फॉलोअर

०९ जुलै २०२१

विजयनगर येथील गोशाळेत.

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
९ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आज निसर्गवारी थोडी उशिरा सुरू झाली,याचं कारण आमचं वाहन हायवेजवळ आल्यानंतर पंक्चर झाले. मात्र पाच मिनिटात माउलींनी व्यवस्था केली. हायवेवरच्या एका पंपाशेजारी पंक्चर काढून त्यानंतर साडेसहाच्या दरम्यान आम्ही वारुंजी फाटा येथे पोहोचलो. तेथे वाहन ईसुझी एका हॉटेलसमोर उभे केले. आमच्या विसाव्याच्या ठिकाणी वाहन पोहोच करण्यासाठीची व्यवस्था करुन आम्ही तिथून चालावयास सुरुवात केली.
आमची वारी होती विजयनगर येथील गोशाळेत.वारुंजी फाट्यावरून आम्ही चालायला सुरुवात केल्यानंतर नुकताच तयार झालेला राष्ट्रीय महामार्ग १६९ ई आमच्यासाठी खुला होता, मोकळा होता. वाहनांची संख्या कमी होती. हरिपाठ करत करत आम्ही शासकीय शेती महाविद्यालयासाठी पोहचलो. या ठिकाणी आमच्या आठवणीसाठी एक फोटो काढताना जणूकाही आम्ही या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत काय असा फिल आमच्यातल्या काही जणांना आला. पुढे विजयनगर गाव जवळच होते गावात प्रवेश केला. प्रवेशद्वाराजवळच सुनील पाटील आमची वाट पाहत होते. त्यांचे जवळचा एक सहकारी आज कोव्हिडमुळे मरण पावल्यामुळे ते आमच्यासोबत सहभागी होणार नव्हते त्यांची भेट घेऊन आम्ही पुढे चालू लागलो.
विजयनगर या गावाविषयी आजच्या या वारीमध्ये मी आपणास सविस्तर माहिती सांगणार आहे. या गावात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही महाकाली मंदिराचे जाऊन देवीचे दर्शन घेतले. या गावात अनेकदा आलो मात्र मंदिरात जाण्याचा योग आला नव्हता.बाहेरूनच या मंदिराची भव्यता नेत्र सुखावत होती. आज प्रत्यक्ष आम्ही सर्वजण या मंदिरात प्रवेश केल्यानंतर खुप आनंद झाला. कोयना धरणाच्या पायथ्याशी असलेले हे गाव स्थलांतरित होऊन दोन-तीन ठिकाणी विस्थापित झाले. यापैकी महत्त्वाचा भाग म्हणजे विजयनगर. १९५९ साली कोयना धरणाच्या कामासाठी गोजेगाव सहित कोयनानगर खोऱ्यातील अनेक गावे शासनाने ताब्यात घेतली. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक अनेक गावे होती. धरणासाठी हे सर्व क्षेत्र संपादित केल्यानंतर ही गावे इथून बाहेर काढण्यात आली. पुनर्वसनाच्या कायद्यानुसार त्यांचे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन झाले. गोजेगाव हे गाव कराड जवळील मुंडे गावाजवळ तसेच चिंचणी अंबक, राममळा आणि नवी मुंबईतील काही परिसरात विस्थापित करण्यात आले. गावातील शेतकऱ्यांना या विस्थापित झालेल्या नवीन गावात जमिनी देण्यात आल्या.
१९५९ मध्ये गोजेगाव कराड तालुक्यात आल्यानंतर १९८५ अखेर मुंडे ग्रामपंचायत अधिपत्याखाली या गावाचे कामकाज सुरू होते. गोजेगावसह सहा गावाची मुलकी पाटीलकी असणारे जमीनदार राघोजी बहिरू पाटील यांनी कराड जवळील मुंडे या गावात येण्याचा निर्णय घेतला. (स्व. राघोजी पाटील हे माजी आमदार आनंदराव पाटील यांचे वडील आहेत) राघोजी पाटील यांना रामचंद्र, जयराम, आनंदराव, विश्वासराव, वसंतराव आणि दिलिप ही सहा मुले आणि दोन मुली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राघोजी पाटील यांची ३६५ एकर जमीन गेली. एवढी जमीन कोयना धरणाच्या निर्मितीसाठी देणारे राघोजी पाटील यांच्या कार्याला खरंच सलाम करावासा वाटतो.
राघोजी पाटील यांचा लाकडाचा व्यवसाय होता. मालकीचे दोन ट्रक होते. या निमित्ताने कराडचा संबंध आणि येणेजाणे होतेच. कराडात मुंडे येथे आल्यानंतर नवीन गाव व ग्रामस्थासोबत जुळवून घेतले. गोजेगावच्या शेतकऱ्यांना मुंडे गायरान तसेच वन विभागाची जमीन देण्यात आली. कोयना विभागाच्या अगदी वेगळी नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेऊन कामाला सुरुवात केली. अगोदरच विस्थापित झालेल्या या गोजेगावाला पुन्हा एकदा १९८० मध्ये विस्थापित होण्याची वेळ आली. वीज कंपनीच्या (MSEB) ४०० केव्ही आणि २२० केव्ही अशा दोन वेगवेगळ्या भव्य सबस्टेशनसाठी या गावातील जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय सरकारने घेतला.कोयना धरणासाठी जमीन सोडून या गावाकडे आलो, मात्र येथील जमीन पुन्हा वीज कंपनीसाठी जाणार हे कळल्यावर ग्रामस्थ नाराज झाले. मात्र त्या वेळचे जिल्हाधिकारी व्ही.पी. राजा यांनी ग्रामस्थांची बाजू घेतली. ( त्याकाळात धरणग्रस्तांची बाजू घेणारे जिल्हाधिकारी होते हे किती मोठे भाग्य !) युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व इंटक वीज या कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पाटील आणि तत्कालीन जिल्हा परिषद शेती सभापती जगन्नाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभी राहिली. या संघटनेने बाजू मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विस्थापित गावाची जमीन तुम्ही पुन्हा घेऊ शकत नाही, असे वीज कंपनीला ठणकाऊन सांगितले. शेवटी तडजोडीचा मार्ग निघाला आणि मुंडे आणि विजयनगर या दोन्ही गावातील ज्या लोकांची जमीन या वीज केंद्रासाठी जात आहे त्या कुटुंबांतील एकाला एमएसईबी मध्ये नोकरीला घ्यायचा अटीवर ही जमीन सबस्टेशनला देण्यात आली. मात्र एकत्र कुटुंबातील प्रत्येक भावाच्या एका मुलाला वीज कंपनीमध्ये कामावर घ्यावेच लागेल असा आग्रह आनंदराव पाटील यांच्यासह सर्वानी धरला. वीज कंपनीने ही मागणी मान्य केली. सरासरी घरटी एक जण नोकरीला लागला आणि त्या ठिकाणी वीज केंद्र उभे राहिले. या सब स्टेशन मध्ये कोयनानगर होऊन आलेले वीज आणली जाते आणि ही वीज महाराष्ट्रातील संपूर्ण कानाकोपऱ्यात पुरवली जाते.
मुंडे ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली असलेल्या गोजेगाव या ग्रामस्थांनी 1985 झाली स्वतंत्र ग्रामपंचायत मागितली. राघोजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली याला मंजुरी मिळाली. स्वतंत्र झालेल्या गावाला विजयनगर हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. वीज कंपनीच्या शेजारी कोयना धरणातील विस्थापित गाव म्हणून विजयनगर हे नामकरण करण्यात आले. १९८६ ते १९९६ दहा वर्षे या गावाचे सरपंच म्हणून आनंदराव पाटील यांनी काम पाहिले. त्यानंतरच्या काळात त्यांचे बंधू वसंतराव पाटील,पुतणे सुनील पाटील या गावचे सरपंच होते. या गावाने अनेक शासकीय पातळीवरील अभियानात भाग घेऊन पुरस्कार मिळालेले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात स्वच्छता अभियान, निर्मल ग्रामसहित अनेक उपक्रम राबवले गेले. नियोजनबद्ध असलेल्या गावात आपण कधीही भेट दिली तर स्वच्छता स्वच्छता दिसते.
स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने आनंदराव पाटील यांनी लोकवर्गणीतून ग्रामदैवत महाकाली मंदिर उभे केले आहे. या मंदिरात महाकालीसह जानाईदेवी, चंडीकादेवी, केदारनाथ, तुळाईदेवी, झोळाईदेवी मुर्ती स्थापित करण्यातआल्या आहेत. मंदिरासमोर तत्कालीन खासदार प्रेमलाताई चव्हाण यांच्या फंडातून 1987 झाली अतिशय भव्यदिव्य सभामंडप उभारला आहे. तर सभागृहातील सुशोभीकरण आणि परिसर पेविंग ब्लॉक आदी कामे आ. आनंदराव पाटील यांनी यांच्या फंडातून पूर्ण झाली आहेत. या हॉलमधे एकाच वेळी पाचशे लोक बसू शकतात इतकी चांगली सोय आहे. प्रत्येक वर्षी या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशा या महाकाली मंदिरात आम्ही काही काळ विसावा घेतला देवीचे दर्शन घेतले आणि पुढे चालू लागलो.
*विजयनगर या गावाविषयी अलीकडच्या पिढीला खूप कमी माहिती आहे, या गावात जाण्याचा योग निसर्गवारीच्या निमित्ताने आल्यानंतर मुद्दामहून या गावाची माहिती आणि या ग्रामस्थांचा त्याग जनतेला कळावा म्हणून ही सर्व माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे.*
कोयना धरणाच्या निर्मितीसाठी अनेकांनी योगदान दिलेले आहे, अनेकजण आपली घरे जशीच्या तशी आहे तिथे सोडून ते दुसर्या गावात विस्थापित झाले आहेत. राघोजी पाटील यांच्यासारखी महान दानशूर व्यक्ती ३६५ एकर जमीन देतात, बदल्यात तुटपुंजा मोबदला आणि १६ एकर जमीन घेतात, त्याग करतात तेव्हाच कोयना धरणासारखा महान प्रकल्प उभा राहू शकतो. राज्यभरात अनेक प्रकल्प उभे राहत आहेत मात्र त्या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी जातात त्यांचे पुनर्वसन करणे आज देखील शासनाला जमलेले नाही, हे दुर्दैव आहे. कोयना धरण पुनर्वसन धरणग्रस्तांच्या समस्या आजही तशाच आहेत.
विजयनगर सारख्या गावाने मिळेल तेवढी शासकीय मदत घेऊन कराडजवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्या काळात जमिनी कमी मिळाल्या. मात्र शहराजवळ राहून हे गाव आहे अतिशय प्रगत झाले आहे. या गावातील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित आहेत. मोठ्या पदावर काम करत आहेत.
या गावातून बाहेर पडत आम्ही आमच्या विसाव्याच्या ठिकाणी गोशाळेकडे निघालो. आनंदराव पाटील यांचे धाकटे बंधू वसंतराव पाटील (भाऊदा) यांनी काही वर्षांपूर्वी स्वतःच्या जागेत सामाजिक बांधिलकीतून गोशाळा सुरू केली आहे. डोंगराच्या पायथ्याशी सहा एकर क्षेत्रात गोशाळा आहे. सुरुवातीचे काही काळात 50 हून अधिक गाई होत्या,गोप्रेमीकडून या शाळेला मदत केली जात होती. भाऊदा या गोशाळेसाठी पूर्णवेळ काम करत असतात. वनौषधी करणे, गोमुत्रापासून वेगवेगळे घटक तयार करण्यापासून शेणाच्या वस्तू तयार करण्यासाठी तेथे कार्यरत असतात. आनंदराव पाटील यांचे थोरले बंधू रामचंद्र पाटील (दादा) हे जुन्या काळातील आयुर्वेद तज्ञ होते. कोयना भागात त्यांनी अनेक वर्षे रुग्णसेवा केली, नाडी परीक्षणामध्ये त्यांचा हातखंडा होता. कोणत्याही प्रकारच्या जर्जर आजारावर ते आयुर्वेदिक औषध देत. आयुष्यभर त्यांनी विनामोबदला रुग्णांची सेवा केली.अतिशय त्यागाने त्यांनी हे व्रत जपले होते. गोशाळेमध्ये त्यांचा हा वारसा आता वसंतराव पाटील चालवत आहेत.
गोशाळेत एक ध्यान मंदिर तयार करण्यात आले आहे. या परिसरात मी यापूर्वी तीन वेळा जाऊन आलो आहे. मध्यंतरी दोन दिवस या गोशाळेत मुक्काम केला आहे. गोशाळेपासून जवळच डोंगरावर पांडवकालीन लेणी आहेत तसेच जवळच डोंगरावर जानाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परिसरातील अनेक गावांचे श्रद्धास्थान आहे. गोशाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. सध्या सहा गाई असून गाईंच्या सेवेसाठी वसंतराव पाटील व त्यांचा स्टाफ कार्यरत असतो.
कराडपासून जवळच एक छोटीशी ट्रीप करण्यासाठी हे अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. गोशाळा परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उंच डोंगरावरील घनदाट वृक्षारोपण आणि मोठ्या प्रमाणात मोरांची संख्या. घनदाट अशा झाडीतूनच आपण ह्या गोशाळेकडे आपल्याला जावे लागते. डोंगरावर असलेले वृक्षसंपदा आणि अन्न असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर पक्षी आहेत. मध्यंतरी मी येथे ५० हून अधिक मोर एकाच वेळी पाहिले होते. दिवसभर या परिसरात मोरांचा आवाज ऐकू येत असतो.मोरांना या गोशाळेत खुला प्रवेश असतो. मोरांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी खोल भांडे ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे. मोरांच्या सान्निध्यात गोशाळा, पांडवकालीन लेणी आणि जानाईदेवी मंदिर अशी एक छोटीशी एक दिवशी ट्रिप येथे होऊ शकते.
या ही जागा याअगोदर पाहिल्यानंतरच या ठिकाणी निसर्ग वारीत झाडे लावावीत असा संकल्प केला होता आणि आज तर प्रत्यक्षात उतरला. वसंतराव पाटील भाऊदा यांच्या हस्ते निसर्ग वारकर्यांनी याठिकाणी पाच झाडे लावली. याकामी वैभव जाधव आणि मेजर या दोन सहकार्याने खूप कष्ट घेतले. आमचे या ठिकाणी स्वागत झाले ते औषधी काढा पिऊन. या ठिकाणी तयार होत असलेल्या औषधे वनस्पती बरोबरच चहाचा काढा खूप प्रसिद्ध आहे. चहा पिल्यानंतर आम्ही ताजेतवाने झालो. निरोप घेतला आणि आम्ही या निसर्गरम्य वातावरणातून घराकडे परतलो.
आजच्या निसर्गरम्य वारीमध्ये निसर्गरम्य वातावरण तर होतेच शिवाय पुनर्वसित गावाचा इतिहास ऐकायला मिळाला. गोशाळेत जाऊन झाडे लावण्याचा आनंद मिळाला. त्यामुळे आजची वारी खूप आनंददायी झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

०८ जुलै २०२१

कराडजवळच्या वारुंजी गावात.

 निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
८ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आमच्या निसर्ग वारीने कराड तालुक्यातील कराड उत्तरचा भाग गेल्या सात दिवसात पूर्ण केला आहे किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.आजपासून आमची वारी पुढील बारा दिवस कराड दक्षिणच्या कोयना कृष्णा नदीकाठावर असलेल्या गावामध्ये असणार आहे .
आज आमची निसर्गवारी होती कराडजवळच्या वारुंजी गावात. सकाळी सव्वा सहा वाजता आम्ही वारुंजी फाट्यावर पोहोचलो. गेली दोन दिवस आजारी असल्यामुळे येऊ न शकलेले आमचे वारकरी रणजीत पाटील आज स्वतः गाडी घेऊन वारुंजी फाट्यावर आले होते. या ठिकाणी असलेल्या श्री गणेश मंदिरासमोर आम्ही एकत्र आलो. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून अतिशय सुंदर मंदिर परिसरातर काही काळ विसावलो. या परिसरातील नागरिकांनी गणेश मंदिर परिसर अतिशय चांगल्याप्रकारे विकसित केला आहे. या मंदिरात गणेश चतुर्थीला फार गर्दी असते. दिवसभर भाविक याठिकाणी येतात. मंदिरातील पूजा विधी सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या जातात. थकलेल्या, दमलेल्या पादचरींना विसावा मिळावा यासाठी येथे बेंचेस ठेवलेले आहेत.गणपतीला नमन करून आम्ही वारुंजी गावात निघालो.
आजचा वारी प्रवास नेहमीप्रमाणे निसर्गरम्य परिसरात होता. अंतर थोडे होते मात्र नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे सहा किलोमीटर वारी झाली पाहिजे असा विचार करून आम्ही गावाकडे निघालो. जरा पुढे आल्यानंतर ग्रामपंचायत ऑफिस समोरून जुने वारुंजी गावाकडे वळालो. वारुंजी गावात ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. वारुंजी हे बागायतदार गाव आहे. या गावात अनेक प्रगतशील शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी राबवलेले प्रयोग पाहण्यासाठी बाहेरगावचे अनेक लोक येतात. वारुंजी, केसे,पाडळी,गोटे हा भाग हे भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम झाला आहे. हरिपाठ सुरू केला. आज माऊलींची वारी असती तर आज आम्ही जेजुरी मध्ये पोहचलो असतो.सासवड ते जेजुरी असा प्रवास केला असता, या पायी दिंडीमध्ये आणि दुपारी विसावा कुठे केला असता? काय केले असते? या आठवणी जाग्या झाल्या.
आम्ही जुने वारुंजी गावाजवळ पोहचलो,रस्त्याला वेताळेश्वर हे वारुंजीचे ग्रामदैवत मंदिर पाहिले. येथून पुढे आल्यानंतर वारुंजीच्या वरूणेश्वर मंदिरा समोर थांबलो, या मंदिरा शेजारी १८४२ साली बांधलेला एक दगडी पार आहे, पारा वरील शिलालेखात तसा उल्लेख आहे.या पारावर फार जुने उंच पिंपळाचे झाड आहे. हा पार जर १८४२ सालचा असेल तर हा पिंपळाचा वृक्षही त्या दरम्यानच लावलेला असावा. इतका जुना पिंपळाचा वृक्ष पाहून आम्ही नतमस्तक झालो. हे पिंपळाचे झाड काही महिन्यापूर्वी या झाडाखाली लावलेल्या अगरबत्त्यामुळे पेटले होते.आग विजवण्यासाठी ग्रामस्थांनी कराड नगरपालिकेचा अग्निशमन बंब आणला.गेल्या पाच सहा महिन्यात या झाडाने पुन्हा भरारी घेतली आहे.हे झाड मरणार नाही याची ग्रामपंचायतीने फार काळजी घेतली आहे.
पिंपळाचा जुना वृक्ष आणि दगडी पार यावरून वारुंजी हे किती जुने गाव आहे, हे लक्षात येते. आपण वारुंजी फाटा आणि नवीन गाव नेहमी पाहतो. मात्र जुन्या वारुंजी गावात कोयना काठावर जाऊन हे जर गाव पाहिले तर या गावाची भव्यता लक्षात येते. 1967 च्या भूकंप,कोयना धरण निर्मिती तसेच वेळोवेळी आलेल्या भीषण पुरानंतर महाराष्ट्र शासनाने हे गाव नदीपासून वरच्या भागात पुनर्वसित करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात पाणी व्यवस्थापनामध्ये अडचणी येऊ नयेत किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर नदीकाठच्या गावांना धोका पोहोचू नये म्हणून कोयनाकाठची वारूंजी,सुपनेसह अनेक गावे नदी काठापासून वरच्या बाजूला पुनर्वसित करण्यात आली. लोक जुनी घरे, वाडे जशीच्या तशी सोडून नवीन भागात राहायला आले. जुन्या गावात आम्ही आज जेव्हा गेलो तेव्हा गावाच्या अनेक स्मृती पाहायला मिळाल्या. अजूनही सुस्थितीत असणारे दोन तीन भव्य वाडे पाहिल्यानंतर या गावाची सुबत्ता लक्षात आली. कोयना नदी काठावरील या गावातील हे भव्यदिव्य वाडे पाहिल्यानंतर या गावातील शेतकरी किती सधन होते,याचा अनुमान आला.खरं तर या जुन्या वाड्याची डागडुजी होणे गरजेचे आहे, हे वाडे ज्यांच्या मालकीचे आहेत त्यांच्या वारसदारांनी आपल्या जुन्या पिढीचा वाडारूपी आठवणी जपून ठेवल्या पाहिजेत,असे मला वाटले. जुन्या गावात राहायला शासनाकडून परवानगी नसल्यामुळे सारे ग्रामस्थ, या वाड्याचे मालक नवीन गावात स्थायिक झालेले आहेत.
गावाला फेरफटका मारला, रस्त्यात आणि शेतकरी भेटले ग्रामीण जीवन पाहायला मिळाले. गुराळाचे एक मोठं धुराडं दिसलं. या गावात पूर्वी अनेक गुराळं होती, काळाच्या ओघात ती बंद झाली. पुढे चालत आम्ही केंद्रीय जल आयोगाच्या इमारतीजवळ पोहचलो.कोयना आणि कृष्णा नदीच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याचा पाणी उंचीचा नोंदी करण्यासाठी कराडमध्ये जल आयोगाची दोन कार्यालये आहेत. त्यापैकी एक कार्यालय जुन्या वारुंजी गावात आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी येथे पोहोचल्यानंतर या पाण्याची उंची किती आहे,पाण्याचा वेग किती आहे, किती क्सुसेक्स पाणी आहे याची माहिती या कार्यालयात संकलित केली जाते. अशाच प्रकारचे जल आयोगाचे दुसरे कार्यालय रुक्मिणीनगर (कराड) मध्ये आहे. याठिकाणी कृष्णा कोयना संगम झाल्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याचे उंचीचे व्यवस्थापन केले जाते, याच्या नोंदी ठेवल्या जातात. स्टेशन रोडवरील कृष्णा पुलावरून कृष्णा नदीत वायर रोपला बांधलेली जी बोट दिसते, ती बोट केंद्रीय जल आयोगाच्या मालकीची आहे. वारुंजी येथील केंद्रीय जल आयोगाच्या या इमारतीपासून आम्ही तसेच पुढे चालत आलो. हा रस्ता हायवेला जाऊन मिळतो. हायवे पर्यंत जाऊन पुन्हा आम्ही वारुंजी फाट्यावर गणेश मंदिरापर्यंत पोहोचलो आणि आमचा पायी वारीचा साडे पाच किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला. आज आम्ही वारुंजी गावाला प्रदक्षिणा घातली.
साडेसात वाजले होते,आमचे वाहन ताब्यात घेऊन आम्ही थेट वारुंजी स्मशानभूमीमध्ये पोहचलो. याठिकाणी उपसरपंच अनुज पाटील आणि त्यांचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आमची वाट पाहत बसले होते. वारुंजीची स्मशानभूमी मोठ्ठी आहे. या स्मशानभूमीमध्ये आम्ही वडाचे एक झाड लावले. जुने वारुंजी उठून नवीन वारुंजी वसले. अनेक वर्षे या नवीन गावाला गावठाण दर्जा मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते .ग्रामस्थांनी शासन दरबारी प्रयत्न केले. नुकताच नवीन गावाला नवीन गावठाण दर्जा मिळाला आहे,असे आम्हाला आमच्या अनुज पाटील यांनी सांगितले. मंदिरा समोर बसून आम्ही नाष्टा घेतला आणि पुन्हा अनुज पाटील यांच्या निवासस्थानी चहा घेतला.
यावेळी आळंदी वारीमधील एक सहकारी हरिभाऊ गरुड भेटले, ते दुचाकीवरून ऊसाचे ओझे घेऊन आले होते. वारकरी वारसा असलेले हरिभाऊ गरुड आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले.त्यांच्या घरात चरण धुवून महिला माऊलींनी आमचे औक्षण केले,स्वागत केले.हे स्वागत हे आमचे नव्हते तर आमच्यातील वारकऱ्याचे होते, माऊलींचे होते, विठ्ठलाचे होते.निसर्गवारी करणाऱ्या आम्हा वारकऱ्यांमध्ये आता विठ्ठल वसलेला आहे. खरंतर चराचरामध्ये विठ्ठल आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये विठ्ठल आहे. सर्वांनी एकमेकाचे पाया पडून दर्शन घेतले. वारकरी संप्रदायमध्ये सर्वजण समान असतात, कोणी लहान असतो कोणी मोठा नसतो. येथे सर्व जण एकमेकांच्या पाया पडतात आणि एकमेकाला माऊली म्हणतात. आज तो आनंदाचा क्षण आणि अनुभवला.
आजची आमची वारी आनंदमय झाहली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

०७ जुलै २०२१

तळबीड फाटा

 निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
७ जुलै २०२१
निसर्गवारीचा आजचा दिवस खरंतर तासवडे टोलनाका ते तासवडे एमआयडीसी परिसर असा नियोजित होता. मात्र तासवडे एमआयडीसी परिसरात आम्हाला आवश्यक असे नैसर्गिक वातावरण पाहायला जायला खूप अंतर जावं लागत होतं आणि त्यामुळे पुढारीचे वार्ताहर प्रवीण माळी यांच्या सूचनेनुसार आम्ही थोडासा बदल करून आमची निसर्ग वारी तळबीड फाटा येथून सुरू केली.
सहा वाजता हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी मोहिते यांच्या गावाच्या प्रवेशद्वारावर (तळबीळ फाटा) येथे आम्ही पोहोचलो. तळबीड गावाला जाणारा फाट्यापासूनचा संपूर्ण रस्ता निसर्गाची खाण आहे,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दोन्ही बाजूला हिरवंगार उस, सोयाबीन पीक, समोर किल्ले वसंतगड,गडाच्या पायथ्याशी हिरवीगार झाडी,थंड हवा आणि नैसर्गिक विपुलता. अशा या प्रसन्न वातावरणात आम्ही चालायला सुरुवात केली. हरिपाठ सुरू होता, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वनसंपदेकडे लक्ष होते. पक्षी, फुले, पाने, झाडे, पाणी,प्राणी, डोंगर नदी या सर्व पासून तयार झालेला निसर्ग. यातून चालत असताना रस्त्याला दोन्ही बाजूने असणारी निरगुडीची विपुल वनस्पती आणि वेगवेगळ्या वनस्पतींच्या वेलीकडे लक्ष गेलं.निरगुडीची मोठ्या प्रमाणात असणारी झाडे आणि त्याची तटबंदी कुंपण केलेली शेती, घरं आम्ही पाहिली.निरगुडी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे, अनेक आजारात निर्गुडीचा पाल्याचा रस किंवा लेप दिला जातो. खेडेगावात निरगुडीचा उपयोग खराटा म्हणून तसेच ताटी बांधण्यासाठी केला जातो.
साडेसहाच्या सुमारास तळबीड गावाच्या जवळ पोहोचलो तेव्हा लांबूनच श्रीराम मंदिराचे ३ कळस दिसू लागले. सकाळच्या कोवळ्या उन्हात हे सोनेरी कळस अजून उजळून दिसत होते. साई किरण महाराजांनी बांधलेले श्रीराम मंदिर गावची शान वाढवते. या कळसाचे आम्ही दुरूनच दर्शन घेऊन माऊलीना नमस्कार केला.
गावात प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या उजव्या बाजूला असणारा महाकाय वड वृक्ष पाहून आमची पावले थांबली आणि हात जोडले गेले. हा वृक्ष किती वर्षांपूर्वीचा असावा याचा विचार मनात आला. त्या वृक्षाच्या सावलीखाली कोण कोण बसले असेल? या वृक्षाने आज अखेर किती पक्षी, प्राणी आणि माणसांना उनवाऱ्यापासून निवारा दिला असेल? हा विचार आला. वडाचे झाड भक्कम आणि उंच असते. आपण वडाची झाडे लावत आहोत,आपण लावलेला वडाच्या झाडाचा अजून काही वर्षांनी एवढाच मोठा वृक्ष होईल असे आम्हाला वाटलं. पुढे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दुरूनच दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आमचा विसावा बेलदरे खिंडीत असणाऱ्या मंदिराजवळ होता. ही खिंड आमच्यासाठी नवीनच होती, या अगोदर पाहिली नव्हती.त्यामुळे रस्ता विचारत आम्ही गावाबाहेर आलो. या रस्त्यावरून एमआयडीसीचा शेवटचा भाग आम्हाला दिसत होता. पुढे हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात चालत राहिलो.
आता गाव खूप मागे राहिलं होतं, थोडासा चढाचा रस्ता लागला. समोर किल्ले वसंतगड अतिशय सुंदर दिसत होता. आम्हाला जिथे पोहचायचे होते ती खिंड जवळ आहे असे वाटत होते मात्र चालत राहिलो तरी ती खिंड जवळ येत नव्हती. दुरून डोंगर साजरे याचा अर्थ काय असतो हे आम्हाला समजले. खरंच डोंगर पाहायला गेलं तर ते जवळ दिसतात मात्र प्रत्यक्ष चालत जातो तेव्हा तो लांब असतो .चालायला सुरुवात करतो तेव्हाच हे कळतं. थोडासा चढाचा रस्ता आल्यानंतर आम्हाला आमचा वेग मंदावला. आम्ही हळूच चालत राहिलो. या उंच ठिकाणावरून पाठीमागे तळबीड गाव अतिशय सुंदर दिसत होते तर पुढे मंदिरावरील भगवा झेंडा आम्हाला दिसू लागला.आम्ही तिथे जाऊन पोहचलो. उंचावरून नजारा पाहिल्यानंतर आमचा कंटाळा निघून गेला,भान हरपून गेलं.
बेलदरे गावच्या हद्दीत उंचावर असणारे नाईकबा मंदीर आणि त्या ठिकाणी विकसित केलेला परिसर अतिशय सुंदर असा आहे. मंदिराच्या समोर असणाऱ्या पर्यटक गॅलरीतून उंच ठिकाणावरून आम्ही बेलदरे , म्होप्रे, विहे गावे दिसत होती. पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा समोर होत्या. बेलदरे खिंडीत असणारे हे नाईकबा मंदिर फार प्राचीन आहे. नाईकबा मंदिराबाबत सुद्धा आख्यायिका आहे. तळबीड गावातील एक भक्त ढेबेवाडी नाईकबा येथे हा दर्शनासाठी जायचा. वृद्ध झाल्यानंतर त्याला जाणे अवघड झाले. शेवटी त्यांनी देवाला विनंती केली आणि देव त्याच्यासोबत तळबीड गावाकडे यायला निघाला. मात्र देवाने घातलेली मागे न पाहण्याची अट त्याने मोडली.तळबीड समोर दिसत होते मात्र या डोंगरावर त्यानं पाठीमागे पाहिले आणि नाईकबा देवाने तिथेच आपला मुक्काम केला. तेच हे ठिकाण.
हे नाईकबा मंदिर तळबीडच्या हद्दीत आहे कि बेलदरेच्या यावरून दोन्ही गावांत वाद होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्या डोंगराचे दोन भाग करून ह्या मंदिराचा भाग बेलदरे हद्दीत असल्यामुळे हे मंदिर बेलदरे ग्रामस्थांचा असल्याचा निवाडा दिला असे आम्हाला उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतले. या ठिकाणी आम्हाला पुजारी भेटले. त्यांच्याकडून मिळालेली माहिती अतिशय वेगळी होती. बेलदरे गावातील मराठा समाजातील 32 भावक्या आहेत त्यांच्याकडे या मंदीराच्या पूजेची दिवाबत्तीची जबाबदारी असते. बत्तीस भावकी या मंदिराचा कार्यभार पाहतात. अमावस्या ते अमावस्या असा एक महिन्याचा कालावधी प्रत्येक भावकीला मिळतो. त्या एक महिन्यात त्या भावकीचा व्यक्ती या मंदिरात राहतो, एक महिनाभर श्रीची पूजा करतो. अमावस्या आल्यानंतर हा कार्यभार पुन्हा दुसऱ्या भावकीच्या ताब्यात दिला जातो. मंदिराचा कारभार पुन्हा त्याच भावकीच्या ताब्यात येण्यासाठी 31 महिने वाट पाहावी लागते. संपूर्ण गावावर या मंदिराची जबाबदारी असल्यामुळे मंदीर परिसरात विकास अतिशय चांगला झालेला आहे. मंदिराच्या परिसरात कराडचे परशुराम रावजी शिंदे यांनी एक आड काढून दिला आहे ,त्याला भरपूर पाणी आहे. ग्रामस्थांनी पाइपलाइन करून पाणी या मंदिरात आणले आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या परिसरात रामघळ नावाचा एक भाग आहे, शेजारी खुप उंच टेकडी आहे त्या टेकडीवर सुमारे तीनशे एकर एवढे मोठे पठार आहे. गिर्यारोहण प्रेमीसाठी हे पठार एक पर्वणी आहे. मंदिराच्या समोरच वसंतगडावर जायला रस्ता आहे. या बाजूने वसंतगडावर जाण्याचा रस्ता अतिशय सोपा आहे असे आम्हाला ग्रामस्थांनी सांगितले.
या ठिकाणी काही वर्षांपूर्वी वसंतगडावर जाण्यासाठी मोठा रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. स्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रयत्नाने गडावर दूरदर्शनचे केंद्र होणार होते. हे केंद्र सुरू होण्याअगोदर या मंदिरासमोरून वसंतगडावर जाण्यासाठी रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले. सुमारे दोनशे मीटर रस्ता तयार करून झाला. मात्र पुढे हे दूरदर्शन केंद्र अजिंक्यताऱ्यावर स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आणि हे काम बंद पडले. याच परिसरात आम्ही उपस्थित असलेल्या पुजारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन वडाची झाडे लावली. ही झाडे लावण्यासाठी मंदिरातील सर्व लोकांनी हातभार लावला. खड्डे काढण्यापासून पाणी घालण्यापर्यंत तसेच त्या झाडाला कंपाउंड घालण्यापर्यंत जबाबदारी या मंदिरातील लोकांनी स्वीकारली.विष्णु कदम, महेश खांबे, विठ्ठल डुबल, मंथन खांबे, मंदार खांबे तसेच वाहागावचे अजित माळी, राजवर्धन माळी, प्रवीण यांचं ही झाडे लावण्यासाठी फार सहकार्य लाभले. डोंगरावर नाईकबा मंदिरासमोर दोन वडाची झाडे लावण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचा आम्हाला खूप आनंद झाला.
झाडे लावल्यानंतर मंदिराशेजारी असलेल्या एका शेडमध्ये बसून आम्ही नाश्ता केला. प्रवीण माळी यांनी आमच्यासाठी शेवयाचे उपीट आणले होते. याची चव माऊलींच्या भाषेत सांगायचे तर अमृताहून गोड होती. आम्ही नाश्ता करेपर्यंत मंदिरातील पुजारी मंडळींनी आमच्यासाठी आले, वेलदोडे टाकून अतिशय सुंदर असा ब्लॅक टी केला होता. या चहाची चव अजून सुद्धा जिभेवर रेंगाळत आहे.
चहा पिऊन आम्ही सर्व माऊलींचा निरोप घेतला आणि परतीच्या दिशेने निघालो. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गेल्या काही वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने तळबीड गावात सरसेनापती यांचे अतिशय सुंदर असे स्मारक तयार झाले आहे. या स्मारकाची निगा चांगल्या पद्धतीने राखली जाते. या ठिकाणी हंबीरराव मोहिते यांच्या स्मृती ग्रामस्थांनी जपून ठेवलेल्या आहेत. विजय दिवस समारोह समिती आणि भारतीय सेनेच्या वतीने सरसेनापतींच्या समाधीवर 16 डिसेंबर रोजी पुष्पचक्र अर्पण केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचे राज्याभिषेक पाहिलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावात आल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळाली. येथूनच श्रीराम मंदिराचे दर्शन घेतले आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
आजची निसर्ग वारी वसंत गडाच्या तळबीड आणि बेलदरे गावातील नाईकबा टेकडीवर अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाली.
राम कृष्ण हरी माऊली
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

०६ जुलै २०२१

अंधारवाडीला

 निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
6 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
आज आमची निसर्ग वारी निघाली अंधारवाडीला. नाव जरी नकारात्मक असलं तरी या गावात खूप सकारात्मक आहे, गावकरी खुप प्रेमळ आहेत.गावाला मोठा इतिहास आहे. त्या गावात जाण्यासाठी कराडला सगळे जमलो. सव्वा सहा वाजता उंब्रज येथे पोहचलो.निसर्ग वारीचे खास शिलेदार रणजीत पाटील यांना थोडेसे तब्येत बरं नसल्यामुळे ते येऊ शकले नव्हते. मात्र त्यांनी गाडी घेऊन अभिजित सूर्यवंशी यांना आमच्या सोबत पाठवले होते.
सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आम्ही अंधारवाडीच्या दिशेने उंब्रज येथून चालायला सुरुवात केली. उंब्रज ते अंधारवाडी हे अंतर तीन किलोमीटर आहे,सकाळच्या प्रसन्न वेळेत उंब्रजचे अनेक नागरिक, युवक पुरुष माॅर्निंग वाॅकसाठी या रस्त्यावर होते. रस्त्यावरून चालणारांची संख्या खूप होती.या रस्त्यावरून अंधारवाडी पर्यंत रोज चालत जाणारे खूप लोक आहेत. या लोकांना आम्ही नवीन दिसत होते, त्यामुळे लोक आमच्याकडे उत्सुकतेने पाहत होते.आमचा हरिपाठ सुरू होता. साडेसहा वाजता आम्ही अंधारवाडीत पोहोचलो फक्त तीन किलोमीटर अंतर चालून झाले होते. त्यामुळे आम्ही आणखीन गावाच्या पुढे जाण्याचा निर्णय घेतला. गावाच्या बाहेर एक वाघजाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात आपण नक्कीच जायचे असा आम्ही निर्णय घेतला.
अंधारवाडीच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर आनंदपुर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे असा मोठा फलक पाहिला. या गावाने काही वर्षापूर्वी आनंदपुर असे नामकरण केले आहे. या कमानीतून आम्ही आत आलो, या गावात आम्ही सकाळ सकाळी पोहोचल्यामुळे या गावातील सुखद चित्र आम्हाला पाहावयला मिळाले. खेडेगावातील अनेक पद्धती,रुढी, सवयी अजूनही संपलेल्या नाहीत. गावागावात बंगले उभे राहिले तरीपण ग्रामीण जीवन हे अजूनही ग्रामीण आहे.आम्ही गावातून पुढे जात होतो तेव्हा हे सर्व ग्रामीण चित्र पाहावयास मिळाले. घराबाहेर चुलीवर पाणी तापवण्यासाठी महिला मंडळी बसल्या होत्या. चौकात काहीजण हातावर तंबाखू मिसरी घेऊन दात घासत होते, गोठ्यामध्ये कोणी शेण काढत होते तर काढलेले शेण टाकण्यासाठी कुणी डोक्यावर पाटी घेतली होती. गोठ्यात धार काढायची लगबग सुरू होती. शेतातून वैरण घेणारे काही लोक पाहायला मिळाले तर काहीजण शेतात जाताना आम्हाला भेटले. गावातील हनुमान मंदिर चौक पाठीमागे सोडून आम्ही पुढे आलो. महालक्ष्मी मंदिरा शेजारीच एक वडाचे प्राचीन झाड आहे. या झाडा विषयी पुढे सांगेन.
खेडेगावातील लाइफ खरच वेगळ असतं, आम्ही या गावातून पुढे जात होतो तेव्हा मला माझ्या करवडी गावातील काही गोष्टी सहज आठवल्या. सकाळी उठल्यानंतर चुलीवर पाणी तापवायचे, त्यासाठी आदल्या दिवशी पालापाचोळा आणून ठेवायचा.विहिरीवरून पाणी आणायचे, पुढे गावात नळ आल्यानंतर नळाला नंबर लावण्यासाठी घागरी ठेवायच्या, असा तो नित्यक्रम असायचा. अंधारवाडीत सुद्धा हे दृष्य पाहिल्यानंतर करवडीची आठवण नाही आली तर नवल !
गावाच्या बाहेर शेताच्या रस्त्याने निघालो. येथून पुढे वाघजाईदेवी मंदीराकडे जाणारा रस्ता होता. या रस्त्यावर पुन्हा ग्रामीण शेती दर्शन पाहून खूप आनंद झाला.ग्रामीण अशा जुन्या पद्धतीची घरे, दारात असलेला गोठा,पडवी ! घरासमोर बांधलेली पशु संपत्ती, शेतात खळखळणारे पाणी हे सर्व आनंदी दृष्य खुप दिवसानंतर पाहायला मिळाले. यादरम्यान पंडित भीमसेन जोशी यांचे भक्ती संगीत ऐकत होतो, सुरुवातीला ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्व कृपा करी त्यानंतर तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल आणि पुढे याचसाठी केला होता अट्टाहास, ही तीन भक्तीगीते ऐकत ऐकत आम्ही वाघजाई मंदिराजवळ आलो.
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले वाघजाई मंदिर अतिशय सुंदर आहे.हे मंदिर पाहून आमचा थकवा निघून गेला. मंदिराला चारी बाजूने तटबंदी आहे,झाडी आहे .बाहेर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ जाऊन हात पाय धुतले आणि मंदिरात प्रवेश केला. आत पुजाऱ्यांची गडबड सुरू होती पूजेचे साहित्य जुळवाजुळव सुरू होती.आम्ही मंदिरात गेल्यानंतर आज मंगळवार आहे आणि आणि देवीच्या वारा दिवशी आम्ही आज मंदिरात आलो, याचा आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या सोबत असलेल्या ग्रामस्थांनी आम्हाला या मंदिराची माहिती सांगितली. खूप जुने असे हे मंदिर असून ही नवसाला पावणारी देवी आहे, या देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते अशी माहिती आम्हाला मिळाली. देवीची पूजा होईपर्यंत आम्ही मंदिरात बसलो. त्यानंतर मनोभावे दर्शन घेऊन बाहेर पडलो.
यादरम्यान सागर बर्वे आणि जगन पुरोहित, भुषण पाटील, बंडा भस्मे अंधारवाडी गावात पोचले आहेत, असा फोन आला.आम्ही परत गावाकडे निघालो. गावाच्या वेशीच्या अलीकडेच सागर बर्गे मित्रांसमवेत आले होते. आज सागर यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी आमच्या वारीमध्ये एक दिवस सहभागी होण्याचा, त्याच्या वतीने एक झाड देण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व मित्रमंडळी समवेत आम्ही आम्ही गावात येऊ लागलो.
मगाशी आमच्या नजरेतून सुटलेला एक भाग म्हणजे या गावाच्या बाहेर असणारा आड. खूप वर्षापासून नंतर कार्यरत असलेला एक आड पहिला. अनेक गावात आजही आड आहेत पण ते बंद पडलेले आहेत. अनेक ठिकाणी तर या आडांमध्ये कचरा टाकण्यात येतो, काही ठिकाणी आड म्हणजे अडगळीची जागा झाली आहे. अंधारवाडीच्या या आडातून एक व्यक्ती पाणी बाहेर काढत होता. आडातून पाणी बाहेर काढण्याचा प्रसंग आजच्या पिढीला खरच माहीत नसेल, माहीत नसणार. प्रत्येक गावागावात अशा प्रकारचे आड आहेत पूर्वी अशा आडातून पाणी काढायचे, डोक्यावर कळशी घेऊन पाणी घरी न्यायची पद्धत होती. या आडातून पाणी काढताना व्यायाम होत असे आणि पाण्याची कळशी घरी नेईपर्यंत जे कष्ट व्हायचे तो एक वेगळा व्यायाम व्हायचा. त्या आडा जवळ जाण्याचा मोह मला आवरला नाही आणि सर्वांनी आडातून पाणी काढले. हात पाय धुतले आणि पुढे आलो.
प्राथमिक शाळेमध्ये गावचे सरपंच धोंडीराम बर्गे आणि त्याचे सर्व सहकारी आमची वाट पहात होते. पुढारीचे उंब्रजचे प्रतिनिधी सुरेश सूर्यवंशी सकाळीच आम्हाला येऊन मिळाले होते, त्यांनी पुढे जाऊन या शाळेजवळ झाडे लावण्या साठीची सर्व तयारी सरपंचांच्या मदतीने केली होती. अंधारवाडी प्राथमिक शाळेची स्थापना 1938 सालची आहे, या शाळेच्या समोर मैदानावर काढलेल्या एका खड्ड्यात सागर बर्गे यांच्या हस्ते आणि सरपंच बर्गे यांच्या उपस्थितीत एक झाड लावण्यात आले. हा कार्यक्रम झाल्यानंतर सरपंच आणि ग्रामस्थांनी आम्हा सर्व जणांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
सरपंचाशी गप्पा मारताना मिळालेल्या माहितीनुसार या गावाचा इतिहास फार जुना आहे. वाघजाई मंदिरापासून खंडोबाची पाली येथे जाण्यासाठी शिवकालीन जुना रस्ता आहे. या रस्त्यावरून संताजी धनाजी यांची फौज आणि संताजी-धनाजी गेलेले आहेत. संताजी धनाजी यांनी या गावात मुक्काम केला आहे आणि त्यांच्या नावाने गावात इनाम जमीन आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. अंधारवाडी हे नाव का पडले असे असा प्रश्न आम्हास पडला याबाबतची आख्यायिका गावातून आम्हाला ऐकायला मिळाली. गावाच्या बाहेर अनेक वडाची झाडे होती. ही वडाची झाडे अतिशय महाकाय अशी होती. या झाडाच्या पारंब्या लांबपर्यंत पोहोचलेल्या होत्या. अशा या झाडांची दाट गडद सावली पडत असे. ही सावली पडल्यानंतर दिवसासुद्धा या परिसरात अंधार व्हायचा आणि त्यामुळे या भागात जायला लोक घाबरायचे. अंधार आणि वड त्यावरून पुढे या गावाचे नाव अंधारवाडी पडले, अशी माहिती आम्हाला मिळाली. या महाकाय वडापैकी आता फक्त एकच वडाचे झाड शिल्लक आहे. त्या झाडाचा फोटो काढून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
दोन दिवसापूर्वी वडोली निळेश्वर येथे आम्ही एक झाड लावले होते, या गावातील निळेश्वर माध्यमिक विद्यालयांमध्ये वडाची पाच झाडे लावावीत असा आम्ही संकल्प केला होता. त्यानुसार आम्ही मुख्याध्यापक सचिन नलावडे आणि शिक्षक सुधीर पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यादिवशी ते शक्य न झाल्यामुळे आज पुन्हा एकदा वडोली निळेश्वर गावी आम्ही पोहचलो. निळेश्वर माध्यमिक विद्यालय तथा ज्ञानप्रसारक शिक्षण मंडळाचे संस्थापक सुनिल संकपाळ नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. संकपाळ भाऊ यानी नवी मुंबई ऐरोली येथे 1998 साली शिक्षण संस्थेची स्थापना केली, नवी मुंबई येथे त्यांचे फार मोठे हायस्कूल आहे. यास हायस्कूलमध्ये ते नोकरीला होते त्यांचे मूळ गाव म्होप्रे आहे. साकुर्डी आणि नावडी या दोन ठिकाणी या अगोदर माध्यमिक विद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता मात्र राजकीय कारणांमुळे त्या ठिकाणी हायस्कूल सुरू होऊ शकले नाही. मात्र संकपाळ यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांना वडोलि निळेश्वर येथे हायस्कूल करण्यासाठी सुरु करण्यासाठी योग्य दिशा मिळाली आणि 1999 मध्ये हे हायस्कूल सुरू झाले. सुरुवातीला हायस्कूल छोट्याशा जागेत खाजगी जागेत होते मात्र सकपाळ भाऊ यांचे प्रयत्न, लोकवर्गणी आणि लोकसहभागातून गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी निळेश्वर माध्यमिक विद्यालयाची सुंदर इमारत उभी राहिली आहे. ही इमारत आणि या शाळेचा परिसर निसर्गरम्य आहे, ही शाळा पाहण्यासाठी जिल्ह्यातून अनेक शाळाचे मुख्याध्यापक येथे येतात.
संकपाळ सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला होता. माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांना पन्हाळा टेकडीवर ही शाळा आहे, असा भास झाला, इतकं सुंदर वातावरण या शाळेच्या परिसरात आहे. टेकडीवरील या शाळेतून समोर भव्य सदाशिवगड अतिशय सुंदर दिसतो. करवडी, पार्ले, बनवली, विरवडे हजारमाची, कोपर्डे हवेली ही गावे पण दिसतात. शाळेच्या प्रांगणात संकपाळ सरांच्या उपस्थितीत आम्ही वडाची झाडे लावली.
संकपाळ सरांनी आमच्या निसर्ग वारीची सविस्तर माहिती घेतली आणि निसर्गवारीसाठी पाच हजार रुपये किमतीची वडाची झाडे दान करण्याचा इरादा बोलून दाखवला , त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्याध्यापक सचिन नलवडे यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या. आम्ही धन्य झालो आमचा संकल्प 221 झाडे लावण्याचा आहे. गेल्या पाच-सहा दिवसात आमच्याकडे 100 झाडे जमा झाली आहेत.आम्हाला अजून एकशे एकवीस झाडांची गरज होती, आम्ही कुणालाही कळवले नव्हते किंवा कुणालाही झाडे मागितली नव्हती. मात्र आज वडोलि निळेश्वर मध्ये सकपाळ सरांच्या रूपाने माउलींनी आम्हाला काही झाडे मिळतील अशी तरतूद करून ठेवली होती. खरंच माउलीचा महिमा फार महान आहे.
ईश्वर चराचरामध्ये बसलेला आहे, प्रत्येक झाडांमध्ये एक विठ्ठल आहे. आळंदी ते पंढरपूर या 221 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण एका किलोमीटर मागे एक झाड लावले तर पंढरीच्या वारीला गेल्याचा आनंद मिळेल आणि या कल्पनेतूनच मी आणि रणजीत पाटील यांनी ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला आमच्या वारी ग्रुपचे विजय वाटेगावकर यांनी पाठिंबा दिला होता. आपल्याला काही कमी पडणार नाही कमी पडेल तिथं आपण आहोतच, असे रणजीत पाटील आणि वाटेगावकर मला बोलले होते. माऊलींनी आमच्यासाठी, आमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्हाला हवे असलेली झाडे मिळण्याची व्यवस्था केलेली आहे . परवा खळे येथील एका व्यक्तीने दोन झाडे आमच्या पुढारी ऑफिसमध्ये आणून दिली आहेत, सोमवार पेठेतील एका व्यक्तीने एक झाड देण्याचे मान्य केले आहे. डॉक्टर डी जे जोशी यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 75 झाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणालाही काहीही न मागता माउलींनी आमच्या वृक्ष लागवड चळवळीसाठी शेकडो हात पाठवून दिले आहेत. खरंच माउलीचा महिमा फार मोठा आहे
आज आमच्या निसर्ग वारीने आम्हाला माणसातील विठ्ठलाचे दर्शन घडवले, विठ्ठलरूपी अनेक लोक भेटले,यापेक्षा अधिक काय हवं आणि लिहिणे!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
Ashok Mohane, Mahesh Patil and 73 others
7 comments
Like
Comment
Share

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...