फॉलोअर

१६ मे २०२४

कांचीपुरम मी निशब्द...पृथ्वी वरील मंदीराची शंभर नंबरी राजधानी..!



कांचीपुरम मी निशब्द...
पृथ्वी वरील मंदीराची शंभर नंबरी राजधानी..!

महाबलीपुरम येथील दिव्य आणि भव्य मंदिराचे सौंदर्य डोळ्यात साठवून आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. साडेदहाच्या दरम्यान महाबली परम येथील रूम सोडली आणि आम्ही बस स्टॅन्ड वर आलो. येथून कांचीपुरमचे  अंतर केवळ 60 किलोमीटर होतं. हा प्रवास आम्ही तामिळनाडूच्या खाजगी बस म्हणून करायचा ठरवले. बस मध्ये बसलो तर 60 किलोमीटर साठी फक्त 25 रुपये तिकीट होतं. रमत गमात किनारपट्टीवरून निवांत आमचा प्रवास सुरू झाला. या बस मध्ये मोठ्या आवाजात तमिळ गाणी लावली होती. गाण्याचा अर्थ कळत नव्हता मात्र आवाज सुंदर होता संगीत तर अतिशय ठेका लावणारे होते. तो आनंद खरंच वेगळा होता. पूर्ण बसमध्ये  खचाखच गर्दी होती. आम्हाला जागा मिळाली होती. मात्र गाणी ऐकत, शेजारच्या लोकांशी संवाद साधत आमचा प्रवास कधी संपला हेच आम्हाला कळलं नाही. दुपारी दोन वाजता आम्ही कांचीपुरम येथील हॉटेलमध्ये पोहोचलो.आम्ही जेव्हा येथे आलो तेव्हा येथे पाऊस सुरू होता, संपूर्ण पावसाळी वातावरण होते. पाचच्या दरम्यान आम्ही लोकल एक रिक्षा बुक केली आणि कांचीपुरम सिटी पाहायला सुरुवात केली. 


हजारो मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर, कांचीपुरम.  हे शहर मंदिर वास्तुकला, 1000-स्तंभांचे हॉल, विशाल मंदिराचे मनोरे आणि रेशमी साड्यांसाठी ओळखले जाते. कांचीपुरम हे भारतातील सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून काम करते. कांचीपुरम हे परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. हे शहर कांचीपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. 

सहाव्या शतकाच्या शेवटी सिंहरिष्यम राजानं कांचीपुरम इथं आपली राजधानी स्थापन केली. या राजाने कृष्णा ते कावेरीपर्यंतचा मुलूख काबीज करून आपल्या राज्याची व्याप्ती वाढवली. पुरु महेंद्रवर्मा हा मोठा प्रसिद्ध मंदिरनिर्माता होता. त्यानी महाबलीपुरम इथं मोठमोठ्या एकसंध पाषाणांतून देव खोदून काढण्याचं काम करून घेतल . त्यानंच 'गविलासप्रहसन नावाचं संस्कृत प्रहसन लिहिलं. संस्कृत भाषेत आज अस्तित्वात असल पहिले प्रहसन !

दुसरा नरसिंहवां यानं कांचीपुरममध्ये कैलासनाथ राजसिंहवर नामक शिवालय बांधलं. नगरेषु कांची' या शब्दात साक्षात् कविकुलगुरू कालिदासानं ज्या कांचीपुरमनगरीचं वर्णन केलं आहे, ते कांचीपुरम अगदी आजही तिथल्या मंदिरांसाठी आणि हातमागावर विफलेल्या झोकदार जरी-पदराच्या कांचीपुरम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. अगदी आजही या शहरात अक्षरण पावलागणिक एक मंदिर आहे. आज कांचीपुरम कामाक्षीदेवीच्या मंदिरासाठी ओळखले असले तरी कांचीपुरममध्ये शिवाची  आणि देवीची हजारभर तरी लहान- मोठी मंदिरं असतील. त्यातले सगळ्यात पुरातन मंदिर म्हणाजे 'कैलासनायार कोविल' किंवा कैलासनाथाचं मंदिर.

कांचीपुरम हे शहर पाहताना माझ्या मनात अनेक विषय येत होते. खरंच पृथ्वीवरचा आजपर्यंत मी पाहिलेला मंदीराचा स्वर्ग कुठे असेल तर कांचीपुरम येथे असेल. आयुष्यात पहिल्यांदाच इतकी भव्य आणि दिव्य मंदिरे पाहिली. 100 ते 1000 मंडपाचे खांब असणारे दगडी बांधकाम, अप्रतिम कलाकृती, जिकडे पाहील तिकडे फक्त सौंदर्य.. सौंदर्य आणि कल्पकता. कांचीपुरमचे वर्णन खरंच शब्दात करणे अवघड आहे.  आजपर्यंत मी पंढरपुरात अनेक मंदिरे पाहिली होती मात्र कांचीपुरम येथील भव्य दिव्य मंदिरे पाहिल्यानंतर मंदिरे कशी असावी आणि कुठे असावीत याचे उत्तर फक्त कांचीपुरम एवढंच येतं.

 एक नव्हे दोन नव्हे तर पंधरा गुंठे, वीस गुंठे, 30 गुंठे, दोन एकर तीन एकरात वसलेली ही मंदिरे खरंच उत्तम कलाकारीचा नमुना आहेत. दुरुन मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजेच आपल्याला ते मंदिर वाटते. दक्षिणेमधील मंदिराची हीच खासियत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे मंदिरासारखे वाटते की जे पन्नास ते सत्तर फुटाचे उंचीचे असते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली 700 ते 800 दशकातील ही मंदिरे डोळ्याचे पारणे फेटतात. कांचीपुरम येथील शिवमंदिर पाहिले, कामाक्षी मंदिर पाहिले, बालाजी मंदिर पाहिले आणि चित्रगुप्ता चे मंदिर पाहिले. वेळेअभावी आणखी चार-पाच अशी दहा बारा मंदिरे पाहिली. या मंदिराविषयी काय बोलावे हेच कळत नाही. अतिशय विस्तीर्ण ठिकाणी, पवित्रता राखून ही मंदिरे जपली आहेत. मंदिरात कुठेही अस्वच्छता दिसत नाही, कचरा नाही. देवाचे दर्शन लांबून घ्यायचे, दर्शनासाठी कोणतीही फी नाही, ओळीने दर्शन घ्यायचे,अशी ही मंदिरे तात्कालीन राजाने बांधलेली आहेत. मंदिराचे कळस आणि मंदिराचे भव्य सभा मंडप बघतच राहावे लागतात. 

आपल्या महाराष्ट्रातील मंदिरे प्रवेश केला की  दोन मिनिटात संपतात. मात्र या मंदिरात प्रवेश केल्यापासून दहा फूट, वीस फूट नव्हे शंभर फूट, दोनशे फूट ते तीनशे फुटापर्यंत फक्त सभा मंडपच आहेत. सभा मंडप पार करून पुढे गेल्यानंतर मग मुख्य गाभारा लागतो. कांचीपुरम मध्ये 1000 दगडी खांब असलेले एक कैलासनाथ मंदिर आहे. हे मंदिर पहायला दोन ते तीन तास लागतील. सर्व मंदिराच्या परिसरात पाण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे,मोठे तलाव बांधण्यात आलेले आहेत, ही दुरदृष्टी निर्मात्याने ठेवलेली आहे.. मंदिराच्या आसपास कुठेही तुम्हाला राहण्याची सोय पाहायला मिळणार नाही. पावित्र्य राखण्यासाठी राहण्याची सुविधा मंदिराच्या बाहेरच करण्यात आलेली आहे. मंदिराचे पुजारी स्वयं पुर्ण आहेत.

कांचीपुरम हा पृथ्वीवरील स्वर्ग म्हणावे लागेल. मी स्वतः केवळ दहा बारा मंदिरे पाहिली मात्र कांचीपुरम मध्ये शंभरहून अधिक मंदिरे आहेत आणि ही सर्व मंदिरे 200 ते 700 वर्षांपूर्वीची आहेत. मंदिरे पाहताना मन एकदम शांत होतेच, पोटही भरतं .येथील पावित्र्य आणि समर्पण पाहिल्यानंतर मंदिरे असावीत तर कांचीपुरम सारखीच असावेत असे वाटले. शंकराचार्यांना अतिशय प्रिय असणारे कांचीपुरम पाहायचे असेल तर वेळ काढायला हवा.

एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधलेली भव्य दिव्य मंदिरे, विराट रुप पाहून खरंच मी हँग झालो. सर्वात आनंदमय मंदिर वाटले ते बालाजी मंदिर. आपण सर्वत्र एक मजली मंदिर पाहिले असेल परंतु कांचीपुरम येथील बालाजी मंदिर तीन मजली आहे. या मंदिरात  चढून जाताना अतिशय सुंदर असे बांधकाम केलेले आहे. पायऱ्यावरून वर चढत जाताना कसलाही त्रास होत नाही. तिसऱ्या मजल्यावर तिरुपतीच्या बालाजी इतकं सुंदर असे येथील बालाजी मंदिराचे दर्शन होते. या मंदिरात गेल्यानंतर दहा फुटी मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटते. कांचीपुरम येथील प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. येथील शंकराचे भव्य मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच कामाक्षी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी मंदिर पाहायला तर अर्धा तास लागतो. देशातील चित्रगुप्ताचे एकमेव मंदिर कांचीपुरम येथे आहे. चित्रगुप्त आपल्या पाप पुण्याचा इतिहास लिहितात असे म्हटले जा.ते या मंदिरात जाऊन चित्रगुप्तांना पाहण्याचे परम भाग्य आपल्याच लाभू शकते.

शब्द मर्यादा...

सतीश वसंतराव मोरे सतिताभ 
9881191302

उद्या वेल्लूर शहर आणि मराठ्यांनी जिंकलेला वेल्लोर किल्ला

१५ मे २०२४

महाबलीपूरम...मम्मलपूरम. ...अद्भुत, अमोघ, अद्वितीय, अमाप..दगडामध्ये कोरलेली मंदिरे...!



महाबलीपूरम...मम्मलपूरम. ...
अद्भुत, अमोघ, अद्वितीय, अमाप..
दगडामध्ये कोरलेली मंदिरे...!

दीड दिवसाचा पाॅन्डेचरी येथील मुक्काम आटोपून पुढील प्रवासाला निघालो. आमचा पुढचं डेस्टिनेशन होतं महाबलीपुरम. पांडेचरी ते चेन्नई यादरम्यान महाबलीपुरम हे प्राचीन नगर वसलेले आहे. निवन बस बुक केली, एसी बस मधून अडीच तासात महाबलीपुरम येथे पोहोचलो. बसचा प्रवास अतिशय सुखद होता. संपूर्ण किनारपट्टीवरून पांडिचेरी टू चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. दुपारी तीनच्या दरम्यान आम्ही महाबलीपुरमला पोहोचलो. रामकृष्ण हॉटेल येथे रूम बुक केलेली होती. भर दुपारी उन्हाचा तडाका फार होता. त्यामुळे रूमवर जाऊन दोन तास विश्रांती घेतली.

इंटरनेटवर माहिती घेतले असता महाबलीपूरम  संरक्षित स्मारक आणि मंदिर सहा वाजता बंद होते असे कळल्यानंतर आज ऐवजी उद्या सकाळी जायचे ठरवले. मग सायंकाळी सत्रात करायचे काय असा विचार करून हॉटेल मॅनेजरला विचारले. त्यांनी हॉटेलच्या शेजारीच भव्य बीच असल्याचे सांगितले. मग काय सहाच्या दरम्यान बीचवर गेलो. अतिशय सुंदर लोभक वातावरण होते. मद्रास, पांडिचेरी किंवा कन्याकुमारीचा समुद्र यापूर्वी पाहिलेला आहे. आज महाबलीपुरम येथील समुद्र पाहत होतो. या समुद्राचा बाबत एक वेगळं सांगावं लागेल ते म्हणजे या समुद्रकिनारावर भव्य असे दगड आहेत, भव्य असे पाषाण आहेत, जे आपल्या कोकणात पाहायला मिळत नाहीत किंवा कमी पाहायला मिळतात. महाबलीपुरम येथील समुद्र किनारा अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. या किनाऱ्यावर दगडावर जाऊन खडकावर जाऊन फोटो काढले, वाळूमध्ये चाललो. सायंकाळी समुद्र काठावरच असलेल्या एका सुंदर हॉटेलमध्ये जेवण केले. या हॉटेलमध्ये पुण्यामधील ध्रुव नावाचा एक मुलगा भेटला, जो या ठिकाणी मॅनेजर चे काम करत होता. एवढ्या दूर भागात मराठी बोलणारा माणूस दोन-तीन दिवसानंतर भेटल्यामुळे खूप आनंद झाला. त्याच्याशी गप्पा मारल्या परत रूमवर आलो आणि लवकर झोपी गेलो.

आज मंगळवार सकाळी लवकर महाबलीपूरम येथील मंदिर पहायला जायचं होतं. पहाटे पाचला उठलो आणि सहा वाजता तयार झालो. हॉटेलच्या बाहेरच आल्यानंतर एक रिक्षावाला भेटला त्यांनी संपूर्ण ठिकाणी पाहण्यासाठी सातशे रुपये घेतो असे सांगितले, आम्ही सहाशे रुपये व्यवहार ठरवला आणि महाबलीपुरम येथील संरक्षित स्मारक मंदिराकडे गेलो. सकाळी सव्वा सहा वाजताची वेळ होती. सूर्य अजून उगवला नव्हता मात्र तरीही पावसाळी वातावरण निर्माण झालं असल्यामुळे आद्रता खूप वाढली होती. आम्ही तिथे पोचलो होतो.

ममल्लापुरम महाबलीपुरम म्हणूनही ओळखले जाते. हे आग्नेय भारतातील तमिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू जिल्ह्यातील एक शहर आहे , जे महाबलीपुरम येथील 7व्या आणि 8व्या शतकातील हिंदू स्मारकांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी प्रसिद्ध आहे . हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाचे प्राचीन नाव थिरुकादलमल्लई आहे. 

ममल्लापुरम हे पल्लव साम्राज्यातील दोन प्रमुख बंदर शहरांपैकी एक होते . या शहराचे नाव पल्लव राजा नरसिंहवर्मन  याच्या नावावरून ठेवण्यात आले होते , ज्यांना ममल्ला म्हणूनही ओळखले जात असे. आर्थिक समृद्धीबरोबरच, हे शाही स्मारकांच्या समूहाचे ठिकाण बनले, अनेक जिवंत खडकातून कोरलेले. हे 7व्या आणि 8व्या शतकातील आहेत: रथ (रथांच्या रूपातील मंदिरे), मंडप (गुहा अभयारण्य), गंगेच्या अवतरणाला आराम देणारा विशाल मोकळा खडक आणि शिवाला समर्पित किनारा मंदिर .तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई. याच चेन्नईपासून सुमारे 55 कि.मी. अंतरावर आहे सुप्रसिद्ध महाबलीपूरम् मंदिर. पूर्वी याच मंदिराच्या आवाराला माम्मलापुराम असे नाव होते. काळाच्या ओघात त्या नावाचा अपभ्रंश होत गेला आणि महाबलीपूरम् रूढ झाले. अर्थात महाबलीपूरम् हे निव्वळ एक मंदिर नसून हे आवार आहे.यात 100 हून अधिक वेगवेगळी मंदिरे आहेत, असे मानले जाते. तमिळनाडूमधील अनेक भव्य आवारांपैकी हे एक प्राचीन स्थान मानले जाते. सागर तटावर हे मूळ मंदिर बांधलेले आहे.
 
सातव्या शतकामध्ये ही पल्लव राजाची राजधानी होती. द्रविड वास्तुकलेच्या दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचे स्थापत्यशास्त्र अग्रणी स्थानावर होते. समुद्र तटावरील या मंदिरामध्ये अनेक शिवमूर्ती आणि लहान लहान मंदिरे दिसून येतात.
 
पुरातन काळात शिवसंकल्पनेमागे काय विचार होते, ते कसे विस्तारित केले गेले हे या मंदिराच्या शिल्पकलेतून आपणास अभ्यासता येऊ शकते. ‘चित्रभाषा’ हे या आवाराचे वैशिष्टय़ आहे. म्हणजेच मंदिराचा इतिहास लिखित स्वरूपात न कोरता आकृत्याच त्या गोष्टीरूपात मांडलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही भाषेची गरज न भासता कोणीही या मंदिराचा इतिहास समजून घेऊ शकतो. भारतातील प्राचीनपैकी खूप कमी मंदिरांबाबत हा असा विचार झाला आहे.
 
येथील लोकप्रिय रथ मंदिराच्या दक्षिणेला स्थित आहे. महाभारतातील पाच पांडवांच्या नावाने त्याला पांडव रथ म्हणतात. महाबलीपूरममधील प्रवेशाकडील भागातील दगडाच भव्य शिला फोडून कृष्ण मंडप उभारला गेला आहे.
या मंडपाच्या प्रवेशद्वारावर तेथील ग्रामीण जीवनावर आधारित कथा कोरलेल्या आहेत.भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलल्याचा प्रसंग तर अप्रतिम म्हणावासा चित्रबद्ध केला गेला आहे.
 
मंदिरावरील कोरीव काम हे अतीव कोरीव असे आता राहिलेले नाही. कारण इतक्या शतकानंतर वातावरणाचा परिणाम कलाकृतींवर झालेला आहे. तरीही साधेपणा आणि सौंदर्य यांचा उत्तम मिलाफ या सर्व मंदिरांमध्ये दिसून येतो. या मंदिराभोवती अनेक भव्य पिवळसर रंगाच्या  शिळा आहेत. या दगडाचे वैशिष्टय़ म्हणजे कितीही उन्हाचा मारा असला तरी हा दगड विशेष तापत नाही. वराह येथील गुहा प्रसिद्ध आहेत .या गुहा इतिहास अभ्यासकांतही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहेत.

सुरुवातीला आम्ही एका ठिकाणी गेल्यानंतर  आश्चर्यचकित झालो. मगाशी चांगल्या प्रमाणे महाबलीपुरम येथे भव्य , दणकट, विशाल पाषाण खूप आहेत. अशाच पाषाणावर कोरलेली पाच मंदिरे आम्हाला पाहायला मिळाली .खरंतर याला पांडवरथ असे म्हटले जाते. उंच पाषाणात खालून कामकाज करून टप्प्याटप्प्याने वर जात कोरलेली ही पाच मंदिरे पाहून डोळ्याचे पारणे फिटले. युधिष्ठिर रथ, भीम रथ अर्जुन रथ, नकुल आणि सहदेव रथ असे पाच मंदिर आणि त्यासमोर दगडामध्ये कोरलेला उंच हत्ती असे हे भव्य चित्र होते. त्यानंतर आम्ही लगेच पुढे गेलो. श्रीकृष्ण मंडपम आणि अर्जुन मंडप जवळ भव्य अशा शिळेवर कोरलेला हा मंडप, हे मंदिर पाहून कलाकाराने हे कसं काढलं असेल याचं कोडं खरं सुटत नाही. श्रीकृष्ण मंडपामध्ये रासलीला गोपाळकाला असे अनेक प्रसंग मांडलेले आहेत. त्या शेजारीच अर्जुन मंडप आहे. अर्जुनाने केलेला पश्चाताप असे या चित्राचे वर्णन केले जाते. भव्य शिळेवर कोरलेले  प्रसंग आपल्याला महाभारताची आठवण करून देतात. या दोन्ही मंडपाच्या शेजारी भव्य असा एक दगड आहे. खरं तर हा दगड काम सुरू असताना निखळून आलेला असावा असे वाटते. मात्र स्थानिक लोकांनी याला श्रीकृष्णाचा लाडू असं नाव दिले आहे. या दगडा शेजारी फोटो काढण्यासाठी लोक खूप गर्दी करतात.पुढे पाषाणात कोरलेलं महाकाली आणि शिवाचं भव्य मंदिर आहे, हेही मंदिर खूप उंचावर आहे. सुमारे पन्नास फुटाचे हे मंदिर कसे कोरले असेल याचे कोडे समजत नाही. या मंदिराशेजारी एक दीपस्तंभ उभा करण्यात आलेला आहे मात्र तो अलीकडच्या काळातील आहेत.

समुद्र काठावर आणखीन तीन मंदिर आहेत. या मंदिरासमोर भव्य असे गार्डन तयार करण्यात आले आहे. मंदिराचा फेरफटका करताना समुद्राचे दर्शन होते.  ही तीन मंदिरे पाहून आम्ही मुख्य चौकातील नारायण मंदिरात आलो. या मंदिराचेही काम खूप प्राचीन आहे हे मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात नसले तरी  मंदिर खूप जुनं आहे. या ठिकाणी निद्रा करत असलेले विष्णू भगवान आणि त्यासमोर प्रभू रामचंद्र सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे. दक्षिणेतील मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे तिथे देवाच्या सजावटीसाठी फार मोठी तयारी केली जाते. यासाठी असलेले सर्व साहित्य पाहिल्यानंतर हे लक्षात येते.

सकाळी सहा ते नऊ असे तीन तास आम्ही हा मंदिराचा परिसर फिरत होतो, अक्षरक्ष घामाची आंघोळ झाली होती. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली होती. तरीही आम्हाला पाहायला तीन तास लागले. खरं तर या परिसरात ही सर्व मंदिरे पाहण्यासाठी पूर्ण दिवसही पुरणार नाही. मात्र त्यासाठी हिवाळा ऋतू योग्य आहे. अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी महाबलीपुरम येथील ही दगडी पाषाणात कोरलेले मंदिरे एक गुढ आहेत. दगडात कोरलेली ही मंदिरे पाहून मन तृप्त झाल्यानंतर आम्ही दहा वाजता पुन्हा हॉटेलवर आलो आणि विश्रांती केली घेतली. बारानंतर आम्हाला कांचीपुरमकडे जायचे होते.

*उद्या वाचा कांचीपुरम*..

*सतीश वसंतराव मोरे* __ 
सतिताभ 9881191302.

१३ मे २०२४

पान्डेचरी.... 32 वर्षांनंतर



32 वर्षांनंतर पुन्हा एकदा पाॅडेंचरी... पुद्दुचेरी...!


सद्घागुरू गाडगे महाराज कॉलेजच्या सहलीमधून 1992 साली मैसूर बेंगलोर पांडेचेरीला गेलो होतो. त्यावेळेला आमचे हेड होते प्राध्यापक जाधव सर जाधव सर. सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व भागातील बॉटनिकल गार्डन पाहिल्या होत्या. जाधव सरांनी पॉंडिचेरी शहर दाखवताना ज्या पद्धतीने वर्णन केले होते ते वर्णन आजही डोळ्यासमोर आहे. 1992 साली पांडेचेरी ठिकाण पाहताना जे उत्सुकता होती तीच उत्सुकता आजही आहे. आज 32 वर्षानंतर या शहराला देताना त्या सर्व आठवणी पुन्हा जागी झाल्या.


पॉंडिचेरी ला जायचं म्हटल्यानंतर कसं जायचं असा प्रश्न पडला आणि नेटवर सर्च केलं तर कराड वरून थेट पांडेचेरीला रेल्वे आहे, हे कळल्यानंतर खूप आनंद झाला. शनिवारी पहाटे पाच वाजता कराड रेल्वे स्थानकावर पोहोचलो, माझे मित्र किशोर पाटील सर आणि मुले आम्हाला सोडायला आली होती. दुसऱ्या दिवसी सकाळी साडेसात वाजता पांडेचरीमध्ये 26 तासानंतर पोचलो. माझ्यासोबत माझा मित्र अनिल चव्हाण आहे. आम्ही दोघांनी ट्रेनमध्ये नवीन ओळखी केल्या. ट्रेनमध्ये विटा भागातील सोन्या-चांदीचा व्यवसाय करणारे काही लोक भेटले. सकाळी सात वाजता आम्ही पोचल्यानंतर रिमझिम पावसाने आमचे स्वागत केले. शहरातच मध्यभागी हॉटेल निवडले. दहा वाजता शहर फिरायला बाहेर पडलो. संपूर्ण शहराचा सर्व भाग टू व्हीलर वरून पाहिला. शहराचे मुख्य आकर्षण आणि केंद्र असलेल्या योगी अरविंद घोष यांच्या आश्रमाला भेट दिली. आश्रमामध्ये जाऊन समाधीस्थळी अभिवादन केले. आश्रमाचा हा परिसर फ्रेंच कॉलनी म्हणून सुद्धा ओळखला जातो. या परिसरात फ्रेंच लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. फ्रेंच राजदूत या ठिकाणी राहतात. पांडेचरी आणि फ्रेंचचा फार मोठा संबंध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फ्रेंच लोकांनी पांडेचरी सह परिसरावर राज्य केले होते. फ्रेंच लोक या ठिकाणी व्यापारासाठी आलेले होते. भारतावर इंग्रजांची सत्ता आल्यानंतर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेल्या व्यापार करारानुसार फ्रेंच लोक त्या ठिकाणीच राहिले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा संपूर्ण परिसर भारताच्या ताब्यात आला. मात्र त्या ठिकाणची असणारी सामाजिक परिस्थितीचा विचार करून हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आला. आज जेव्हा या भागाला भेट दिली तेव्हा फ्रेंच लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे बसवलेली वसाहत पाहून एवढ्या जुन्या काळातील त्यांच्याकडे किती मोठे वास्तू कौशल्य होतं याची जाणीव झाली. या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असतो. फ्रेंच राजदूताच्या भव्य बंगल्यासमोर We Support Ukraine  नावाचा एक बोर्ड पाहायला मिळाला. समुद्रकिनारी वसलेल्या पांडेचरी समुद्र काठावर वाॅर मेमोरियल आहे. समुद्रकिनाऱ्या लगत महात्मा गांधी यांचा भव्य पुतळा आहे. पांडेचेरी महापालिकेची अतिशय सुंदर अशी भव्य गार्डनही या ठिकाणी आहे. या सर्व ठिकाणी जाऊन आलो.


 दुपारी आम्ही पाॅन्डेचरी  येथील भव्य बोटॅनिकल गार्डनला भेट द्यायला गेलो. मात्र दुरुस्तीच्या कामासाठी सप्टेंबर अखेर ही गार्डन बंद असल्याचा बोर्ड बाहेर लावला होता. त्यामुळे थोडी निराशा झाली. या बोटॅनिकल गार्डनमध्ये १९९३ साली आम्ही फिरलो होतो, प्लांट कलेक्शन केले होते, तेथील झाडांची माहिती घेतली होती. प्रत्येक झाडालाही एक नाव असते हे नाव या झाडावर लावलेले होते, यांचा अभ्यास केला होता. आम्ही बॉटनीचे विद्यार्थी या गार्डनला भेट देऊन आम्हाला खूप शिकायला मिळाले होते. मात्र आज ही गार्डन बंद असल्यामुळे तसेच बाहेर आलो. गार्डनच्या बाहेर फोटो काढले आणि आरोविल्ली या गावाकडे जायला निघालो. हे ठिकाण फाउंडेशन पासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे गाव तामिळनाडू राज्यामध्ये येते. 

ऑरोविल हे भारतातील एक शहर आहे. ही एक आहे प्रायोगिक वैश्विक नगरी आहे. ही नगरी विल्लुपुरम जिल्हा, तामिळनाडू येथे आहे. भारतातील पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या जवळ ही नगरी आहे.

ऑरोविलची स्थापना आणि हेतू

श्रीमाताजींच्या ऊर्फ मीरा अल्फान्सा यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने ऑरोविल या आंतरराष्ट्रीय नगरीची स्थापना करण्यात आली. दि. ०२८ फेब्रुवारी १९६८ रोजी, तामिळनाडूच्या दक्षिणेस पाँडिचेरीच्या उत्तरेस, युनेस्को समर्थित हा आंतरराष्ट्रीय समुदाय स्थापन करण्यात आला. मानवी एकता साध्य करणे हे या आंतरराष्ट्रीय नगरीचे ध्येय आहे. इ.स.१९६० मध्ये श्रीमाताजीनी ऑरोविल या प्रायोगिक नगरीची संकल्पना भारताच्या सरकारपुढे मांडली आणि त्यांच्या पाठिंब्याने ती युनेस्कोमध्ये मांडण्यात आली. इ.स.१९६८ मध्ये मानवतेच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून युनेस्कोने त्यास एकमताने मान्यता दिली.

ऑरोविलच्या स्थापना-दिनी श्रीमाताजींनी फ्रेंच भाषेत भाषण दिले होते आणि ते ऑल इंडिया रेडिओ वरून थेट प्रसारित करण्यात आले होते. श्रीमाताजींनी दिलेल्या संदेशात ऑरोविलचा हेतू स्पष्ट केला तो असा - ऑरोविल ही एक अशी वैश्विक नगरी बनू इच्छिते की, जेथे पंथातीत होऊन, सर्व राष्ट्रीयता व सर्व प्रकारच्या राजकारणाच्या अतीत होऊन, सर्व देशांमधील स्त्रीपुरुष, शांती व प्रगतशील सुसंवादाने जीवन व्यतीत करू शकतील. मानवी एकता प्रत्यक्षात उतरविणे हा ऑरोविलचा हेतू आहे.

ऑरोविलच्या केंद्रस्थानी मातृमंदिर आहे. दि.२१ फेब्रुवारी १९७१ रोजी या मातृमंदिराचा शिलान्यास समारंभ संपन्न झाला. श्रीअरविंद आश्रमाच्या श्रीमाताजींनी स्थापन केलेल्या ऑरोविलच्या मध्यभागी, मातृमंदिर आहे. पूर्णयोगाच्या अभ्यासकांसाठी आध्यात्मिक महत्त्व असलेली ही इमारत आहे. याला 'ऑरोविलचा आत्मा' (सोल ऑफ द सिटी ) ( फ्रेंच : L'âme de la ville ) असे म्हणतात.
‘मातृमंदिर’ हे केवळ एखादे प्रेक्षणीय पर्यटनस्थळ नाही. तर ते व्यक्तीला शांतचित्ताने एकाग्रता करता यावी यासाठी निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. व्यक्तीने मनाच्या शांत, समचित्त अवस्थेत तेथे प्रवेश करणे अपेक्षित आहे.

मातृमंदिराच्या पायथ्याच्या सभोवती बारा भुयारी कक्ष आहेत. या प्रत्येक कक्षाची रचना भिन्न आहे. येथे बसून ध्यान करण्याची सोय आहे. या कक्षांना पुढीलप्रमाणे नावे देण्यात आली आहेत. - मन:पूर्वकता, विनम्रता, कृतज्ञता, चिकाटी, अभीप्सा, ग्रहणशीलता, प्रगती, धैर्य, चांगुलपणा, औदार्य, समत्व (समभाव), शांती.मातृमंदिराच्या सभोवती १२ उद्याने आहेत. त्या उद्यानांचा अर्थ - सत्‌, चित्‌, आनंद, प्रकाश, जीवन, शक्ती, ऐश्वर्य, उपयोगिता, प्रगती, तारुण्य, सुसंवाद, परिपूर्णत्व.

गोल डोम आकाराच्या मातृमंदिराला भेट दिल्यानंतर अध्यात्मिक शांतता तर मिळालीच मात्र अतिशय प्रयत्नपूर्वक जपलेला हा परिसर पाहिल्यानंतर भारतातही अशा ठिकाणची मंदिरे उभे राहू शकतात याचा अभिमान वाटला. सायंकाळी उशिरा पान्डेचरीला पोहोचल्यानंतर पुन्हा दोन बीच पाहिले. हे बीच म्हणजे परिसरातील लोकांसाठी पिकनिक पॉईंट आहेत. शहरातील बाजारपेठ भाजी मंडई या ठिकाणी भेटी दिल्या. 

उन्हाचा तडाका खूप होता. दिवसभर शहरातून फिरताना काही गोष्टी लक्षात आल्या त्या म्हणजे येथील लोक फार कष्टाळू आहेत. रविवार हा पांडेचरीच्या बाजारचा दिवस असल्यामुळे भाजी मंडईत गेल्यानंतर विविध तर्हेचे लोक पाहायला मिळाले. आणखीन एक गोष्ट पाहिला मिळाली ती म्हणजे पॉंडेचरी येथील सर्व सिग्नलवर उन्हाचा तडाका बसू नये म्हणून पॉंडिचेरी पीडब्ल्यूडी खात्याने नेट शेड उभे केलेले आहेत. आम्हालाही याचा खूप चांगला फायदा झाला.  ३२ वर्षांनंतर जुळून आलेला हा योग आणि ही सहल नक्की स्मरणात राहील.

सतीश वसंतराव मोरे सतिताभ 
9881191302

अपुर्ण...

उद्या महाबलीपुरम..

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...