फॉलोअर

०४ जानेवारी २०२४

कराडातील कलाकृतींचा अयोध्येत बहुमान




कराडातील कलाकृतींचा अयोध्येत बहुमान


अयोध्येमध्ये राम जन्मभूमीत रामलल्ला विराजमान होत आहेत. भव्य राममंदिर साकार होत असताना त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराडमधील छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांनी काढलेले फोटोरुपी रामचरित्र अयोध्येत कायमस्वरुपी लावण्यात येणार आहे. ही सर्व छायाचित्रे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण प्रकल्प प्रमुख गोपालजी यांच्याकडे केदार गाडगीळ आणि कल्पेश पाटसकर यांनी नुकतीच अयोध्या येथे सुपूर्द केली आहेत. शहरातील कलाकारांच्या सहभागातून तयार झालेली ही छायाचित्रे अयोध्येत कायमस्वरुपी राहणार असल्यामुळे कराडकरांचा हा एक अनोखा सन्मानच ेआहे.

5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. पाहता पाहता मंदिरासाठी निधी संकलनाचे काम सुरु झालं. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला. याशिवाय अनेकांनी आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कलेच्या माध्यमातून सेवा घडवू या उद्देशाने कराडमधील कलाकारांनी एकत्र येऊन संस्कार भारती, कराड निर्मित व कराडतमधील छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांच्या संकल्पनेतून श्रीराम दिनदर्शिका तयार केली. प्रभू श्रीराम यांची आठवण जनमानसात सतत जागृत रहावी, या उद्देशाने ही दिनदर्शिका तयार करण्यात आली होती. ही दिनदर्शिका तयार करण्याच्या कामात परिसरातील अबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या दिनदर्शिकेत प्रभू श्रीरामांचे आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श शिष्य, आदर्श बंधू असे 12 आदर्श गुण असलेले प्रसंग आहेत. या प्रसंगांचे छायाचित्रण करुन ही छायाचित्रे या दिनदर्शिकेत घेतली आहेत. ही सर्व छायाचित्रे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील परिसरात प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन काढण्यात आली असून ही दिनदर्शिका चैत्र ते फाल्गुन अशी अर्थात मराठी वर्ष पद्धतीप्रमाणे तयार केली. या दिनर्शिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे छायाचित्राच्या खाली असणारा क्यु-आर कोड स्कॅन करताच छायाचित्रातील प्रसंग मराठी, इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत या चार भाषांमध्ये लिखित स्वरूपात येतो. ही दिनदर्शिका तयार करण्याची कल्पना कराडमधील फोटोग्राफर कल्पेश पाटसकर यांची आहे. त्यांनी एक-एककलाकार जोडून टीम तयार केली. त्यातून पुढे फोटोग्राफी विभाग, एडिटिंग विभाग, ड्रेपरी विभाग असे छोटे-छोटे विभाग केले आणि त्यातून काम सुरू केले. या विभागात स्वतः कल्पेश पाटसकर, सर्वेश उमरणी, आसावरी पंडित, शांतनू देशमुख, अमेय तिडके, गणेश गायकवाड (श्रीरामांच्या भूमिकेत), कल्याणी बोरकर (सीता) रितू उनऊने, अर्पिता गाडगीळ, अनंत जोशी (विश्वामित्र), के. एन. देसाई (दशरथ), अभय भंडारी आणि रिता जोशी (मार्गदर्शक) यांनी काम केले. दिनदर्शिकेच्या छायाचित्रणासाठी लागणारे नेपथ्य साहित्य (धनुष्यबाण, गदा, पुरुष पात्रांचे दागिने, मुकुट इ.) रात्रंदिवस काम करून टीममधील कलाकारांनी स्वतः तयार केले. त्यानंतर निवडलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन 12 प्रसंगांचे छायाचित्रण पूर्ण झाल्यानंतर त्याचे एडिटिंग, प्रिंटिंग आणि काही तंत्रात्मक काम पूर्ण झाले आणि दिनदर्शिका हातात आली. दिनदर्शिकेचे प्रकाशन गुढीपाडव्याच्या दिवशी अभिनेते नितीश भारद्वाज आणि कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते झाले होते. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रविण दभडगाव आणि संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव कामत यांच्यापर्यंत ही दिनदर्शिका पोहोचवली. याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनज गडकरी यांना सुद्धा प्रत्यक्ष भेटून दिनदर्शिका सुपूर्द केली. दिनदर्शिकेतील प्रभू श्रीरामांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन कराडमध्ये भरवले होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन भिडे गुरुजी आणि प्रसिद्ध वक्ते अभय भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनातील छायाचित्रे लोकांना पाहण्यासाठी 5 फूट बाय 3 फूट या आकारात प्रदर्शनात मांडली होती. त्याबरोबरच टीममधील कलाकारांनी स्वतः तयार केलेले नेपथ्य साहित्य सुद्धा प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. प्रदर्शनातील सर्व छायाचित्रे श्री गोपालजी श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या उभारणी प्रकल्प प्रमुख यांच्याकडे सुपूर्त केली असून ही छायाचित्रे अवधूत कलबुर्गी यांनी प्रिटिंग करून दिली होती. दिनदर्शिका तयार झाल्यानंतर त्याच्या विक्रीतून खर्च वजा करता 2 लाख हातात आले. सर्व रक्कम श्री गोविंददेवगिरी महाराज कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आयोध्या यांच्याकडे सुपूर्त केली. या दिनदर्शकेनंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्रामातील 12 स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित अशी स्वराज्य 75 दिनदर्शिका सुद्धा तयार केली. यानंतर दोन्ही दिनदर्शिकांच्या टीम बरोबर श्री गोविंदगिरी महाराज यांना ही भेटण्याचा योग आला. मानवी मनावर प्रभाव टाकणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कला.  आपल्या कलेचे सार्थक व्हावे, असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. याच प्रेरणेतून कराडमध्ये एकत्र येत कलाकरांनी स्वप्न साकारले. ही दिनदर्शिका अयोध्येत प्रभू श्रीरामांपर्यंत पोहचावी, असं प्रत्येकाला वाटत होतं आणि ते प्रयत्नांती सत्यात उतरलं. 

कल्पेश पाटसकर आणि केदार गाडगीळ यांनी ही  छायाचित्रे राम मंदिर न्यास कमिटीपर्यंत पोहोचवली. ही छायाचित्रे त्यांना इतकी आवडलीत की, या छायाचित्रांचे पोट्रेट राम मंदिर न्यासाच्या कार्यालयात लावण्याची इच्छा व्यक्त केली. ही छायाचित्रे श्रीराम मंदिराच्या शेजारील कार्यालयात लावण्याचा निर्णय कमिटीने घेतला. सध्या ही चित्रे कार्यालयात लावण्याचे काम सुरु आहे.


सतीश मोरे सतिताभ 

वनवासावेळी झालेल्या प्रभू श्रीराम व भरत भेटीचे छायाचित्र.

 वनवासावेळी झालेल्या प्रभू श्रीराम व भरत भेटीचे छायाचित्र.
 प्रभू श्रीराम यांचे हनुमान भेट झालेल्या प्रसंगाचे छायाचित्र.

मी पाहिलेली नाटके..! मी केलेलं नाटक.. अर्थात माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स


मी पाहिलेली नाटके..!
मी केलेलं नाटक.. अर्थात माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स 

प्रत्येक माणसांमध्ये एक कलाकार असतो,कला असते आणि तो  'ती कला' कुठे ना कुठे व्यक्त करत असतो.कोणी गाणं म्हणतो, कुणी नाटकं करतो,कोण नकला करतो, कोण कुणाचा तरी आवाज काढतो, रिमेक करायचा प्रयत्न करतो. कोण आपल्या स्वतःच्या आवाजाची, वागण्याची, बोलण्याची वेगळी स्टाईल निर्माण करतो. स्टेजवर अभिनय करणे हे प्रत्येकाला जमतंच असं नाही पण प्रत्येक मनुष्य आयुष्यभर अभिनयच करत असतो, नाटक आणि नाटकं करत असतो,नाट्य घडवत असतो,नाट्य पाहत असतो. आयुष्याच्या नाटकात तो अनेक भूमिका निभावतो. त्याला आवडणारी भूमिका तो इतरांच्यावर लादत असतो. दुसऱ्यांच्या न आवडणाऱ्या भूमिकेवर तो लगेच व्यक्त होत असतो. मात्र स्वतःच्या 'भूमिके'वर तो कायम ठाम असतो. 

असो. नाटक, नाट्य आणि अभिनय याचा प्रत्येकाच्या आयुष्यातील सहभाग कमी जास्त प्रमाणात असला तरी नाटक करायला किंवा अभिनय करायला एक संधी मिळावी लागते.  लहानपणी ती संधी मिळते शाळेमध्ये. अलीकडे बालवाडी पासूनच मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले जाते. आमच्या काळात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी फक्त आम्ही सजलेलो असायचं. बाकी वेळेला रेगुलर कपडे. नवीन कपडे घ्यायला दिवाळीची वाट पाहत बसायला लागायचे. त्या काळात फोटो हा विषय नव्हताच, त्यामुळे त्या  आठवणी फक्त डोळ्यांत साठवल्या जात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला टोपी घालून केलेली महात्मा गांधीची ड्रेपरी आजही डोळ्यात आहे. आज अभिनय आणि नाट्य या विषयावर बोलायचं , लिहायचं सुचलं कारण आज मला एक फार जुना फोटो सापडला. हा फोटो मी करवडी गावातील अल्बम मधून मिळवला. तो फोटो आहे माझ्या स्टेजवरील पहिल्या परफॉर्मन्सचा.

माझ्या आयुष्यातील नाट्य क्षेत्राचा किंवा अभिनयाचा पहिला योग आला की जो मला चांगला आठवतो. तो म्हणजे टिळक हायस्कूलमध्ये सादर केलेला पोवाडा. माझा कोळे येथील प्रशांत उकिरडे नावाचा एक मित्र आहे. त्याने आम्ही आठवीला असताना भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचा पोवाडा आमच्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये सादर केला होता. त्याच्यासोबत पाठीमागे 'जी..जी रं' म्हणायला मी आणि कडेपूरचा हिंदुराव यादव होतो. स्टेजवरचा माझा पहिला परफॉर्मन्स. फक्त जी जी म्हणण्यापुरते मी स्टेजवर असलो तरी त्याची पूर्वतयारी मात्र महिन्यांपासून सुरू होती. तो फोटो आता माझ्याकडे उपलब्ध नाही. मात्र मी बांधलेला फेटा , नेहरू शर्ट ही आठवण आजही माझ्या हृदयावर कोरलेली आहे.

 त्यानंतर सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमधील एक आठवण माझ्या स्मरणात आहे. सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी गॅदरिंग म्हणजे एक उत्सव असायचा. या गॅदरिंग मध्ये सर्वांचा आवडता एक विषय असायचा तो म्हणजे फिश पॉइंट. आपल्या वर्गातील मुला मुलीवर फिश पॉइंट लिहून द्यायचे आणि त्याचं वाचन स्टेजवर केलं जायचं. माझ्या वर्गात अकरावी बारावीला सहा मुली होत्या आणि आम्ही जवळजवळ 70 मुलं. आमच्या वर्गातील एका मुलाने एका मुलीवर फिश पॉइंट टाकला होता. ती मुलगी परिक्षेला कॉपी खूप करायची. म्हणून तिच्यावर 'कोणती कॉपी कोणत्या खिशात, याची इंडेक्स वरच्या खिशात ...मिस ...' असा फिश पॉइंट पडला होता. गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला खूप कमी विद्यार्थाचा नंबर लागायचा. मला सीनियर असलेल्या आर्ट शाखेतील  प्रदीप वालावालकर यांने एक नाटिका बसवली होती. त्याच्यामुळे मला 1990 साली कॉलेजमधल्या गॅदरिंग मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. ते एक छोटसं नाटक होतं. नाटकाचं नाव होतं 'आधुनिक रामायण'. सर्व प्रसंग हिंदी चित्रपटामधील गाण्यावर आधारित होते. दहा मिनिटांची ही नाटिका होती. अर्थातच या नाटकाचा दिग्दर्शक आणि रावण भुमिका वालावलकर याने केली होती.अंताक्षरी टाईप सर्व गाण्याचा मुखडा एकत्र करून आम्ही ही नाटिका सादर केली होती. या नाटकाची सुरुवात सरगम चित्रपटातील 'ओ रामा हो.. हम तो चले परदेस, हम परदेसी हो गये' या गाण्याने झाली होती आणि त्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेत असा सीन होता. या नाटकात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि रावण अशी फक्त पाच पात्र होती. सीतेचे काम करायला आम्हाला आमच्या वर्गातीलच काय आख्या कॉलेजमधील कोणतीही मुलगी तयार झाली नाही. शेवटी एका मुलालाच आम्ही सीता बनवलं. विशेष म्हणजे प्रभू रामचंद्राचे पात्र निभावलेला मुलगा  ख्रिश्चन धर्मीय होता) आम्ही दमदारपणे ते नाटक स्टेजवर सादर केलं, कॉलेजमधील युवक युवतींनी टाळ्या वाजवत आम्हाला दाद दिली. तुम्हाला सर्वांना सांगायला आता आनंद वाटतो आणि थोडसं हसू पण येतं, या नाटकात मी चक्क हनुमानाची भूमिका केली होती. बारावीत असताना माझी तब्येत अतिशय सड पातळ होती. सोबतचा फोटो पाहिला की तुमच्या लक्षात येईल. कोणत्याही दृष्टीने, कोणत्याही अँगलने मी हनुमानाची भूमिका करायला पात्र नव्हतो. मात्र तरीही ती भूमिका माझ्या वाट्याला आली होती. या नाटकातली माझी एन्ट्री होते त्यावेळेला लावलेले गाणं सुद्धा माझ्या आवडीचं, माझ्या आवडत्या कलाकाराचं होतं. सीतामाईला रावण पळवून नेतो. सीतामाईच्या शोधात हनुमान जेव्हा लंकेत जातो तेव्हा तो सीतेला अंगठी दाखवून आपली ओळख दाखवतो आणि तेव्हा गाणं होतं 'अरे दिवानो मुझे पहचानो कहा से आया मै हु कौन'.

या नाटकाची वेशभूषा, रंगभूषा सर्व काही तयारी आम्ही पाच जणांनीच केलेली होती. हनुमानाच्या हातात गदा पाहिजे. मात्र मोठी गदा कुठे मिळणार? आणि बजेट फार कमी होतं. शेवटी प्लास्टिकची  खेळण्यातील गदा आणली. आपण हा जर फोटो पाहिला तर गदा दिसून येईल.आधुनिक रामायणातील माझी ही भूमिका माझा स्टेजवरचा पहिला परफॉर्मन्स होता. मात्र तो परफॉर्मन्स आज 33 वर्षे होऊन गेली तरीही माझ्या डोळ्यासमोर अजूनही तसाच आहे.नाटकातली भूमिका छोटी असली तरी ही भूमिका साकारल्यानंतर मला मिळालेला आनंदाचा सुगंध अजूनही दरवळतो आहे.

पुढे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना आणि झाल्यानंतर नाटक आणि अभिनय करायचा योग कधीच आला नाही. मात्र गावात यात्रेला, गणपती उत्सवात परिसरात कुठेही नाटके असली तरी आम्ही पाहायला जात होतो. कार्वे ,सह्याद्री साखर कारखाना,कराड,रेठरे या ठिकाणी पाहिलेली नाटके मला थोडेफार आठवतात. कराडच्या टाऊन हॉलमध्ये प्र. के. अत्रे यांचे 'ब्रह्मचारी' नावाचं एक नाटक आलं होतं. या नाटकात प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर हे मुख्य भूमिकेत होते. वर्षा उसगावकर यांचं त्या काळातील हे नाटक फार गाजलं होतं. कदाचित हा काळ 1993 चा असावा. स्टेजवर वर्षा उसगावकर कृत्रिम तयार केलेल्या धबधब्यासमोर आंघोळ करते,असा एक सीन होता आणि त्या काळात कमी कपडे घातलेली वर्षा उसगावकर स्टेजवर पाहायला मिळणे म्हणजे ....., धाडस होते. लोक नाटक पहायला जायचे, वर्षा उसगांवकरचा तो तीन पाहून उलट सुलट चर्चा करायचे. आजच्या काळात कमी कपडे घातलेली हीरोइन पाहणे काहीच विशेष नाही .मात्र त्यावेळेला अशी कमी कपड्यातली नटी स्टेजवर येणं म्हणजे संस्कृतीविरोधी होतं.  


आमच्या टिळक हायस्कूल आणि कन्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीं मिळून राम गणेश गडकरी लिखित 'एकच प्याला' नावाचे एक नाटक केले होते. कदाचित 1985 सालं असावं. हे नाटक मला चांगले आठवते. या नाटकात आठवीत शिकत असलेल्या सुधीर घळसासी यांने सुधाकरची दमदार भूमिका केली होती. शाळेतील सर्व शिक्षकांनी अतिशय प्रयत्न करून,रातं दिवस सराव करून हे नाटक अतिशय सुंदर पद्धतीने बसवले होते. एकच प्याला हे नाटक सादर करणे एवढं सोपे नाही मात्र आमच्या शाळेतील मुलांनी ते शिव धनुष्य पेललं होते. हे नाटक पहायला त्यावेळी परिसरातील अनेक नागरिक आलेले होते. घळसासी सरांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक टिळक हायस्कूलच्या निगडीकर कला मंदिर येथे सादर करण्यात आले होते (या नाटकाविषयी माहिती संकलित करत आहे, सविस्तर लिहीन लवकरच... )


2001 साली पुढारी मध्ये वार्ताहर म्हणून जॉईन झालो. त्यानंतर प्रत्येक वर्षी कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉलमध्ये राज्य नाट्य स्पर्धा होत होत्या. या नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांचे समिक्षण लिहिण्याची जबाबदारी पुढारीने माझ्यावर सोपवली होती. त्यामुळे ही सर्व नाटके पाहिली आहेत. निळू फुले,अशोक सराफ, भरत जाधव प्रशांत दामले, संकर्षन कराडे, रीमा लागू, रोहिणी हट्टंगडी अशा अनेक नाट्य कलाकारानी कराडच्या टावर मध्ये सादर केलेली अनेक नाटके त्यानंतर पाहिलेली आहेत. 'रायगडाला जेव्हा जाग येते' आणि 'तो मी नव्हेच' ही दोन नाटके मी तीन चार वेळा पाहिली आहेत. 'हनुमाना'चा तो फोटो पाहून मला आठवलेल्या काही नाटकाविषयी आज लिहिण्याचा प्रयत्न केला. आपणास आवडेल कदाचित ! धन्यवाद.

सतीश मोरे सतिताभ
9881191302

लेखन @श्रीकृष्ण सिटी विंग 
4 जानेवारी 2024 सकाळी आठ वाजता

सिकंदर प्रेमी संजय


नमक हलाल पहायला 
सायकलवरून टिबल सीट सातारला 
जाणारा अमिताभ बच्चन प्रेमी.... संजय शिंदे 

संजय शिंदे ...
एक कट्टर बच्चन प्रेमी... 
एक चांगला माणूस ...
एक कुटुंबवत्सल व्यक्ती 
आणि दिलदार मित्र 
संजय शिंदे यांचा आज वाढदिवस आहे . 
त्यानिमित्त ....

संजय शिंदे, कराडचे लोकप्रिय नगरसेवक. शिंदे आमचे पाहुणे आहेत. जुनी ओळख आहेच , होती. तरीही ही त्यांची माझी ओळख वादातून झाली. त्यांच्या आई नगरसेविका होत्या.पुढारीमध्ये नगरपालिका सभेतील एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमी बाबत संजय शिंदे यांनी मला नोटीस पाठवली. आम्ही छापलेली बातमी किंवा त्यांनी दिलेला खुलासा या दोन्ही त्या त्या ठिकाणी योग्य होत्या. राजकीय लोकांनी काही कारणास्तव त्यांना तसे करायला भाग पाडले होते, हे त्यांनाही आणि मलाही समजलं आणि पुढे आमच्यातले गैरसमज दूर झाले आणि आम्ही चांगले मित्र झालो. पुढे त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत मित्र म्हणून मी त्यांच्यासोबत राहिलो. 

आमची मैत्री घट्ट झाली ती 2015 सालापासून. त्याचं कारणही तसंच होतं. त्यांच्या आणि माझ्यातील एक समान धागा होता तो म्हणजे अमिताभ बच्चन. संजय शिंदे यांचे बच्चन प्रेम आणि अभ्यास खरच अफाट आहे. त्यांचं बच्चन प्रेम माझ्यासारखंच लहानपणापासून आहे. संजय शिंदे यांच्या नावाची सुरुवात S ने होते आणि माझ्याही नावाची. एस फॅक्टर आमच्यामध्ये इतका घट्ट होत गेला, आमची मैत्री तशीच मजबूत होत गेली.अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप 8 जानेवारी 2015 रोजी स्थापन झाला. तेव्हापासून संजय शिंदे या ग्रुपचे संस्थापक ॲक्टिव्ह मेंबर आहेत. शिंदे यांचे दोन बंधू विकास आणि प्रकाश. तेही बच्चन प्रेमी आहेत. त्या तिघांच्या बंधुप्रेमाचा मला अनेकदा अनुभव आलेला आहे. हे तिघे भाऊ सकाळ आणि संध्याकाळ रोज एकत्र येतात, गप्पा मारतात. त्यांनी जी इमारत बांधली आहे त्या ठिकाणी अशी व्यवस्था केली आहे की तिघांनी एकमेकाला भेटलंच पाहिजे. हे तिघे एकदा बच्चनचा नमक हलाल चित्रपट बघायला कराड ते सातारा सायकल वरून टिबल सीट गेले होते. एकाचे वय १७, एकाचे १४ आणि संजय शिंदे यांचं वय ११. विचार करा.. कराड ते सातारा ५४ किलोमीटर अंतर, तेही ट्रिपल सीट जाणारे हे बालक शिंदे बंधूं. त्यांच्या बच्चन प्रेमाविषयी काय बोलावं. म्हणूनच म्हणतो संजय शिंदे यांचा सारखा बच्चन प्रेमी होणे अवघड आहे. 

संजय शिंदे यांचे एक फार मोठे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यात माझा वाटा होता आणि ते संजय शिंदे कधी विसरत नाहीत. अमिताभ बच्चन यांना भेटायची इच्छा कुणाची नसेल! संजय शिंदे यांची सुद्धा होती.आयुष्यात मला आता काही नको फक्त एकदा अमिताभ बच्चन भेटायचे आहे, ती भेट तुम्ही मला करून द्या, असे संजय शिंदे मला वारंवार बोलले होते. अखेर तो दिवस उजाडला. पाच सप्टेंबर २०१९ रोजी अमिताभ बच्चन ग्रुप मधील आम्ही पन्नास जण एकाच वेळी केबीसी सेटवर गेलो होतो त्यात संजय शिंदेही होते. बच्चन भेटीचा अनुभव संजयजी अजूनही मला आजही सांगतात की अमिताभ बच्चन समोर आल्यानंतर त्यांचे अंग थंड पडले होते, विश्वास बसत नव्हता. अमिताभ बच्चन यांची पहिली भेट अजूनही संजय शिंदेच्या स्मरणात आहे. कधी कधी हा विषय निघाल्यानंतर ते अतिशय नम्रपणे मला म्हणतात, मोरे साहेब मी तुम्हाला कधी विसरणार नाही.तुम्ही माझ्या आयुष्यातलं एक असं स्वप्न पूर्ण केला आहे जे पूर्ण होईल का नाही याची मला खात्री नव्हती.

संजय शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. अजून खूप लिहिता येईल त्यांच्याविषयी मात्र आता एवढेच सांगेन, एक चांगला नगरसेवक, एक चांगला मित्र, कोणत्याही गोष्टीसाठी सतत तात्काळ उपलब्ध होणारा, 'मुकंदर का सिकंदर' हा चित्रपट ज्यांना खुप आवडतो, अशा कराडच्या सिकंदर मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२

१९ डिसेंबर २०२३

जीवन शिक्षण विद्या मंदिर @ करवडी'


*जीवन शिक्षण विद्या मंदिर @करवडी* 

करवडी गावातील दिवस खुप रम्य होते. बालपणीचे, शालेय जीवनातील दिवस तर त्याहून वेगळे होते. एसटी स्टँड पाठीमागे माझी प्राथमिक शाळा होती,आहे. *शाळेला 'जीवन शिक्षण विद्या मंदिर, करवडी' असे नाव होते. खरंच जीवन शिक्षण विद्यामंदिर हे नाव किती सार्थ आहे हे त्या सरकारी शाळेत शिकलेले आहे त्यांनाच कळू शकेल*. या चारही शब्दाची आपण जर फोड केली तर आज शाळेत काय काय शिकलं, शिकले पाहिजे आणि काय शिकवलं जातं शिकवायला हवं, हे उमगेल.

जीवन शिक्षण...जीवन जगण्याचं शिक्षण देणारं केंद्र म्हणजे ही शाळा. शिक्षण म्हणजे काय.क्षणाक्षणाला शिकले पाहिजे, काहीतरी नवीन आत्मसात केले पाहिजे, हे शिकवणारे केंद्र म्हणजे माझी शाळा. विद्या मंदिर.. विद्या एखाद्या क्षेत्रात, विषयात पारंगत होणे आणि ती विद्या देणारी ही शाळा. एखाद्या विषयाचा खोल अभ्यास करणे, सतत अभ्यास करत राहणं आणि हे देणारं केंद्र म्हणजे शाळा. शेवटचा शब्द आहे मंदिर. खरंच हे शाळा एक मंदिर असतं. जिथे ज्ञानाची पूजा केली जाते, ज्ञान हा देव असतो.शिक्षक गुरु असतात. शाळेची इमारत सुधारणा मंदिर असते. आपण देवाच्या मंदिरात कशासाठी जातो शांतता मिळवण्यासाठी, काहीतरी मागण्यासाठी. शाळा रुपी मंदिरात आपण ज्ञानार्जन करण्यासाठी जातो आणि हे मिळवलेले ज्ञान पुढच्या आयुष्यात आपल्याला खूप उपयोगी पडते. देवाच्या मंदिरात शांतता मिळते आणि देवाचा आशीर्वाद मिळतो आणि आपण देवाला काहीतरी मागतो. शाळा रुपी मंदिरात जे ज्ञान मिळते हे ज्ञान मिळून आपण शहाणे होतो, पुढे पारंगत होतो, नोकरीला लागून पैसे मिळवतो, सुखी होतो आणि पुढच्या पिढीला हे ज्ञान देतो. 

*२००० सालच्या दरम्यान कुणा अतिहुशार अधिकाऱ्याच्या कि शिक्षण मंत्र्यांच्या डोक्यात काय आलं कुणास ठाउक! त्यानं जीवन शिक्षण विद्या मंदिर हे नाव बदलून प्राथमिक शाळा असं केलं. कदाचित काही पुरोगामी लोकांच्या लोकांना 'मंदिर' हे नाव नको असेल म्हणून त्यांनी हे नाव बदलून टाकलं. असो..कालाय तस्मै नमः* 

"जीवन शिक्षण विद्या मंदिर करवडी" ही माझी शाळा खरंच संस्काराचं केंद्र होती, एक मंदिर होतं, आनंददायी ठिकाण होतं. माझं पहिली ते चौथी शिक्षण या शाळेत झालं. सुहास पिसाळ, रमेश पिसाळ, अरविंद पिसाळ, अनिल बनसोडे, रवि सुतार हे माझे वर्गमित्र. मला आठवतंय या शाळेत जाताना आम्हाला खूप आनंद व्हायचा. शाळा दहा वाजता असली तरी आम्ही मित्र साडेनऊ वाजता शाळेत जाऊन बसायचो. दप्तर कोपऱ्यात ठेवून मग आमचे खेळ सुरू व्हायचे. गुरुजी आल्यानंतर वर्ग उघडायचे. *माझ्यासहित सर्व विद्यार्थ्यांना पहीलं एकच काम असायचं शाळेचा परिसर स्वच्छ करणे*. शाळा स्वच्छ करण्यासारखी मजा खरंच कुठे नसेल.खराटे तिथे नसायचे मग आसपासच परिसरातील निरगुडी शोधायची. निरगुडी तोडायची आणि खराटा तयार करायचा. काही जणांकडे वर्ग स्वच्छ करण्याचे काम असायचे. कोपऱ्यात केरसुणी ठेवलेली असायची, ती घेऊन काही मुले मुली वर्ग स्वच्छ करायचे. त्याकाळी वर्गामध्ये थोड्याच फरश्या होत्या? साधी शेणाने सारवलेली खडबडीत जमीन. प्रत्येक शनिवारी आम्हाला वर्ग सारवायचे वेगळं काम असायचं. आसपास रस्त्यावर पडलेलं शेण गोळा करायचं आणि शाळा सारवायची. आपली शाळा आणि वर्ग स्वच्छ ठेवणे, सारवणे हे शिक्षण एवढ्या छोट्या वयात मिळालं होतं. म्हणून तर म्हणलं ना ही शाळा म्हणजे जीवन कसं जगायचं हे शिकवणारे एक मंदिर आहे. हे सारं करून मग प्रार्थनेसाठी उन्हात उभं रहायचं.  

सुर्यवंशी बाईंचा मी लाडका विद्यार्थी. मधल्या सुट्टीत मी घरी जेवायला गेलो की भाजलेले शेंगदाणे घेऊन यायचो आणि बाईना द्यायचो. बाईंनी माझ्या कडून पाढे छडी लागेने पाठ करवून होते.माझ्या शाळेतील पहिली ते चौथीचे वर्ग मला आजही आठवतात. आता ती शाळा काही अंशी पाडली आहे, जुन्या शाळेचा काही भाग अजून शिल्लक आहे. या शाळेने आम्हाला खूप काही दिलें आहे. आजही या शाळेत जायला मला फार आवडते. घरासमोरच शाळा असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर शाळेचे पटांगण म्हणजे आमच्यासाठी सारं काही असायचे. क्रिकेट हा तसा त्याकाळी थोडा महागडा खेळ होता. मग या शाळेच्या पटांगणावर सुरपाट्या, कबड्डीचे ग्राउंड आखले जायचे. रात्रीच्या अकरा बारा पर्यंत इथे खेळ चालायचे. विट्टी दांडू आणि गट्टया तर आवडते खेळ. या खेळात आम्ही इतकं रमायचे की घरची आठवण येत नसे. काही मित्रांची आई टिकारणं घेऊन यायची तेव्हा आमचा खेळ संपायचा. 

शाळेच्या परिसरात अनेक झाडे होती.आमच्या घरासमोरच शाळेच्या कंपाऊंड लगत एक वड आणि दोन बाभळीची झाडं होती. ही तिन्ही झाडे आता अस्तित्वात नाहीत. पण या झाडाखाली आम्ही खेळलेले खेळ, दुपारच्या सुट्टीत मारलेल्या गप्पा आजही आठवतात. या झाडाखाली बसून उन्हाच्या सुट्टीत खाल्लेले गारीगार आणि त्याची चव आजही जिभेवर रेगाळत आहे. कधी कधी माकडवाला यायचा, मग माकडाचे खेळ या झाडाखालीच व्हायचे. चौथीला मला या शाळेत 74 टक्के मार्क मिळाले माझा वर्गात दुसरा नंबर आला होता. पहिला नंबर अनिल बनसोडे किंवा रवी सुतारचा आला असेल. एवढे चांगले मार्क मिळाल्यानंतर माझ्या वडिलांच्या तीव्र इच्छेनुसार पाचवीला मला १९८२ साली कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. टिळक हायस्कूलचा प्रवास खूप सुंदर आहे, त्यावर लिहीनच पुढे कधी तरी. मात्र करवडी येथील प्राथमिक शाळेतील या आठवणी हृदयावर कोरलेल्या आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी आपली पहिली शाळा विसरू शकत नाही. जीवन शिक्षण विद्या देणारी माझी शाळा आणि त्या शाळेतील सर्व शिक्षकांना वंदन !

लेखन @कृष्णा विद्यापीठ कॅम्पस सेन्ट्रल गार्डन 

*सतीश वसंतराव मोरे*
सतिताभ 
9881191302

१८ डिसेंबर २०२३

Save me I am the Oldest Tree here



Save me I am the Oldest Tree here
धन्यवाद डॉ. सुरेश बाबा, Dr.Suresh Bhosale  एक झाड वाचवल्याबद्धल !

पत्रकार परिषद असो वा एखाद्या नातेवाईकांना रुग्णालयात भेटण्यासाठी जाण्याच्या कारणासाठी असो, कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणि कृष्णा विद्यापीठ परिसरात जाण्याचा योग मला अनेकदा येतो. या परिसरात गेल्यानंतर कृष्णा विद्यापीठ हे केवळ कराडचेच नव्हे तर जिल्ह्याचे, अवघ्या महाराष्ट्राचे वैभव आहे याचा पदोपदी अनुभव येतो. परवा कोल्हापूरला एका पाहुण्यांकडे गेलो होतो. तेव्हा त्या पाहुण्यांनी मला सहज एक गोष्ट बोलून दाखवली, "पुण्यानंतर शैक्षणिक आणि आरोग्याचे माहेरघर आणि सर्वात मोठे केंद्र कोणतं असेल तर तुमचं कराड ! " छाती एवढ्या अभिमानाने फुलून आली होती काय सांगू !आपल्याला हा एवढा मोठा बहुमान मिळण्याचे कारण म्हणजे कराडचं मोठं कृष्ण हॉस्पिटल आहे. 

कृष्णा हॉस्पिटलच्या इतर उपक्रमाबाबत मला आता बोलायचे नाही.आज मला सांगायचे आहे कृष्णा विद्यापीठ परिसरात राबवलेल्या एका वेगळ्या उपक्रमाविषयी. देवयानीला आगाशिवनगर मध्ये क्लासला सोडल्यानंतर आज जिमला सुट्टी असल्यामुळे काय करायचे असा विचार करून मी कृष्णा विद्यापीठ कॅम्पस मध्ये प्रवेश केला. आज संपूर्ण कृष्णा विद्यापीठ कॅम्पस परिसर फेरफटका घालायचा असा विचार करून मी कृष्णा सरिता बाजारच्या बाजूने आत प्रवेश केला.

आदरणीय स्व.जयंतराव भोसले आप्पा यांच्या समाधीस्थळला अभिवादन करून पुढे वळसा घालून आलो .रस्त्याच्या बाजूला भव्य जिमनॅसीयम, महिला होस्टेल्स, नर्सिंग स्कूलच्या इमारती तसेच निवासी इमारती डोळे दिपून घेत होत्या. आपण कराडमध्ये आहोत की परदेशात आहोत असं वाटत होतं. या इमारतीच्या चारी बाजूला, सभोवताली शेजारी, अलीकडे, पलीकडे जाणीवपूर्वक निर्माण केलेली हिरवाई आणि वृक्षलागवड पाहून मन प्रसन्न होत होते. एवढी सुंदर आणि मोहक झाडे या ठिकाणी लावलेली आहेत की आपण या झाडांच्याच प्रेमात पडतो. ही झाडे पाहून मनाला आनंद तर मिळतोच तर शिवाय आपणही झाडांच्या इतकं उंच व्हावं, सतत हिरवगार राहावं आणि ऊन वारा पाऊसरूपी कसलंली संकट आली तर खचू नये, एवढं मात्र नक्की शिकायला मिळतं.


तसाच पुढे गेल्यानंतर कृष्णा विद्यापीठ परिसरातील फार्मसी कॉलेजच्या समोर रस्त्यावर येऊन माझी पावले थांबली. रस्त्याच्या मध्यभागी एक भला मोठा वृक्ष उभा होता, या वृक्षाला वळसा घालून रस्ता पुढे गेला होत. हा वृक्ष रस्त्याच्या मध्यभागी येऊन सुद्धा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कृष्णा विद्यापीठाने तथा डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांनी केल्याचे पाहून खूप आनंद झाला. मध्यभागी असलेल्या या वृक्षाला संरक्षित करून 'मी सर्वात जुना वृक्ष आहे आय एम द ओल्डेस्ट हिअर ' अशी सोनेरी पाटी या झाडावर लावलेली पाहायला मिळाली. येथून रस्ता जात असताना मध्यभागी आलेला हा महाकाय वृक्ष तोडणे खरंतर फार अवघड नव्हते. हा वृक्ष तोडून आणखीन शंभर झाडे कृष्णा विद्यापीठात डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांना लावता आली असती .मात्र सर्वात जुना हा वृक्ष वाचवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला खरंच दाद दिली पाहिजे, सलाम केला पाहिजे. 

रस्त्याच्या मध्यभागी  असे महाकाय वृक्ष आणि आणि उंच डेरेदार वृक्ष आपण या अगोदर पाहिले असतील. पण ही दृश्यं अमेरिका ,इंग्लंड, फ्रान्स  अशा पाश्चात्त्य देशात पाहायला मिळतात. काळाच्या ओघात रस्ते रुंदीकरण आलेच, रस्ते मोठे झाले पाहिजेत. मात्र रस्ता जिथून जातो तिथे जर जुने वृक्ष येत असतील तर ते वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. रस्ते कुठेही बांधता येतील मात्र जुने वृक्ष पुन्हा तिथे उभं करणे अवघड असते. हाच दृष्टिकोन डोळया ठेवून समोर ठेवून डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या कल्पकतेतून कृष्णा विद्यापीठ परिसरातील हा उंच वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याबद्दल खरंच कृष्णा विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. सुरेश बाबा भोसले यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. हा वृक्ष पाहून त्यानंतर मी पुढे असलेल्या लायब्ररी समोरील सेंटर पार्क मध्ये गेलो. तिथेही अशाच प्रकारचा उंच असा एक पिंपळ वृक्ष जपला आहे. या झाडाशेजारी बसूनच हे सर्व लिहिण्याचा आनंद मला लुटला.


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..!

सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२

ता.क.
हा ब्लॉग लिहून झाल्यानंतर त्या वृक्षसंवर्धन डॉ. विनायक भोसले यांना फोन केला.  यावेळी त्यांनी  एक इंटरेस्टिंग माहिती सांगितली. कृष्णा विद्यापीठ परिसरात जे वृक्ष, झाडी आणि हिरवाई फुलली आहे, या सर्व झाडांना पाणी कुठून येते ? कृष्णा रुग्णालयात बाथरूम ,वॉश बेसिन मध्ये वापर करून जे सांडपाणी गोळा होते, ते सर्व पाणी एका ठिकाणी गोळा केले जाते. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एटीपी प्लांटमध्ये हे सर्व पाणी आणून ते स्वच्छ केले जाते आणि हे स्वच्छ केलेले पाणी पाईप लाईन मधून या सर्व झाडांना घातले जाते, असे विनायक भोसले यांनी मला सांगितले. पर्यावरणप्रेमी डॉ. सुरेश बाबा भोसले यांच्या या कल्पनेला दाद दिली पाहिजे.

#Vinayak Bhosale  #savetrees #oldesttrees

२७ ऑक्टोबर २०२३

तुम अतीत़ हों...


तुम अतीत़ हों...

गेलेला काळ, बीता हुआ कल किंवा अतीत म्हणा.. एक सुखद किंवा दुःखद आठवणीने भरलेला असतो. या काळात आपल्याला अनेक सुखद आठवणीने भरून ठेवलेलं असतं. जुन्या आठवणी आपल्याला ताज्यातव्याना करतात, आनंद देतात.. तर कधी कधी दुःखही देतात. 

लहानपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात,पण 'बिता हुआ कल' म्हणजे फक्त लहानपणीचा काळ नव्हे तर तुमच्या गत आयुष्यात घडलेल्या सुखद घटना किंवा तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट देणाऱ्या काही प्रेरणादायी घटना तसेच तुम्हाला उध्वस्त करणाऱ्या काही दुःखद घटनाही असतील. या घटना तुम्ही आयुष्यभर कधी विसरत नाही, तो क्षण देणारी ती व्यक्तीही कधी विसरू शकत नाही.

हा 'अती़त'' आपल्याला काही गोष्टी शिकवून जात असतो, परिणाम देत असतो. 'त्या' सोबत राहायला माणसाला खूप आवडतं. असं म्हणतात आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करायचा नसतो,सतत पुढे जायचं असतं. 'सिलसिला' मध्ये संजीव कुमार पत्नी रेखाला एक गोष्ट बोलून जातो, 'अती़त को एक मिठी याद समझ़कर भूल जाना चाहिए'... पण हा 'अती़त' विसरणं अशक्य असतं जर तो अती़त एखादी व्यक्ती असेल तर. कारण त्या व्यक्ती सोबतच्या आठवणी तसेच घडलेल्या काही गोष्टी आपल्या मनावर अतिशय खोलवर बिंबलेल्या,कोरलेल्या असतात. त्या गोष्टी किंवा ती व्यक्ती आपण कधीच विसरू शकत नाही. 

'बिता हुआ कल' प्रेरणादायी असतो, वेदनादायी असतो, सतत जवळ असतो त्रासदायक पण असतो. मात्र अनेकदा आपल्याला जेव्हा पुन्हा वाईट प्रसंग येतात तेव्हा तो जुना काळ आठवला की तो कल, ती आठवण 'औषध' म्हणूनही काम करत असतो. अशा या 'अतीत' विषयी सहज चार ओळी बाहेर पडल्या...

तुम अतीत़ हो...
पर सबसे करीब हों !

तुम अतीत़ हों...
पर सबसे खुब़सुरत हों !

तुम अतीत़ हों...
पर तकलिफें खुब़ देते़ हों !

तुम अतीत़ हों...
पर दवा़ भी तुम ही़ हों !

सतीश मोरे सतिताभ
२७.१०.२०२३

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...