निसर्गवारी*
संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
७ जुलै २०२१
निसर्गवारीचा आजचा दिवस खरंतर तासवडे टोलनाका ते तासवडे एमआयडीसी परिसर असा नियोजित होता. मात्र तासवडे एमआयडीसी परिसरात आम्हाला आवश्यक असे नैसर्गिक वातावरण पाहायला जायला खूप अंतर जावं लागत होतं आणि त्यामुळे पुढारीचे वार्ताहर प्रवीण माळी यांच्या सूचनेनुसार आम्ही थोडासा बदल करून आमची निसर्ग वारी तळबीड फाटा येथून सुरू केली.
सहा वाजता हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी मोहिते यांच्या गावाच्या प्रवेशद्वारावर (तळबीळ फाटा) येथे आम्ही पोहोचलो. तळबीड गावाला जाणारा फाट्यापासूनचा संपूर्ण रस्ता निसर्गाची खाण आहे,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दोन्ही बाजूला हिरवंगार उस, सोयाबीन पीक, समोर किल्ले वसंतगड,गडाच्या पायथ्याशी हिरवीगार झाडी,थंड हवा आणि नैसर्गिक विपुलता. अशा या प्रसन्न वातावरणात आम्ही चालायला सुरुवात केली. हरिपाठ सुरू होता, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वनसंपदेकडे लक्ष होते. पक्षी, फुले, पाने, झाडे, पाणी,प्राणी, डोंगर नदी या सर्व पासून तयार झालेला निसर्ग. यातून चालत असताना रस्त्याला दोन्ही बाजूने असणारी निरगुडीची विपुल वनस्पती आणि वेगवेगळ्या वनस्पतींच्या वेलीकडे लक्ष गेलं.निरगुडीची मोठ्या प्रमाणात असणारी झाडे आणि त्याची तटबंदी कुंपण केलेली शेती, घरं आम्ही पाहिली.निरगुडी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे, अनेक आजारात निर्गुडीचा पाल्याचा रस किंवा लेप दिला जातो. खेडेगावात निरगुडीचा उपयोग खराटा म्हणून तसेच ताटी बांधण्यासाठी केला जातो.
साडेसहाच्या सुमारास तळबीड गावाच्या जवळ पोहोचलो तेव्हा लांबूनच श्रीराम मंदिराचे ३ कळस दिसू लागले. सकाळच्या कोवळ्या उन्हात हे सोनेरी कळस अजून उजळून दिसत होते. साई किरण महाराजांनी बांधलेले श्रीराम मंदिर गावची शान वाढवते. या कळसाचे आम्ही दुरूनच दर्शन घेऊन माऊलीना नमस्कार केला.
गावात प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या उजव्या बाजूला असणारा महाकाय वड वृक्ष पाहून आमची पावले थांबली आणि हात जोडले गेले. हा वृक्ष किती वर्षांपूर्वीचा असावा याचा विचार मनात आला. त्या वृक्षाच्या सावलीखाली कोण कोण बसले असेल? या वृक्षाने आज अखेर किती पक्षी, प्राणी आणि माणसांना उनवाऱ्यापासून निवारा दिला असेल? हा विचार आला. वडाचे झाड भक्कम आणि उंच असते. आपण वडाची झाडे लावत आहोत,आपण लावलेला वडाच्या झाडाचा अजून काही वर्षांनी एवढाच मोठा वृक्ष होईल असे आम्हाला वाटलं. पुढे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दुरूनच दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आमचा विसावा बेलदरे खिंडीत असणाऱ्या मंदिराजवळ होता. ही खिंड आमच्यासाठी नवीनच होती, या अगोदर पाहिली नव्हती.त्यामुळे रस्ता विचारत आम्ही गावाबाहेर आलो. या रस्त्यावरून एमआयडीसीचा शेवटचा भाग आम्हाला दिसत होता. पुढे हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात चालत राहिलो.
आता गाव खूप मागे राहिलं होतं, थोडासा चढाचा रस्ता लागला. समोर किल्ले वसंतगड अतिशय सुंदर दिसत होता. आम्हाला जिथे पोहचायचे होते ती खिंड जवळ आहे असे वाटत होते मात्र चालत राहिलो तरी ती खिंड जवळ येत नव्हती. दुरून डोंगर साजरे याचा अर्थ काय असतो हे आम्हाला समजले. खरंच डोंगर पाहायला गेलं तर ते जवळ दिसतात मात्र प्रत्यक्ष चालत जातो तेव्हा तो लांब असतो .चालायला सुरुवात करतो तेव्हाच हे कळतं. थोडासा चढाचा रस्ता आल्यानंतर आम्हाला आमचा वेग मंदावला. आम्ही हळूच चालत राहिलो. या उंच ठिकाणावरून पाठीमागे तळबीड गाव अतिशय सुंदर दिसत होते तर पुढे मंदिरावरील भगवा झेंडा आम्हाला दिसू लागला.आम्ही तिथे जाऊन पोहचलो. उंचावरून नजारा पाहिल्यानंतर आमचा कंटाळा निघून गेला,भान हरपून गेलं.
बेलदरे गावच्या हद्दीत उंचावर असणारे नाईकबा मंदीर आणि त्या ठिकाणी विकसित केलेला परिसर अतिशय सुंदर असा आहे. मंदिराच्या समोर असणाऱ्या पर्यटक गॅलरीतून उंच ठिकाणावरून आम्ही बेलदरे , म्होप्रे, विहे गावे दिसत होती. पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा समोर होत्या. बेलदरे खिंडीत असणारे हे नाईकबा मंदिर फार प्राचीन आहे. नाईकबा मंदिराबाबत सुद्धा आख्यायिका आहे. तळबीड गावातील एक भक्त ढेबेवाडी नाईकबा येथे हा दर्शनासाठी जायचा. वृद्ध झाल्यानंतर त्याला जाणे अवघड झाले. शेवटी त्यांनी देवाला विनंती केली आणि देव त्याच्यासोबत तळबीड गावाकडे यायला निघाला. मात्र देवाने घातलेली मागे न पाहण्याची अट त्याने मोडली.तळबीड समोर दिसत होते मात्र या डोंगरावर त्यानं पाठीमागे पाहिले आणि नाईकबा देवाने तिथेच आपला मुक्काम केला. तेच हे ठिकाण.
हे नाईकबा मंदिर तळबीडच्या हद्दीत आहे कि बेलदरेच्या यावरून दोन्ही गावांत वाद होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्या डोंगराचे दोन भाग करून ह्या मंदिराचा भाग बेलदरे हद्दीत असल्यामुळे हे मंदिर बेलदरे ग्रामस्थांचा असल्याचा निवाडा दिला असे आम्हाला उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतले. या ठिकाणी आम्हाला पुजारी भेटले. त्यांच्याकडून मिळालेली माहिती अतिशय वेगळी होती. बेलदरे गावातील मराठा समाजातील 32 भावक्या आहेत त्यांच्याकडे या मंदीराच्या पूजेची दिवाबत्तीची जबाबदारी असते. बत्तीस भावकी या मंदिराचा कार्यभार पाहतात. अमावस्या ते अमावस्या असा एक महिन्याचा कालावधी प्रत्येक भावकीला मिळतो. त्या एक महिन्यात त्या भावकीचा व्यक्ती या मंदिरात राहतो, एक महिनाभर श्रीची पूजा करतो. अमावस्या आल्यानंतर हा कार्यभार पुन्हा दुसऱ्या भावकीच्या ताब्यात दिला जातो. मंदिराचा कारभार पुन्हा त्याच भावकीच्या ताब्यात येण्यासाठी 31 महिने वाट पाहावी लागते. संपूर्ण गावावर या मंदिराची जबाबदारी असल्यामुळे मंदीर परिसरात विकास अतिशय चांगला झालेला आहे. मंदिराच्या परिसरात कराडचे परशुराम रावजी शिंदे यांनी एक आड काढून दिला आहे ,त्याला भरपूर पाणी आहे. ग्रामस्थांनी पाइपलाइन करून पाणी या मंदिरात आणले आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या परिसरात रामघळ नावाचा एक भाग आहे, शेजारी खुप उंच टेकडी आहे त्या टेकडीवर सुमारे तीनशे एकर एवढे मोठे पठार आहे. गिर्यारोहण प्रेमीसाठी हे पठार एक पर्वणी आहे. मंदिराच्या समोरच वसंतगडावर जायला रस्ता आहे. या बाजूने वसंतगडावर जाण्याचा रस्ता अतिशय सोपा आहे असे आम्हाला ग्रामस्थांनी सांगितले.
या ठिकाणी काही वर्षांपूर्वी वसंतगडावर जाण्यासाठी मोठा रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. स्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रयत्नाने गडावर दूरदर्शनचे केंद्र होणार होते. हे केंद्र सुरू होण्याअगोदर या मंदिरासमोरून वसंतगडावर जाण्यासाठी रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले. सुमारे दोनशे मीटर रस्ता तयार करून झाला. मात्र पुढे हे दूरदर्शन केंद्र अजिंक्यताऱ्यावर स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आणि हे काम बंद पडले. याच परिसरात आम्ही उपस्थित असलेल्या पुजारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन वडाची झाडे लावली. ही झाडे लावण्यासाठी मंदिरातील सर्व लोकांनी हातभार लावला. खड्डे काढण्यापासून पाणी घालण्यापर्यंत तसेच त्या झाडाला कंपाउंड घालण्यापर्यंत जबाबदारी या मंदिरातील लोकांनी स्वीकारली.विष्णु कदम, महेश खांबे, विठ्ठल डुबल, मंथन खांबे, मंदार खांबे तसेच वाहागावचे अजित माळी, राजवर्धन माळी, प्रवीण यांचं ही झाडे लावण्यासाठी फार सहकार्य लाभले. डोंगरावर नाईकबा मंदिरासमोर दोन वडाची झाडे लावण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचा आम्हाला खूप आनंद झाला.
झाडे लावल्यानंतर मंदिराशेजारी असलेल्या एका शेडमध्ये बसून आम्ही नाश्ता केला. प्रवीण माळी यांनी आमच्यासाठी शेवयाचे उपीट आणले होते. याची चव माऊलींच्या भाषेत सांगायचे तर अमृताहून गोड होती. आम्ही नाश्ता करेपर्यंत मंदिरातील पुजारी मंडळींनी आमच्यासाठी आले, वेलदोडे टाकून अतिशय सुंदर असा ब्लॅक टी केला होता. या चहाची चव अजून सुद्धा जिभेवर रेंगाळत आहे.
चहा पिऊन आम्ही सर्व माऊलींचा निरोप घेतला आणि परतीच्या दिशेने निघालो. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गेल्या काही वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने तळबीड गावात सरसेनापती यांचे अतिशय सुंदर असे स्मारक तयार झाले आहे. या स्मारकाची निगा चांगल्या पद्धतीने राखली जाते. या ठिकाणी हंबीरराव मोहिते यांच्या स्मृती ग्रामस्थांनी जपून ठेवलेल्या आहेत. विजय दिवस समारोह समिती आणि भारतीय सेनेच्या वतीने सरसेनापतींच्या समाधीवर 16 डिसेंबर रोजी पुष्पचक्र अर्पण केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचे राज्याभिषेक पाहिलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावात आल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळाली. येथूनच श्रीराम मंदिराचे दर्शन घेतले आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
आजची निसर्ग वारी वसंत गडाच्या तळबीड आणि बेलदरे गावातील नाईकबा टेकडीवर अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाली.
राम कृष्ण हरी माऊली
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*




