पाहणं म्हणजे प्रेम
तिच्या कडून गोड बोलून काम करून घेणं म्हणजे प्रेम
तिच्यासाठी पैसे वाचवून राखी गिफ्ट आणणे म्हणजे प्रेम की
आयुष्यभर तिला दूर न करणे म्हणजे प्रेम

भावासाठी खाऊ बाजूला काढून ठेवणं म्हणजे प्रेम
त्याला जे आवडतं ते करणे म्हणजे प्रेम
भावाची चुक स्वतःवर घेऊन बाबांचा मार खाणं म्हणजे प्रेम की
दादा मला एक वहिनी आण ही थट्टा म्हणजे प्रेम



किती तरी लिहता येईल या प्रेम स्वरूप प्रेमाबद्धल. प्रेमरस हा शरीरात अविरत पाझरत  असतो . त्यामुळेच  अनेक नाती घट्ट झाली आहेत . परवा मला एकाने विचारले, तुम्ही  अमिताभ बच्चन यांच्यावर खुप प्रेम करता, मोठे फॅन आहात. तुमचा महागुरू बच्चन विषयी पेपर मध्ये काय आले आहे,  वाचले का, असा सवाल त्यांनी केला. मी त्याला सांगितले, मी अमिताभ बच्चन यांच्यावर फॅन म्हणून प्रेम करतो, त्याच्या कलेवर प्रेम करतो, त्याच्या  अभिनयावर जीव टाकतो. मी त्यांना मानतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषासहीत स्वीकारणे म्हणजे प्रेम . मी बच्चन यांचा फॅन आहे, राहणार. उलट  अशा कठीण प्रसंगात तर नक्कीच त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार.

उदाहरण बच्चनजीचे असले तरी आयुष्यभर आपण हेच करतो.
आपल्या पत्नीचे, पतीचे, भावाचे, बहीणीचे, मित्राचे, मैत्रिणीचे, शेजारच्या व्यक्तीचे, नोकरी 
आणि व्यवसायातील सहकारी मित्रांचे चांगले वाईट गुण आहेत, असतात.
ते आपणास माहित असतात .
आपण 
त्याला -तिला, 
त्याच्या -तिच्या
गुण अवगुणासहीत स्वीकारत असतो आणि तेच खरे प्रेम आहे.

मला आवडलेली, आवडणारी ही  प्रेमाची सर्वात सुंदर व्याख्या आहे.

...अपुर्ण ...



     सतीश मोरे



०५ एप्रिल २०१६

गोवा सहल 2006 फोटो


गोवा सहल 2006  आणि 2016 असा एक ब्लॉग मी एप्रिल मध्ये लिहला होता.
त्यावेळी 2006 चे फोटो मिळाले नव्हते.
आता ते सापडले आहेत. 
खास माझ्या मित्रासाठी टाकत आहे.

गोवा ट्रीप @ 2006 आणि 2016


2006 

2016

गोवा आणि मी खुप जवळच नातं आहे.  खुप जवळचं म्हणजे गोव्यात माझं कुणी नाही  किंवा   मला  गोव्यातील खुप सारी माहिती आहे, असे नाही. गोवा हा महाराष्ट्राच्याच विचाराचा, संस्कृतीचा, मराठी कम् कोकणी भाषिकांचा आहे. गोव्यात गेल्यावर मराठी बोलले तरी चालतं, गोव्यात गेल्यावर रोमिंग पडत नाही, म्हणजेच तो महाराष्ट्राचाच एक भाग आहे, अशी मनाची तयारी होते, म्हणून गोवा मला फार आवडतो. मी गोव्याला चार वेळा गेलो आहे. आज सुद्धा गोव्यातच आहे. तिथे गेल्यावर यापुर्वी आलो तेव्हाच्या काही आठवणी शेअर करण्याची इच्छा झाली, म्हणून तर हे लिहतोय.

मला माझी गोवा पहीली ट्रिप चांगली आठवतेय. 2006 मध्ये केलेली.  दुचाकीवरून फिरायची मला पहिल्या पासूनच फार हौस आहे. त्याअगोदर सायकल वरून सुद्धा औदुंबर, सागरेश्वर, कडेपूर, बत्तीस शिराळा या ठिकाणी सायकल प्रवास केला आहे. पहीली नवी कोरी दुचाकी एम 80 मी स्वकमाईतून 1996 मध्ये खरेदी केली होती.  MH-11-E- 7836 नंबर होता त्या गाडीचा ! कराड तालुक्यात एकन एक गाव फिरलो मी एम 80 वरून. त्यावेळी क्रेझ होती म्हणा ग्रामीण भागात एम 80 ची. दुचाकी वाहन घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होते. तेव्हा लोक काय अडचण आली तर जायला गाडी मागायला यायचे. यादव मोरे क्लासेसचा तो बहरता काळ होता.  याच गाडीवरून सांगली, सातारा, कोल्हापूर ,पुणे जिल्ह्यात बराच प्रवास केला मी आणि बापु डुबल यांनी. इस्लामपूर येथील माणकेश्वर  थिएटर मध्ये पिक्चर पहायला जायला हीच गाडी असायची. पुढे हिरो होंडा SS, बजाज बाॅक्सर AT, स्पेन्डर ,  NXG स्पेन्डर अशी वाहने झाली, पण एम 80 ची मजा औरच.

2006 मध्ये गोवा दुचाकी दौरा आखला होता. सोबत लक्ष्मण कचरे, अंकुश पाटील  आणि बापु. फार मोठे थ्रिल होते. कोकण दौरा म्हणजे दुचाकी चालवायला प्रचंड जोश अपोआपच निर्माण होतो. हिरवीगार झाडे, नागमोडी रस्ते, उंच अवघड घाट , चकाचक रस्ता आणि गार वारे अशा वातावरणात गाडी चालवायला मजा खुप येते, कितीही वाहन चालवा कंटाळा येत नाही. आम्ही तीन दिवसाचे नियोजन करून निघालो. सकाळी सकाळी बाहेर पडलो, साहित्य मागे बांधलेले. राधानगरी जवळपास मार्ग एका पुलाजवळ थांबलो, फोटो काढले. पुन्हा प्रवास सुरू. रस्ता माहित नाही, विचारत गेलो. सायंकाळी सात वाजता म्हापसा येथे पोहचलो. कुठे रहायचे माहीत नव्हते.  विचारपूस करत एक शेअर बेसवर हाॅटेल मिळाले. संपूर्ण दिवस प्रवास केला होता, जेवलो आणि झोपलो. सकाळी लवकर उठून कलिंगुट बीचवर पोहोचलो, समुद्रात खेळलो. बारा वाजता निघालो. पणजी,जुन्या गोवा, चर्च पाहीले, फिरलो. पुन्हा मुक्काम म्हापसा. आम्ही चौघे, खर्च काॅमन, मजा अनलिमिटेड !

तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु झाला. पुन्हा कलिंगुट बीच, बागा बीच वर गेलो,  'सौंदर्या'चा आनंद लुटला  किनारपट्टी रस्त्यावरून निघालो, अतिशय दाट झाडीतून जाणारा हा रस्ता खुप छान होता.  एक सुंदर बीच पाहीला, तिथेच आंघोळीला थांबलो. छोटंसं गाव होतं ते.  स्वच्छ विस्तीर्ण समुद्र किनारा, बेफाम वारा यामुळे वेळेचं भान राहीलं नाही. पुढे गोवा महामार्ग सीमेवर फेरीत (बोटीत) गाड्या घातल्या, खुप मजा आली.  दुचाकी, चारचाकी, टेम्पो सारी वाहने एका मोठ्या फेरी बोटीत घातलेली पहिल्यांदाच पाहीली. अद्वितीय, अविस्मरणीय अनुभव होता तो. रेडी गाव लागले.  एव्हाना चार वाजले होते. प्रवास सुरू केला खरा पण तीनशे किलोमीटर कसे पार करायचे, हा प्रश्न निर्माण झाला. सकाळी उठून लगेच निघायला हवे होते, मात्र आम्ही फिरत बसलो. घाटात रात्री प्रवास कसा करायचा, गाडी बंद पडलीतर काय होईल, रात्रभर गाडी कशी चालवायची असा प्रश्न पडला.  आम्ही सगळे एकाच  ऑफिसला,  उद्या कामावर तर गेले पाहिजे, पण कसे पोहचणार, असा प्रश्न पडला.  सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी मध्ये पोहचलो.  एकत्र बसून चर्चा केली, काय पर्याय नव्हता, शेवटी रहायचे ठरवले.  पण बाॅसना काय सांगणार,  हा विचार मनात आला.  शेवटी गाडी पंक्चर झाली म्हणून फोन केला आणि लाॅज शोधला. बाॅसने ओळखले होते सारं . पण पर्याय नव्हता.  खिशात पैसे थोडे, मग  एकदम साध्या ठिकाणी उतरलो.

सकाळी  उठून तयार झालो. आता आंबोली मार्गे कराड. पण पुन्हा निर्णय बदलला,  आता आजचा दिवस आहे, ऑफीस दांडी पडलीच आहे  तर चला सिंधुदुर्ग, मालवणला.  निघालो सारे. मालवण किल्ला पाहिला, आता जवळच विजयदुर्ग आहे चला पुढे.  मज्जा आली.  तीन वाजता निघालो तेथून.  गगनबावडा मार्गे मजल दरमजल करत रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथे पोहचलो. रात्री उशिरा कराड!   दुचाकी वरून केलेली ही खास ट्रिप मी कधीच विसरू शकणार नाही.  ऑफिसात आलो सारे अंदाज घेऊन. जे व्हायचे ते झाले, बाॅसनी हेड  ऑफिसला तक्रार केली होती, 'एकाच दिवशी चौघे अनुपस्थित राहिल्याने कामकाज विस्कळीत झाले. ' पुन्हा खुलासा करावा लागला. समजून घेतले सर्वानी.
या ट्रिपनंतर फॅमिली सोबत 2009 मध्ये पुन्हा गोवा पाहीला,  गतवर्षी ऑफिसने गोवा बक्षीस  ट्रिप दिली.  आज पण गोवा ट्रीप वरून परत येत आहे. आता मी ऑफिस बाॅस आहे, ट्रिप पण  ऑफिस स्पाॅन्सर आहे. प्रवासाला आराम कार होती, रहायला मस्त हाॅटेल होतं, स्विमिंग पूल होता, खिशात पैसे होते, जेवण पण लय भारी होतं. परंतु टु  व्हिलर एवढी मजा नाय आली . गोवा तेव्हा पाहिला तितका सुंदर नाही दिसला. 

तीन दिवससोबत माझे जवळचे सहकारी होते. आम्ही enjoy केला, खुप फिरलो, खरेदी पण केली, बीचवर क्रिकेट खेळलो. सर्व उपलब्ध होतं, खुप होतं, साथीदार तर  एकास एक होते. पण थ्रिल नव्हते टू व्हिलर प्रवासाएवढं!


,
2016




We 4

नो बाॅल म्हणजे चुकीचे पाऊल


              

सोशल प्रीतिसंगम पुढारी सातारा पान 11

भारताने बॅटींग,फिल्डींग खुपच चांगली केली. बाॅलरांचे प्रयत्नांना यश कमी मिळाले, टिम इंडीयाला नशिबाने साथ नाही दिली. तरीपण जाऊ दे. खेळ म्हणजे हार जित चालायचीच. आपणाला फक्त एक हवं असते पाकिस्तानला हरवा, बांगलादेशला ठेचा. आपल्या टीमने ते केले आहे, पाकड्याला हरवलं म्हणजे वल्ड कप जिंकला.
मित्रानो, मँच हरलो म्हनून वाईट वाटून घेऊ नका. बांग्लादेश विरुद्ध हरता हरता जिकलो. आस्ट्रेलिया विरूद्ध पन तेच झाले.जो चांगला खेळ करेल तो जिंकेल..म्हनूण मित्रानो कोणी सुध्दा टिम वर अथवा खेळाडूवर कमेंट करू नका . उलट टिमचे अभिनंदनच करा चांगले खेळाल्याबदल .

धोनी आणि टिम इंडीयाबद्दल वाईट पोस्ट Market मध्ये आणताल तर याद राखा.आज हारलो या पेक्षा या मॅच पर्यंत कसे लढलो ते अभिमानाने सांगा.

या आणि अशा प्रकारचे अनेक चांगले मेसेजेस यावेळी टी 20 विश्वचषक सेमीफायनल मध्ये भारत हारल्या नंतर येऊ लागले आहेत. याअगोदर अशा क्रिकेट स्पर्धेत भारत हरल्यावर येणारे मेसेज, उमटणार्‍या प्रतिक्रिया आणि गेल्या दोन दिवसांत  सोशल मीडिया वर व्यक्त झालेल्या भावना यात फार फरक आहे. क्रिकेट प्रेमीची मानसिकता बदलत आहे. पराभव पचवायची क्षमता वाढण्याबरोबरच खेळाचा विजय लोक स्वीकारू लागले आहेत . आला मनात राग की व्यक्त केला टिव्ही वर, व्हाॅट्स अपवर, फेसबुक वर,  हे यावेळी दिसले नाही. पराभव सुद्धा विनोद बुद्धीने कसा पचवायचा असतो, हे पहायला मिळाले. खरंच दाद द्यावी लागेल सोशल मीडिया प्रेमीना, वेड्यांना, नेटीझनना आणि ऑनलाइन खुळ्यांना !

वेस्ट इंडिज आणि भारतीय क्रिकेट संघात झालेली परवाची सेमीफानल खरंच अप्रतिम होती. आपण ही मॅच जिंकू शकलो असतो जर आपल्याला 'सिमन्स' आडवा आला.  त्याला दोन वेळा  मिळालेल्या नो बाॅलचे जीवदानाने भारतीय संघाला पराभवाकडे खेचत नेले. या 'नो बाॅल' वर खुप छान पोस्ट येत आहेत. ही पोस्ट पहा.

हमे तो नो बाॅलने लुटा, उनमें कहाॅ दम था
मेरा पाॅव वहा पडा, जहाॅ चुना कम था

अश्विन आणि पंड्याच्या गोलंदाजीवर दोन वेळा विकेट मिळाली पण रेषेच्या जवळ पुढे गेल्यामुळे नो बाॅल दिला गेला, विकेट राहीली बाजुला फ्री हिट मुळे रन्स वाढल्या. या गोलंदाजांनी बाॅल टाकताना पाऊल पुढे टाकले म्हणून आलेली ही पोस्ट वाचून आपण हसू आवरू शकणार नाही.

'अश्विन आणि पंड्याला झी चोवीस तास चॅनेलवर
निवेदकाची नोकरी मिळणार
कारण हे दोघे नेहमी एक पाऊल पुढे '
याच्या पुढे जाऊन एकाने म्हटले आहे,
'संपुर्ण रामायण रेषेच्या पुढेपाय टाकल्याने घडले.
T20 चे काय घेऊन बसलाय राव...?'



काही विनोदबुद्धीच्या WhatsApp तज्ञांनी सध्या मार्केटमध्ये आघाडीवर पतंजली उत्पादने 'टाचेच्या मागे चार फुट लांब बुटाची  उत्पादन सुरू करणार आहे ',  असा शोध लावला आहे.

अंधश्रदेवर जोक करत एकाने टाकले आहे,
कालची मॅच हारल्यानंतर धोनी, विराट आणि रोहित शर्मा गुरवांकडे गेले, जाब विचारायला . धोनी गुरवाला विचारतो, तुम्ही अंगारा दिला तरीपण आम्ही मॅच कशी हारलो ? कोकणातील गुरव म्हणतो, मी तुमका सांगलय होतय मी मारलेली रेश कोणी अोलंडता कामा नये, तरी पण आश्विन आणि पांड्यान ती कशाक अोलंडल्यानी,म्हणान तुम्ही मॅच हारलास.
याच आशयाच्या याही पोस्ट गंमतीशीर आहेत. 

' CBI ने मालवणात केली गुरवाला अटक. जादुटोण्यासाठी सुपारी घेतल्याची कबुली '
'चेंडू टाकताना मागून देवचाराने ढकलल्याची आश्विन, पंड्याची तक्रार'
'झेल घेताना कोणीतरी ढकलल्यासारखे वाटल्याचे जडेजाचे प्रतिपादन'

विराट कोहली आणि त्याची मैत्रीण अनुष्का शर्मा यांचे अफेअर, स्टेडियमवर येऊन अनुष्काने विराटला दिलेला फ्लाईंग किस सर्व क्रिकेट प्रेमीना माहीत आहे. पण अनुष्का शर्मा मॅच बघायला आली की भारत मॅच हरतो, अशी (अंध )श्रद्धा क्रिकेट चाहत्यांची आहे. ऑस्ट्रेलिया भारत मॅच दिवशी यावर मिडीयावर खुप जोक पडत होते. सारी ऑस्ट्रेलिया टीम अनुष्का शर्माच्या घरी जाऊन आली आणि तिला विनवणी केली,  ' वहिनी,  काही पण करा मॅच बघायला स्टेडियम वर या ', अशा शब्दांत क्रिकेट प्रेमीनी उडवलेली टर विराटला पण  आवडली नव्हती. मॅचच्या दुसर्‍या दिवशी विराटने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हाच धागा पकडून वेस्ट इंडीज जिंकल्यावर ही पोस्ट आली.

जब जब इस धरती पर
नारी का अपमान हुआ है
तब तब बुरा हुआ है !
और बना लो सालों
अनुष्का पर चुटकुले.

खरंच दाद द्यायला हवी या WhatsApp प्रेमींच्या बुद्धीला.


खा. शरद पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. थोर राजकारणी, किंगमेकर आणि गेम चेंजर आहेत. पवार स्वःत सेमीफायनल पहायला मुंबईत होते. त्यांची उपस्थिती पाहून लगेच त्यांच्या फोटो सहीत ' काही काळजी करू नका, फटाके तयार ठेवा,' असे मेसेज फिरू लागले होते. मॅच हरल्यावर पुन्हा  शरद पवार यांच्या नावाने  आणखी एक मेसेज पडला. ' मॅच हारल्यानंतर पवारांचे जबाबदारी झटकणारे वक्तव्य. मला काय माहीत बाकीचे पण खेळतील, मी फक्त एक गेलशी बोललो होतो '
काही पण होऊ दे कसलीही परिस्थिती निर्माण झाली की ऑनलाइन मंडळीच्या डोक्यात सर्व तयार असते.आता हेच बघा,
'अभ्यास केला गेलचा, पेपर आला सिमन्सचा !
असा युक्तिवाद करणार्‍या नेटीझनचं काय डोकं चालतं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल नेटवर्किंग मार्केटिंगला उत्तर म्हणून काँग्रेस प्रेमीनी टाकलेली जावईशोध लावणारी पोस्ट वाचून हसावे की रडावे हा प्रश्न पडतो ,
1983 वर्ल्ड कप जीता देश में कांग्रेस
2007 T20 वर्ल्ड कप जीता देश में कांग्रेस
2011 वर्ल्ड कप जीता देश में कांग्रेस
और देश में एक पनोती आई
2016 में इंडिया सेमीफानल से बाहर हो गए


सर्वात शेवटी आलेली ही पोस्ट मात्र मन सुन्न करून गेली.
भारत क्रिकेट टीमने जर विश्वकप जिंकला असता तर सरकारचे करोडो रुपये  त्यांच्या बक्षिसांवर खर्च झाले असते. भारत सरकारने तो पैसा गारपीटग्रस्त शेतकर्याना द्यावा ! बरं झाल हे जिंकले नाहीत.  हरले म्हणून एकही खेळाडू आत्महत्या करनार नाही. कारण मॅच चालू असतांना गारपीट झाली नाही. लोकांना क्रिकेट साठी एवढं दुःख झालय. ज्या शेतकर्यांमुळे दोन वेळची भाकर मिळते त्यांच्या साठी कधीच एवढे दुःख नाहीं करणार ! भारत सेमीफायनल हरला. सर्वांना खुप दुःख झाले. पण माझा शेतकरी राजा दर वर्षी फायनल हरतो याच कुणालाच दुःख नाही !

लास्ट बट नाॅट लिस्ट
' मॅच बघुन खुप शिकायला भेटले.
 जीवनात कधीच NO BALL (चुकीचे पाऊल) पडू देऊ नका. 
कारण लोक तुमच्या त्याच चुकीचा फायदा घेतात '


मॅच हरली म्हणजे सर्व संपले असे नाही. चुकीचे पाऊल आणि नो बाॅलचा सुद्धा संबंध असतो, हे आपल्याला सांगणारी आजची पिढी खुप खुप हुशार आहे. तरूणांच्या 'हिडन टॅलेंट'ला वाव आणि दाद मिळतेय इथं. सोशल मीडिया आणि नेटवर्किंग साइट्स वर येणार्‍या या पोस्ट, प्रतिक्रिया तरूणाईच्या उस्फूर्त भावना आहेत.


                                           .......सतीश मोरे



०२ एप्रिल २०१६

दोस्तों का दोस्ताना



मैत्री हे आयुष्याला पडलेले एक सुखद स्वप्न आहे.
दोस्त, यार, जोडीदार, मैतर, खासकिल, सखा, फ्रेन्ड, सोबती
किती तरी सुंदर शब्द आहेत या नात्यासाठी !

जरा चार पाच वर्षाचा झाल्यावर,  मैदानावर खेळायला गेले की, शाळेत जायला लागल्यावर आपल्या विचारांशी सहमत,  सम आवडीचा , सवयीच्या सहकारी शोध सुरू होतो. तुला काय खायला आवडते? तुझी पेन्सिल, माझी पेन्सिल सेम टू सेम यातून जवळ येतात. डबा शेअर करतात,  एकत्र खेळतात,  एकाच बेंचवर बसतात. .. आणि मैत्री सुरू होते.
ज्याचे मित्र जास्त तो सर्वात श्रीमंत असे म्हणतात. मनासारखे करू देणारा,
मनात नसलं तरीही बरोबर येणारा,  चुकीचे असले तर सांगणारा, 
वाट्टेल तेव्हा वाट्टेल तेथे येणारा मित्र  मिळणे खरंच भाग्याचे आहे.



 निम्र भरलेयां उणे |ते पाणी ढलो चि नेणें ||
 तेवि अनतोखौनि जाणे | सामोरेयां ||

अर्थात  मार्गात खड्डा आला तर वाहते पाणी त्याला वळसा घालून पुढे जात नाही,
तो  खड्डा पुरा भरूनच पुढे  वाहते. त्याच प्रमाणे दयाशील माणुस दु:खिताचे दुःख पुर्ण नाहीसे करूनच पुढे पाऊल  टाकतो.मला वाटते हा दयाशील माणुस म्हणजे माझे मित्र.
एखादी अडचण आली आहे ,
कशाची तरी गरज आहे , कुठेतरी जायचं आहे, काय पण करायचे आहे. 
अशा परिस्थितीत माझे मित्र मला कधीही डावलून गेले नाहीत. 
या मित्रामुळेच माझ्या आयुष्यातील अडथळेरूपी खड्डे भरले गेले.



मला आयुष्यात खूप छान मित्र मिळाले.
शाळेत, कॉलेजात, व्यवसायात, नोकरीत चांगले मित्र, सहकारी मिळाले
म्हणून खुप काही करू शकलो, करणार आहे.
व्यक्ती विशेष या सदरात भविष्यात मी मला भावलेले मित्र, व्यक्ती आणि मार्गदर्शक
यावर लिहणार आहेच. परवा मैत्रीवर सहज बाहेर पडलेले हे शब्द तुम्हालाही आवडतील.




        दोस्तो का दोस्ताना

   सारी दुनिया एका बाजूला,
   दोस्त सोबतीला
   माझ्या सारखा पाॅवरफुल मीच !

   सगळे काही संपलं,
   तरीही फ्रेन्ड जोडीला
   माझ्या सारखा भाग्यवान मीच !

   सारे फक्त सोबतीला,
   मित्र सारं सावरायला
   माझ्या सारखा स्ट्राँगेस्ट मीच !

   सर्व कामात मदतीला,
   मैतर अडचणीत जोडीला
   माझ्या सारखा भारदस्त मीच !

   ए टू झेड मताशी सहमत,
   चुकल्यावर कानफाड ढोस
   माझ्या सारखा नशीबवान मीच !

   सरणार जाईपर्यंत नाही
   आमच्या दोस्तीचा अंत
   माझ्या सारखा भाग्यवंत मीच !

   म्हणूणच म्हणतो
   दुनियेची नाही पर्वा आम्हाला
   सलामत रहे दोस्ताना हमारा !



                           ...........सतीश मोरे .


०१ एप्रिल २०१६

विचारांच्या सुक्ष्म लहरी

विचारांच्या सुक्ष्म लहरी

सदगुरू वामनराव पै म्हणतात,
विचार म्हणजे बह्रीमन आणि  अंतर्मन यांना जोडणारा दुवा.
आयुष्यात प्रत्येक वेळी, क्षणी मनुष्य विचार करत असतो.
जीवन म्हणजे विचार . Life is only thinking .
माणुस हा विचार करणारा प्राणी हे खरे नसून विचार करतो तोच माणूस ,
चैतन्य शक्तीचा अविष्कार म्हणजे विचार.
विचार मनातून नव्हे बाहेरून येतात, बहीर्मनात पोहचतात,
घोळतात मग अंतर्मनात पोहचतात.
नशीब विचारातून घडते, माणसाचे जीवन त्याचे विचार आहेत तसे घडत असते.
सतत एक विषय घोळणे म्हणजे चिंतन.  आपण  शुभ चिंतन व अशुभ दोन्ही प्रकारचे चिंतन करतो. जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करणे सामर्थ्य चिंतनात आहे.
उद्याची चिंता करणे म्हणजे न घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे.
चिंता करून दुख कमी होत नाही.
  सुविचार प्रात्यक्षिक करा,पहायला शिका. मनातल्या विचाराची संख्या कमी होते.
विचार ओळखायला शिका. वाईट विचार  झटकून कामाला लागा.
शरीराला लागलेला रोग बरा होण्यासाठी दवाखान्यात उपचार घेतो.
आजार, रोग काढायची जेवढी काळजी घेता तितकी विचार करत असताना करा. विचार वळवायला शिका. त्यासाठी संगत महत्वपूर्ण भूमिका निभावते. 
प्रयत्न पुर्वक चांगल्या विचारांच्या लोकांची सोबत करा.

  To get rid of poverty is to think prosperity
  You should become master of your thoughts.
शुभ विचारांची प्रतिष्ठापणा करा,शुभ विचार दिव्य विचार करण्याची सवय लावा.
सुंदर विचाराची जोपासना हीच खरी उपासना.
आत्मलिंगावर शुभ विचाराचा अभिषेक करा.
विचाराचे स्पंदन vibrations एकमेकांपर्यत पोहचतात.
विचार लहरी किती महत्वाच्या आहेत हे समजण्यासाठी
सदगुरू राजा आणि वखारवाला दुकानदार गोष्ट सांगायचे.
ती गोष्ट ऐकलीच पाहिजे.

🎈🎈राजा आणि वखार दुकानदार   🎈🎈
एक न्यायी, जनप्रिय राजा होता. त्याच्या राज्यात जनता सुखी समाधानी होती. राजाला नगरीत फिरायची खुप आवड होती. महीन्यातून एकदा राजा राजधानीत फेरफटका मारायला जात असे. राजाकडे पाहून लोक नमस्कार करत,राजा त्यांची चौकशी करत. लोकाचे समाधानी चेहरे पाहून राजाला आनंद होत असे.
हमरस्त्याच्या कोपर्‍यावर एक लाकडाची वखार  होती. या दुकानाजवळ आले की त्या दुकानदाराकडे पाहून राजाला नेहमी खुप राग येत होता. राजाने खुप विचार केला, असे का होतय पण त्याला रागाचे कारण कळत नव्हते. इतर कोणाकडेही पाहीले तर राग येत नाही, फक्त त्या दुकानदाराकडे पाहून संताप का येतो ?
त्याला थोबाड मारावी अशी इच्छा का होती? याचे कारण काय राजाला उमगत नव्हते.
अखेर राजाने न राहून प्रधानजीच्या कानावर ही गोष्ट घातली.  प्रधानजीने हा शोध लावण्यासाठी वेषांतर करून त्या दुकानाशेजारी दुकान थाटले. काही दिवसांत ते दोघे मित्र बनले. एके दिवशी नेहमी प्रमाणे राजाची स्वारी तेथे आली. राजाला पाहताच त्या दुकानदाराची चलबिचल सुरू झाली. प्रधानजीच्या ते लक्षात आले. त्यांनी दुकानदाराकडे राजाचा विषय काढून बोलणे सुरू केले.
त्रागा करून दुकानदार म्हणाला,
'राजा कधी मरणार कुणास ठाऊक ? जेव्हा हा राजा मरेल तेव्हा त्याला जाळायला अंत्यविधीसाठी राजवाड्यातील लोक माझ्या दुकानातील चंदनाची लाकडे नेतील. माझा चांगला धंदा होईल, बक्कळ फायदा होऊन मी श्रीमंत होईन '
दुकानदाराचे हे उत्तर ऐकून प्रधानजीना राजाच्या संतापाचे कारण उमगले.  दुकानदार राजाच्या मृत्यूची वाट पहात होता, राजाविषयी वाईट चिंतन करत होता. त्या वाईट विचाराच्या लहरी राजापर्यत पोहचत होत्या आणि त्यामुळेच राजाला
त्या दुकानदाराकडे पाहून राग येत होता.
गोष्ट  इथे संपली. या मधून एक लक्षात घ्यायला हवे ,
आपण जे इतराविषयी शुभ अशुभ चिंतन, विचार करतो,
ते विचार सुक्ष्म लहरीच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यत पोहचतात
आणि त्यांच्या चांगल्या किंवा वाईट प्रतिक्रिया उमटतात.
गोष्टीचा दुसरा भाग. ....
ही गोष्ट गुरूजींनी वर्गातील मुलांना ऐकवली आणि उद्या येताना हीच गोष्ट  सकारात्मक करून आणायला त्यांनी सांगितले.
लहान मुलांच्या मनात नेहमीच चांगले विचार  असतात. 
एका हुशार मुलाने अशी छान गोष्ट करून आणली.
जेव्हा जेव्हा तो राजा समोर आला तेव्हा दुकानदाराने एकच विचार केला,
राजा खुप मोठ्ठा होऊ दे. किर्तीवंत होऊ दे . राजाने अनेक वाडे बांधु दे.
राजाने चंदनाचा राजमहाल बांधु दे.
त्यासाठी माझ्या कडून लाकडे विकत घेऊन जाऊ दे,
मग मी खुप श्रीमंत होईन.
बघा, किती छान विचार केला त्या मुलाने.
उगीच  नाही आपण म्हणत.
लहान मुले ही देवाघरची फुले असतात.
                           ........सतीश मोरे
महत्वाचे....
उद्या शनिवार कविता डे.
रविवार सुट्टी.

सोमवार सोशल प्रितिसंगम.
मंगळवारी वाचा.... विचारांची क्रांती, माझ्या जीवनातील .

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...