फॉलोअर

१५ जुलै २०१६




पंढरीच्या वारीत विठ्ठल मज भेटला ..!
 पंढरपूर : सतीश मोरे
सर्वाघटी राम ,देहा देही एक,
सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी ।।

म्हणजे सर्व देहात मला ईश्वर दिसतो आहे. याची प्रचिती पंढरीऱ्या वारीत येत आहे. पंढरीची वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर चालत जाणे,वारी म्हणजे ध्यान , वारी म्हणजे  नामजपयज्ञ, वारी म्हणजे लोकसंग्रह,  वारी म्हणजे संत संगती,  वारी म्हणजे माऊलीची साथ सोबत, वारी म्हणजे दिंड्या,  वारी म्हणजे पालखी सोहळा,  वारी म्हणजे टाळ मृदंगाचा नाद, वारी म्हणजे विठ्ठल भेटीचा ध्यास,  वारी म्हणजे वारकऱ्यांची साथ, वारी म्हणजे भगवान भेटीचा योग, मार्ग  आणि ध्यास. गेली 18 दिवस वारीतून चालता चालता वारीचा थोडा अर्थ कळायला लागला,  वारीत मला माऊली भेटले,  देव भेटला, वारीत मला विठ्ठल दिसला.
कराड मधून जेव्हा वारकरी लोकांना नेणारा ट्रक शाहू चौकात पोहचला तेव्हा मागे बसलेल्या  एका माऊलीची एक चप्पल खाली पडली. रस्त्यावरून अनेक जण ये- जा करत होते.  अनेकांनी ते पाहीले, दुर्लक्ष केले. एक मुस्लिम युवकाने दुचाकी मागे वळवून ती चप्पल  उचलली,  ट्रकच्या मागे गाडी लावली, नाक्यावर आणून ती चप्पल परत दिली,  होय त्या युवकात मला विठ्ठल दिसला. आळंदी मध्ये वाहतुकीचा खोळंबा झाला होता.  अनेक जण खुप लांब उतरून गावात येत होते, मठाचा पत्ता विचारत होते. एक पोलिस सर्व जणांना पत्ता सांगत होते.  काहीना इच्छित स्थळी पोहचवत होते, तिथे मला विठ्ठल दिसला. माऊली सोहळा पुण्यात पोहचला. भरलेले रस्ते,  उंच  इमारती पाहून काही  वारकरी थोडे भांबवले, त्याना रस्ता पार करायला मदत करणारे  लोक मला दिसले. काहीनी त्यांना पीएमटीचा मार्ग दाखवला, बस मध्ये बसल्यावर डोक्यात टोपी, कपाळावर गंध पाहून कोणी जागा दिली, त्यामध्ये मला देव दिसला.


दिवे घाटाचा अवघड रस्ता पार करून वारकरी थकले होते,  चालवत नव्हते, पायाला गोळे आले होते. या माऊलीचे पाय तेल लावून चोळणारे,  चेपणारे योग विद्या मंडळाचे शेकडो लोक दिसले. रस्त्याकडेला वारकऱ्यांचे डोके मॉलिश करणारे वृद्ध मला दिसले,  त्याच्यामध्ये मला विठ्ठल दिसला. सासवड मध्ये बोअर मधील पाणी पाईपने टाकून माऊलींना आंघोळ घालणारे शेतकरी दिसले, त्यामध्ये मला विठ्ठल भेटला. जेजुरीला वारकरी पोहचले तेव्हा पावसात चिंब भिजले होते, चिखल झाल्याने त्यांना रहायला जागा नव्हती, अशा वारकऱ्यांना घराचे दरवाजे उघडले, मंगल कार्यालय खुले केले, त्या माऊलीमध्ये मला विठ्ठल दिसला. वाल्हेकर तर माऊली सेवेसाठी तत्पर होते. लांब असलेल्या विहिरीतील पाणी घराजवळच्या विहिरीत टाकून हे पाणी वारकऱ्यांना उपलब्ध करून देणारा विठ्ठल वारीत दिसला. निरा कॅनालमध्ये वारकरी स्नानासाठी जात होते,  पहाटेच्या वेळी चुकून एखादा पाण्यात पडू नये म्हणुन तिथे सतर्क असणारा पोलिस दुसरा कोणी नव्हे विठ्ठलच होता.  निरा असो वा लोणंद, वारकऱ्यांना स्वतःचे घर आराम करायला उपलब्ध करून देणारा विठ्ठलच होता. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन वारकऱ्यांना खाऊ घालणारी पिंपरद, तरडगावची माऊली विठ्ठलरूप होती.  फलटण मध्ये वारकरी लोकांच्या चपला मोफत दुरूस्त करणारे,  मोफत केशकर्तन सेवा देणारे, पत्रकार माऊली विठ्ठलाचेच रूप होते. बरड मध्ये रस्त्यावर पडलेल्या केळाच्या साली उचलून बाहेर टाकणारा तो युवक विठ्ठलच होता. माऊली भक्तासाठी घर आणि पिर खुले ठेवणारे मुल्ला मौलवी विठ्ठलच होते ना!

पंढरपूर : पंढरीच्या वारीत विठ्ठल पदोपदी दर्शन देत असतो.


नातेपुते गावात येताना भुकेलेल्या माऊलींना पुरी भाजी देणारे, भुक लागेल तेव्हा तेव्हा  माऊलींना शिरा,  उपीट, पोहे,  पिठलं भाकरी, भात खाऊ घालणारा विठ्ठल अनेक ठिकाणी भेटला. माळशिरस, वेळापूरमध्ये उघड्यावर शौचाला जाऊ नका म्हणून आवाहन करणारे, शौचालय युनिट उपलब्ध करून स्वच्छतेचा संदेश देणारा विठ्ठलच होता.
भंडीशेगाव  असो वा वाखरी, वारी मार्गावर जेव्हा जेव्हा कोणी आजारी पडला, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, सेवा करणाऱ्या नर्स,  सेवाभावी लोक हे सगळे दुसरे कोणी नाही तर विठ्ठलाचे रूप धारण करून आलेले लोक होते. वारकऱ्यांना खाऊ घालणारे, स्वयंपाक करणारे,  अंधारात मार्ग दाखवणारे,  तंबू उभे करून निवारा देणारे, स्वयंपाकाची भांडी स्वच्छ  करणाऱ्या महिला, मोफत मोबाईल चार्ज करून देणारे, नियोजनासाठी झटलेले, शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सेवक या सर्व माऊली मध्ये मला विठ्ठल दर्शन झाले.  पंढरीच्या वारीत प्रत्येक जण माऊली असतो, त्या माऊलीच्या रूपाने विठ्ठल पूर्ण वारीत सहभागी  असतो, हे मी ऐकले होते. गेल्या आठरा दिवसात तो विठ्ठल प्रत्यक्ष मी पाहीला.

१४ जुलै २०१६


महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा 
माऊलीभक्तांचा पालखी सोहळा


वाखरी : सतीश मोरे
पंढरीचा पाडुरंग अवघ्या विश्वात  आहे. जो नसानसा मध्ये ठासून भरलेला तो विठ्ठल. विठ्ठल नामाचा महिमा फार मोठा आहे आणि विठ्ठल भक्त जगभर  आहेत.  शेकडो वषार्र्ं पासून पंढरीचा वारकरी, वारी चूको ने दी हरी, हे लक्षात घेऊन वारीला जात आहे. वारीत सारे जण सहभागी झाले आहेत.  गरिब- श्रीमंत, काळा -गोरा, सवर्ण- कनिष्ठ,  लहान- मोठ्ठा  असा कोणताही भेदभाव  इथे नाही.  प्रांत, देश, विदेश, जात पात या सर्व  सीमा  इथं नसतात, असतो फक्त माऊली. अवघ्या महाराष्ट्रातून आलेले, कर्नाटक,  तेलंगणा आणि महाराष्ट्र  येथून आलेल्या वारकरी माऊलींची दिंडी सामाजिक ऐक्याचे प्रतिक आहे.
महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात सुद्धा विठ्ठलाची जादू आहे.  या प्रांतातून अनेक वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी झाले आहेत. धोंडोपंत दादा पंढरपूर यांच्या दिंडीला अनेक वर्षाची परंपरा आहे. माऊली रथाचे मागे 20 नंबरवर असणाऱ्या या दिंडीत सुमारे 3000  वारकरी  आहेत.  यामध्ये महाराष्ट्र,  कर्नाटक व तेलंगणा राज्यातील वारकऱ्यांचा संगम पहायला मिळाला.
आंध्र प्रदेश राज्यातून वेगळे झालेल्या तेलंगणा राज्यातील महाराष्ट्र सीमारेषेवर असणारा निजामाबाद या जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचे अनेक लोक आहेत. अनेक वर्षे पंढरीची वारी करणारे वारकरी  आहेत.  यंदा पाऊस आला नव्हता,  गेल्या वर्षी पण कोरडे पडले होते,  तरीही पंढरीच्या वारीला या भागातील अनेक वारकरी आले आहेत.  निंभोरे ओढा येथे अनेक जण भेटले. या दिंडीत पहिली पंगत बसताना शर्ट काढून बसावे लागते.  जेवणाची पंगत  उठल्यानंतर कन्नड स्टाईल मराठीत बोलू लागले. आमच्याकडे श्रीमंत देव आहे,  पैसा  आहे. पण विठ्ठलासारखा देव नाही.  या देवाचे दर्शन घेतले की वर्षभर उर्जा मिळते. वारी सारखा आनंद जगात कोठेही नाही.  आमच्याकडे भजन, कीर्तन नित्य नेमाने होतात. अनेक गावात विठ्ठल रूक्मिणी मंदीर आहे, असे त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्यातून आलेल्या लोकांची संख्या पण फार  आहे. गंगाधर महाराज पाटील चंडेगावकर मदनूर यांच्या पुढाकाराने आलेले वारकरी याच दिंडीत पहायला मिळाले. या माऊलींचे पाठांतर खूप आहे. तुकोबा गाथा मधील अनेक अभंग पाठ  आहेत. अनेक गावांमध्ये भजनी मंडळे आहेत.  पंढरीची वारी  कधी चुकवत नाहीत. सुमारे  1000 किलोमीटर प्रवास होतो. सारे जण पंढरपूर  मध्ये धोंडोपंत दादाच्या मठात एकत्र येऊन आळंदीला जातात. वारीमध्ये  पालखी सोहळ्यात सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले.

वाखरी: उडीच्या खेळात टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर विठुनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे वारकरी.



रिंगण  आणि  उडीचे खेळ
वारकरी  अखंड चालत असतात. दमतात,  थकतात पण थांबत नाहीत. त्यांना आनंद,  विरंगुळा देणारा क्षण म्हणजे उभे आणि  आडवे रिंगण. शाळेत जसा पीटीचा तास तसेच हे वारकरी खेळ.  या खेळात सात्विकता आणि  आनंद असतो. माऊली ज्यावर सवार  असतात  असा माऊली अश्व, दुसरा शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व. माऊलीचा अश्व मोकळा  असतो, तो पुढे पळत राहतो. त्यामागे स्वार  असलेला अश्व धावतो.  माऊली अश्व रिंगणात  एक दोन वेढे काढतो,  आणि थांबतो. मग स्वार  अश्व त्यापुढे जातो आणि रिंगण पुर्ण होते. माऊली माऊलीचा घोष होताना दोन्ही  अश्व माऊली पालखी जवळ जातात आणि रिंगण संपते. त्यानंतर चोपदार सर्व दिंड्यांना उडीचे खेळासाठी निमंत्रण देतात. माऊली पालखी आणि घड्याळाचा काट्याप्रमाणे ओळी करून टाळकरी उभे राहतात. बाहेर गोलाकार सर्व  मृदंगधारक, विणेकरी आणि झेंडेकरी असतात. टाळ मृदंगाची जुगलबंदी सुरू होते. चोपदार बंधू चार ठिकाणी उभे राहून सूचना देतात, त्यावर टाळकरी ठेका धरतात. झोपून, गुडघे टेकून,  मागे, पुढे तोंड करून टाळकरी  बेफाम  होऊन नाचतात.अर्धा तास खेळ रंगतो. तुका म्हणे वृद्ध होती तरूण, अशी परिस्थिती  असते.  शेवटी चोपदार चोप वर करून उडी मारतात, उडीचे खेळ संपतात. सारेजण लोटांगण घालून नमस्कार करतात. यामागे  संताची धुळ शरिराला लागावी हा उद्देश  असतो.


🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 14 जुलै 
पंढरपूर  सतीश मोरे 

वाखरीत काल सायंकाळी पोहचले पासून खूप प्रयत्न केला पण नेट काय सुरू झाले नाही.  कसे होणार संत तुकाराम,  संत ज्ञानेश्वर महाराज,  सोपानकाका या मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी सुमारे चार लाख वारकरी वाखरी येथे विसावले होते. वाखरी तळ फार मोठ्ठा आहे,  सर्व सुविधा उपलब्ध करून दिली होती,  पालिकेने.  खुप वेळ वाट पाहीली मात्र नेट सुरू झाले नाही,  तुम्ही सारे वाट बघत होता,  माझी वारी वाचण्याची.  पण नेट पुढे काय करायचे?साडे दहा वाजता पडलो,  झोप लागत नव्हती,  शेजारी  एका दिंडीत जागर सुरू होता. आकरा वाजणेच्या सुमारास झोप लागली. दरम्यान  एक वाजता जाग आली, नेट पाहीले,  3 G रेंज होती,  पटकन सर्व ग्रुपला,  तुम्हाला माझी वारी पाठवून दिली,  पुन्हा पडलो.  पहाटे अडीच  वाजता सहकार्यानी उठवले. चला तयार व्हा.   लगेच उठलो खरात माऊलीनी आंघोळीला नेले.  मुख्य रस्त्याला  अनेक नळ उभारले होते,  तिथे पोहोचलो. पाणी कमी होते,  गर्दी जास्त होती.  गडबडीत घुसलो आत,  उरकली आंघोळ. परत  आलो तयार होऊन निघालो दर्शनासाठी. 

तळावर खुप गर्दी होती.  पहिल्यांदा संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.  कमी होती गर्दी.  खुप जवळुन आणि निवांत  घेता आले दर्शन.  पुढे आलो सोपानकाका यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.  माऊली दर्शन  अनेकदा झाले होते,  पण  आज  आणखी  एकदा मन भरून दर्शन घेतले,  डोके टेकवून.  मन प्रसन्न झाले.  येताना बंडा तात्या भेटले.  चहा घेऊन साडे तीन वाजता पुन्हा तंबूत येऊन पडलो.  सकाळी साडे सहा वाजता  उठवले. ब्रश करून 
घेतला.  गरमागरम दुध वाटप सुरू होत, आमच्या साठी.  वाखरी मध्ये संताचा मेळा जमला होता.  पुन्हा एकदा फिरून आलो.  सारे डोळ्यात घातले. आता  उद्या पासून तंबूत रहायला मिळणार नाही, उठून लवकर चालावे लागणार नाही,  एकादशी झाली की वारी पुर्ण, सारे जण बोलत होते . दरम्यान तंबू उतरणे सुरू झाले, साहित्य ट्रक मध्ये टाकले. किचन मधे वडे तळायचे सुरू होते, तिथे गेलो.  पाणी देणारे थोरात टीमचे फोटो काढले. दहा वाजता पंगती पडल्या.  कालेकरांची पंगत होती.  पुरी, श्रीखंड, कुर्मा, भात,  वरण भात,  बुंदी आणि केळी. सर्दी खोकला मुळे पुर्ण वारीत फळे व श्रीखंड खाल्ले नाही.  जेवण झाल्यावर निघण्याची तयारी सुरू झाली तेवढ्यात रामभाऊ  आणि राजाभाऊ चोपदार यांचे आगमन झाले.  सारे जण जमले,  वारी कशी झाली,  काय कमी जास्त ,सारी चौकशी केली त्या दोघांनी. अनेकांना चोपदार बंधू सोबत फोटो काढायचा होता.  फोटो काढायचा मोबाईल माझ्या कडे  असल्याने पुर्ण वारीत सारे जण माझ्या मागे असायचे, खुप वेगळा भाव होता त्या माऊलींच्या मनात.  मी स्वतःला नशीबवान समजतो, या भोळ्या भाबड्या लोकासोबत मी राहीलो, त्याचे फोटो काढायला मिळाले.  चोपदार बंधुच्या आगमनाने सारेच खुलले. आमच्या शेवटच्या तळ मुक्कामाच्या आठवणी चोपदार  बंधुच्या भेटीने सुखद झाल्या.






साडे आकरा वाजता निघालो पंढरीच्या दिशेने.  वारीचा अंतिम टप्पा. पाडुरंगाचे गावाला जाताना गेली सतरा दिवस  अनेक गावे गेली, आता देवाचे गाव.  सहा किलोमीटर अंतर फक्त. चालू लागलो.  सगळीकडे बघेल तिथे फक्त दिंड्या,  वारकरी,  भाविक,  पोलिस,  दुकाने  आणि वाहने.  गर्दी होती खुप. कडक उन्हात वारीचा शेवटचा टप्पा पार पडला.  एक वाजता पंढरीत पोहचलो.  एसटी स्टँड बाहेर  आणले होते.  दुतर्फा फक्त वारकरी होते.  येणारे जाणारे.  आमची वेळ योग्य म्हणा किंवा नशीब म्हणा. समोरून तीन महान संताच्या पालख्या आल्या.  या पालख्या माऊली भेटीला निघाल्या होत्या.  संत नामदेव पालखी पंजाब , संत निवृत्ती नाथ पालखी त्रिंबकेश्वर  आणि दिड महिन्यांत सुमारे एक हजार किलोमीटर अंतर पार करून जळगाव मुक्ताईनगर येथून आलेली संत मुक्ताई पालखी अशा एका पाठोपाठ एक  समोरून आल्या. जवळून दर्शन घेतले.  



पुढे आलो. कृषि पंढरी प्रदर्शनासाठी खुप गर्दी झाली होती, चार वाजता मुख्यमंत्री येणार होते उद्घाटन करायला.  रेल्वे लाईन ओलांडून शहरात  आलो.  सगळीकडे वारकरी दिसत होते.  दोन वाजता मारूती बुवा कराडकर मठात पोहचलो. घामाघूम झालो होतो.  ऑफिस शेजारच्या रूममध्ये माझी व्यवस्था होती.  मोबाईल चार्ज करण्यासाठी लावला. नेट सुरू होते, बायकोने लेकीचा फोटो पाठवला होता,  त्याच्या शाळेत आज पंढरीची वारी होती.  देवयानीने  डोक्यावर तुळस घेतलेला फोटो पाहून डोळे भरून आले. लेकीच्या  आठवणी जाग्या झाल्या.  डोळ्यातले पाणी थांबत नव्हते,  शेजारी महेश तवर होत,  म्हणून गेले,  लेकीचे प्रेम असेच असते! 

या आठवणीतच निवांत दोन तास झोपलो. 

साडे पाच वाजता फ्रेश होऊन पंढरपूर दर्शन करायला बाहेर पडलो एकटाच.  सारे रस्ते ओसंडून वाहत होते.  पाय ठेवायला पण जागा नव्हती.  एका मागोमाग एक दिंड्या शहरात प्रवेश करत होत्या.  माऊलींचा उत्साह पाहण्या सारखा होता.  तीन चार चौक पार करून उद्धव घाटातून चंद्रभागा तिरी आलो.  काय सुंदर चित्र होते ते. वाळवंटावरवैष्णवाचा मेळा भरला होता,  अनेक जण स्नानासाठी पात्रात उतरले होते. कुठे किर्तन सुरू होते,  तर कुठे नामसंकिर्तन. पालिकेने उच्च न्यायालयाचे आदेशानुसार पात्र दुषित,  अस्वच्छ  आणि  खराब होऊ नये म्हणून काळजी घेतली होती,  उघड्यावर बसू नये यासाठी पथके कार्यरत होती.  पुंडलिक मंदीर परिसरात मोठय़ा प्रमाणात भाविक होते.  

सारे पहात,  फोटो काढत महाघाटातून वर  आलो. तिथे आळंदीचे डाॅ विश्वनाथ कराड यांचे वतीने पवित्र चंद्रभागा नदीच्या नित्य  आरतीचा शुभारंभ कार्यक्रम सुरू होता. मोठे स्किन लावले होते.  महादजी शिंदे सरकाराचा फार जुना वाडा पाहून गतवैभव उभे राहिले.  पुढे आलो,  लांबून विठ्ठल मंदिर दिसू लागले.  नामदेव पायरी जवळून पुढे आलो.  दर्शन बारी भव्य मंडप  इमारत आकर्षक सजवली होती,  लाईन मोठी होती. डाव्या हाताने पुढे आलो,  महाद्वार बाजूला. रूक्मिनी मंदीराचा कळस दिसला,  आणखी पुढे आलो विठ्ठल मंदिर दिसले.  लांबून नमस्कार केला.  

मुख्य रस्त्यावर  आलो.  खेळणी, प्रसाद,  बुक्का,  कुंकु, देवाचे साहित्य यांची दुकाने फुलली होती. मठात  साडे सात वाजता पोहचलो. थोडा पडलो आणि टॅबवर काम सुरू केले. साडे आठ वाजता बाजरीची भाकरी, मटकीचे पातळ कालवण खाल्ले.  पुन्हा काम सुरू केले .


सकाळी लवकर उठून स्नान करण्यासाठी जायचे होते.  नेट बंद होते.  सुरू होण्याची वाट बघत बघत पडलो. 



     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

१३ जुलै २०१६

समाज आरती फोटो

समाज आरती;  पालखी सोहळ्याचा मानबिंदू 

भंडीशेगाव : सतीश मोरे
माऊली पालखी सोहळा प्रस्थान झाल्यापासून  पालखी मुक्कामाला पोहचे पर्यंत सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध  ,नियोजित,  नियमबद्ध आणि अचुक वेळी होतात.  सोहळ्यात सहभागी सुमारे अडीचशे दिंड्यामध्ये एकवाक्यता  असते. सोहळा मुक्कामाला पालखी तळावर पोहचल्यावर होणारी समाज आरती आणि तंबू उभारणी रचना हा सैनिक शिस्तीचा उत्तम नमुना आहे.  पालखी सोहळा सुरू करणारे हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडे  सरदार असल्याने पालखी सोहळ्यावर सैनिक शिस्तीची छाप आहे.  समाज आरती हा लोकशाही दिंडी सोहळ्याचा मानबिंदू म्हणावा लागेल. 
संत तुकारामाच्या  घराण्यात वारीची परंपरा अनेक  वर्षापासून होती. तुकाराम महाराजांनी ती पुढे चालवली. त्याचे पश्चात त्यांचे  कनिष्ठ बंधू कानोबांनी वारी सुरू ठेवली. तुकाराम महाराजांचे  तृतीय चिरंजीव श्री नारायण बाबा यांनी 1685 मध्ये  या वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले. देहूहून ते तुकोबारायाच्या पादुका पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीला नेत. . त्याठिकाणी पालखीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन ही पालखी पंढरपूरला जात होती. श्री नारायण बाबांच्या पश्चात 1830 पर्यंत हा सोहळा अखंडीत सुरू होता. संत तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये घरगुती वाद झाल्याने हा सोहळा खंडीत झाला. आज सुरू असलेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 1832 मध्ये  माऊलींचे निश्चिम भक्त हैबत बाबा पवार आरफळकर यांनी सुरू केला. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांकडे सरदार म्हणून असलेल्या हैबत बाबानी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा खुलवला. 
हैबतबाबा सुरूवातीला माऊलींच्या पादुका गळ्यात बांधून पंढरीला जात.  सैन्य दलात काम केले  असल्याने पालखी सोहळ्यात त्यांनी तीच शिस्त आणली आहे. पालखी वेळेतच निघते,  पालखी मार्गावर कुठे आणि किती  थांबायचे, विसावा कुठे,  दुपारचे जेवण कुठे हे ठरलेले आहे.  या व्यतिरिक्त पालखी कुठेही थांबत नाही. वारकरी,  टाळकरी,  झेंडेकरी, विणेकरी यांचा क्रम, जागा ठरलेली आहे. या दरम्यान बाहेरचा कोणी  अनोळखी घुसू नये, दिंडी ओळीत चालावी, यासाठी प्रत्येक दिंडीत व्यवस्था  असते. पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदारांचे वंशज  बाळासाहेब, राजाभाऊ  आणि रामभाऊ रणदिवे (चोपदार) हे काम पाहतात.  सोहळा मालक आरफळकर,  सरदार शितोळे यांचे प्रतिनिधी, चोपदार आणि वास्कर बाबा तसेच  आळंदी देवस्थान कमिटी हे एकत्र बसून सर्व निर्णय घेतात  , एकटा कोणी निर्णय घेत नाही. सोहळ्यात लोकशाही अनेक वर्षे पासून सुरू आहे, यांचे हे प्रतिक आहे. 
समाजआरती दरम्यान चोपदारांनी चोप आणि
हात वर केल्यावर सारे शांत होतात.

सायंकाळी सहा ते सात दरम्यान  (वाहतुक परिस्थिती नुसार ) पालखी तळावर पोचते.  तळाच्या मध्यभागी माऊली पालखी ठेवण्यासाठी अलिशान तंबू तयार असतो.  या पुढे पालखी आत यायला जागा सोडून दोन्ही बाजूला आयत आकारात वारकरी, भाविक बसतात.  एका मागोमाग एक नामघोष करत दिंड्या चहुबाजूला येऊन  उभ्या राहतात. यामध्ये फक्त मृदंगचालक, झेंडेकरी,  टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला ऐवढेच असतात.  मानाच्या सर्व दिंड्या तळावर पोहचल्यावर स्थानिक ग्रामस्थ पालखी नाचवतच तळावर आणून उंच ठिकाणी ठेवतात.  या दरम्यान माऊली, माऊली चा जयघोष आणि टाळ, मृदंगाच्या नादाने वातावरण फुललेले असते. 
अचानक हो. .....असा प्रमुख चोपदार बाळासाहेब यांचा आवाज येतो आणि  एका क्षणात सर्व काही शांत होते. सारे टाळ बंद होतात. मृदंग वाजवणे थांबतो.  कोणीही बोलत नाही.  फक्त ज्या दिंडी मालकाची अडचण  असेल, दिवसभर त्यांना त्रास झाला  असेल तर त्याच दिंड्या टाळ वाजवत राहतात.  चोपदार स्वत: किंवा त्याचे प्रतिनिधी त्याचेकडे जातात,  अडचणी,  तक्रार  ऐकून घेतात.  शक्य त्या समस्या जागेवरच सोडवल्या जातात, उर्वरितांसाठी नंतर तळावर बोलवले जाते. यानंतर प्रमुख चोपदार हरवलेल्या  आणि सापडलेल्या वस्तूची यादी वाचून दाखवतात. ओळख पटवून त्या वस्तू नेण्याचे आवाहन करतात,  सुचना देतात  आणि शेवटी 'उद्या पालखी सकाळी सहा वाजता निघणार आहे हो ', असे जाहीर करतात.  दुसऱ्या दिवशीचे अंतर पाहून वेळ सांगीतली जाते. ही वेळ पाहून वारकरी दुसऱ्या दिवसाचे नियोजन करतात. सैन्य दलाच्या जवानांना अशाच सुचना दिल्या जातात.  
यानंतर चोपदार दंड  (चोप) विशिष्ट पद्धतीने वर उचलतात आणि  लगेच ज्ञानेश्वर माऊली आणि जगतगुरू तुकोबाराय याची समाज आरती होते.  आरती वेळी बाळासाहेब चोपदाराचे शेजारी, मालक आरफळकर समोर राजाभाऊ आणि रामभाऊ चोपदार उभे असतात. त्याचे बाजूला हैबतबाबाचे विणेकरी,  शितोळे सरकार प्रतिनिधी  आणि समाज म्हणून  वास्करबाबा असतात. हे सर्व ठरले प्रमाणे शिस्तबद्ध होते.  
आरती संपलेनंतर सर्व दिंड्या आपल्या जागेवर जातात.  दरम्यान सोहळा मालकांचा तंबू  उभारण्यात येतो.  हा तंबू तयार झालेशिवाय  इतर तंबू  उभे केले जात नाहीत.हा तंबू कसे उभारावेत हे पण निश्चित आहे. या तंबू च्या आठ खुट्यावर प्रमुखांचे काही तंबू उभारले जातात. प्रचंड शिस्तीचा हा सोहळा असून समाज  आरती मानबिंदू आहे.



 
 
 
 
 🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 13 जुलै 
वाखरी सतीश मोरे 

कोणतीही सवय लागायला, सुटायला किमान पंधरा कमाल एकवीस दिवस लागतात,  असे म्हणतात . गेल्या सोळा दिवसात पहाटे दोन तीन वाजता उठायची  आम्हा सर्वाना सवयच लागली होती. आज भंडीशेगाव मध्ये खरं तर लवकर  उठायची गरज नव्हती, वाखरी अंतर
कमी  असल्याने दुपारी एक वाजता पालखी निघणार होती. पण सवयी प्रमाणे तीन वाजता अनेकांना जाग आली,  पुन्हा झोपवले इतरांनी. पाणी टंचाई थोडी जाणवत होती या भागात.  याचाच विचार करून खरात व लोहार माऊलींनी मला चार वाजता जागे केले.  उठा,  कपडे तंबूतच ठेवा आणि लगेच टॅन्कर खाली आंघोळीला चला,  असे सांगितले.  हा अनुभव मी लोणंद मध्ये पण घेतला होता.  उठलो,  थेट टॅन्कर गाठला.  टॅन्कर रिकामा करून शंकरराव थोरात  नडशीकाना पाणी भरून  आणायला जायचे होते.  काॅक फुल करून भरपूर पाणी सोडले त्यांनी.  मनसोक्त स्नान केले.  12 नंबर दिंडीला थोरात  आणि त्याचे सहकारी दिपक जगताप वडगाव, रमेश थोरात कार्वे, रामचंद्र पिसाळ, दिनकर वायदंडे घोणशी, मुकेश खराडे काले यांच्या अविरत प्रयत्नामुळे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. सह्याद्री साखर कारखान्याने टॅकर दिला आहे. 

पावणे पाच वाजता आम्ही चहा प्यायला बाहेर पडलो. रस्त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक गाडी फिरत होती,  शौचालयांची जागा सांगत तिकडे जायचे आवाहन सुरू होते.  जय भवानी, बारामती चहा वारीत प्रसिद्ध आहे. चहा घेऊन पालखी तळाकडे आलो.  तळावर काकडा आरती सुरू झाली होती,  तर तिथेच एका बाजूला  खुल्या जागेत  अनेक जण झोपले होते. तेथून पुढे जाऊन  माऊली पालखी दर्शन घेतले. गर्दी कमी असल्याने निवांत दर्शन झाहले. परत तंबूत परतलो आणि पुन्हा झोपलो.  सात वाजता उठवले कोणीतरी,  फ्रेश झालो,  उरलेले विधी आटोपले . 

बंडा तात्या त्या झाडाच्या जवळपास पुजा करत बसले होते.  नमस्कार केला, त्यानी विचारपूस केली. दहा मिनिटांनी बसू असे सांगितले. परत  एकदा गेलो, तात्या सोबत  अनेक विषयांवर चर्चा झाली.  रिंगण आणि उडीचे खेळ यावर माहिती दिली. वारीमध्ये बदल होत आहेत,  शासन स्तरावर चांगले काम केले आहे यावर्षी,  असे सांगून आणखी सुधारणा होणेसाठी तुम्ही लिखाण करा, पुढच्यावर्षी वारी सुरू होण्याआधी मला  आठवण करा,  असेहीते म्हणाले.  करवडी गावात तात्याच्या पुढाकाराने गेल्या महिन्यात जलसंधारण काम झाले, त्याचा परिणाम छान झाला, याची माहिती दिली तेव्हा त्यानी करवडीत आणखी एक करायचे आहे, गोशाळेत बैठकीला हजर रहाव असे सांगून आम्हाला कसलेच श्रेय नको,  पण गावागावांत कामे पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

आज मठाधिपती वैकुंठवासी भगवान मामा कराडकर यांची 7 वी पुण्यतिथी.  त्या निमित्ताने भजन कार्यक्रम आयोजित केला होता. अनेकांनी मामाच्या आठवणीना उजाळा दिला.   पाडुरंग पवार कराड आणि  बाळासाहेब देसाई वाठारयांचेवतीने पुरी कुर्मा गुलाबजाम, जिलेबी, भात जेवण होते . दहा वाजता पंगती पडल्या. तंबू पॅक अप अगोदरच झाले होते.  आकरा वाजता  आम्ही निघालो वाखरी दिशेने. 

आज कडक  ऊन पडले होते.  पंढरी जवळ आली आहे,  त्यामुळे विठ्ठल दर्शन ध्यास घेतलेले वारकरी भर  ऊन्हात चालत होते. वारे जोरात वाहत होते.  रस्ता तापला होता,  वरून ऊन्हाची धग,  तरीही पायात काही न घालता चालणारे वारकरी मी पाहिले. एक तास गेला,  बाजीराव विहीरीच्या  अलिकडे एक नवीन बांधलेले घर दिसले,  रंग दिला नव्हता,  आत गेलो. टॅब चार्ज करायला लावला,  कागद टाकला आणि दिड पर्यंत  आराम केला. पुन्हा चालू लागलो.  बाजीराव विहिरी जवळ रिंगण पहायला खुप गर्दी होती.  या ठिकाणी संत तुकाराम महाराज, सोपान काका, वटेश्वर आदी अनेक पालखी सोहळ्याचे वारकरी एकत्र आले होते. बघेल तिकडे वारकरी,  पताका आणि टाळाचा आवाज.  येथून वाहतुक दुसर्‍या मार्गाने वळवली होती.  अनेक पालखीचे दर्शन घेतले,  चालत पुढे आलो.  तीन वाजता वाखरीत पोहचलो. 

 
पंढरपूरचे प्रवेशद्वार म्हणुन वाखरी ओळखलेजाते. शासन व  पंढरपूर नगरपालिकेने येथे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे तुकाराम महाराज  आणि ज्ञानेश्वर माऊली पालखी  जवळ जवळ मुक्कामी असतात . दोन्ही मोठ्या सोहळ्याचे वारकरी  साडेतीन चार लाख लोकांना चांगली  सुविधा उपलब्ध करून दिली होती. येथे उघड्यावर शौचाला बसायला पुर्ण बंदी आहे.  अनेक युनिट तसेच पाणी नळ आहेत. 

सायंकाळी तंबूसमोर सर्वासोबत फोटो सेशन केले,  आराम केला.  डाॅक्टर जोशी सोबत वारीतील चांगल्या वाईट गोष्टीवर चर्चा केली. परत जीप मध्ये जाऊन बातमी व वारी लिहीत बसलो साडे आठ वाजेपर्यंत. 

दुपारी एक वाजता नेट बंद पडले आहे.  सुरू झाले की लगेच तयार  आहे तुम्हाला माझी वारी पाठवायला.  माऊली 

 

एकंदरीत आजचा दिवस छान गेला. 


     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

१२ जुलै २०१६



🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 12 जुलै 
भंडीशेगाव  सतीश मोरे 

पंढरीची पायी  वारी सुरू होऊन  आज 15 दिवस झाले, वारीचा आता अंतिम टप्प्या आहे.  पंढरी 32 किलोमीटर अंतरावर आहे. विठ्ठल दर्शन तीन दिवसावर आलं आहे. आज 16 किलोमीटर चालायच,  उद्या 8 आणि परवा 6 किलोमीटर,  आली पंढरी. ही चर्चा सुरू  असतानाच काल झोप लागली होती. पहाटे दिड वाजता बापूंनी उठवले.  मी म्हणालो,  अहो दिड वाजले आहेत,  आज जवळचा टप्पा आहे,  झोपा.  सारे पुन्हा झोपले.  अडीच वाजता काही जण जागे झाले,  सर्वाना उठवले.  वळकटी ट्रकात नेऊन ठेवल्या.  ब्रश केला. सारे बाहेर पडलो.  गेली चार दिवस पालखी तळावर भाजपायुमो, प्रशासन, संघाचे कार्यकर्ते  आणि ग्रामस्थ यांनी वारकरी लोकांना शौचालय युनिट  उपलब्ध करून दिले आहेत.  उघड्यावर जाऊ नका,  पालखी तळावर अमुक ठिकाणी युनिट  ठेवले आहेत,  मोफत उपलब्ध आहे,  भरपूर पाणी आहे असे आवाहन स्पिकर वर केले जात होते. गत वर्षीचा अनुभव आणि यंदाचा विचार करता काही प्रमाणात का होईना निर्मल वारीने एक पाऊल पुढे पडले आहे. सकाळी या अतिशय  अत्यावश्यक कामासाठी  केलेल्या सुविधांचा लाभ वारकरी घेत होते,  हा बदल स्वागतार्ह आहे. 

सव्वा तीन वाजता चालायला सुरुवात केली.  नेहमी प्रमाणे खुप गर्दी होती.  पहाटे अंधारात चालताना फक्त पुढे बघायचे, पुढच्याचे चालणे अनुकरण करत पुढे चला,  माऊली, माऊली म्हणा, चालत रहा,  येवढेच करायचे असते. ज्याला पुढे जायचे त्यानी उजव्या बाजूने माऊली माऊली म्हणत जायचे, वाहनाची लाईन त्याच बाजूला  असते,  थोडी रिस्क  असते,  पण काही अडचण येत नाही. वारी हे पुर्व संचित आहे,  असे म्हणतात, आम्ही खरंच नशीबवान आहे,  वारी करायला मिळाली, त्यामुळे  या सर्व  अडचणी,  अडथळे वर मात करत चालत  आहे.  आजपर्यंत कोणतीही अडचण आली नाही.  खुप आनंद लुटत आम्ही चालत राहिलो. 

तोंडले आणि  बोंडले अशी दोन गावे रस्त्याचे विरूद्ध बाजुला  आहेत.  इथेच माऊली पालखी दुपारचा भोजन विसावा असतो,  येथेच तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालखी जवळून जातात.  या ठिकाणी सकाळी सहा वाजता पोहचलो.  खुप कंटाळलो होतो, त्यात बारीक पाऊस झाल्याने रस्ता घसरट झाला होता,  एक माऊली पडली होती.  थोडे थांबायचे ठरवले. 
बोंडले गावातील  एका दुकानासमोर कागद  अंथरले. पडलो.  सात वाजता जागे झाले सारे.  ईपुढारी ओपन केला,  सारे जण माझेजवळ आले.  पाऊस  आणि पुराच्या बातम्या पाहिल्या.  कोयना धरण भरेल यंदा नक्की,  कराड पुलावरून पाणी जाणार. .... हे होणार,  ते  होणार सुरू झाले.  चहा घेऊन पुढे चालू लागलो. 

 
 
 
 
खरं तर  आज आमच्या दिंडीत चकुल्या मेनू होता.  पण त्यासाठी  आकरा वाजेपर्यंत थांबायला लागले असते.  अजून चार तास होते.  सर्व संमतीने पुढे चालत रहायचा निर्णय घेतला.  एक दोन किलोमीटर चाललो,  कडेला कुठे पाणी दिसते काय याचा सारेच शोध घेत होते,  पाणी असायचे पण गर्दी खुप असायची,  किंवा गर्दी कमी होती पण पाणी कमी होते.  पंढरपूर तालुक्याचे या भागात पाणी दुर्भिक्ष होते.  कुठेही पाणी व्यवस्था नव्हती.  ज्याची विहीर आहे,  तिथे खुप कमी पाणी होते.  पुढे सोय होईल , माऊली करतील काहीतरी, असा विश्वास होता,  चालत राहिलो.  चढाला महाराष्ट्र शासन पीडब्लुडी विभागाचे चार टॅकर ओळीत उभे होते.  एकातले पाणी कमी होते,  तर तीन जागी महिलाची स्नान करण्यासाठी गर्दी होती.  चला पुढे म्हणालो,  एव्हाना साडे आठ वाजले होते,  भुकेची जाणीव झाली. पुण्यातील आमदार श्रीमती
माधुरीताई मिसाळ यांच्या वतीने पिठलं भात जेवणाचीसोय केली होती. पळसाच्या पानाच्या  पत्रावळी वर गरमागरम भात पिठलं घेऊन मस्त नाश्ता केला. पोट भरलं.  आमचे काही मित्रांनी  पेठ वडगावच्या माऊली अन्नछत्र मंडळाने तुपातला शिरा पण घेतला. पुढे निघालो. चालत राहिलो.  रस्त्याकडेला आंघोळीसाठी गर्दी दिसली. आता काही झाले तरी तिथे जायचेच,  असे म्हणून उतरलो खाली.  खुप गर्दी होती,  तरीही घुसलो, उंच पाईप लावली होती, बोअर होती.  पाणी कमी जास्त होत होते,  गडबडीत स्नान केले, तयार झालो,  गंध लावला, निघालो.  

बारा वाजता भंडीशेगाव येथे पोहचलो.  कपडे वाळत टाकली.  लिंबाच्या झाडाखाली पडलो . तीन पर्यंत आराम केला. झाडाखालच्या राष्ट्रीय गप्पा मारत बसलो. चार वाजता   आमची वाहने आली,  तंबू उभारणे सुरू झाले. दरम्यान टॅबवर काम केले . मोबाईल बॅटरी  उतरली होती, चार्ज करण्यासाठी बाहेर पडलो.  मोबाईल चार्ज सेंटर वारीत उपलब्ध आहेत.  पुढे पानपट्टी मागे चार्ज सेंटर होते,  सोबत काही  सहकारी पण होते. मोबाईल लावून तिथेच बसायला लागते,  त्यामुळे तिथेच ठाण मांडले. दरम्यान त्याची माहिती घेतली,  टॅबवर वारी सुरू केली.  परत जाताना एका  आवाजाकडे लक्ष वेधले.  

तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत सोलापूर पोलीसाचे किर्तन कलापथक होते.  सहाय्यक फौजदार विठ्ठल माने यांचे ऑन ड्युटी किर्तन झाले.  खुप लोक जमले होते. अतिशय सुंदर विवेचन करताना बायकोवर दादागिरी नको, व्यसने करू नका,गुरू नाही त्याचे जीवन गुरासारखे, पण गुरू करताना काळजी घ्या, असे आवाहन केले. भिंतीवरचा विषारी विंचू  पाल खाते,  तीच अतिविषारी पाल जमीनीवर आली की  कोंबडी खाते मग त्या कोंबडींचे  तगडे ओढून खाणारा माणुस किती विषारी ? असा प्रश्न उपस्थित केला. 7350014801 हा मोबाईल नंबर देताना मी किर्तनकार पोलीस  आहे,  पाकीटमार महाराज नाही, तुमच्या गावात बोलवा , प्रवास खर्च दिला तरी चालेल ,नाही दिला तर  चालेल,  असे सांगून वाढदिवस,  पुण्यतिथी दिनी एक झाड लावा , असे आवाहन त्यांनी केले. पोलीस काॅन्स्टेबल रमेश ठोंबरे ,रविकिरण माने,सुरेश कांबळे ,रमेश सुरनर यांनी त्यांना साथ दिली. 

सात वाजता पालखी  आली. आज पुन्हा समाज आरती अनुभवली.  
उद्या पुढारीत समाज  आरती  याविषयी वाचा. 

आरती नंतर तळावर सेना कराड तालुका प्रमुख माझे गाववाले  विनायक भोसले आणि नितिश जाधव नाना सैदापूरकर यांची भेट झाली. सोबत प्रमोद खंडागळे  आणि अमित पवार होते.   दुपारी फोन करून त्यानी कळवले होते.  तळावर फोन लागत नाही,  पण फोन लावायला काढला आणि विनायक समोर!  दोघांना भेटून खुप आनंद झाला.  त्याना आमच्या तंबूत नेले, सर्व दाखवले.  गप्पा मारल्या. जाधव यांनी माझी वारी रोज वाचतो असे मला  आवर्जून सांगितले. आज बंडा तात्याचा मुक्काम इथेच होता. आठ वाजता तात्या जेवताना दिसले ,पुन्हा जाऊन भेटू म्हटले तर सव्वा नऊ वाजता ते एका छोट्या झाडाच्या बुंध्याला झोपले होते. खरंच तात्या फार मोठी विभुती आहेत, वारीत पदोपदी याचा अनुभव आला. 

नऊ वाजता जेवलो. आजची वारी पूर्ण केली. 
दिवसभर खुप आनंद मिळाला. 


     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...