फॉलोअर

२९ जून २०१९

ना पाऊस थांबला,  ना वारकरी..!
दिवेघाटात मुसळधार पावसात विठुरायाच्या नामघोषात माऊली चिंब

दिवेघाट : सतीश मोरे
पंढरीच्या  वारकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा नसते, याचा प्रत्यय शुक्रवारी दिवेघाटात आला. एकिकडे पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी तुकोबा, ज्ञानोबाचे वारकरी  माऊलीचा नामघोष करत होते तर दुसरीकडे याच माऊलींना भेटण्यासाठी अवकाशात नभानेही सुंदर रूप धारण करत माऊलींच्या दर्शनासाठी जलधारा बरसायला सुरुवात केली. ना पावसाचा जोर कमी होता ना वारकऱ्यांचा उत्साह ! सुमारे दोन-अडीच तास वारकरी भर पावसात ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात आणि विठू माऊलीच्या  गजरात न्हाऊन गेले.
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास सासवडकडे जायला निघाला. पुण्यात दोन दिवस वारकऱ्यांनी पुणेकरांचा पाहुणचार घेतला होता. पुण्यातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आळंदी वरून पुण्याला आलेली पालखी नाना पेठेत विसावल्यानंतर पुणेकरांच्या आनंदाला उधाण आले होते .दोन दिवस पुण्यामध्ये माऊलींचा उत्सव सुरू होता. बहुतांश शाळांना सुट्ट्या होत्या तर अनेक शासकीय , निमशासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी होती. दोन दिवस पावसाने अधुनमधुन जोरदार हजेरी लावली होती. पुणेकरांचे दातृत्व पाहून  भारावलेल्या वारकऱ्यांनी आदरातिथ्य स्वीकारून गुरुवारी सकाळी ज्ञानोबा माऊलीचा पालखी सोहळा सासवडकडे रवाना झाला.
बाजारपेठेत दुतर्फा माऊलींच्या स्वागतासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हडपसर येथे गाडीतळ परिसर चौकात माऊलीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक उभे होते. दर्शन घेऊन सुखावलेले भाविक तृप्त होऊन माऊलीना निरोप देत होते. गेल्या काही वर्षात गेल्या पुणेकरांच्या उत्साहात अधिक भर पडली आहे. आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड या दरम्यान अनेक पुणेकर पायी वारी करतात. अनेक महिला मंडळे, आयटी क्षेत्रातील नोकरदार, शिक्षक तसेच उद्योजक यांनी चालण्यासाठी दिंड्या तयार केल्या आहेत. या दिंडीला पुणेकर दिंडी, आयटी दिंडी, पर्यावरण दिंडी ,जलदिंडी अशा प्रकारची नावे असून आळंदी ते सासवड या दरम्यान हजारो पुणेकर वारीमध्ये सहभागी होत असतात.





हडपसर नंतर माऊलीने देवाची उरुळी या गावाकडे प्रस्थान केले. दरम्यान माऊलीच्या पालखीच्या पुढे असणाऱ्या अनेक खुल्या दिंड्या आणि मोकळ्या समाजातील लाखो वारकरी सकाळपासूनच दिवे घाटाकडे चालत होते. दुपारी बारा पर्यंत दिवे घाट भक्तीच्या महासागरात वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. या मार्गावर सासवड बाजूने येणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. मात्र वारकऱ्यांचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक, ट्रॅ्नटर,  टँकर हे पुण्यावरून सासवडच्या मार्गाला जात होते. रस्त्याच्या डाव्या बाजूला वारकरी आणि उजव्या बाजूला वारकऱ्यांच्या सेवेसाठी असणारी वाहने अशाप्रकारे वाहतूक बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात सुरू होती.
दिवे घाटातील अवघड वळणे पार पडताना वारकऱ्यांना जराही थकवा येत नव्हता. कारण त्यांच्या मुखी होते माऊलीचे नाव. प्रत्येक वळणावर वारकरी झिम्मा फुगडीचा खेळ खेळत होते. काहीजण भारुड  गात मनोरंजन करत होते. काही वारकऱ्यांनी मृदंगाच्या ठेक्यावर माऊली माऊली असा जयघोष सुरू केला होता. वारकरी चालत होते. त्यांच्यात उत्साह संचारत होता. वारकऱ्यांसाठी खरे तर दुःख आणि संकट हा विषय म्हणजे एक आनंदी आव्हानच असते. घाट रुपी दुःख नामरुपी घोषात कधी संपले हे वारकऱ्यांना कळलेच नाही. वारकरी पुढे चालत होते आणि वारकऱ्यांचा हा उत्साह अधिकच दुणावत होता.
सकाळपासून या परिसरात सूर्य दर्शन नव्हते. वातावरण ढगाळ होते. साडेबाराच्या सुमारास आभाळ आणखीनच भरून आले .वारकऱ्यांचा उत्साह आणि वारकऱ्यांनी मध्ये असलेला आनंदाचा झरा पाहण्यासाठी आणि त्यामध्ये मिसळून जाण्यासाठी पर्जन्य राजाला सुद्धा राहवले नाही. जोरदार पाऊस सुरू झाला आणि वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला. पावसाची अडचण वारकऱ्यांसाठी काहीच नसते. दगड, चिखल, ऊन, वारा या सर्वांवर मात करून वारकरी चालत असतात. या कष्टरुपी प्रवासातून सुटकेसाठी पाऊस म्हणजे एक आनंदरूपी भेटच असते. घामामध्ये भिजलेल्या शरीराला पावसाच्या थेंबाच्या सुखद स्पर्शाने आनंद मिळत गेला. पावसात भिजण्याची पर्वा कुणालाच नव्हती. आजारी पडण्याची भीती कुणाला नव्हती. ज्याच्या मुखी माऊलीचे नाव नसते त्याला कसलीच अडचण येत नसते अशी वारकऱ्यांची भावना होती. पाऊस वाढत होता आणि वारकऱ्यांचा उत्साहही वाढत होता. मोकळ्या समाजामधून चालणाऱ्या अनेक वायकऱ्यांनी आता प्लास्टिकची खोळ डोक्यावर घेतली आणि चालायला सुरुवात केली. सुमारे दोन तास जोरदार पाऊस सुरू होता. मात्र वारकरी कुठेही थांबला नव्हता. थांबण्यासाठी एवढ्या लाखो वारकऱ्यांना निवारा थोडाच मिळणार होता !
घाटमाथ्यावर झेंडेवाडी गावात परिसरातील आणि सेवाभावी मंडळांनी तसेच पुणेकर दानशूर लोकांनी फार मोठ्या प्रमाणात सेवा दिली होती. घाटातून वर आलेल्या वारकऱ्यांसाठी चहा, पाणी, खिचडी ,जेवण, केळी, फळे याची रेलचेल होती. सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते वारकऱ्यांना हात जोडून माऊली चहा घ्या असा आग्रह करत होते. अनेक जण हाताला धरून वारकऱ्यांना भोजन कक्षामध्ये नेत होते. काहीजण पाय चेपत होते. वारकऱ्यांप्रती असणारा स्नेहभाव उफाळून वाहत होता. कारण हे वारकरी सतरा दिवस पायी चालत पंढरीला जाणार होते. आपणाला पंढरीला जाता येत नाही, मात्र पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची जर सेवा केली, त्यांच्या हाताला आपला हात लागला तर तो हात पंढरपूरचा विठोबा पर्यंत पोहोचेल आणि आपले सुद्धा पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन होईल अशी भावना भाविकांची होती. पुणेकरांच्या सेवेची गणना कोणकरी अशी परिस्थिती या ठिकाणी होती.
पावसाच्या दमदार हजेरीनंतर वारकरी पूर्ण भिजलेले होते. साडेचारच्या सुमारास पाऊस थांबला. वारकरी चालत राहिले. चालता चालता अंगावरील कपडे कधी सुकले हे कळलेच नाहीत. माउलींच्या नामाचा आणि विठ्ठल दर्शनाचा ध्यास असलेल्या वारकऱ्यांचा हा उत्साह पाहून
अरे अरे वारकऱ्या। तुला नाही उन, वारा ।।
या मु्नताबाईच्या अभंगाची आठवण झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...