उद्दिष्ट 'हट्टी' राजकारणी.. मनोहर शिंदे
मनोहर भास्करराव शिंदे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मलकापूर. मनोहर शिंदे आणि मलकापूर यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की या दोन्ही नावांना एक वलय प्राप्त झालं आहे. या नात्यासोबत आणखीन एक नातं आहे ते म्हणजे मलकापूरची 24 बाय 7 योजना. मलकापूरच्या विकासासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचेच खरं करणाऱ्या 'हट्टी मनोहर शिंदे भाऊ' यांचा आज 9 जानेवारी रोजी वाढदिवस.... त्यानिमित्ताने...
मलकापूर सारख्या छोट्या गावातील एक युवा कार्यकर्ता ते प्रगल्भ राजकारणी असा मनोहर शिंदे यांचा प्रवास मी गेल्या तेवीस वर्षांपासून पाहत आहे. माजी आमदार भास्करराव शिंदे यांचा मुलगा, केवळ अशी ओळख असणारे मनोहर शिंदे ज्यावेळी काहीच नव्हते तेव्हापासून मनोहर शिंदे यांना मी पाहत आलो आहे. आता 'मनोहर शिंदे भाऊ' या नावाचा ब्रँड तयार झाला आहे. पण हा प्रवास छोटा नाही, सोपा तर अजिबातच नाही. या प्रवासात मनोहर शिंदे यांना जे यश,कीर्ती आणि नाव मिळालं आहे याची माझ्या अभ्यासातून किंवा माझ्या मते केवळ दोन कारणे आहेत. ती म्हणजे पक्षनिष्ठा आणि माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर असणारे अढळ प्रेम.
सुरूवातीला मलकापूर ग्रामपंचायत होती,आता मलकापूर नगरपालिका झाली आहे .यामध्ये मलकापूर नगरपंचायत नावाचा एक टप्पा येऊन गेला. हा टप्पा फार महत्त्वाचा होता. ग्रामपंचायतीची मलकापूर नगरपंचायत करणे हे म्हणजे अंगावर अनेक शत्रू ओढवून घेण्यासारखे होते. कर वाढणार, शासनाचे नियम वाढणार, घरपट्टी वाढणार, पाणीपट्टी वाढणार अशा काही गोष्टी नकोशा असणारे सामान्य नागरिक आणि त्यांना चिथावणी देणारे राजकीय नेते यामुळे शक्यतो कोणी नगरपंचायत करायच्या नादाला लागत नाही. मनोहर शिंदे यांनी हे अग्निदिव्य स्वीकारले आणि खा. पृथ्वीराज बाबा यांच्या पाठीमागे लागून तात्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून मलकापूरची नगरपंचायत करून आणली. नगरपंचायत झाल्यामुळे मिळणारा भरघोस विकास निधी आणि त्यामुळे गावाचा होऊ शकणारा विकास याची जाण शिंदे यांच्याकडे होती. सुदैवाने मनोहर शिंदे यांच्याकडे मलकापूरची सत्ता आल्यानंतर राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला.आणखी दुधात साखर पडली, 2010 साली पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. मग मलकापूरला भरभरून विकासाची गंगाच होऊ लागली. विकासकामं ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, एक विकास केला की दुसरी विकासाची कामे पुढे उभी असतात. त्यामुळे कमी जास्त होत असलं तरी मलकापूरमध्ये एके काळी काहीच नव्हतं मात्र ते सगळे आणण्यासाठी मनोहर शिंदे यांनी केलेली धडपड,केलेले प्रयत्न मी स्वतः पाहिलेले आहेत. कराड शहरालगत मोठ्या वेगाने विकसित होत असलेले मलकापूर शहर म्हणजे नागरिकांसाठी राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण तर व्यापाऱ्यांसाठी सोन्याची खाणंच. महामार्गालगत राहायला मिळणे, त्याबरोबरच कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा मिळणे, सर्व पद्धतीचे शिक्षण मिळणे आणि हे सगळे मलकापूर मध्ये कमी खर्चात उपभोगाला मिळणे, ही संधी कोण कसे बरे घालवील ?आणि याच गोष्टीमुळे मलकापूरचा विकास झपाट्याने होत गेला, लोकसंख्या वाढत गेली. भौतिक सुविधा कमी पडू लागल्या. मग डोळ्यासमोर विकासाची ब्ल्यू प्रिंट ठेवून मनोहर शिंदे यांनी शहर विकासाचे नियोजन केले. उत्तम , भव्य आणि सुंदर रस्ते हा तर प्रत्येकाचा अधिकार आहेच. रस्ते मोठे झाले तरच शहराचा विकास होतो हे खरे असले तरी विकसित होत असलेल्या मलकापूरमध्ये सुरुवातीला घरोघरी शुद्ध आणि मुबलक पाणी गेले पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून मनोहर शिंदे यांनी 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना आखली. या योजनेच्या मंजुरीपासूनच ही योजना सुरू होणार का ? चालणार का ? टिकणार का ? 24 तास पाणी कोणी देऊ शकतं का ? 24 तास पाणी देऊन काय उपयोग होणार? मनोहर शिंदेंना यश मिळणार नाही ? मलकापूर ग्रामपंचायत तोट्यात जाणार,अशा नकारात्मक आणि उलट सुलटचर्चा त्यावेळेला रंगल्या होत्या. मात्र मनोहर शिंदे यांनी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले. देशभरात जिथे ही योजना सुरू आहे तिथे जाऊन माहिती घेतली, अभ्यास केला. 24 तास शुद्ध आणि मुबलक पाणी देणे शक्य आहे. हे पाणी दिलं तर पाण्याचा अपव्यय कमी होईल, लोकांना शुद्ध पाणी मिळाले की मलकापूरमध्ये लोक राहायला येतील, मलकापूरचा विकास होईल,लोकांना आरोग्य मिळेल, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही योजना उभी केली, चालवली. देशात आदर्शवत करून या योजनेच्या माध्यमातून मलकापूरचे नाव जगाच्या जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले. मनोहर शिंदे होते म्हणूनच ही योजना चालू शकली आणि यशस्वी झाली, यात काही शंका नाही. मनोहर शिंदे यांचा स्वभाव थोडासा हट्टी आहे, ते स्वतःचच खरं करतात. मात्र ते शहराचा विकासासाठी हट्ट करतात, हे मी अनेकदा पाहिले आहे. 24 बाय सात योजना राबवताना त्यांनी हा हट्टच केला आणि या हट्टीपणामुळेच ही योजना यशस्वी झाली, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
सलग दोन टर्म काँग्रेसच्या चिन्हावर बहुमत मिळणे हे सोपे काम नाही. मात्र मनोहर शिंदे यांना हे शक्य झाले कारण त्यांची काँग्रेस पक्षावर असणारी निष्ठा. मनोहर शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे अतिशय जवळचे मानले जातात. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मधील अनेक महत्त्वाच्या गोष्टी मनोहर शिंदे यांनाच विचारून करतात. किंबहुना कराड दक्षिणेत काँग्रेस पक्ष वाढीसाठी मनोहर शिंदे यांचे योगदान फार मोठे आहे. एकनिष्ठ असलेल्या मनोहर शिंदे यांनी जे जे मागितले तेथे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत मलकापूरला दिले. काँग्रेस पक्षनिष्ठा हा मनोहर शिंदेचा गुण घेण्यासारखा आहे.
अनेक गोष्टीवर मनोहर शिंदे भाऊ आणि यांचं माझं एक एकमत असतं, मात्र कधी कधी आमचे तात्विक वाद होतात. त्यांच्या जवळच्या काही चमच्यांनी अनेकदा आमच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला मात्र भाऊंनी त्या चमच्याना वेळोवेळी अलगद फेकून दिले. त्यामुळे आमच्या दोघां मधील वैयक्तिक संबंध कधीही दुरावले नाहीत. पुढारीच्या माध्यमातून अनेकदा मलकापूरच्या विकासाबाबत वस्तुनिष्ठ बातम्या द्यावा लागतात. कचरा समस्या, सांडपाणी याबाबत आर्टिकल छापून येतात, फोटोन्यूज येतात. मात्र हे छापून आल्यानंतर मनोहर शिंदे यांनी कधीही ही बातमी का छापली म्हणून मला फोन केला नाही. उलट ही बातमी छापून आल्यामुळे आमचा फायदा झाला ,या बातमीचे कटिंग दाखवून मी मंत्रालयात गेलो आणि मलकापूर स्मशानभूमीसाठी निधी आणला. कचराकुंडीची बातमी छापून मी कचऱ्यासाठी निधी आणला,असे मनोहर शिंदे मला आनंदाने सांगतात. हा त्यांचा गुण खरंच उल्लेखनीय आहे. विरोधात छापून आलेल्या बातम्यानांही जो सकारात्मक घेतो, त्याचा फायदा उठवतो,असा राजकारणी मी क्वचितच पाहिलेला आहे. या पुढील काळातही मनोहर शिंदे यांची काँग्रेस पक्षनिष्ठा घट्ट होओ,त्यांच्या हातून मलकापूर वासीयांसाठी चांगली कामं होवो, त्यांना आरोग्य लाभो,अशा त्यांना शुभेच्छा !
सतीश मोरे सतिताभ
9881191302