फॉलोअर

०४ जुलै २०२१

वडोली रस्ता

 *निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
4 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
कराडच्या कृष्णा नाक्यावर जमून पावणेसहा वाजता आज आमचा निसर्ग वारीचा दिवस सुरु झाला. आम्ही बरोबर सहा वाजता कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ मंदिरासमोर पोहचलो. देवाचे दर्शन घेऊन आम्ही हरिपाठ सुरू केला. आज निसर्ग वारीमध्ये अमित खाडे सहभागी झाले होते.
कोपर्डे हवेली ते वडोली रस्ता म्हणजे हिरवीगार उस शेती, काठोकाठ भरलेल्या विहिरी आणि वनराई. आज या गावातून जाताना एक वेगळा आनंद होता. हे गाव खूप मोठं आहे, अतिशय चांगलं गाव आहे. या गावाची लोकसंख्या 15 हजारच्या सुमारास आहे. खूप सधन गाव आहे, या गावात गावातील लोक सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र एकेकाळी या गावाची ओळख 'कोपर्डे आलं,नाकावर रुमाल धरा' अशी अस्वच्छ गाव म्हणून होती. मला आठवते 2002 साली या गावातील अस्वच्छतेवर मी पुढारीमध्ये 'गाव तसं चांगलं पण अति पुढाऱ्यांच्या संख्येने वेशीला टांगलं' या शीर्षकाखाली बातमी दैनिक पुढारीमध्ये छापली होती. या बातमीनंतर गावातील काही नेत्यांनी मला फोन करून नाराजी व्यक्त केली. मात्र काही जणांनी हे सत्य स्वीकारून गाव स्वच्छ होण्यासाठी, गावाची कुओळख पुसण्यासाठी दै. पुढारीने योग्यच केलं,आमचे डोळे उघडले,अशी प्रतिक्रिया दिली होती.
नंतरच्या काळात 2004 नंतर ग्रामस्वच्छता अभियानाचं वारं मोठ्या प्रमाणात वाहू लागलं. ग्राम विकास मंत्री आर आर पाटलांना सुचलेली संकल्पना संपूर्ण राज्याने उचलून धरली. त्यानंतर केंद्र सरकारचं निर्मल ग्राम अभियान आलं. स्वच्छता अभियान आणि शौचालयाचे महत्त्व गावागावांत पटू लागलं. कोपर्डे गावाने या स्वच्छता अभियानात भाग घेतला. अनेकांनी घरात,घरासमोर शौचालये बांधली. मोठमोठे बंगले उभे करताना त्या बंगल्याच्या बाहेर शौचालयेही बांधली गेली आणि गाव स्वच्छ आणि सुंदर होत गेलं. आज कोपर्डे गावाची ओळख अतिशय स्वच्छ आणि सुंदर गाव अशी आहे. या नवीन गावातून चालत जाताना मला आज खूप आनंद होत होता. जाताना आम्हाला गावातील सुबत्तेचं दर्शन होत होतं. घराघरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर,चार चाकी वाहने, गोठ्यामध्ये गोधन असं सुखद चित्र होतं. धारा काढायची वेळ झाली होती.अतिशय सुंदर दृश्य पाहत आणि याचा आनंद घेत आम्ही कोपर्डे हवेली पार करून पुढे गेलो.
रेल्वे फाटका जवळ आलो. रेल्वेचं लहानपणापासून सर्वांनाच आकर्षण आहे,असतं. मला पण होतं. करवडी ते कराड टिळक हायस्कूलमध्ये जाताना एसटी बस मधून मला रोज रेल्वेचे दर्शन व्हायचं. करवडी कराड एसटी जर पार्ले मार्गे जाणार असेल तर हमखास साडेदहाच्या दरम्यान कोयना एक्सप्रेससाठी फाटक बंद केलेलं असायचं. कधीकधी कोयना एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस एकाच वेळेला येणार असतील तर दहा पंधरा मिनिटे रेल्वे गेट बंद राहायचं आणि आम्हाला या दोन्ही एक्स्प्रेस पाहायला मिळायच्या. आज रेल्वेट्रेन जाताना जाताना काहीच वाटत नाही. लहानपणी रेल्वे गाडी जवळून गेली की किती डबे आहेत हे मोजायचे. मालगाडी असेल तर त्याला खुप डबे असतात. प्रवासी वाहतूक असेल तर कोणती एक्सप्रेस आहे, कुठल्या गावाहून आली आहे, याची आम्हाला उत्सुकता असायची. आजच्या छोट्या मुलांना ह्या ट्रेन गाडी विषयी किती आकर्षण आहे कल्पना नाही. आम्ही रेल्वे रुळावर रेल्वे जाण्यापूर्वी एखादे नाणे ठेवायचे रेल्वे गेल्यानंतर ते शोधण्याचा पराक्रम केला आहे.
रेल्वे फाटक ओलांडून आम्ही उत्तर पार्ले मध्ये आलो. या ठिकाणी गेल्या काही वर्षात नागरी वस्ती खूप वाढली आहे. पार्ल्यातील अनेक लोक या परिसरात राहायला आले आहेत. त्यांनी बंगले बांधले आहेत. या ठिकाणी मंदिर उभारले आहे. याच ठिकाणी शासकीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह बांधण्यात आले आहे. नजीकच कराड पालिकेसाठी आ. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या कचरा डेपोची 25 एकर जागा आहे, ही जागा पाहून उंडाळकर काकांनी कराड पालिकेसाठी केलेला एक मोठं काम डोळ्यासमोर आलं. या ठिकाणी कचरा डेपो किंवा कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा प्रयत्न झाला मात्र परिसरातील ग्रामस्थांना आपण नक्की काय करून देणार आहोत हे पटवून देण्यास कराड पालिका अपयशी ठरल्यामुळे इथे काही होऊ शकले नाही. आज ती जागा पडून आहे,भविष्यात या ठिकाणी कराड पालिकेकडून एक मोठा प्रकल्प उभा राहिल,अशी अपेक्षा आहे.
निसर्गाचं रूप पाहत आम्ही पुढे जात होतो, हरिपाठ संपला होता. आता भक्ती गीते सुरू होती. राम कृष्ण हरी चा जप सुरू होता. सातच्या सुमारास आम्ही वडोली निळेश्वर या गावात पोहोचलो. या गावाच्या पश्चिमेला डोंगरावर एक दत्त मंदिर आहे, त्या मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही वळालो. गावाच्या पलीकडे असणारा आरफळ कॅनॉल पार करत रूळलेल्या पाऊलवाटेने आम्ही चालत राहिलो. याही रस्त्यावर आम्हाला मोरांचे आवाज ऐकत होते. मोरांचे दर्शनही झाले. पुढे एक छोटासा तलाव होता, या तलावात अनेक बगळे स्नान करत होते, अतिशय सुंदर असे दृश्य होते ते! तिथून पुढे वळणावर एक मोठा शेडवजा गोठा पाहायला मिळाला. या गोठ्यात असणारी पशु संपत्ती पाहून खूप आनंद वाटला. पुढे निघालो टेकडीवरील दत्त मंदिर खूप आम्हाला खुणावत होते. आम्ही पुढे टेकडी चढायला लागलो, तोपर्यंत आमचे जावई विजय पवार आणि त्यांचे बंधू संभाजी पवार, त्यांचा पुतण्या तिथे आले. दोन मिनिटांत टेकडीवर पोहचलो. हळूवार वाहणारा थंड वारा आनंद देत होता आणि त्याच वेळेला 'आनंदी आनंद गडे,जिकडे तिकडे चोहीकडे' ही बालकवींची कविता आठवली.
आता झाडं लावण्यासाठी तयारी सुरू केली. दोन-तीन जागेवर आम्ही खड्डा काढण्याचा प्रयत्न केला मात्र खाली दगड लागत असल्यामुळे आमचे प्रयत्न अयशस्वी झाले. शेवटी तीन खड्डे काढल्यानंतर एका जागी खूप माती मुरूम लागला. त्या ठिकाणी आम्ही वडाचे एक झाड संभाजी पवार आणि विजय पवार यांच्या हस्ते लावले. पुंडलिंक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आणि गुरुदेव दत्तचा जयघोष केला आणि मंदिरात जाऊन दत्त भगवानांचे दर्शन घेतले.
वडोली गावात काही काही वर्षापूर्वी एक महाराज आले होते, त्यांनी हे छोटेसे दत्त आणि शंकर मंदिर उभारले. मात्र काही वर्षांनंतर हे महाराज येथून निघून गेले आणि मग ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिर उभे केले. या मंदिरात दत्ताच्या मूर्तीच्या खाली गाभारा असून यामध्ये महादेवाची पिंड आहे. टेकडीवर वसलेले हे मंदिर आणि ही जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. ग्रामस्थांनी प्रयत्न करून या ठिकाणी अनेक छोटी मोठी झाडे लावली आहेत, शेजारी बोअर मारले आहे. बोअरच्या पाण्यावर ही झाडे जगविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र वन विभागाकडून या लोकांना त्रास होतो. सिमेंटची पाण्याची टाकी उंचावर ठेवण्यासाठी भिंत उभी केली होती मात्र हे बांधकाम वन विभागाने दोन दिवसात तोडून टाकले. आजही ही पाण्याची टाकी तिथेच आहे.
काही वर्षापूर्वी या जागेत खोदलेल्या बोअरसाठी वीज कनेक्शनसाठी वन विभागाने खूप अडवणूक करत वीज कंपनीला कनेक्शन न देण्याचे पत्र लिहिले. शेवटी कंटाळून संभाजी पवार हे छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटले.उदयनराजेनीं त्यांच्या खास 'स्टाईल'मध्ये वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर काही तासातच याठिकाणी वीज जोडणी झाली होती. ही माहिती संभाजी पवार यांनी आम्हाला सांगितली. हे ऐकताना सातारा जिल्ह्यात कोणतेही काम होत नसेल तर लोक उदयनराजेंकडे का जातात? उदयनराजे लोकांच्या हृदयामध्ये का आहेत? याचा प्रत्यय आला.शासकीय नियमाप्रमाणे सगळेच अधिकारी, पदाधिकारी काम करतात मात्र कायदा, नियम आणि व्यवहार याची सांगड घालून जनतेच्या हिताचे काम करणारा नेता म्हणून उदयनराजेंना ओळखलं जातं.
मंदिराच्या समोरच टेकडीवर बसून कांदे पोहे नाष्टा केला. त्या ठिकाणावरुन उंच डोंगर, हिरवीगार झाडी आणि उसाची शेती पाहून तनामनात उत्साह संचारला, हा उत्साह घेऊनच आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
आजची वारी खूप सुंदर आणि आनंदी झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

०३ जुलै २०२१

सुर्लीच्या घाटांमधील जानाई मंदिरा

 निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
3 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
काल सुर्लीच्या घाटांमधील जानाई मंदिरासमोर वृक्षारोपण केल्यानंतर आज आमचा संकल्प शामगाव घाट परिसरात जाण्याचा होता. त्यानुसार जाण्यासाठी पावणेसहा वाजता कराडच्या कृष्णा नाक्यावर जमलो. आज आमच्या वारीमध्ये सौरभ पाटील तात्या, विजय वाटेगावकर भाऊ, प्रमोद वेर्णेकर, गौतम करपे वाय.के. जाधव, मिलिंद डुबल हे सहभागी झाले होते. सहाच्या सुमारास आमची वाहने करवडी गावात आमच्या घरासमोर उभी करून आम्ही शामगावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
सहा वाजून दहा मिनिटे झाली होती, थंड हवा वहात होती.वातावरण अतिशय प्रसन्न होते. राम कृष्ण हरी चा जप करत आमची पावले पडू चालु लागली . करवडी गाव सोडल्यानंतर दोन्ही बाजूला असणारी झाडे, हिरवागार निसर्ग, फुललेली शेती पहात आम्ही पुढे आलो. आरफळ कॅनॉल पार करून पुढे आलो. मोबाईलवर बाबा महाराज सातारकर यांचा हरिपाठ सुरू होता. कीर्तन सुरू होते. चिंचमळा परिसरापासून पुढे मोरांचे आवाज आम्हाला ऐकू येऊ लागले.खूप उत्साह येत होता. अंतवडी खिंडीपर्यंत पोचलो, एव्हाना सात वाजले होते. पुढे जात असताना वळणे, उंच डोंगर आम्हाला खुणावत होते. या रस्त्याने वाहनातून अनेकदा गेलो, मात्र चालत जाण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आल. घाटाच्या सुरुवातीला आणि इकडे रस्त्याला काही लिंबू लिंबू पडलेली होत. ही लिंबे कशासाठी टाकली टाकली जातात हे मला माहित होते. करवडीमध्ये माझा जन्म झाला, माझं संपूर्ण बालपण गेलं. 2001 पर्यंत करवडीत राहायला होतो. गावातील कोणतेही लग्नाचं वराड शामगाव घाटातून पुसेसावळी, मसूर दिशेला जाणार असेल, नवीन नवरा नवरी देवदर्शनासाठी या घाटातून जाणार असेल तर या घाटाच्या अगोदर एका ठिकाणी लिंबू फेकले जाते, नारळ फोडला जातो. असे केले तर पुढील प्रवास सुरक्षित होतो, या ठिकाणी असणारी, कुठलीतरी शक्ती तुम्हाला त्रास देत नाही असा ग्रामस्थांचा समज असत. हे नारळ फोडल्यानंतर नारळाचे बक्कल खाण्यासाठी ट्रॅक्टर किंवा ट्रक मधील मुलं खाली उतरत आणि पटकन भक्कल खायचे. या आठवणी माझ्या स्मरणात ताज्या आहेत.
आता रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोरांचे आवाज येऊ लागले, शामगाव घाट परिसर हा मोरांसाठी नंदनवनच आहे. या परिसरात आहे या अगोदर अनेक वेळा मोरांचे थवे मी पाहिलेले आहेत. आज आमच्या डोक्यावरून एक मोर रस्तावरून उंच उडत जाताना मी पाहिला. मोर पक्षाला एवढ्या उंचावर उडता येतं ते पहिल्यांदाच पाहिलं. सकाळच्या वेळी निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर खूप चांगले अनुभव येतात, त्यापैकी हा अनुभव. याच दरम्यान निसर्गप्रेमी फोटोग्राफर सौरव पाटील यांनी त्यांच्या झूम कॅमेरा वरून अनेक फोटो टिपले.
आम्ही शामगावच्या घाटात पोहोचलो होतो. गर्द दाट झाडीतून जाणारा शामगाव घाटाचा रस्ता या अगोदर अनेकदा वाहनातून पाहिला होता. पण आज चालत जाताना पाहताना हा घाट आणि डोंगर किती उंच जाणवत होतं. घाटात रस्त्याकडेला निसर्ग विद्रुप करणाऱ्या काही लोकांनी दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या होत्या, आमच्यापैकी काही मित्रांनी त्या बाटल्या हटवल्या.घाटातून आता वाहतूक सुरू झाले होती.आमच्या अंतिम मुक्कामापर्यंत पोचलो होतो.
घाटातील दोन मोठ्ठी वळणे संपल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला शिवकालीन प्राचीन मंदिर नावाचा एक बोर्ड आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी सिमेंटचा रस्ता अलिकडेच करण्यात आलेला आहे. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. या मंदिराकडे आम्ही जायला सुरुवात केली, मंदिराच्या परिसरात अगोदरच बाळकृष्ण शिंदे हे लोकमतचे वार्ताहर मुलासमवेत पोहोचले होते. त्यांनी आणि मिलिंद डुबल यांनी या ठिकाणी दोन खड्डे काढून ठेवलेले होते. तिथे असलेल्या बोअरवर पाणी हापसून आम्ही हात पाय धुतले आणि झाडे गाडीतून आणलेली झाडे खाली उतरवली.
झाडे लावण्यासाठी सर्वांची लगबग सुरू होती. वाय. के. जाधव आणि माझे माळकरी बंधू हणमंत मोरे यांच्या हस्ते एक वड आणि पिंपळ असे दोन वृक्ष या ठिकाणी लावण्यात आले. ही झाडे लावल्यानंतर तिथे जनावरे येऊ नये म्हणून काट्याच्या कुंपन सर्व जणांनी तयार केले आणि आम्ही मंदिराच्या खाली जाण्यास निघालो.
मगाशी सांगितल्याप्रमाणे या मंदिराचे महात्म्य फार आहे, डोंगराच्या असणारे कुशीत असणारे मंदिराकडे जाण्यासाठी पूर्वी रस्ता नव्हता. सैदापूर येथील वारकरी कृष्णा यशवंतराव जाधव (वाय के जाधव यांचे वडील) यांना दृष्टांत झाला आणि 1997 च्या दरम्यान त्यांनी या ठिकाणी यावयास सुरवात केली. सुरुवातीला ते कराड पासून इथंपर्यंत चालत यायचे.शामगाव ग्रामस्थ, परिसरातील दानशूर यांच्या मदतीने 2001 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि अतिशय सुंदर असे मंदिर उभे राहिले. या दुर्लक्षित मंदिराची बातमी 1997 साली मी लोकमत ओगलेवाडी वार्ताहर असताना प्रसिद्ध केली होती. ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर हे मंदिर प्रकाशात आले होते. याबाबतच्या आठवणींना आज उजाळा मिळाला.
या मंदिराकडे खाली जाताना अतिशय सुंदर मनोहरी दृश्य दिसत होते. एका बाजूला उंच डोंगर तर दुसर्या बाजूला छोटासा ओढा, छोटा धबधबा आम्हाला आनंद आणि स्फूर्ती देत होत.मंदिरात जाऊन आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले, पूजा केली आणि मंदिराशेजारी असलेल्या शेडमध्ये आराम केला. बाळकृष्ण शिंदे यांनी कांदेपोहे बनवून आणले होते. करवडी ते शामगाव घाट सुमारे सात किलोमीटर अंतर चालत आल्यामुळे थकवा भूक खूप लागली होती. सर्वांनी एकत्र बसून नाश्ता केला. शंभू महादेवाचा जप केला, पुंडलिक महाराज पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष करत आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.अशा पद्धतीने आजची निसर्गवारी अतिशय आनंदात, निसर्गाच्या सानिध्यात संपन्न झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

०२ जुलै २०२१

सह्याद्री साखर कारखाना

 निसर्गवारी २०२१

१ आणि २ जुलै
हरिनामाचा महिमा सांगणारी पंढरीची वारी आजपासून सुरू होत आहे. आळंदी ते पंढरपूर वारी प्रत्यक्षात निघणार नसली तरी आळंदी येथून आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचे प्रस्थान होणार आहे आणि पुढे एसटी बसमधून ही पालखी वाखरी येथे जाणार आहे. याहीवर्षी पंढरीला जाण्याचा योग येणार नाही,वारी करता येणार नाही,त्यामुळे निसर्गवारी करण्याचा मनोदय आम्ही व्यक्त केला होता.
काल १ जुलै २०२१ रोजी ज्येष्ठ नेते पी. डी.पाटील यांच्या जयंतीदिनी सह्याद्री साखर कारखाना पाठीमागे असणाऱ्या एका टेकडीवर निसर्गवारीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे,तहसीलदार अमरदीप वाकडे आणि आमचे पंढरीच्या वारीमधील सहकारी युवानेते जशराज पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि कारखान्याचे संचालक मान्यवर मॅनेजिंग डायरेक्टर उपस्थित होते.
नामदार पाटील यांनी आमच्या निसर्गवारीचे कौतुक केले, आपुलकीने त्यानी या संपूर्ण वारीची माहिती घेतली, पुढील 19 दिवसात कोण कोणत्या गावी जाणार आहात झाडे कोणती, लावणार आहे, झाडे कोण जगवणार आहे, याची माहिती घेऊन ना. बाळासाहेब पाटील यांनी आमच्या निसर्ग वारीला शुभेच्छा दिल्या.
आज दोन जुलै आज प्रत्यक्षात पंढरीच्या वारीला आळंदीतून सुरुवात होणार आहे,आज आमच्या निसर्ग वारीचा पहिला दिवस पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम च्या जयघोषात सुरू केला. साडेसहा वाजता रणजित पाटील, संदीप सुर्यवंशी आणि मी ठरल्याप्रमाणे ओगलेवाडी येथे पोहोचलो आणि सुरली घाटाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. हरिपाठ सुरू झाला 'हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी' हरिपाठ करत करत आम्ही वनवासमाची येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिर महिला आश्रम (महानुभाव) मध्ये पोहोचलो.
या आश्रमाची स्थापना 1971 तपस्विनी कमळाबाई अक्का लातूरकर यांनी केली होती. या आश्रमाचे आणि माझे अनेक वर्षापासून ऋणानुबंध आहेत.ओगलेवाडी येथे मी सय्यद सर यांच्या इंग्लिश च्या क्लासला जात होतो या क्लासमध्ये भगवान जाधव आणि तानाजी घार्गे हे दोन मित्र मला मिळाले तेथेच मला माझा लहानपणीचा मित्र श्रीधर नलवडे पंधरा वर्षानंतर भेटला होता. भगवान आणि तानाजी हे दोघे वनवासमाची येथील श्रीकृष्ण मंदिरामधील महानुभाव आश्रमात राहत होते. या आश्रमाच्या संचालिका लिलाताई लासूरकर या तानाजी आणि भगवान जाधव यांच्या मावशी होत. मुळ खटाव तालुक्यातील हे दोघे ही या गावात राहत होत. पुढे वेगवेगळ्या कारणाने या मंदिरात येणे-जाणे सुरू झाले. परीक्षा जवळ आल्या की आम्ही या मंदिरात अभ्यास करायला जात असे. गेल्या चाळीस वर्षात एखादीच श्रीकृष्णजन्माष्टमी सोडली तर प्रत्येक वेळी जन्माष्टमी ला या मंदिरात मी जात आहे. या दरम्यान महानुभाव पंथाची माहिती मिळू लागली. महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक डॉक्टर कन्हैया कुंदप यांची या मंदिरातील एका कार्यक्रमावेळी माझी भेट झाली. महानुभाव पंथाची स्थापना १३ व्या शतकात चक्रधर स्वामींनी केली,हा पंथ अतिशय जुना आहे.ज्ञानेश्वरां महाराजांच्या काही काळ अगोदर 'महानुभाव' संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. ‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. स्त्रियांना भक्तीमार्गात सहित प्रत्येक ठिकाणी महत्त्व देणारा आदराचे स्थान देणारा हा अतिशय पुरोगामी पंथ आहे, अतिशय त्यागी जीवन आणि तपश्चर्या आहे या महानुभाव पंथामध्ये.
गेल्या अनेक वर्षापासून तपस्वीनी लीलाताई लासूरकर प पु प महंत कमळाकर बाबा या महिला आश्रम चालवत आहेत. दोन वर्षांपूर्वी या श्रीकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, अतिशय सुंदर असे भव्यदिव्य मंदिर सदाशिव गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वनवासमाची येथे बांधण्यात आले आहे. या मंदिरात सर्वांना प्रवेश असतो,आपण ज्ञानी वाचकांनी या मंदिराला अवश्य भेट द्यावी. आमच्या पंढरीच्या वारीची, निसर्ग वारीची सुरुवात श्रीकृष्ण मंदिरात गुरुवर्य लिलाताई यांचे दर्शन घेऊन झाली. या मंदिरातील श्री कृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर आहे मंदिराचा गाभारा फार मोठा आहे. या आश्रमात सुमारे 25 महिला उपासिका अभ्यास करतात, श्रीकृष्णभक्ति करतात. महानुभाव पंथ आणि श्रीकृष्णभक्ती याबाबतचा स्वतंत्र लिहावं लागेल इतका मोठा इतिहास आहे.
श्रीकृष्ण माऊलीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे चालू लागलो. सव्वा सातच्या सुमारास आम्ही सुरली घाटामध्ये पोचलो. यादरम्यान रस्त्यावरून चालत असताना गेल्यावर्षीच्या पंढरीच्या वारीची मन मंदिर वारीची आठवण झाली. गेल्यावर्षी हा रस्ता करण्याचे काम चालू होते आणि आम्ही या रस्त्यावरून चालत गेलो होतो. त्यावेळी अक्षरशः रस्त्यावर चिखल होता,भरपूर पाऊस पडत होता मात्र तरीही आम्ही थांबलो नव्हतो. यावर्षी मात्र बरोबर उलटी परिस्थिती होती. सातच्या सुमारास सूर्याची किरणे डोळ्यावर येत होती,आकाश मोकळे होते. सुली च्या घाटात पोहोचल्यानंतर सागर हाके यांच्या नर्सरीमधून अगोदर ठरल्याप्रमाणे वडाची काही झाडे विकत घेतली. परत जानाई देवी मंदिरामध्ये आलो. सुली घाटाच्या पायथ्याशी असणारे जानाईदेवी मंदिर हे ओगलेवाडी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांचे दैवत आहे, श्रद्धेचे स्थान आहे. आमच्या करवडीची जानाईदेवी हे ग्रामदैवत आहे, या मंदिरातून प्रत्येक वर्षे यात्रेदिवशी आमच्या गावात पालखी आणण्यात येते. मंदिरात पूजाअर्चा करणारे दत्तात्रेय खोचरे हे आमचे भाऊबंद आहेत. या मंदिराची जागा सूर्यभान माने आणि त्यांचे बंधू भाऊ माने यांच्या मालकीचे आहे. अगोदर ठरल्याप्रमाणे मंदिराचे पुजारी दत्ता माऊलीनी मंदिराच्या समोरच एक खड्डा काढून ठेवलेला होता. यादरम्यान ट्रेकिंग साठी सायकलवरून आलेले आमचे कराडचे मित्र तिथे आम्हाला भेटले.त्यांनी या खड्ड्यात माती टाकण्यास आम्हाला मदत केली. मानेभाऊ आणि मान्यवरांच्या हस्ते मंदिराच्या समोर डाव्या बाजूला एक वडाचे झाड आम्ही लावले आणि पुन्हा एकदा पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष केला. जानुबाईच्या नावाने चांगभलं असा गजर करत आम्ही जानुबाई चे दर्शन घेतले. त्या ठिकाणी चहा घेतला आणि आमचा परतीचा प्रवास कारमधून सुरू झाला.
वनवासमाची गावात पुन्हा एकदा आमच्या आत्याच्या घरी थांबलो. आमच्या आत्याचा मुलगा अशोक पवार हा दिव्यांग आहे. मध्यंतरी एका अपघातात त्याच्या दोन्ही पायाचे स्नायू दुखावले आणि तो पूर्ण अपंग झाला. गेल्या दहा वर्षांपासून तो व्हिल खुर्चीवर बसून काम करत आहे. अशोक पवार यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे. चालता फिरता येत नसतानाही गावच्या विकासासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतातच तर दुसरीकडे आपल्यासारख्या असणाऱ्या दिव्यांगांच्या मदतीसाठी अशोक सतत धावून जात असतो. कुठेही भेटला तरी मला दाजी म्हणून हाक मारणाऱ्या चार-पाच लोकांपैकी आमचा अशोक आहे .अशोकच्या घरी कांदेपोहे करून घेऊन आम्ही पुन्हा कराडला परतलो.
अशा पद्धतीने आमच्या निसर्गवारीचा पहिला दिवस आज पूर्ण झाला, पाच किलोमीटर चालणं झालं, निसर्ग वारीतील दुसरे वडाचे झाड लावले. माऊलींच्या कृपेने पुढील काही दिवसात आमचा संकल्प पूर्ण होईल. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे.आपणास शक्य असेल तर वडाची काही झाडे आम्हाला दान करावीत. ही झाडे आम्ही कराड परिसरात लावणार आहोत. धन्यवाद.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
Ashok Mohane, Satish More Satitabh and 91 others
5 comments
1 share
Like
Comment
Share

०१ जून २०२१

यशवंतरावांची वेणुबाई



यशवंतरावांची ‘वेणूबाई’


महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान अशी उच्चपदे भूषवणार्‍या यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेणूताई यांची आज पुण्यतिथी. यशवंतराव होण्यामध्ये त्यांचा आईचा जितका मोलाचा वाटा होता तितकीच महत्त्वाची साथ त्यांच्या पत्नी वेणूताई यांचीही होता. 41 वर्षे यशवंतरावांना सोबत देणार्‍या वेणूताईंवर यशवंतरावांचे खूप प्रेम होते. 1 जून 1983 साली वेणूताई यांचे निधन झाले आणि त्यांच्या पाठोपाठ दीड वर्षातच म्हणजे 25 नोव्हेंबर 1984 साली यशवंतरावांचेही निधन झाले. यशवंतराव आणि वेणूताई यांच्या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये अडचणीच्या, सुखदुःखाच्या आणि भरभराटीच्या काळात सुद्धा एक अतुट नातं होतं. आज वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताई चव्हाण यांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून वाहिलेली आदरांजली.



महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी सूत्रे हाती घेतली मात्र यशवंतराव यांच्या सारखा बुद्धिमान राजकारणी नवी दिल्लीमध्ये हवा असल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांनी यशवंतरावांना मध्यरात्री फोन केला होता. पंडितजींनी यशवंतरावांना मी तुम्हाला एक नवी संधी देत आहे. तुमच्यावर संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देणार आहे, असे  फोनवरून सांगितले. पंडितजींनी ही बाब कोणालाही सांगू नका असे सांगितल्यानंतर यशवंतरावांनी मला ही गोष्ट एका व्यक्तीला सांगावी लागेल असे पंडितजींना सांगितले. त्यावर अशी कोणती व्यक्ती आहे असे विचारताच मला माझ्या पत्नीला हे सांगावे लागेल, असे यशवंतराव मिश्किलीने म्हणाले होते.

1962 ते 66 या काळात संरक्षण मंत्री, त्यानंतर 1970 ते 1974 या काळात अर्थमंत्री आणि 1974 ते 1977 या कालावधीमध्ये विदेश मंत्री म्हणून यशवंतरावांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. या कारकीर्दीत यशवंतरावांना जगभरात अनेक देशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या दौर्‍यामध्ये यशवंतरावांना पत्नी वेणूताईंना प्रकृतीच्या कारणामुळे नेता येत नाही याचे दुःख होते. पत्नीवर असलेले प्रेम आणि तिच्या शिवाय केलेला परदेश दौरा, पाहिलेली रम्य ठिकाणे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या उच्च नेत्यांच्या भेटी या विषयाची सर्व माहिती आपल्या पत्नीला सांगण्यासाठी 1965 ते 1977 या कालावधीमध्ये वेणूताईंना एकूण 96 पत्रे लिहिलेली आहेत. या पत्रात चव्हाण साहेबांनी जगभरातील अनेक देशांना दिलेल्या भेटीतील सविस्तर वर्णन केले आहे. दिवसभर काय झाले? काय पाहिले ? याचे इतंभूत वर्णन वाचताना प्रत्यक्ष यशवंतराव वेणूताई चव्हाण यांच्या समोर बसलेले आहेत, असा भास होतो. ही सर्व पत्रे वेणूताईंना लिहिली खरी मात्र ती प्रत्यक्ष ती पोस्ट मध्ये टाकली नाहीत. परदेश दौर्‍यावरून परत आल्यानंतर त्यांनी ही पत्रे वेणूताईंना हातामध्ये दिली.


या सर्व पत्राची सुरूवात ‘प्रिय सौ. वेणुबाईस्’ अशी आहे तर समारोप ‘तुझाच यशवंतराव’ असा आहे. या पत्रातून यशवंतरावांची वेणुताईविषयी काळजी दिसून येतेच आणि प्रेमही व्यक्त होते. बहुतांश पत्रात “तुझी तब्येत कशी आहे, तब्येतीची काळजी घेतेस ना? तू आपली प्रकृती चांगली ठेवत असशील, प्रकृती सांभाळा, डॉक्टर रोज येतात ना? अशी विचारपूस करणारी वाक्य आहेत. 19 सप्टेंबर 1971 साली लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, आज रात्री कुठे जायचे नाही. त्यामुळे सर्व निवांत आहे. वाचण्यासाठी भरपूर आणले आहे. तुझी आठवण झाली आणि तुझ्या प्रकृतीच्या शंकेने व्याकूळ झालो. प्रकृतीची काळजी घे.”

26 एप्रिल 1974 साली क्वॉलालंपूर येथून लिहिलेल्या पत्रात ते लिहितात ‘आज सारा दिवस तुझ्या आठवणीत गेला, तुझ्या संगतीत काढलेले कष्टाचे, आनंदाचे सर्व क्षण कसे अलगुन - बिलगून जवळ येतात आणि मन एका अर्थाने कृतज्ञतेने भरून जाते.’ तर 2 मे 1975 साली किंग्स्टन जमैका येथून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘तुझी आठवण सारखी येत असते, पण आज तुझ्या संगतीची तीव्रता फार वाटली.’

यशवंतराव परदेश दौर्‍यावर निघताना वेणूताईंना खूप वाईट वाटे. फ्रेंड फोर्ट येथून 28 ऑगस्ट 1975च्या पत्रात ते वेणुताईंना धीर देताना म्हणतात, ‘तू मी निघताना फारच संयम दाखवला, तुला असे एकाकी सोडून निघताना मी किती व्याकुळ होत असेन, कल्पना आहे ना? 1975 साली ऑक्टोबर महिन्यात यशवंतराव अफगाणिस्तान दौर्‍यावर होते. या दरम्यान काबूल येथून लिहिलेला लिहिलेल्या पत्रात ते वेणूताईंना म्हणतात, ‘आज दिवाळी ! तुझी फार आठवण झाली. गेल्या 25-30 वर्षात ही पहिलीच दिवाळी आहे,  मी तुझ्यापासून दूर आहे आणि एकटा परदेशात आहे. सकाळी आशामाईचे दर्शन घेताना तुम्हा सर्वांची आठवण झाली.’
यशवंतरावांचे पुस्तक प्रेम सर्वांनाच माहिती आहे. जगभरातील कोणत्याही देशात गेल्यानंतर तेथून त्यांनी वस्तू, दाग-दागिने नव्हे तर पुस्तके आणलेली आहेत. देशाचा परराष्ट्रमंत्री किंवा संरक्षण मंत्री परदेशात गेल्यानंतर काय आणतो तर पुस्तके ? हे वाचून अलीकडच्या राजकारण्यांना थोडे आश्चर्य वाटेल. यशवंतरावांनी शासकीय सोयीचा कधीही गैरवापर केला नाही. 10 मे 1975 साली मेक्सिको सिटी मधून लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘काल हॉटेल मधील दुकानातून एक दोन पुस्तके विकत आणली.  वस्तू पाहिल्या. मात्र महागाई फार आहे म्हणून विचार सोडून दिला. घरच्या आठवणीने अस्वस्थ वाटते आहे. आज आता चार-पाच दिवसांनी घरी येणार आहे म्हणून परतीच्या प्रवासाची ओढ आहे.’ 2 ऑक्टोबर 1972 साली रॉयल हवेन या हॉटेलमधून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘काहीतरी घ्यावे म्हणून दुकानात गेलो. भरमसाठ किंमती. येथील लाकडात कोरलेली एक सुंदर कलाकृती फार आवडली. किंमत 650 डॉलर्स म्हणजे जवळ जवळ 5 हजार रुपये. म्हंटले रामराम. निदान नेत्रसुख तरी मिळाले.’


19 जानेवारी 1974 साली रोम येथून लिहिलेल्या पत्रात थोडेसे नाराज झालेले मात्र जनतेवर मनापासून प्रेम करणारे यशवंतराव वेणूताईंना म्हणतात, ‘महाराष्ट्रात सर्व पोटनिवडणुकीत झालेले पराभव धक्का देणारे आहेत. कठीण प्रश्न, न सुटलेले गुंतागुंतीचे प्रश्न व रागावलेले लोक यांच्याकडे परत येतो आहे. पण ते घरचे प्रश्न आणि घरचे लोक आहेत. त्यांच्यातच राहायचे आहे, त्यांच्यातच मरायचे आहे. घरी परतण्यास मन अत्यंत उत्सुक आहे.’ परदेशात कुठेही असले तरी यशवंतराव घरी परतण्यास नेहमी उत्सुक असायचे. 1975 साली लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात, ‘भेटीसाठी उत्सुक, घरासारखे दुसरे रुबाबदार आणि आसरा देणारे दुसरे ठिकाण असू शकत नाही.’

26 एप्रिल 1974 मध्ये क्वॉलालंपूर मध्ये एक पुस्तक प्रदर्शन पाहत असताना एका पुस्तकामध्ये लेखकाने त्यांच्या पत्नीविषयी व्यक्त केलेल्या भावना वाचून पत्नी वियोगात बुडालेले यशवंतराव लिहितात, ‘तुझ्या संगतीची साथ ही ईश्वराने दिलेली मोठी देणगी आहे. त्याच्या या कृपेच्या जाणिवेने माझे मन आकंठ भरलेले आहे. तुझ्या उदार अंतःकरणाने मध्ये माझ्या या जाणिवेला जागा राहू दे. एवढे सांगण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.’

यशवंतरावांचे हे सर्व लेखन पत्ररूप आहे. त्यांनी हे लेखन माध्यम स्वीकारले याला विशिष्ट कारण आहे. त्यांनी सार्‍या जगाचा प्रवास केला. वेणूताई यांची प्रकृती दुर्बल, हजारो मैलाचा धावपळीचा प्रवास त्यांना झेपणारा नव्हता. वेणूताई नित्य दिल्लीत, स्वगृही ! यशवंतरावांना याची खंत असावयाची ही खंत त्यांनी पत्रातून नमूद केली आहे. एकाकीपणाची ही खंत या लेखनाची प्रेरणा ठरली असावी, असे ‘विदेश दर्शन’ या यशवंतराव चव्हाण यांच्यावरील एका पुस्तकाचे संपादक रामभाऊ जोशी म्हणतात. रामभाऊ जोशी यांनी संकलित केलेल्या पुस्तकात ही सर्व पत्रे उपलब्ध आहेत.

वेणूताईंना लिहिलेली ही पत्रे पाहिल्यानंतर वेणूताईंवर यशवंतरावांचे किती प्रेम येते हे तर लक्षात येतेच त्याबरोबर यशवंतराव वेणुताई प्रेम कथेची दुसरी बाजू, दोघांमधील परस्पर भेटीची व्याकुळता लक्षात येते. वेणूताईंच्या पुण्यतिथीदिनीच्या पूर्वसंधेला ‘विरंगुळा’ या बंगल्यात जाऊन ही सर्व पत्रे पाहण्याचा, वाचण्याचा मला योग आला. ही पत्रे वाचताना खरंच डोळ्यातून पाणी आले. यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा सुसंस्कृत समाजकारणी राजकारणी होणार नाहीच. त्याच बरोबर त्यांना खंबीरपणे साथ देणारी दुसरी वेणूताईही होणार नाही, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.वेणूताईंना भावपूर्ण आदरांजली.

*********
प्रीतिसंगमावरून
- सतीश मोरे
१ जुन २०२१

यशवंतरावांची वेणुबाई


यशवंतरावांची ‘वेणूबाई’
***********
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान अशी उच्चपदे भूषवणार्‍या यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेणूताई यांची आज पुण्यतिथी. यशवंतराव होण्यामध्ये त्यांचा आईचा जितका मोलाचा वाटा होता तितकीच महत्त्वाची साथ त्यांच्या पत्नी वेणूताई यांचीही होता. 41 वर्षे यशवंतरावांना सोबत देणार्‍या वेणूताईंवर यशवंतरावांचे खूप प्रेम होते. 1 जून 1983 साली वेणूताई यांचे निधन झाले आणि त्यांच्या पाठोपाठ दीड वर्षातच म्हणजे 25 नोव्हेंबर 1984 साली यशवंतरावांचेही निधन झाले. यशवंतराव आणि वेणूताई यांच्या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये अडचणीच्या, सुखदुःखाच्या आणि भरभराटीच्या काळात सुद्धा एक अतुट नातं होतं. आज वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताई चव्हाण यांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून वाहिलेली आदरांजली.


महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी सूत्रे हाती घेतली मात्र यशवंतराव यांच्या सारखा बुद्धिमान राजकारणी नवी दिल्लीमध्ये हवा असल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांनी यशवंतरावांना मध्यरात्री फोन केला होता. पंडितजींनी यशवंतरावांना मी तुम्हाला एक नवी संधी देत आहे. तुमच्यावर संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देणार आहे, असे  फोनवरून सांगितले. पंडितजींनी ही बाब कोणालाही सांगू नका असे सांगितल्यानंतर यशवंतरावांनी मला ही गोष्ट एका व्यक्तीला सांगावी लागेल असे पंडितजींना सांगितले. त्यावर अशी कोणती व्यक्ती आहे असे विचारताच मला माझ्या पत्नीला हे सांगावे लागेल, असे यशवंतराव मिश्किलीने म्हणाले होते. 1962 ते 66 या काळात संरक्षण मंत्री, त्यानंतर 1970 ते 1974 या काळात अर्थमंत्री आणि 1974 ते 1977 या कालावधीमध्ये विदेश मंत्री म्हणून यशवंतरावांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. या कारकीर्दीत यशवंतरावांना जगभरात अनेक देशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या दौर्‍यामध्ये यशवंतरावांना पत्नी वेणूताईंना प्रकृतीच्या कारणामुळे नेता येत नाही याचे दुःख होते. पत्नीवर असलेले प्रेम आणि तिच्या शिवाय केलेला परदेश दौरा, पाहिलेली रम्य ठिकाणे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या उच्च नेत्यांच्या भेटी या विषयाची सर्व माहिती आपल्या पत्नीला सांगण्यासाठी 1965 ते 1977 या कालावधीमध्ये वेणूताईंना एकूण 96 पत्रे लिहिलेली आहेत. या पत्रात चव्हाण साहेबांनी जगभरातील अनेक देशांना दिलेल्या भेटीतील सविस्तर वर्णन केले आहे. दिवसभर काय झाले? काय पाहिले ? याचे इतंभूत वर्णन वाचताना प्रत्यक्ष यशवंतराव वेणूताई चव्हाण यांच्या समोर बसलेले आहेत, असा भास होतो. ही सर्व पत्रे वेणूताईंना लिहिली खरी मात्र ती प्रत्यक्ष ती पोस्ट मध्ये टाकली नाहीत. परदेश दौर्‍यावरून परत आल्यानंतर त्यांनी ही पत्रे वेणूताईंना हातामध्ये दिली.

या सर्व पत्राची सुरूवात ‘प्रिय सौ. वेणुबाईस्’ अशी आहे तर समारोप ‘तुझाच यशवंतराव’ असा आहे. या पत्रातून यशवंतरावांची वेणुताईविषयी काळजी दिसून येतेच आणि प्रेमही व्यक्त होते. बहुतांश पत्रात “तुझी तब्येत कशी आहे, तब्येतीची काळजी घेतेस ना? तू आपली प्रकृती चांगली ठेवत असशील, प्रकृती सांभाळा, डॉक्टर रोज येतात ना? अशी विचारपूस करणारी वाक्य आहेत. 19 सप्टेंबर 1971 साली लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, आज रात्री कुठे जायचे नाही. त्यामुळे सर्व निवांत आहे. वाचण्यासाठी भरपूर आणले आहे. तुझी आठवण झाली आणि तुझ्या प्रकृतीच्या शंकेने व्याकूळ झालो. प्रकृतीची काळजी घे.”

26 एप्रिल 1974 साली क्वॉलालंपूर येथून लिहिलेल्या पत्रात ते लिहितात ‘आज सारा दिवस तुझ्या आठवणीत गेला, तुझ्या संगतीत काढलेले कष्टाचे, आनंदाचे सर्व क्षण कसे अलगुन - बिलगून जवळ येतात आणि मन एका अर्थाने कृतज्ञतेने भरून जाते.’ तर 2 मे 1975 साली किंग्स्टन जमैका येथून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘तुझी आठवण सारखी येत असते, पण आज तुझ्या संगतीची तीव्रता फार वाटली.’

यशवंतराव परदेश दौर्‍यावर निघताना वेणूताईंना खूप वाईट वाटे. फ्रेंड फोर्ट येथून 28 ऑगस्ट 1975च्या पत्रात ते वेणुताईंना धीर देताना म्हणतात, ‘तू मी निघताना फारच संयम दाखवला, तुला असे एकाकी सोडून निघताना मी किती व्याकुळ होत असेन, कल्पना आहे ना? 1975 साली ऑक्टोबर महिन्यात यशवंतराव अफगाणिस्तान दौर्‍यावर होते. या दरम्यान काबूल येथून लिहिलेला लिहिलेल्या पत्रात ते वेणूताईंना म्हणतात, ‘आज दिवाळी ! तुझी फार आठवण झाली. गेल्या 25-30 वर्षात ही पहिलीच दिवाळी आहे,  मी तुझ्यापासून दूर आहे आणि एकटा परदेशात आहे. सकाळी आशामाईचे दर्शन घेताना तुम्हा सर्वांची आठवण झाली.’
यशवंतरावांचे पुस्तक प्रेम सर्वांनाच माहिती आहे. जगभरातील कोणत्याही देशात गेल्यानंतर तेथून त्यांनी वस्तू, दाग-दागिने नव्हे तर पुस्तके आणलेली आहेत. देशाचा परराष्ट्रमंत्री किंवा संरक्षण मंत्री परदेशात गेल्यानंतर काय आणतो तर पुस्तके ? हे वाचून अलीकडच्या राजकारण्यांना थोडे आश्चर्य वाटेल. यशवंतरावांनी शासकीय सोयीचा कधीही गैरवापर केला नाही. 10 मे 1975 साली मेक्सिको सिटी मधून लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘काल हॉटेल मधील दुकानातून एक दोन पुस्तके विकत आणली.  वस्तू पाहिल्या. मात्र महागाई फार आहे म्हणून विचार सोडून दिला. घरच्या आठवणीने अस्वस्थ वाटते आहे. आज आता चार-पाच दिवसांनी घरी येणार आहे म्हणून परतीच्या प्रवासाची ओढ आहे.’ 2 ऑक्टोबर 1972 साली रॉयल हवेन या हॉटेलमधून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘काहीतरी घ्यावे म्हणून दुकानात गेलो. भरमसाठ किंमती. येथील लाकडात कोरलेली एक सुंदर कलाकृती फार आवडली. किंमत 650 डॉलर्स म्हणजे जवळ जवळ 5 हजार रुपये. म्हंटले रामराम. निदान नेत्रसुख तरी मिळाले.’

19 जानेवारी 1974 साली रोम येथून लिहिलेल्या पत्रात थोडेसे नाराज झालेले मात्र जनतेवर मनापासून प्रेम करणारे यशवंतराव वेणूताईंना म्हणतात, ‘महाराष्ट्रात सर्व पोटनिवडणुकीत झालेले पराभव धक्का देणारे आहेत. कठीण प्रश्न, न सुटलेले गुंतागुंतीचे प्रश्न व रागावलेले लोक यांच्याकडे परत येतो आहे. पण ते घरचे प्रश्न आणि घरचे लोक आहेत. त्यांच्यातच राहायचे आहे, त्यांच्यातच मरायचे आहे. घरी परतण्यास मन अत्यंत उत्सुक आहे.’ परदेशात कुठेही असले तरी यशवंतराव घरी परतण्यास नेहमी उत्सुक असायचे. 1975 साली लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात, ‘भेटीसाठी उत्सुक, घरासारखे दुसरे रुबाबदार आणि आसरा देणारे दुसरे ठिकाण असू शकत नाही.’
26 एप्रिल 1974 मध्ये क्वॉलालंपूर मध्ये एक पुस्तक प्रदर्शन पाहत असताना एका पुस्तकामध्ये लेखकाने त्यांच्या पत्नीविषयी व्यक्त केलेल्या भावना वाचून पत्नी वियोगात बुडालेले यशवंतराव लिहितात, ‘तुझ्या संगतीची साथ ही ईश्वराने दिलेली मोठी देणगी आहे. त्याच्या या कृपेच्या जाणिवेने माझे मन आकंठ भरलेले आहे. तुझ्या उदार अंतःकरणाने मध्ये माझ्या या जाणिवेला जागा राहू दे. एवढे सांगण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.’
यशवंतरावांचे हे सर्व लेखन पत्ररूप आहे. त्यांनी हे लेखन माध्यम स्वीकारले याला विशिष्ट कारण आहे. त्यांनी सार्‍या जगाचा प्रवास केला. वेणूताई यांची प्रकृती दुर्बल, हजारो मैलाचा धावपळीचा प्रवास त्यांना झेपणारा नव्हता. वेणूताई नित्य दिल्लीत, स्वगृही ! यशवंतरावांना याची खंत असावयाची ही खंत त्यांनी पत्रातून नमूद केली आहे. एकाकीपणाची ही खंत या लेखनाची प्रेरणा ठरली असावी, असे ‘विदेश दर्शन’ या यशवंतराव चव्हाण यांच्यावरील एका पुस्तकाचे संपादक रामभाऊ जोशी म्हणतात. रामभाऊ जोशी यांनी संकलित केलेल्या पुस्तकात ही सर्व पत्रे उपलब्ध आहेत.


वेणूताईंना लिहिलेली ही पत्रे पाहिल्यानंतर वेणूताईंवर यशवंतरावांचे किती प्रेम येते हे तर लक्षात येतेच त्याबरोबर यशवंतराव वेणुताई प्रेम कथेची दुसरी बाजू, दोघांमधील परस्पर भेटीची व्याकुळता लक्षात येते. वेणूताईंच्या पुण्यतिथीदिनीच्या पूर्वसंधेला ‘विरंगुळा’ या बंगल्यात जाऊन ही सर्व पत्रे पाहण्याचा, वाचण्याचा मला योग आला. ही पत्रे वाचताना खरंच डोळ्यातून पाणी आले. यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा सुसंस्कृत समाजकारणी राजकारणी होणार नाहीच. त्याच बरोबर त्यांना खंबीरपणे साथ देणारी दुसरी वेणूताईही होणार नाही, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. वेणूताईंना भावपूर्ण आदरांजली.
*********
प्रीतिसंगमावरून
- सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...