फॉलोअर

०३ जुलै २०१९

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

  *लोणंद*
  *०२/०७/२०१९*

राम कृष्ण हरी,




Also available at

👇karawadikarad.blogspot.com


नीरा नदीच्या काठी निरा गावात राहण्याचा अनुभव खरच वेगळा होता. सकाळी सर्व विधी आटोपले.  माऊलीं नीरास्नान ज्या ठिकाणी होणार आहे त्या नीरा नदी काठी पुलावर आलो .नीरा पुल पुणे जिल्ह्याच्या हद्दीत  तर पुल संपल्यानंतर सातारा जिल्हा लागणार होता. सात दिवसानंतर आपल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार होतो. समोरच पुलाच्या शेवटी सातारा जिल्ह्यात आपले स्वागत करत आहे असा बोर्ड लावला होता. सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी नदी पुलावरून पात्राचे दर्शन घेतले.

निरेच्या पात्रांमध्ये वारकरी स्नान घेत होते .वरुन धो धो पाऊस पडत होता. निरा पुलावर वारकऱ्यांची गर्दी होती. हे सर्व मोकळ्या समाजातील वारकरी पुढे येऊन आपल्या सकाळच्या सर्व विधी करण्यासाठी निवारा शोधत होते.

काल रात्री नीरा पुलावर पाहणी करायला आलो तेव्हा पुलाच्या फुटपाथवर असणारा चिखल व घाण याबाबत सातारच्या कलेक्टर श्वेता सिंघल यांना फोन करून कल्पना दिली होती. सिंगल मॅडम याची तात्काळ दखल घेत स्वच्छता करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याचे पूल स्वच्छ झालेला पाहून लक्षात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासन असो वा पुणे-सोलापुर  प्रशासन असो कायमच कार्य करत असते. माऊलींचा सोहळा सुसह्य होण्यासाठी प्रशासनाचे मिळणारे सहकार्य खरच उल्लेखनीय असते. जिल्हा परिषद पंचायत समिती पोलीस यंत्रणा महसूल विभाग आरोग्य विभाग शेती विभाग या सर्व विभाग वारकऱ्यांच्या सोयीसाठी सदैव कार्यक्रम असतात वारकऱ्यांना काही कमी पडू देत नाहीत. नीरा नदीकाठी वैष्णवांचा भरलेला मेळा पाहून खूप आनंद झाला.




पुढे येऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. आलो आपल्या जिल्ह्यात असे म्हणत सर्व मित्रांनी आनंद व्यक्त केला. लोणंद मध्ये येत असताना रस्त्याकडेला नेहमीप्रमाणे अनेक ओळखीचे पोलीस कर्मचारी भेटत गेले. अधिकारीही दिसले. दुपारी लोणंद मध्ये पोहोचल्यानंतर गजानन प्लॅनेट्सचे विवेक राव यांच्या घरी जाऊन चहा पाणी घेतले. माऊलीची पालखी यावेळी निरा स्नानासाठी नदीपात्रात नदीकाठाला होती, अतिशय भावपूर्ण वातावरणात माऊलींना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले.सहाच्या सुमारास माऊलींची पालखी लोणंद मध्ये पोहोचली. लोणंदकरानी माऊलींचे भक्तिभावात स्वागत केले. नेहमीप्रमाणे लोणंदमध्ये ही माऊली पोहोचल्यानंतर थोडा पाऊस पडला.

लोणंदच्या पुढे असणाऱ्या चांदोबाचा लिंब येथे आमचे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पुढे चालत चार किलोमीटर अंतरावर डॉक्टर काकडे यांच्या आत्मश्री आयुर्वेदिक केंद्रामध्ये आलो.

माऊलीच्या नामघोषात गेल्या सात दिवसांपासून पंढरीच्या वाटेचे अंतर कसे कमी होत आहे हेच कळत नाही. तरीपण सातारा जिल्हा आल्यानंतर आपल्या गावात आल्याचा आनंद खूप होत आहे. लोणंदला आल्यानंतर वारकरी आज दीड दिवस थांबणार आहेत. इथे लोणंदच्या पाठीमागे आणि पुढे अनेक गावात वारकरी मुक्काम करत आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्थानिकांनी मोफत चहा पाणी पिण्याचे पाणी याची व्यवस्था केली आहे. लोणंद मध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाने पाण्याचे टँकर उभे केले आहेत.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान .

माऊलीची कृपा दुसरे काय !



🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

०२ जुलै २०१९

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

राम कृष्ण हरी,

जेजुरी मध्ये मुक्कामाची चांगली सोय झाली होती, रात्री झोप चांगली मिळाली मात्र सकाळी सहा वाजता पालखीतळावर या असा निरोप रामभाऊ चोपदार यांनी दिला होता. पहाटे पाच वाजता जेजुरीच्या गडावरून करून भोंगा वाजल्याचा आवाज आला आणि जाग आली, उठलो. पटकन तयार झालो. सहा वाजता जेजुरी पालखी तळावर पोहोचलो. नियोजित वेळेप्रमाणे बरोबर सहा वाजता माऊली साठी खास तयार केलेल्या मोठ्या या गडद हिरव्या रंगाच्या तंबूमध्ये पालखीत ठेवलेल्या माऊलींच्या पादुका भावपूर्ण वातावरणात माऊली नामाचा जयघोष करत उचलण्यात आल्या. या पादुका रथामध्ये ठेवल्यानंतर लगेच नगारा वाजला आणि पालखी सोहळा वाल्हेच्या दिशेने रवाना होण्यास सज्ज झाला.



पालखीतळावर काय शिस्त असते, पालखीचा मुक्काम आटोपून दुसर्‍या गावाकडे जाताना त्या ठिकाणी काय वातावरण असते काय नियम असतात,असते हे सकाळी सहा वाजता पहावयास मिळाले. इतक्या लवकर पालखी निघणार असल्यामुळे सर्व सुमारे 400 दिंड्यांचे विणेकरी, झेंडेकरी तळावर येऊन थांबले होते. राजाभाऊ चोपदार यांनी विणेकरांची हजेरी घेण्यास सुरुवात केली होती. सोहळ्यात सहभागी असणाऱ्या दिंड्याच्या मालकांना रोज हजेरी देणे गरजेचे असते .दिंडी मालकांच्या वतीने त्या दिंडीचा विणेकरी हजेरी देण्यासाठी येतो. पालखी तळाच्या परिसरात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर किंवा अगदी जवळपास कोठेही त्या दिंडीला मुक्कामाची जागा मिळालेली असते. त्याठिकाणाहून संबंधित दिंड्याचे विणेकरी आणि झेंडेकरी सोहळा सुरू होण्याच्या वेळेअगोदर तळावर येऊन थांबतात, ओळीने दिलेल्या क्रमानुसार उभे राहतात. विणेकरी हजेरी देतात, रथा समोरील 27 दिंड्यांची हजेरी अगोदर होते. रथाच्या पाठीमागे असणाऱ्या नोंदणीकृत 251 दिंड्या आणि त्याचे विणेकरी हजेरी देताना माऊलींचा पालखी पादुका मध्ये ठेवल्यानंतर त्या तंबूमध्ये असलेल्या कट्टाचे दर्शन घेतात, आणि बाहेर बाहेर उभे असलेल्या चोपदारांच्या कडे हजेरी देतात अशी पद्धत आहे. ही माहिती मिळाल्‍यानंतर आम्ही वारकरी  या मासिकाचे संपादक सचिन पवार यांना भेटावयास गेलो आम्ही वारकरी संस्थेतर्फे तरुणांसाठी वेगळा उपक्रम वारी विथ विसडम पवार यांनी यावर्षी राबवण्याचा निर्णय घेतला होता



पंढरीची वारी काय आहे याचा अप्रुव सगळ्यांनाच आहे.वारी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता असते अशाच उत्सुकता असणाऱ्या राज्यभरातील आस्तिक-नास्तिक 100 विद्यार्थ्यांना यावर्षी वारीमध्ये *वारी विथ विसडम* या उपक्रमाच्या माध्यमातून वारीची माहिती सांगितले जाणार आहे. आम्ही वारकरीचे संपादक सचिन पवार माऊली हे वारकऱ्यांना विद्यार्थ्यांना वारी कशी चालते, वारी मध्ये काय उपक्रम असतात आणि वारी कोणी सुरू केल्यापासून  दिवसभरात वारीत उपक्रम काय असतात याची माहिती विद्यार्थ्यांना देत होते.

तळावरील हा दोन उपक्रमाची माहिती घेतल्यानंतर बाहेर पडलो. अचानक ओ मोरे माऊली असा आवाज आला. पाठीमागे पाहतो तर एक विणेकरी मला बोलावत होते. या विणकरी माऊरलीकडे पाहून मी इतका आनंदित झालो की माझा आनंद सांगू शकत नाही.माझे चुलते पण जी मोरे यांची मुलगी, माझी चुलत बहीण वैशाली रहिमतपूर येथे आत्याच्या मुलाला दिली आहे. आत्याचा मुलगा संजय म्हणजे आमचे दाजी. या लग्ना अगोदर पासून संजय दाजी यांचे करवडी मध्ये सतत येणे-जाणे होते, मी ही अनेक वेळा रहीमतपुरला त्यांच्या घरी राहून आलो आहे.  हे दाजी  एका दिंडीचे विणेकरी होते.

 संजय दाजी यांची माझी भेट जवळजवळ पाच सहा वर्षानंतर झाली असेल. गेली काही वर्षे संजय दाजी यांनी पूर्ण परमार्थाचा मार्ग स्वीकारून एक वेगळ्या पद्धतीचे जीवन ते जगत आहेत. मध्यंतरी त्यांच्या घरातील काही कार्यक्रमाला मला जाणे जमले नव्हते. संपूर्ण भारत भ्रमण करून आलेल्या पारमार्थिक विचारांचा वसा घेतलेल्या संजय पवार दाजी यांना भेटण्याची इच्छा मला खूप दिवसापासून होती. ती भेट माऊलींच्या पालखी सोहळ्यात झाली. मला खूप आनंद झाला. आम्ही दोघांनी एकमेकाच्या पायाचे दर्शन घेतले , कडकडून मिठी मारली. संजय दाजींना यांना विणकरीच्या रुपात पाहून खूप खूप आनंद झाला.इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, त्यांच्यासोबतच पालखी मधून पुढे चालत आलो. जेजुरी लोणंद रस्त्यावर पालखी येताच मी त्यांचा निरोप घेतला आणि जेजुरी गडावर जायला निघालो.

*जेजुरीच्या गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले.  जेजुरीमध्ये मल्हारराव होळकर यांच्या वंशजांनी बांधलेले छत्री मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे .या मंदिराविषयी यापूर्वी ऐकले होते या मंदिराला भेट दिली. या मंदिरातील नंदी 6 फुटी आहे. एक वेगळे मंदिर पाहिल्याचा आनंद झाला.या मंदिराचा व्हिडिओ आणि माहिती आपणास पाठवून देत आहे अवश्य ऐका*.

 9 वाजता पुन्हा वाल्ह्यांच्या दिशेने चालायला सुरुवात सुरुवात केली. वाल्हेचा घाट आणि घाटांमधील अरुंद रस्ते आणि नागमोडी वळणे यामुळे वारकऱ्यांना चालणे कठीण होते त्यातच पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला.

मात्र या कशाचीही तमा न बाळगता वारकरी चालत होते चिखलातून दगडातून पाण्यातून आपली वाट पार पाडत भरपावसात साडेबाराच्या सुमारास माऊलींची पालखी वाल्हे गावाजवळ पोहोचली. दुपारी एक वाजता पालखी तळावर पोहचली, समाज आरती झाली. पाऊस उघडल्यावर दुपारच्या पंगती पडल्या. त्यानंतळ थकलेल्या माऊलींनी आराम केला. काही जण कपडे धुवायला गेले, काहीजण वाल्या कोळीच्या डोंगरावर वाल्मिक ऋषीच्या दर्शनासाठी गेले काही जण निवांत तंबूमध्ये पडून राहिले. कराडकर यांच्या बारा नंबर दिंडीमध्ये जेवण झाल्यानंतर ह. भ .प. बंडातात्या कराडकर यांची एक मुलाखत घेतली .दुपारचे दोन वाजले होते, वाल्यामध्ये न राहता पुढचा प्रवास सुरु करावा,असा निर्णय घेतला आणि चालायला सुरुवात केली.




साडेपाच वाजता नीरा नदी जवळ पोहोचलो ,नदीच्या पलीकडे गेल्यानंतर सातारा जिल्हा लागणार होता.आपल्या जिल्ह्यात प्रवेश करण्याची उत्सुकता होती.दरम्यान निरेत कुठे राहायचे या बाबत अगोदरच फोनाफोनी झाली होती.माझे लहानपणीचे जुने मित्र श्रीधर नलवडे यांची एक बहीण नीरा येथे शिक्षिका होते ते अनेक वर्षे निरेत राहत होते, त्यांना फोन करून निळ्या मध्ये कुठे राहायची व्यवस्था होती का अशी विनंती केल्यानंतर आमच्या बहिणीने लगेच घर मालक तुषार आगवणे  यांच्या घरी राहायला जावा सांगितले. सधन शेतकरी आणि तितकेच मनाने श्रीमंत असलेल्या या आगवणे कुटुंबाने  आमचे अतिशय मनोभावे स्वागत केले, पाहुणचार केला.नीरा मध्ये चांगल्या ठिकाणी राहायला मिळाल्यामुळे खूप आनंद झाला,

एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला. माऊली माऊली.

Also available at

👇karawadikarad.blogspot.com




🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

०१ जुलै २०१९

राम कृष्ण हरी,
दोन दिवस माऊलींचा पाहुणचार सासवडमध्ये अतिशय उत्तम झाला.माऊलींच्या आगमनाने सुखावलेल्या सासवडकरांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही दोन दिवस माऊली पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या सुमारे साडेतीन लाख वारकऱ्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली. दोन दिवस सासवडमध्ये भक्तीचा महापूर वाहत होता.वारकऱ्यांसाठी अनेकांनी आपली घरी खुली केली होती. घरात, घराबाहेरील शेडमध्ये, फ्लॅटमध्ये, पार्किंगमध्ये ,हॉटेलच्या परिसरात , कंपनीच्या कंपाऊंडमध्ये ,एसटी स्टँड दुकान जिथे मिळेल त्या जागेवर वारकरी आराम करत होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी परिसरातील नागरिकांनी चहापाणी नाश्ता सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या.

सासवडमधील नदीमध्ये पाण्याचा थेंबही नव्हता थोडी फारसे पाणी आले ते दोन दिवस पडलेल्या पावसामुळे. शेतीसाठी पाणी अजिबात नाही, दोन-तीन दिवस पिण्याचे पाणीही येत नाही.पिके करपली आहेत ,अशी परिस्थिती असतानाही वारकऱ्यांसाठी पाणी,  बोअर उपलब्ध करून दिली. प्रशासनाने जागोजागी वारकऱ्यांच्या सेवेसाठी मदत केंद्र उभे केले होते. वारकरी सकाळी जेजुरी च्या दिशेने रवाना झाले




नऊच्या सुमारास आम्ही आम्ही बाहेर पडलो. सासवडच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर सोहळा सकाळच्या न्याहारीसाठी विसावला होता, या ठिकाणी अनेक वारकरी थांबले होते .काल एकादशी होती .द्वादशी आज उपवास सोडायचा होता. उपवास सोडण्यासाठी न्याहरी आणली होती. काहीनी सार्वजनिक मंडळाने दिलेला नाश्ता खाऊन उपवास सोडला. विसाव्याच्या ठिकाणी दोन वर्षानंतर बाबा महाराज यांचे नातू हभप चिन्मय महाराज आणि भगवती महाराज सातारकर यांची भेट झाली. कराडच्या किर्तन महोत्सवच्या आठवणींना उजाळा दिला .चिन्मय महाराजांची पुढारी आँनलाईन साठी मुलाखत घेऊन पुढे चालू लागलो.

पुण्यातील टेकडी ग्रुपचे पंधरा-वीस वारकरी सासवड ते जेजुरी असा टप्पा पार पडणार होते. या ग्रुप मध्ये पुण्याचे नवीन पाहुणे थोरात साहेब भेटले. या ग्रुपसोबत सातारा जिल्ह्याचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी पराड साहेब हे होते. मी त्यांची मुलाखत घेतली मात्र सुरुवातीला त्यांना ओळखले नाही त्यांनी स्वतःहून आमच्या सातारा भेटीविषयी आठवण करून दिल्यानंतर खूप आनंद झाला.


पुढे पुढे चालत राहिलो रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेले कराड ट्राफिक पोलीसचे वरिष्ठ कर्मचारी पाटील माझगावकर भेटले , त्यांनी आम्हाला चहा पाजला .

आम्ही हळूहळू पुढे वाटचाल केली. चारच्या सुमारास जेजुरीला पोहोचलो आणि जोरदार पावसाला पुन्हा यायला सुरुवात झाली. धो-धो पावसाने वारकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. पूर्वनियोजित मुलाखत आणि बातमीच्या कामानिमित्त पेशवे लॉज येथे पोचलो. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही काही कार्यकर्ते एका बातमीच्या विषयासाठी वाट पाहत बसले होते. त्यांच्याशी झालेल्या फोनवरून चर्चेनंतर सासवड नगरपालिका येथे सभागृहांमध्ये दोन तास बसलो. वेगळी माहिती मिळाली या विषयीची बातमी दोन दिवसात पुढारी मध्ये प्रसिद्ध होणार आहे. सेवाभाव काय असतो याचे मूर्तीमंत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अनुभवायला आले.

सासवड पालिकेच्या इमारतीसमोर वारकऱ्यांनी जागा व्यापली होती. त्यानंतर पुढे सायंकाळी पालखीतळावर पोहोचलो. कराडकरांच्या दिंडीत जेवण केले  माहिती घेत बसलो आणि रात्री उशिरा झोपायचं निघालो. एकंदरीत आजचा दिवस चांगला गेला.


🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩
*सतीश मोरे*
karawadikarad.blogspot.com

३० जून २०१९

राम कृष्ण हरी,

शुक्रवारी सायंकाळी माऊलींचा पालखी सोहळा सासवड मध्ये पोहोचला,तेव्हा माऊलींचे स्वागत जोरदार पावसाने केले होते.सासवडमध्ये माउलींनी पाऊस आणला अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.या पावसाने पालखीतळावर दिंडी मालक आणि वारकरी माऊलींची दैना उडवली,पाऊस थोड्या वेळाने थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र सायंकाळच्या पंगती बसण्याच्या वेळेत पावसाने आणखी जोर धरला. पालखी तळ आणि परिसरात मुक्कामाला असलेल्या अनेक दिंड्यांमध्ये स्वयंपाक तयार झालेला होता. मात्र जेवायचे कसे असा प्रश्न  होता. पावसाची धार सुरू होती शेवटी बुफे सिस्टीम लावून जेवण सुरू केले. काही वारकर्‍यानी तंबूत बसून जेवण आटोपले.अनेकांची गैरसोय झाली.दिवसभर सुमारे तीस किलोमीटर चालल्यानंतर माऊलींना भूक लागली होती. त्यामुळे भर पावसात कुठेतरी बसून, उभे राहून मिळेल ते, मिळेल तसे वारकर्‍यानी जेवण केले. दहा वाजले तरी पाऊस थांबला नव्हता.



जेवणाचा प्रश्न मिटला मात्र आता झोपायचे कसे आणि कुठे? तंबूच्या चारी बाजूने पावसाचे पाणी वाहत होते. या तंबूत रात्र कशी काढायची असा प्रश्न होता? तंबूचे कापड पहिल्या पावसात भिजते तेव्हा पाणी आत झिरपते, पुढे पुढे ठिक होत जाते . पहिलाच पाऊस असल्यामुळे अनेक तंबू गळत होते. मात्र हार मानतील ते वारकरी कसले? परिस्थितीला सामोरे जाणे आणि तडजोड करणे हे फक्त वारकरीच करू शकतात, याचा प्रत्यय सासवडमध्ये आला. वारकऱ्यांनी प्रशासनाविरोधात कसलीही तक्रार न करता पावसाला तोंड दिले.दुसरीकडे ज्ञानेश्वर माऊलींनी पाऊस आणल्याबद्दल सासवडकर मात्र खुश होते.



आमच्या कराडकर 12 नंबर दिंडी मध्ये फार वेगळी परिस्थिती नव्हती,या ठिकाणी तंबूमध्ये पाणी घुसले होते. खालची जमीन  पाण्याने झिरपली होती. अंथरलेले कागद कार्टून ओले झाले होते. पाऊस सुरूच होता आता येथे रहायचे कसे हा प्रश्न पडला. शोधाशोध सुरू झाली. याच दरम्यान प्रकाश पाटील आणि रणजित पाटील यांच्या कराड मधील एका मित्राचा फोन आला. सासवडमध्ये माझी सासरवाडी आहे तिकडे राहायला जाता का? असे त्यांनी स्वतःहून विचारले. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे ,अशी आमची अवस्था झाली. आमचे ध्यानी मनी नव्हते ते माऊलींनी पाठवले होते.

कराड येथील ढेबेवाडी फाट्यावर असणारे साँ मिलचे मालक दीपकशेठ पटेल यांचा मुलगा निलेश याची सासरवाडी सासवड आहे. निलेश यांनी तात्काळ आपले मेहुणे राज पटेल यांना फोन करून माझे कराडचे मित्र तुमच्याकडे झोपायला येत आहेत,त्यांची व्यवस्था करा असे सांगितले.पंधरा मिनिटात राज पटेल आणि त्यांचे वडील सासवडच्या शिवाजी पुतळा चौकात भर पावसात आले आणि त्यांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतले.

गणेश मंगल कार्यालयाच्या शेजारी त्यांनी नुकतेच एक नवीन घर बांधले आहे, खाली बेसमेंट, मध्ये दुकान गाळे आणि पहिला मजला निवास असे हे घर होतं. या घराची अद्याप वास्तुशांती झालेली नव्हती. या घरात पटेल बापलेक आम्हाला घेऊन आले. त्या घरात पोहोचल्यानंतर पाहिले तर अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेल्या या तीन मजली घरांमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्यांनी आमची व्यवस्था केली. या घराचे अजून वास्तुशांती झाली नाही त्या ठिकाणी पटेल पितापुत्रांनी आमच्यासाठी खूप कमी कालावधीत लाईट व्यवस्था, पाणी बादली या सर्व आणून दिल्या.अतिशय सुंदर अशा या नवीन घराची त्यांनी आम्हाला दारे उघडून माऊली निवांत रहावा,काही गरज लागली तर मध्यरात्री फोन करा असे नम्रपणे सांगितले.



माऊली काय चमत्कार करतात याचा प्रत्यय याची डोळा याची देहा पाहायला मिळाला.आमच्या डोळ्यातून आता पाणी यायचेच बाकी होते.आपल्या जवळच्या कोणीही पाहुण्याने असा वास्तुशांती न झालेला सुंदर बंगला आपल्याला दिला असता का असा प्रश्न डोळ्यासमोर उपस्थित झाला.माऊलीचं हे करू शकतात,त्यामुळे आम्ही कृत्य कृत्य होऊन माऊलीपुढे नम्र झालो.

रात्री उशिरा झोपी गेलो, सकाळी उठलो तर त्या बंगल्यातील टाकीचे पाणी खूप थंड होते. रात्रभर पाऊस चालूच होता.टाकीमधील साठलेल्या थंड पाण्याने आंघोळ करायचे जीवावर आले. बाथरूमचे काँक फिरवले असता सोलरचे कडक गरम पाणी वाहू लागले. पुन्हा एकदा माऊलीचा महिमा पाहायला मिळाला.आदल्या दिवशी गारठून गेलेले शरीर गरम पाण्याने अंघोळ करून आम्ही शेकून घेतले.आंघोळ झाली आणि त्यानंतर आम्ही पालखी तळाकडे माऊली दर्शनासाठी गेलो.

पालखीतळावर फार वेगळी परिस्थिती नव्हती रात्रभर पावसात झाल्यामुळे तळावरील अनेक तंबूमध्ये पाणी शिरले होते .कोणी कपडे सुकवत होते, तंबुमधील पाणी बाहेर काढत होते तर कोणी चिखलातून वाट काढत इतर कामासाठी जात होते. तळावर असलेल्या  सोहळ्याचे मुख्य चोपदारांच्या तंबूमध्ये गेलो. राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांच्याशी सुमारे तासभर गप्पा मारल्या, वारीसह वेगवेगळ्या विषयांवर बोललो. त्यानंतर माऊली दर्शनासाठी निघालो. मसूरचे लंगडे काका तिथे भेटले



यादरम्यान कराडमध्ये काम केलेले पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांची भेट झाली. त्याचसोबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. पोलीसांनी पालखीतळावर येणाऱ्या भाविकासाठी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता. सासवड परिसरात माऊलीं पालखीचे आगमन म्हणजे दसरा-दिवाळी सण असतो. परिसरातील ग्रामस्थ, भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येतात. हा दिवस माऊली उत्सवाचा दिवस असतो. माऊली दर्शन घेऊन तृप्त झालो. एकंदरीत आजचा दिवस नेहमीप्रमाणे खूप सुंदर गेला.


Also available at

👇karawadikarad.blogspot.com

२९ जून २०१९


राम कृष्ण हरी,

पुण्यातील दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळी आम्ही सासवडच्या दिशेने चालायला निघालो. (त्यामुळे दोन दिवस ब्लाँग नव्हता ) पुणे ते सासवड हे अंतर सुमारे बत्तीस किलोमीटर आहे. एका दिवसात हे अंतर पार करणे म्हणजे खूप अवघड काम असते. माऊली पालखी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या पूर्णवेळ वारकऱ्यांना हे अंतर काहीच वाटत नाही मात्र आमच्यासारख्या मोकळा समाजात फिरणाऱ्या वारकऱ्यांना हे आव्हानच असते, हाच विचार करून नवा रस्ता पेठ ते दिवे घाट हे अंतर आम्ही कालच रात्री परवा चालून पूर्ण केले होते.

आज दिवेघाटात सकाळी दहाच्या सुमारास पोचलो आणि चालावयास सुरुवात केली. रस्त्यावर दुतर्फा मोकळा समाजातील वारकऱ्यांची आणि छोट्या-मोठ्या दिंडी यातील वारकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. घाटाच्या पायथ्याशीच आम्हाला पुढारी ऑनलाइनच्या वृत्तांसाठी एक ज्येष्ठ वारकरी भेटले, गळ्यात तुळशीच्या अनेक माळा, फक्त धोतर नेसलेले हे वारकरी पुढारीचा बूम माईक पाहून माझ्याकडे धावत आले.त्यांना विचारले वारीतून तुम्हाला काय मिळते तर ते बोलू लागले ,मी नाशिकहुन आलो आहे,गेली अनेक वर्षे मला डॉक्टरांनी रक्तात साखर जास्त असल्याचे सांगितले आहे, मात्र मी एक गोळी खात नाही,प्रत्येक वर्षी पंढरीची वारी करतो. या वारीतून मला पुढील वर्षभर नामाचे टॉनिक मिळते आणि पूर्ण खडखडीत बरा होतो,असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या वारकऱ्यांच्या भावना असतात या वारकऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही दिवेघाट चारावयास सुरुवात केली.



ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा यादरम्यान हडपसर च्या पाठीमागे होता मात्र सोहळ्याच्या पुढे चालणारे मोकळ्या समाजातील अनेक वारकरी दिवेघाटात पोहोचले होते, सोहळ्यातील प्रमुख दिंड्यांचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक तसेच मोकळ्या समाजातील दिंड्यांचे ट्रक घाटाच्या उजव्या बाजूने वर जात होते तर वारकरी डाव्या बाजूने घाटात चालत होते. वारकऱ्यांचा उत्साह हळूहळू वाढत होता. खुल्या समाजातील वारकऱ्यांना स्वतःचे साहित्य वाहून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साधन नसते, त्यामुळे ते त्यांचे साहित्य डोक्यावर घेऊनच पुढे चालत असतात. डोक्यावर मोठी बॅग घेऊन चालणाऱ्या महिला वारकरी त्यांच्यासोबत असलेले पुरुष वारकरी आणि अशा प्रकारच्या दिंड्या मध्ये असणारे एक वेगळी व्यवस्था पहावयास मिळाली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी मराठी भाषा बोलतात मात्र त्यांच्या बोलण्यावरून ते कोणत्या भागातून आले असतील याचा अंदाज येतो.त्यांच्या सोबत गप्पा मारत घाटावरील वळणावर थांबत थांबत आम्ही दिवे घाट चढत होतो .रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक पाण्याचे टँकर उभे होते या टँकरमध्ये वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. टँकरमधील पाणी व्यवस्थित न पिता अनेक वारकरी पाणी वाया घालवत होते, हे पाहून रणजीत पाटील यांनी वारकऱ्यांना चढ्या आवाजात सुनावले, 'जे पाणी वाया घालवणार त्यांना माऊली नाही भेटणार',असा गोड दम देऊन  नाना पुढे चालत होते. घाटाच्या कट्ट्यावर काही वारकरी बिड्या ओढत निवांत बसले होते ,काहीजण तंबाखू खात होते. यांना पाहूनआम्हाला तुमच्या बिडीचा त्रास होत आहे  तुम्ही धूम्रपान करू नका. 'जो वारीत बिडी ओढणार त्याला माऊली वरचा रस्ता दाखवणार',अशा प्रकारचा दुसरा एक गोड दम देऊन आम्ही पुढे चालू लागलो.

पाय नसलेला एक वारकरी पांगुळगाड्यावरून घाट चढत होता. दोन्ही हाताने तो गाडा ढकलत होता, त्याच्या मदतीला अनेक वारकरी गाडा ढकलण्यासाठी पुढे येत होते तर काही जण त्याच्या मदतीसाठी डब्यामध्ये पैसे टाकत होते. अपघातांमध्ये पाय गेल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी केलेला संकल्प पूर्ण पाडण्यासाठी मी वारी सुरू केली गेली, अनेक वर्षे वारी करतोय असे त्या दिव्यांग वारकर्‍यांने सांगितले.

आम्ही पुढे चालत होतो घाटाच्या शेवटच्या दोन वळणावर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ओबी व्हॅन उभ्या होत्या, या कॅमेरासमोर येऊन काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न काही दिंडीतील वारकरी करत होते. दिवे घाट जिथे संपतो त्या अगोदर एक छोटीशी गुहा आहे आणि त्याच्या शेजारीच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. त्या गुहेमध्ये बसून फोटो काढण्याचा मोह अनेकांना होतो,आम्हीही तो पूर्ण करून घेतला. शेजारच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत चहा वाटप सुरू होते तर समोर सेवाभावी कार्यकर्ते अक्षरशः वारकऱ्यांना थांबवून,विनंती करुन त्यांना चहा देत होते. थंड हवा वाहत होती, पाऊस येण्याची शक्यता होती त्यामुळे आम्ही पुढे लवकर निघालो.



घाट माथ्यावर असलेल्या झेंडेवाडी गावात ग्रामस्थांनी,परिसरातील सेवाभावी संस्था आणि पुण्यातील अनेक मंडळांनी अनेक मदतीचे स्टॉल उभे केले होते .पुण्यातील सालासर हनुमान चालिसा मंडळाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी एक कक्ष उभारला होता. या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांचे पहिल्यांदा गरम पाण्याने हात-पाय धुतले जात होते, त्यानंतर त्यांच्या पायाला, बोटांना, गुडघ्यांना मॉलिश करून त्या वारकर्यांचे वेदना कमी करण्याचा हे लोक प्रयत्न करत होते. यामध्ये महिलांचाही सक्रिय सहभाग होता. पुण्याच्या योग विद्या संवर्धन मंडळाने आदरणीय डॉ. पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचा कक्ष उभारला होता. आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी या कक्षांमधील अनेक सेवेकरी हृदयापासून काम करत होते.

घाट माथ्यावर वारकऱ्यांसाठी चहापाणी,फराळ ,केळी,आम्रस  लिंबू सरबत,जेवण या सर्व सुविधांची रेलचेल होती.सेवा भावी संस्थांचे कार्यकर्ते वारकऱ्यांना आदरातिथ्याने खाऊच्या वस्तू घेण्यासाठी विनंती करत होते. यामध्ये तरुणांचा सहभाग नोंदणीय होता. झेंडेवाडीत एक तास आराम केल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरु केला, तत्पूर्वी कुठे जेवण मिळते का याचा शोध घेऊ लागलो.मात्र त्याच वेळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला.आम्ही आडोसा शोधत एक छोटस हॉटेल गाठलं.अचानक जोरात पाऊस झाल्यामुळे वारकरी भांबावून गेले. आम्ही तिथेच बसून राहिलो पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता, भूक खूप लागली होती शेवटी तिथेच मिसळपाव खाऊन घेतला.तिथून हळूच बाहेर येऊन पावसात भिजत नाम नामामध्ये चिंब झालेल्या वारकऱ्यांचा व्हिडिओ आणि फोटो काढले.दिवेघाटात जाऊन काही फोटो काढले,वारकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.घाटात वर येणारी वाहने आणि वारकरी यांची झालेली गर्दी त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मात्र पोलिस यंत्रणेने अतिशय चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना रस्ता मोकळा करून दिला. या संपूर्ण वारीत पोलिसांचे सहकार्य खरंच वाखाणण्यासारखी असते. एरव्ही डोळे वटारुन थांबवणारे पोलीस या वारीत वारकऱ्यांना  'माऊली' नावाशिवाय बोलवत नाहीत.

तीनच्या सुमारास पाऊस कमी झाला आणि पुढचा प्रवास सुरु केला,माऊलींची पालखी अजून उरळीकांचन मध्ये होती. त्यामुळे आम्ही पुढे चालू लागलो. भिजलेले वारकरी रस्त्याकडेला थांबून कपडे सुकवण्याचा प्रयत्न करत होते. काहीजण ट्रक खाली बसून जेवण करत होते, तर काही जण रस्त्यावर पडलेला कचरा केळीच्या साली,चहाचे कप उचलत होते. पुण्याच्या रिँबिंनहूड या संस्थेच्या युवा कार्यकर्त्यांचे मला चांगलेच अप्रुव वाटले, हे कार्यकर्ते वारकऱ्यांना लिंबू सरबत देत होते त्याच वेळी वारकऱ्यांनी रस्त्यावर टाकलेले कप व इतर कचरा ते गोळा करत होते.अधिक माहिती घेतली असता ही संस्था पुण्यातील हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेले अन्न गोळा करून रोज झोपडपट्टीमध्ये पोहच करतात, अशी माहिती मिळाली. या कार्यकर्त्यांना कौतुकाची थाप देऊन पुढे निघालो. रस्त्याकडेला असणाऱ्या अनेक घरांमध्ये वारकरीही विसावले होते. स्थानिक ग्रामस्थ त्यांना चहा पाणी विचारपुस करत होते  यामध्ये छोटी मुलेही कमी नव्हती. आईने तयार करून दिलेला चहा रस्त्यावर आणून वारकऱ्यांच्या वाटणाऱ्या दोन छोट्या चिमुकल्यांचं मला फार कौतुक वाटलं.लेकीची आठवणी झाली. राम कृष्ण हरी !


अजून सासवड सहा किलोमीटर होते.सासवडच्या परिसरात असणाऱ्या बोराच्या सीताफळाच्या बागा पाहत पाहत गप्पा मारत ,माऊलींचे नाम घेत आणि मधूनच वेगळे फोटो काढत आमचा प्रवास सुरू होता. भिजलेले कपडे आता अंगावरच पूर्ण सुकले होते. सासवडला कधी पोहोचणार याचे वेध लागले होते. थंडीमुळे,भिजल्यामुळे पाय खूप दुखत होते मात्र बसायला कुठे जागाच नव्हती. सगळीकडे चिखल आणि ओलसर जागा होती,त्यामुळे चालतच राहिलो.

साडेपाचच्या सुमारास सासवडमध्ये शाळा नंबर 4 मध्ये बारा नंबर दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. कारमध्ये बसून वेगळी बातमी आणि ब्लॉग तयार केला. सासवड मध्ये गेले चार दिवस पाणीपुरवठा आला नव्हता, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणी येते अशी माहिती मिळाली. मात्र प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी,वारकऱ्यांच्या सेवेसाठी दमदार तयारी केली असल्याचे सांगण्यात आले. थोडा आराम करून शेजारीच असलेल्या सोपानकाकांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या ठिकाणी चर्चा करताना खरात माऊली यांनी हातात शस्त्र नसणारे तीन देव आहेत आणि हे देवच जगाला शांतीचा मार्ग दाखवतील असे सांगितले.पंढरपुरचा विठ्ठल ,भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या तिघांच्या हातात कसल्याही प्रकारचे शस्त्र नाही. विनाशस्त्र या तिन्ही देवांनी भक्तीचा वेगळा मार्ग सांगितला आहे, ही एक वेगळीच माहिती आज ऐकावयास मिळाली. पंढरीच्या वारीत खूप काही शिकायला मिळते,आजही मिळाले.

बारा नंबर दिंडीमध्ये असणारे तंबू मध्ये आपले साहित्य घेऊन ठेवून पुन्हा लिहित बसलो,पावसाची पिरपिर चालू होती,आज रात्रभर असाच पाऊस राहिला तर थोडे वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे.मात्र सासवडमध्ये असणाऱ्या सुमारे तीन लाख वारकऱ्यांची काळजी माऊली घेणार आहेत.त्यामुळे कसलीच अडचण येणार नाही.

राम कृष्ण हरी माऊली !

 😌जय माऊली😌

माऊली सतीश मोरे

Also available at
👇karawadikarad.blogspot.com

👇
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2463181780404657&id=100001385769226
ना पाऊस थांबला,  ना वारकरी..!
दिवेघाटात मुसळधार पावसात विठुरायाच्या नामघोषात माऊली चिंब

दिवेघाट : सतीश मोरे
पंढरीच्या  वारकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा नसते, याचा प्रत्यय शुक्रवारी दिवेघाटात आला. एकिकडे पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी तुकोबा, ज्ञानोबाचे वारकरी  माऊलीचा नामघोष करत होते तर दुसरीकडे याच माऊलींना भेटण्यासाठी अवकाशात नभानेही सुंदर रूप धारण करत माऊलींच्या दर्शनासाठी जलधारा बरसायला सुरुवात केली. ना पावसाचा जोर कमी होता ना वारकऱ्यांचा उत्साह ! सुमारे दोन-अडीच तास वारकरी भर पावसात ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात आणि विठू माऊलीच्या  गजरात न्हाऊन गेले.
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास सासवडकडे जायला निघाला. पुण्यात दोन दिवस वारकऱ्यांनी पुणेकरांचा पाहुणचार घेतला होता. पुण्यातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आळंदी वरून पुण्याला आलेली पालखी नाना पेठेत विसावल्यानंतर पुणेकरांच्या आनंदाला उधाण आले होते .दोन दिवस पुण्यामध्ये माऊलींचा उत्सव सुरू होता. बहुतांश शाळांना सुट्ट्या होत्या तर अनेक शासकीय , निमशासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी होती. दोन दिवस पावसाने अधुनमधुन जोरदार हजेरी लावली होती. पुणेकरांचे दातृत्व पाहून  भारावलेल्या वारकऱ्यांनी आदरातिथ्य स्वीकारून गुरुवारी सकाळी ज्ञानोबा माऊलीचा पालखी सोहळा सासवडकडे रवाना झाला.
बाजारपेठेत दुतर्फा माऊलींच्या स्वागतासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हडपसर येथे गाडीतळ परिसर चौकात माऊलीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक उभे होते. दर्शन घेऊन सुखावलेले भाविक तृप्त होऊन माऊलीना निरोप देत होते. गेल्या काही वर्षात गेल्या पुणेकरांच्या उत्साहात अधिक भर पडली आहे. आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड या दरम्यान अनेक पुणेकर पायी वारी करतात. अनेक महिला मंडळे, आयटी क्षेत्रातील नोकरदार, शिक्षक तसेच उद्योजक यांनी चालण्यासाठी दिंड्या तयार केल्या आहेत. या दिंडीला पुणेकर दिंडी, आयटी दिंडी, पर्यावरण दिंडी ,जलदिंडी अशा प्रकारची नावे असून आळंदी ते सासवड या दरम्यान हजारो पुणेकर वारीमध्ये सहभागी होत असतात.





हडपसर नंतर माऊलीने देवाची उरुळी या गावाकडे प्रस्थान केले. दरम्यान माऊलीच्या पालखीच्या पुढे असणाऱ्या अनेक खुल्या दिंड्या आणि मोकळ्या समाजातील लाखो वारकरी सकाळपासूनच दिवे घाटाकडे चालत होते. दुपारी बारा पर्यंत दिवे घाट भक्तीच्या महासागरात वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. या मार्गावर सासवड बाजूने येणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. मात्र वारकऱ्यांचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक, ट्रॅ्नटर,  टँकर हे पुण्यावरून सासवडच्या मार्गाला जात होते. रस्त्याच्या डाव्या बाजूला वारकरी आणि उजव्या बाजूला वारकऱ्यांच्या सेवेसाठी असणारी वाहने अशाप्रकारे वाहतूक बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात सुरू होती.
दिवे घाटातील अवघड वळणे पार पडताना वारकऱ्यांना जराही थकवा येत नव्हता. कारण त्यांच्या मुखी होते माऊलीचे नाव. प्रत्येक वळणावर वारकरी झिम्मा फुगडीचा खेळ खेळत होते. काहीजण भारुड  गात मनोरंजन करत होते. काही वारकऱ्यांनी मृदंगाच्या ठेक्यावर माऊली माऊली असा जयघोष सुरू केला होता. वारकरी चालत होते. त्यांच्यात उत्साह संचारत होता. वारकऱ्यांसाठी खरे तर दुःख आणि संकट हा विषय म्हणजे एक आनंदी आव्हानच असते. घाट रुपी दुःख नामरुपी घोषात कधी संपले हे वारकऱ्यांना कळलेच नाही. वारकरी पुढे चालत होते आणि वारकऱ्यांचा हा उत्साह अधिकच दुणावत होता.
सकाळपासून या परिसरात सूर्य दर्शन नव्हते. वातावरण ढगाळ होते. साडेबाराच्या सुमारास आभाळ आणखीनच भरून आले .वारकऱ्यांचा उत्साह आणि वारकऱ्यांनी मध्ये असलेला आनंदाचा झरा पाहण्यासाठी आणि त्यामध्ये मिसळून जाण्यासाठी पर्जन्य राजाला सुद्धा राहवले नाही. जोरदार पाऊस सुरू झाला आणि वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला. पावसाची अडचण वारकऱ्यांसाठी काहीच नसते. दगड, चिखल, ऊन, वारा या सर्वांवर मात करून वारकरी चालत असतात. या कष्टरुपी प्रवासातून सुटकेसाठी पाऊस म्हणजे एक आनंदरूपी भेटच असते. घामामध्ये भिजलेल्या शरीराला पावसाच्या थेंबाच्या सुखद स्पर्शाने आनंद मिळत गेला. पावसात भिजण्याची पर्वा कुणालाच नव्हती. आजारी पडण्याची भीती कुणाला नव्हती. ज्याच्या मुखी माऊलीचे नाव नसते त्याला कसलीच अडचण येत नसते अशी वारकऱ्यांची भावना होती. पाऊस वाढत होता आणि वारकऱ्यांचा उत्साहही वाढत होता. मोकळ्या समाजामधून चालणाऱ्या अनेक वायकऱ्यांनी आता प्लास्टिकची खोळ डोक्यावर घेतली आणि चालायला सुरुवात केली. सुमारे दोन तास जोरदार पाऊस सुरू होता. मात्र वारकरी कुठेही थांबला नव्हता. थांबण्यासाठी एवढ्या लाखो वारकऱ्यांना निवारा थोडाच मिळणार होता !
घाटमाथ्यावर झेंडेवाडी गावात परिसरातील आणि सेवाभावी मंडळांनी तसेच पुणेकर दानशूर लोकांनी फार मोठ्या प्रमाणात सेवा दिली होती. घाटातून वर आलेल्या वारकऱ्यांसाठी चहा, पाणी, खिचडी ,जेवण, केळी, फळे याची रेलचेल होती. सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते वारकऱ्यांना हात जोडून माऊली चहा घ्या असा आग्रह करत होते. अनेक जण हाताला धरून वारकऱ्यांना भोजन कक्षामध्ये नेत होते. काहीजण पाय चेपत होते. वारकऱ्यांप्रती असणारा स्नेहभाव उफाळून वाहत होता. कारण हे वारकरी सतरा दिवस पायी चालत पंढरीला जाणार होते. आपणाला पंढरीला जाता येत नाही, मात्र पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची जर सेवा केली, त्यांच्या हाताला आपला हात लागला तर तो हात पंढरपूरचा विठोबा पर्यंत पोहोचेल आणि आपले सुद्धा पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन होईल अशी भावना भाविकांची होती. पुणेकरांच्या सेवेची गणना कोणकरी अशी परिस्थिती या ठिकाणी होती.
पावसाच्या दमदार हजेरीनंतर वारकरी पूर्ण भिजलेले होते. साडेचारच्या सुमारास पाऊस थांबला. वारकरी चालत राहिले. चालता चालता अंगावरील कपडे कधी सुकले हे कळलेच नाहीत. माउलींच्या नामाचा आणि विठ्ठल दर्शनाचा ध्यास असलेल्या वारकऱ्यांचा हा उत्साह पाहून
अरे अरे वारकऱ्या। तुला नाही उन, वारा ।।
या मु्नताबाईच्या अभंगाची आठवण झाली.

२८ जून २०१९










🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

  *आळंदी पुणे*
  *२५/०६/२०१९*

राम कृष्ण हरी, 

तीन वर्षे पंढरीची वारी पुर्ण केल्यानंतर गत वर्षी झालेली अर्धी वारी याची हुरहूर मनाला लागलेली होती, त्यामुळे चालू वर्षी पूर्ण वारी करण्याचा संकल्प केला होता. सकाळी सहा वाजता उठलो. बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत आळंदीला पोहोचण्याची गरज होती. रणजीत पाटील यांच्या कार मधून नऊ आम्ही सगळे आळंदीला जायला निघालो. यावर्षी प्रथमच वारी काय असते हे पाहण्याची उत्सुकता असलेले आमचे मित्र सह्याद्री इक्विपमेंटचे मालक देशमुख साहेब मुद्दामहून आमच्याबरोबर आलेले होते. पुढील अठरा दिवस घरदार पाहायला मिळणार नाही याचे थोडीस दुःख होतं. कारमध्ये बसून पुण्याला जायला निघालो. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी वारी निमित्त सर्व वाहनांना घेऊ नये अशी सूचना देऊनही सातारा जिल्ह्यातील टोल नाक्यावर वारीचे ट्रक व इतर वाहनांना टोलसाठी हुज्जत घालण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यात शिवापुर टोल नाक्यावर मात्र हा अनुभव आला नाही, पुणेकरांना वारीचे महत्त्व किती आहे आणि वारकऱ्यांच्या  किती सन्मान आहे याचा प्रत्यय आला, सातारा जिल्ह्यातील आदिवासी टोल नाक्यावर मात्र वारीतील वाहनचालकांना वाईट अनुभव आले.

दुपारी दिडच्या सुमारास आळंदीत पोचलो,वैष्णवांचा मेळा आळंदीत जमा होऊ लागला होता. इंद्रायणीवर असलेल्या पुलावरून माऊलींच्या मंदिराचे दुरून दर्शन घेतले. यावर्षी प्रथमच जाणवले माऊलींच्या सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी गत दोन तीन वर्षाच्या तुलनेत फार कमी होती. या वर्षी पडलेला भीषण दुष्काळ आणि जून महिना उलटत आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात न पडलेला पाऊस हे या कमी उपस्थिती कारण असल्याचे विविध भागातील भेटलेल्या व्यापाऱ्यांनी 'पुढारी ऑनलाइनशी बोलताना सांगितले. 

इंद्रायणी पात्रामध्ये गेलो,हात पाय स्वच्छ धुऊन नमस्कार केला आणि पुढे आमच्या कराडकराच्या मठामध्ये पोहोचलो. या मठात दुपारच्या पंगती संपल्या होत्या , बारा नंबर दिंडीतील वारकरी विणेकरी निवांत पहुडले होते. विठ्ठल मंदिरात माऊलींचे आणि वैकुंठवासी मामांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण जेवायला बसलो.जेवण झाल्यानंतर लगेच माऊलींच्या मंदिराकडे प्रस्थान सोहळा च्या कार्यक्रमासाठी जायला निघालो.

माऊली सोहळ्यासाठी ज्ञानेश्‍वर मंदिरात एकेक दिंड्या जात होत्या. पूर्ण आळंदी गाव माउलीमय झाले होते वारकरी माऊलींचा उत्साह वाढत होता. मंदिराच्या प्रवेशद्वारा नजीक आमचे मार्गदर्शक सोहळ्याचे प्रमुख चोपदारर माननीय राजाभाऊ माऊली यांची भेट झाली. कडक शिस्तीच्या राजाभाऊ यांनी माऊलीच्या मंदिरात फक्त वारकरीच जावेत, दिंडी मधून कोणीही हौशीगौशी घुसू नयेत यावर चांगलेच लक्ष ठेवले होते. राजाभाऊंना नमस्कार करून पुढे जायला निघालो.

बारामती येथील युवा नेते रोहित पवार यांची योगायोगाने भेट झाली. रोहिदास दादांशी गप्पा मारल्या. कराडहुन आलेल्या आम्हा वारकऱ्यांची, माझी त्यानी वैयक्तिक चौकशी केली. किती वर्षे वारी करता, वाढीचा अनुभव कसा आहे, पुढारी मध्ये किती वर्षे काम करतात याची इत्यंभूत माहिती घेताना रोहित पवार यांच्याकडे एक वेगळा आदरार्थी भाव पाहिला मिळाला.रोहित पवार यांची वारी निमित्त एक छोटीशी मुलाखत घेतली, सोबत फोटो काढले ,कराडला येण्याचे त्यांना निमंत्रण दिले, त्यानीही आम्हाला बारामती मध्ये आल्यानंतर कधी मला फोन करा असा असे आग्रहाचे निमंत्रण दिले. 

त्यानंतर आम्ही माऊलींच्या मंदिरात जाण्यासाठी पुढे निघालो. माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलीस खात्याने अतिशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंदिरात कमीत कमी वारकरी जावेत आणि फार गर्दी होऊन गोंधळ निर्माण होणे दाटीवाटी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते. चारच्या सुमारास माऊली मंदिरात प्रवेश केला. मंदिराला केलेली सजावट आणि तेथील भक्तिमय वातावरणात वातावरणात आलेला वेगळा सुगंध पाहून प्रवासाचा सर्व कंटाळा निघून गेला. आता मंदिरांमध्ये येथे एक दिंडी येत होती. वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला होता, प्रत्येक दिंडी येऊन माऊलींच्या मंदिरासमोर ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत होती, कोणी नाचत होता, कुणी गात होता. माऊली माऊली माऊली नावाचा जयघोष सुरू होता. साडेपाचच्या सुमारास बहुतांश दिंड्यांचे आगमन मंदिरामध्ये झाले होते.

आत माऊलींच्या प्रस्थानाची तयारी करण्यात गावकरी आणि विश्वस्त मंडळ व्यस्त होते तर बाहेर शेकडो वारकरी टाळकरी झेंडेकरी विणेकरी मृदंग वादक यांनी माऊली नावाचा ठेका,ताल धरला होता. सहाच्या सुमारासमाऊलींचेमानाचचे अश्व मंदिरा मध्ये दाखल झाले आणि पुन्हा वारकऱ्यांचा उत्साह वाढला. अश्वाला स्पर्श करण्यासाठी अनेकजण पुढे गेले. माऊलींच्या अश्वाने मंदिराला प्रदक्षिणा घालून दोन्ही अश्व पुन्हा मंदिरासमोरून थांबले. एव्हाना साडे सहा वाजले होते .सुमारे अडीच तीन तास टाळ-मृदंगाच्या तालावर नाचून दमलेले ,थकलेले वारकरी आता माऊली केव्हा येणार याची वाट पाहत होते. 

सातच्या सुमारास माऊलींची आरती झाली. पंच मंडळींची आज चर्चा सुरू होती, बाहेर वारकरी माऊलींच्या पालखीच्या आगमनाची वाट पाहत होते. साडेसात वाजले, वारकऱ्यांचा  उत्साह जराही कमी झाला नव्हता, अनेकांचे लक्ष माऊलींच्या कळसाकडे होते. मंदिराचा कळस माऊली मंदिरातून बाहेर पडतात तेव्हा हालतो, मंदिराला सुद्धा माऊली येथून जातात हे दुःख सहन होत नाही, अशी वारकऱ्यांची भावना आहे. अनेकांचे लक्ष त्या कळसाकडे होते.

घामाने चिंब झालेले वारकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. हवेची थंड झुळूक मधूनच त्यांना गारवा देत होती मात्र पाऊस काही येत नव्हता.  माऊलीच्या नामामध्ये ते तल्लीन होऊन गेल्यामुळे त्यांना माऊलींच्या येण्याची प्रतीक्षा होती, दर्शनाची ओढ होती. सात वाजून 30 मिनिटांच्या सुमारास माऊलींची पालखी मंदिराबाहेर आली आणि वारकऱ्यांनी माऊली माऊली नामाचा जोरदार जल्लोष केला. अवघी आळंदी माऊली नामाने दुमदुमून गेली. पालखी जवळ जाऊन दर्शन घेण्यासाठी वारकरी पुढे सरकले, आळंदी ग्रामस्थ पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवत होते. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरा बाहेर पडली आणि आळंदी गावात वारकऱ्यांचा उत्साह पुन्हा संचारला.

माऊलींची पालखी नगर प्रदक्षणासाठी बाहेर पडली आणि आम्ही मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. आळंदी गावाबाहेर एक किलोमीटर अंतरावर आमची गाडी उभी केली होती तिथे पोहचलो. तीन-चार तास मोबाईलवर खूप काम झाल्यामुळे बॅटरी डाउन झाली होती मोबाईल चार्जिंग लावले, काही फोटो व बातम्याचे मुद्दे ऑफिसला पाठवले. चहा पाणी घेतले आणि पुन्हा पुण्याच्या दिशेने चालायला लागलो.

या अगोदर तीन वारी करताना मी आळंदी मध्ये मुक्काम केला होता व पहाटे पाच वाजता चालावयास सुरुवात केली होती मात्र यावर्षी थोडा बदल करण्याचे ठरवले .सायंकाळी साडेआठच्या सुमारास माझ्यासोबत असलेले रणजीत पाटील, माणिक पाटील ,प्रकाश पाटील आम्ही चौघांनी पुण्याच्या दिशेने चालावयास सुरुवात केली. आमच्या सोबत आमच्या सारखेच रात्री चालणारे अनेक वारकरी पुण्याच्या दिशेने निघाले होते मात्र ही संख्या फार कमी होती. आळंदी सोडून बाहेर आलो माऊली माऊली माऊली नामजप करत आम्ही मार्गक्रमण करत होतो. रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या खाजगी तंबत, फूटपाथवर व अनेकांनी निवारा तयार केला होता. रात्रीचे एक वेगळेच वारी दर्शन मला पहावयास मिळाले.पुलाखाली, रस्त्याकडेला, फुटपाथवर, दुकान गाळ्याखाली,पार्किंग जवळ एटीएम सेंटरच्या शेजारी मिळेल त्या जागेवर ारकर्‍याने निवारा चे स्थान शोधले होते.

तहान लागली होती.थांबण्याचा निर्णय घेतला. चौकात वसंतराव भोसेकर लोंढे प्रतिष्ठानच्यावतीने मंडप उभारण्याचे काम चालू होते. कार्यकर्ते पाण्याच्या बाटल्या त्या ठिकाणी आणून ठेवत होते. पाण्याची बॉटल मागितली, सहज बोलता-बोलता चौकशी केली माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष वसंतराव भोसेकर यांच्या वतीने प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना एक लिटरच्या   बाराहजार पाणी बाटली आणि दिंडी प्रमुखांना विठ्ठलाची मूर्ती भेट दिली जाते.  वसंतराव भोसेकर  नाना यांच्या विषयी माहिती विचारली, तेवढ्यात नानाच आले, नानांनी आम्हाला सर्व माहिती सांगितले.नानांचे चुलते वैकुंठवासी कीर्तनकार लोंढे माऊली फार मोठी विभूती होती. लोंढे माऊली यांनी पंढरपुरात आपला देह ठेवण्यापूर्वी त्यांनी आपल्या नावावरील 4 एकर जमिन वारकरी संप्रदायाला दान केली होती. वसंतराव नानामाऊली त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.

वसंतराव भोसेकर यांचा एक विचार मला खूप आवडला. महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आलेले आहेत आणि बहुतांश देव उत्तर भारतात जन्माला आलेले आहेत. महाराष्ट्रातील संतांनी ही भूमी संतविचाराने आणि बुद्धिमत्तेच्या समृद्ध केली, एकात्मता वाढवली, जातीभेद संपवले आणि महाराष्ट्र पुढे पुढे गेला.याच महाराष्ट्रात उत्तर भारतातील, देवाच्या भूमीतील लोक नोकरी ,कामासाठी येतात. इतका मोठा बदल संतांनी महाराष्ट्रात विचार वैचारीक प्रगल्भतेवर घडवला आहे. मला हा विचार खूप आवडला ना नमस्कार करून पुढे निघालो

सहा किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर एका ठिकाणी पावणे अकराच्या सुमारास थांबण्याचा निर्णय घेतला. शुद्ध शाकाहारी उमंग हॉटेलमध्ये भोजन केले . इंग्लंड ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच शेवटच्या चार ओव्हर पाहण्याचा आनंद घेतला. तेथून बाहेर आलो पुणे शिवाजीनगर किती किलोमीटर आहे याचा अंदाज घेतला, पुन्हा चालण्याचा निर्णय घेतला. साडेअकरा वाजता आम्ही पुण्याकडे चालावयास निघालो. 

रस्त्यावर वारकऱ्यांची गर्दी खुप कमी होती. दोन किलोमीटर झाले की आराम करायचा, निवांत चालत राहायचे असे आम्ही ठरवले होते. मिलिटरीच्या एरिया असलेल्या दिघी भागात आम्ही बाराच्या सुमारास पोचलो. एका ठिकाणी रस्त्यावरच बैठक मारली तेवढ्यात ग्राउंड वर असलेला एक फौजी तेथे आला. साहब यहा बैठने का नही, असे आम्हाला सांगू लागला. माऊली पाच मिनिट बसू द्या अशी त्याला विनंती केली. त्यानेही ती विनंती मान्य केली. पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा चालायला सुरुवात केली . गेल्या तीन वर्षातील वारीच्या गमती जमती वेगवेगळे अनुभव यावर चर्चा करत रणजीत पाटील आणि मी पुढे होतो तर आमचे दोन सहकारी पाठीमागे होते.

विश्रांतवाडी दोन किलोमीटर अंतरावर होती, एका बाकड्यावर आम्ही बैठक मारली. साडेबारा वाजले होते. रस्त्याकडेला मिठाई आणि चहाची दुकाने सुरू होती. स्थानिक ग्रामस्थ तिथे बसले होते. त्यांच्यासोबत  गप्पा मारल्या आणि आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. एकच्या सुमारास आळंदी रोड पोलीस पोलीस चौकी चौकातून पुढे आलो. आता शरीर आणि मन दोन्ही साथ देत नव्हते. त्यामुळे थांबायचा निर्णय घेतला. रात्रीचा मुक्काम करण्यासाठी जागा शोधू लागलो. पुणे शहरांमध्ये अनेक नातेवाईक व मित्र आहेत त्यांनी फोन करून मुक्कामाला यावे असे कळवले होते,मात्र रात्रीच्या दिड वाजता कोणाला उठवायला जायचे, वारकऱ्यांच्या बरोबर वारकऱ्यांचे सारखे रहायला जी मजा आहे, ती घरामध्ये नाही असे नानानी बोलून दाखवले, मग मग झोपण्यासाठी स्वच्छ जागा शिरू लागलो. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी अनेक ठिकाणी स्वागत कक्ष उभे केले आहेत, मंडप उभे केले आहेत अशा मंडपामध्ये अनेक वारकरी झोपलेले आम्ही पाहिले होते. असाच एक मंडप पाहून त्या स्टेजवर अंथरूण टाकले.आमची गाडी शेजारी उभी केली आणि मध्यरात्री दीडच्या सुमारास अंथरुणावर अंग टाकून गेले.

माऊलींच्या कृपेने सर्व काही ठीक झाले. वारीचा अनुभव आज पासून रोज आपल्याला माझी वारी या माध्यमातून शेअर करणार आहोत

आपणास आवडेल अशी सदिच्छा.

 😌जय माऊली😌

माऊली सतीश मोरे

Also available at


🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...