निसर्गवारी*
_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१८ जुलै २०२१
आज प्रत्यक्ष पंढरीची वारी असती तर आम्ही भंडीशेगाव येथे पोहोचलो असतो.पंढरीत पोहचण्याचा शेवटचा टप्पा आहे, वाखरी. वाखरीच्या अगोदर भंडीशेगाव लागते. याच मुक्कामात प्रत्येक वर्षी वैकुंठवासी भगवान मामा कराडकर यांची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि यानंतर गुलाबजाम चा प्रसाद वाटला जातो. आज आमच्यासाठी भंडीशेगाव होतं वडगाव हवेलीचा चौरंगीनाथ डोंगर पायथा. चौरंगीनाथ हे देवस्थान पलूस तालुक्यात येतं मात्र त्याचा पायथा भाग वडगाव हवेली गावात येतो.
या गावात जाण्यासाठी सकाळी साडेसहा वाजता आम्ही वडगाव हवेली फाट्यावर म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर महात्मा गांधी हायस्कूल समोर आलो. या विद्यालयांमध्ये आमच्या सर्व गाड्या उभ्या केल्या. आज आमच्या निसर्ग वारीमध्ये नवीन सहा सदस्य सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत महामार्गावरून वडगाव हवेली गावात कडे चालायला सुरुवात केली.वडगाव हवेली फाटा ते वडगाव या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला ग्रामपंचायतीने अतिशय सुंदर पद्धतीने वृक्षारोपण केलं आहे. हे वृक्ष गावात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. या गावाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा.
आज आमची संख्या एकदम बारावर पोहोचल्यामुळे गावात कुणी अधिकारी आले आहेत, काय असा ग्रामस्थांचा समज होत होता. मात्र एक-दोन ग्रामस्थांना आमच्या निसर्ग वारीचा संकल्प सांगून आम्ही सिद्धेश्वर मंदिरात निघालो आहे असे सांगून पुढे निघालो. दहा मिनिटात गावात प्रवेश केला. वडगाव अतिशय सधन व उपक्रमशील शेतकऱ्यांचे मोठे गाव आहे. या गावाला राजकीय दृष्ट्या फार मोठे महत्त्व आहे. गावात अनेक सर्व पक्षाचे नेते मंडळी आहेत.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे साडू माजी मंत्री दादासाहेब जगताप यांचे गाव म्हणून वडगाव ओळखले जाते. याच गावात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बहिणी दिल्या आहेत. जगताप भावकी मोठ्या प्रमाणात असलेले हे गाव कृष्णा साखर कारखान्याच्या लिफ्ट योजनेमुळे सधन झाले आहे.
गावात प्रवेश केल्यानंतर आम्हाला अनेक जुने वाडे (हवेल्या) दिसले. ज्या गावात मोठ्या हवेली आहेत त्या गावाच्या नावासमवेत हवेली हे नाव जोडले जाते. आता वडगाव हे नाव कसे पडले याचा प्रश्न आपल्याला पडला असेल? या गावात मी अनेकदा गेलो आहे,आज केलेले निरीक्षण पाहता गावात अनेक ठिकाणी वड आणि पिंपळ यांची झाडे पहायला मिळाली.फार मोठ्या प्रमाणात रस्त्याकडेला असणारे वड पाहून आम्ही चक्रावून गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या पारंबी असणारे हे वड पाहताना आम्हाला त्यांचे आयुष्य किती आहे याचा अंदाज करायला भाग पाडत होते. मोठ्या प्रमाणात वड असणारे गाव म्हणून वडगाव आणि गावात मोठी हवेली आहे म्हणून हवेली असे या गावाचे नाव वडगाव हवेली पडले आहे,असे ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले.
गावातील मुख्य चौकात आलो. चौकात असलेल्या यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे गावातून बाहेर पडलो. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे गावाबाहेरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्याला दोन्ही बाजूला आम्हाला अनेक वडाची झाडे दिसली. पुढे रस्त्याकडेला एक जुने भक्कम मंदिर आहे,या मंदिराला दगड मारले जातात. हे दगड का मारले जातात याबाबतची माहिती आम्हाला ग्रामस्थांकडून मिळाली नाही. एक दोन लोक भेटले मात्र त्यांनी माहित नाही,पण जुनी परंपरा आहे एवढेच सांगितले. मात्र याच मंदिराच्या पुढे ते एक गणपती मंदिर आहे. हे गणपती मंदिर प्रत्येक वर्षी गव्हाच्या आकाराने पुढे डोंगराच्या दिशेने सरकते अशी या गावातील लोकांचा भावना आहे.
हे मंदिर आणि परिसरातून थोडे सिद्धेश्वर मंदिराकडे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वड आणि पिंपळाची इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे पाहिली.या झाडामुळे गावातील लोकांना मुबलक ऑक्सिजन मिळत असावा आणि त्यामुळेच वडगाव हवेली गावातील लोक तंदुरुस्त आहेत असे आम्हाला वाटले. निसर्ग वारीमध्ये आम्ही वड पिंपळ आंबा ही तीन झाडे लावण्याचा संकल्प केला आहे, तो किती योग्य होता याची आम्हाला अभिमान वाटला.
थोडे अंतर गेल्यानंतर आम्हाला उंचावर बिरोबाचे अतिशय सुंदर मंदिर दिसले मात्र या मंदिराला दुरूनच नमस्कार करून आम्ही पुढे चालत आलो. आता आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचलो. या मंदिरा शेजारीच आम्हाला वृक्षारोपण करायचे होते मात्र अजून आमची पायी वारी पूर्ण झालेली नव्हती. मंदिराच्या शेजारीच असणार्या पाझर तलावाकडे आम्ही निघालो. अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण हा पाझर तलाव आहे. या तलावाच्या पायथ्याशी सिद्धेश्वर मंदिर आहे तर तलावाच्या शेजारी वरती डोंगरावर चौरंगीनाथ मंदिर आहे. चौरंगीनाथ डोंगरावर जाण्यासाठी सिद्धेश्वर मंदिरापासून जवळचा रस्ता आहे. चौरंगीनाथाला जाण्यासाठी निघाले काही आमचे मित्र आम्हाला या ठिकाणी भेटले.
आम्ही तलावाच्या लगत आलो. तलावाच्या कडेकडेने आम्ही चालायला सुरुवात केली, पूर्ण तलावाला गोल वेढा मारून प्रदक्षिणा घालून परत आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिराजवळ यायचे आणि मग वृक्षारोपण करायचे असे आम्ही ठरवले. तलावाच्या कढेने जात असताना अतिशय सुंदर असा नजारा मला दिसत होता. सूर्याची सोनेरी किरणे या तलावाच्या पाण्यावर पाण्यावर पडलेले होती. मोरांचे आवाज ऐकू येत होते, तलावाच्या कडेला पाणी पिण्यासाठी काही पक्षी दिसत होते. काठाला असलेल्या पाऊलवाटेवरुन आम्ही आता डोंगराच्या पायथ्याला पोहचलो. चालत राहिलो. पुढे अशी वेळ आली आम्हाला पुढे जायला रस्ता दिसत नव्हता. मात्र त्यातूनही झाड वेलीतून, दाट झाडीतून, जंगलातून पुढे जाऊन रणजीत पाटील यांनी रस्ता काढला. आम्ही नऊ जण या जंगलाच्या कसाबसा रस्ता काढून पुढे येत होतो. हा रस्ता जनावरांचा होता, बिबट्याचा होता,मात्र आम्ही त्यातून मार्ग काढत एकमेकाला आधार देत निघालो होतो. राम कृष्ण हरीचा जप करत पुढे चाललो. या अर्धा तासात आम्ही आयुष्यातील सर्वात सुंदर असा प्रवास केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
घनदाट झाडीतून पुढे जात असताना एकमेकाला आधार देत आम्ही पुढे निघालो होतो, मागे कोणी राहणार नाही याची खात्री करत होतो. आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आम्ही निसर्गाच्या सोबतीत चाललो होतो. ही वाट आम्हाला खुप आनंद देत होती. एका ठिकाणी अशी परिस्थिती आली ओघळी पलीकडे जायला पाण्यातून जावे लागणार होते. तिथे काही दगड पडले होते. दगडावर पाय ठेवत पुढे जायचा सुरुवातीला एक जणांनी प्रयत्न केला मात्र पाय घसरल्यामुळे ते पाण्यात पडले, त्यानंतर पायातील शूज काढून पुढे जावे असे नानांनी सुचवले. तरीही मी दगडावर पाय ठेवून चालण्याचा प्रयत्न केला आणि व्हायचे तेच झाले पाय निसटून मीही पाण्यात पडलो. शूजमध्ये पाणी गेले गुडघ्यापर्यंत पॅन्ट ओली झाली. मात्र माऊलींच्या कृपेने कोणाला काही झाले नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या या उक्तीप्रमाणे नंतरच्या लोकांनी शूज हातात घेऊन अतिशय काळजीपूर्वक पाण्यातला रस्ता क्रॉस करून सारे पुढे आले.अतिशय आनंददायी हा प्रवास होता. पुढे मुख्य रस्त्यावर आलो, या रस्त्यावरून एक फाटा जिकडे वळतो तिथे त्या रस्त्याला अनेक दगडाच्या खाणी आहेत. तिकडे न जाता आम्ही पुन्हा मंदिराकडे वळालो.
थोडे चालत पुन्हा सिद्धेश्वर मंदिरा पर्यंत पोहोचलो. सिद्धेश्वर मंदिरातील मठाधिपती, ग्रामस्थ, पोलिस पाटील,युवक या ठिकाणी आमची वाट पाहत होते. या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही त्या ठिकाणी दोन वडाची झाडे लावली. खरं तर या मंदिराच्या परिसरात अनेक वड आणि पिंपळाची झाडे आहेत. मात्र आम्हाला झाडे लावायला मिळालेली जागा अतिशय योग्य होती. सिद्धेश्वर मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे या ठिकाणी रविवारी फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते.चौरंगीनाथला जाणारे अनेक भाविक पहिल्यांदा सिद्धेश्वराचे दर्शन घेतात आणि मग पुढे जातात. हा परिसर अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांनी विकसित केला आहे. मंदिराच्या पाठीमागे आम्ही जे झाड लावले ते मोठे झाल्यानंतर अनेक भाविकांना तिथे आराम करण्यासाठी जागा मिळणार आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं करून आम्ही मंदिरासमोर तयार केलेल्या एका पारावर आराम केला.
रणजीत पाटील यांच्या मित्रांनी, आजोळच्या नातेवाईकांनी आमच्यासाठी आज धपाटे,दही, उसळ,भात आणि कांदेपोहे चहा असा जंगी बेत आखला होता. आम्ही सर्वजण मंदिराशेजारील मठाधिपतींच्या खोलीमध्ये पंगत मांडली. दऱ्याखोऱ्यातून, पाण्यातून सुमारे 3 किलोमीटर चालल्यानंतर खूप भूक लागली होती ,त्यामुळे माऊलीने दिलेला प्रसाद आम्ही पोटभरून खाल्ला.
आज आमची निसर्गवारी पूर्ण निसर्गाच्या संगतीत झाली. माऊलींची कृपा आणि आमच्यासोबत विठ्ठलनाम असल्यामुळे आम्हाला कसलीही अडचण आली नाही. अतिशय सुंदर वातावरणात आम्ही दोन तास देहभान हरपून चाललो, हरिपाठ करत होतो,राम कृष्ण हरी चा जप करत होतो.असे सुख,असा आनंद या अगोदर क्वचितच मिळाला असेल.
राम कृष्ण हरी!
जय जय विठ्ठल!
जय हरी विठ्ठल !
*सतीश मोरे*




