फॉलोअर

०७ ऑगस्ट २०२३

डोक्यावर कितीही ओझं असू दे मित्र किंवा मैत्रीण भेटली पाहीजे




डोक्यावर कितीही ओझं असू दे, 
फक्त मित्र किंवा मैत्रीण भेटली पाहीजे. 
सारं ओझं हलकं होतं. 
समस्या पुर्ण कधीच संपत नाहीत 
पण मित्र भेटला की मार्ग मात्र नक्की निघतो.

तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल. मी तर अनेकदा या अनुभवातून जातो. सोबत दिलेला फोटो पहा दोघी मैत्रिणी भेटल्या आहेत, दोघींच्याही डोक्यावर ओझं आहे मात्र यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत. ओझं असुनही गप्पा काही संपत नाहीत. कारण मैत्रीण भेटल्यानंतर आपल्या डोक्यावर असलेले वजन ओझं वाटतच नाही.

परवा माझा शिकवणीमधला मित्र भगवान भेटला होता. दोघांनी करवडीजवळ मावळा धाबा येथे जेवण केलं, खूप गप्पा मारल्या. दरम्यान दुसरा एक मित्र श्रीधरला फोन लावला, स्पीकर लावून जवळजवळ आम्ही दिड तास बोललो .दोघे समोरासमोर होतो तर तिसरा सातारा मध्ये होता. मात्र ज्या गप्पा झाल्या त्यातून आनंद तर मिळालाच, उर्जाही मिळाली.

आम्ही तिघांनी आता पन्नासी गाठली आहे, तिघांचं कामाचं स्वरूप क्षेत्र वेगवेगळे आहे. तिघांच्या अडचणी आणि समस्याही वेगवेगळ्या आहेत. माझ्या व्यवसायातील समस्या ते सोडवू शकत नाहीत, त्यांच्या मी सोडवू शकत नाही. मात्र आम्ही भेटल्यानंतर या समस्यावर, मुला मुलींच्या शिक्षणावर चर्चा करतो आणि काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो. 

मित्रासोबत बोलल्यानंतर आनंद मिळतो, मन मोकळं होतं. मित्र असतातच रिलीज होण्यासाठी ! ज्याला चांगले मित्र आहेत तो कधीही डिप्रेशन मध्ये जाऊ शकत नाही, वाईट काम करू शकत नाही, संकटाला खचून जाऊन आत्महत्या करू शकत नाही. किंबहुना तशी वेळ येऊ नये म्हणून सतत मित्रांच्या सोबत राहत जा. मित्र भेटले की त्याच्याजवळ रिलीज व्हा. जे चाललंय ते सांगा, जे हवं आहे ते सांगा. काय मार्ग निघतोय का बघा. मित्र नक्की मार्ग काढतात. आपल्या डोक्यावरचे ओझं हलकं झालं की खूप बरं वाटतं. आणि हो फक्त अडचणी आणि कामाचीच चर्चा करू नका. जरा आठवणीच्या हिंदोळ्यावर जा. शाळा कॉलेजमधल्या एखाद्या मित्रमैत्रिणीचा विषय काढा, लहानपणी केलेल्या खोड्यांना उजाळा द्या, शाळा बुडवून केलेल्या करामतीचा विषय काढा. बालपणीचा काळ अजूनही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे,असतो. मित्र सोबत असला की सारं काही मिळवता येतो, गेलेलं सुद्धा पुन्हा मिळवता येते. 

आज मैत्री दिनाच्या निमित्ताने मिरज, वडूज, सातारा येथून तिघेजण एकत्र आलो आहे. चौघांनी मिळून घरात स्वयंपाक केला आहे, आता जेवायला बसणार आहे. जेवण झाल्यावर भांडीही चौघेच घासणार आहे. ऐसी खुशी और कहा ! मेरी दोस्ती मेरा प्यार!

जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

सतीश वसंतराव मोरे सतिताभ
०६.०८.२०२३

२६ जुलै २०२३

पाऊस आणि ती दोघं


*मनात असलेलं प्रेम आणि ओठांवर आलेलं हास्य लपवून ठेवता येत नाही. ते व्यक्त केलं नाही तरी ते प्रकट हौतंच. तुम्ही जरी ते दाबून ठेवले तरी ते डोळ्यात उतरतंच.* डोळे कधी खोटं बोलत नाहीत. मग डोळे खुप सांगून जातात. अशा वेळी जर पाऊस आला आणि दोघांमध्ये एकच छत्री असेल तर ! एकाच छत्रीत ती दोघ एकत्र चालतात, पाऊस बरसत राहतो. काय बोलायचं हे ओठांवर येत नाही. चालता चालता मग हळूवार स्पर्श होतो. ती लाजरीबोजरी होतं. तो बावरा होतो. प्रेमाची भावनाच खूप काही सुखावून जाते. 

काला पत्थर या चित्रपटातील गाण्याचा हा सीन. साहीर लुधीयानवी यांचं गाणंपण तितकेच दमदार. 'इश्क और मिश्क छुप ना पाये' आणि महेंद्र कपूर यांचा पहाडी आवाज.  हे ऐकताना जे सुचलं ते असं....

अबोला संपेना 
अन् पाऊसही थांबेना,
हृदयातील प्रीती ओठावर येईना !
ओल्याचिंब भावनांना,
डोळ्यात साठवताना,
जलधारा बरसत राहील्या ,
जलधारा बरसत राहील्या !

 *सतिताभ* 
२६.०७.२०२३

१८ जून २०२३

आज खुश तो बहोत होंगे तुम ? देवाशी भांडण नव्हे... स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् संवाद !

आज खुश तो बहोत होंगे तुम ?

देवाशी भांडण नव्हे... 
स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् संवाद !


आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा सारं काही संपल्यासारखं वाटतं. कोणीही मदतीला येत नाही किंवा आलं तरी त्यांचे प्रयत्न, मदत तोकडी असते. मनुष्य हतबल होऊन जातो. काय करावं सुचत नाही. सर्व पर्याय संपतात. सर्व वाटा बंद होतात. कुणाकडं जावं हेच कळतं नाही. ज्यांना आपण जवळचं मानलेलं असतं त्यांनीच आपल्याला संकटात आणून आपल्याकडं तोंड फिरवलेलं असतं. अशा वेळी एकच पर्याय उरतो तो म्हणजे देव, देव्हारा, देऊळ !

देव कुठं असतो, तो तर आपल्यातंच असतो. पण तो दिसत नाही. आपल्यात असलेल्या देवाशी भांडायच तर मग आपणच स्वतः आरशासमोर उभे राहून बोलत बसलं पाहिजे किंवा देवळात तरी जायला पाहिजे. आरशासमोर उभे राहून बोलत बसलो तर पाहणारे लोक वेडं म्हणतील. असा विचार करून मग तो देवळात जातो. खरं तर देवळाबाहेर असणाऱ्या काही मनुष्यरूपी देवानींच त्याला फसवलेलं असतं, तोंड फिरवलेलं असतं. मग देवळातील देवाशी तो संवाद साधण्यासाठी, आपलं मन मोकळं करण्यासाठी गाभाऱ्यात प्रवेश करतो . खरं तर देवाशी त्याचं भांडण असतं, देवानं कुठे माझं चांगलं केलं आहे असा विचार करून म्हणून तो याअगोदर कधीच तिकडं फिरकलेला नसतो. देवाशिवाय सारं काही शक्य होईल, असा त्यांचा भ्रम झालेला असतो. पण वेळंच अशी येते त्याला देवळात जावं लागतं.

देवळात गेल्यावर इतक्या दिवस त्याच्या मनात साचलेलं सारं काही बाहेर पडतं. सगळं काही चांगलं करूनही देवांनं माझ्याशी असं का केलं? माझ्या भावनांशी खेळ का केला? असं का केलं, असा प्रश्न त्याच्या मनात आल्यामुळे तो देवाशी थेट भांडायला सुरुवात करतो. 

देवाला अरं तुरं करतो, जणू काही देव त्याचा जवळचा खास मित्र आहे, घरगडीच आहे. खरं तर त्या देवाला त्यांनं कधी मानलेलं नसतं. मात्र यावेळी तो लाडाने नव्हे रागाने देवाशी भांडतो आणि सुरुवात होतो देवाशी संवाद, 'आज खुश तो बहुत होगे तुम ?' माझ्या आयुष्यात एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्या तरीही मी तुझ्या मंदिरात आलो नाही, तुझी पायरी चढलो नाही. पण आज तू तशी वेळ आणलीस. मला तुझ्या मंदिरात यावं लागलं. तुला बरं वाटत असेल ना ? तुला उकळ्या फुटत असतील ना? कसं झुकवलं याला!कसा नांगा जिरवला यांचा, कशी खोडी मोडली यांची ! अशा द्वेषपूर्ण शब्दांत तो भांडायला सुरुवात करतो.

देवाशी एकेरी बोलण्यात त्याला काही वाटत नाही. अनेक संतांनी देवाशी अशाच प्रकारे एकेरी भाषेत संवाद साधला आहे. देव ही गोष्ट अशी आहे जी आपल्यातंच असते, त्यामुळे तो आपल्या जवळचाच असतो. त्यामुळे त्याच्याशी आपण आपल्या जवळची व्यक्ती म्हणून,आपला धाकटा भाऊ, आपला मित्र म्हणून आपला सखा म्हणून भांडू शकतो आणि तोही हेच करतो. आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना देवासमोर मांडतो. खरंतर देवाला हे सारं माहीत असतं. मात्र तरीही तो रागाने, मोठ्या आवाजात देवाला सगळं सांगत राहतो, सांगत राहतो, सांगत राहतो! हे देवाशी भांडण नव्हे स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् एक संवाद आहे !

'दीवार' चित्रपटातील हा प्रसंग आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी आला असेल, येत राहील. असा प्रसंग आल्यानंतर आपण स्वतःची भांडतो म्हणजेच देवाची भांडतो. आपण केलेल्या चुका आपल्याला कळू लागतात. आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला फसवलेलं आपल्याला उमगायला लागतं. आपण हे असं करायला पाहिजे होतं, तसं नको करायला पाहिजे होतं, याचीही आपणाला जाणीव होती. स्वतःने, स्वतःशी, स्वइच्छेने देवासमोर साधलेला संवाद 'दीवार' चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. तो संवाद होण्याची गरज आहे. 

खरंच स्वतःशी बोलल्यानंतर अनेक प्रश्नांना उत्तर मिळतात. आपलं अंतर्मन हाच आपल्यात वसलेला देव असतो. तो कधीही आपल्याला वाईट करू देत नाही. तो देव आपल्याला चांगल्या वाटा दाखवत असतो. फक्त आपल्याला त्या देवाशी, अंतर्मनाशी संवाद साधायला हवा. देवळात जाऊन जाऊन देवाची भांडण करणं, त्याला आपल्या तक्रारी सांगणे, त्याला नवस करून लाच देणे कधीही चांगलं, मात्र कधीतरी आपण आपल्या स्वतःची भांडलो तरीसुद्धा आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळू शकतात.. उत्तर मिळू शकतात.. !

जय बच्चन..जय बच्चन !

#Deewar  
#amitabhbachchanpremi 

Amitabh Bachchan 
Amitabh Bachchan Fans Club India 
AMITABH BACHCHAN FAN$ CLUB 
Bachchanvede Kolhapuri 
Amitabh Bachchan = The Great

३० मे २०२३

नाती आणि नोटा


नोटा असत्या तर बदलल्या असत्या ,
इथं नातीच बदलली आहेत !
मग आम्ही काय बदलायचं ?
स्वतःला सावरायचं की आपणही बदलायचं ?
नोटा बदलणं इथं सोपं असतं,
पण नातीच बदलायला लागली तर ?

नोटांना 'मर्यादा' असते,
नात्यांमध्ये 'अमर्याद' प्रेम असते,
नात्यांना 'किंमत' असते,
तर नोटांना 'भाव' असतो..
नोटा बदलणं इथं सोपं असतं,
पण नातीच बदलायला लागली तर ?

नात्यांच्या याचिकेत अनेकदा नोटा जिंकतात.. 
गुळगुळीत नाण्याप्रमाणे नातीही बदलतात ,
नात्यांतील गोडव्यापुढं नोटा भारी पडतात..  
नोटा बदलणं इथं सोपं असतं,
पण नातीच बदलायला लागली तर ?

सतिताभ
३०.०५.२०२३. सुप्रभात 🌹

११ मे २०२३

न्यायालयावर सामाजिक दबाव येतो....


गेल्या पंचवीस वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात काम करत आहे. यापैकी सुरुवातीची दोन वर्षे लोकमत मध्ये आणि त्यानंतर सलग 22 वर्षे दैनिक पुढारी मध्ये काम करत आहे. येणाऱ्या जुलै महिन्यात माझ्या पत्रकारीतेची 25 वर्षे पूर्ण होत आहेत. याबाबत मी सविस्तर नंतर लिहिणारच आहे. मात्र आज हे सांगण्याचे कारण सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर झालेला निकाल हा संदर्भ आहे. 

2001 साली जेव्हा दैनिक पुढारी मध्ये कामाला लागलो. त्यानंतर पुढच्या दहा वर्षात कोणत्या बीटमध्ये काम केलं नाही असा एकही बीट शिल्लक राहिलेला नाही. यापैकी अतिशय आवडता आणि ज्ञानात भर घालणारा बीट म्हणजे कोर्ट बीट. पंचायत समिती,एसटी स्टँड,सामाजिक वनीकरण,कृषी विभाग,पोलीस स्टेशन, एक्साईज, तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यासह राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक कुठलाही बीट असो दिवसभर या बीटचं काम एकाच वार्ताहराला करायला लागायचं. यातच भर पडायची ती म्हणजे कोर्ट बीटची. त्यावेळी कराडला जिल्हा सत्र न्यायालयाची मान्यता मिळाली आणि ते न्यायालय मार्केट यार्ड मधील नगरपालिकेच्या सुपर मार्केट सुरू झाले.

या न्यायालयात आठवड्यात एखादा निकाल लागायचा. बलात्कार किंवा खून प्रकरणात निकालाची प्रतिक्षा आणि उत्कंठा असायची. कराड उपजिल्हा सत्र न्यायालयात एम.जी .कागणे नावाचे कोर्ट होतं. अतिशय कडक आणि न्यायप्रिय असे हे कोर्ट होतं. या कोर्टामध्ये एखादी केस केली तर हमखास शिक्षा लागायची अशी या कोर्टाची एक वेगळी खासियत होती. याच न्यायालयात 2002 च्या दरम्यान अतिशय गाजलेल्या असा एक खटला सुरू झाला. तो होता अतिरेकी पलायन खटला. खलिस्तानवादी सहा अतिरेकी मालखेड जवळ पोलिसांच्या गाडीतून पळून गेले होते. ते कराड तालुका पोलिसांनी पकडले होते. त्यांना पकडून त्यांच्यावर कराड न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले आणि या खटल्याचे काम एम .जी. कागणे यांच्या समोर सुरू झाले. यानिमित्ताने आम्ही कराड शहरातील सर्व प्रमुख पत्रकार रोज या खटल्याचे वार्तांकन करण्यासाठी न्यायालयात जात असू. न्यायाधीश एम.जी कागणे आणि पत्रकारांचे अतिशय प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते. ते अतिशय कडक न्यायाधीश होतं मात्र कोर्टात पत्रकार नसतील तर आज पत्रकार का आले नाहीत असे ते आपुलकीने चौकशी करायचे. यांच्या न्यायालयाने अतिरेकी पलायन खटल्यातील सर्व आरोपींना शिक्षा दिली होती. या अतिरेकी आरोपींच्याकडे बघण्याची पण आम्हाला भीती वाटायची.

याच न्यायालयास कराडचे लोकप्रिय नगराध्यक्ष जयवंतराव जाधव यांच्या खून खटल्याची सुनावणी झाली. जयवंतराव जाधव खुन खटल्याबाबत केवळ कराड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता होती. या खून खटल्यातील रोजची सुनावणी जशीच्या तशी दैनिक पुढारीमध्ये आम्ही प्रसिद्ध करत होतो. सुमारे सहा महिने या खटल्याचे कामकाज सुरू होते. या निमित्ताने जिल्हा सरकारी वकील, आरोपीचे वकील, साक्षीदार एवढेच काय आरोपींचीही आमची ओळख झालेली होती. सातारचे प्रसिद्ध डि. व्ही. पाटील , मुल्ला साहेब, श्यामाप्रसाद बेगमपुरे, पवार वकील या सर्वांची न्यायालयातील जुगलबंदी आम्हाला अजूनही आठवते. त्यानंतर नरेश मस्के अपहरण आणि खून प्रकरण खटला येथेच चालले. तसेच पैलवान संजय पाटील खून खटल्याचे सुनावणीचे कामकाज काही काळ या न्यायालयात झालं. नरेश मस्के खून खटला प्रकरणात सरकारी वकील म्हणून त्यावेळी प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांची नेमणूक सरकारने केली होती. उज्वल निकम सर न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर पत्रकारांना बोलवून सर्व मुद्दे आम्हाला समजावून सांगायचे. या सर्व खटल्याचे सुनावणीचे वार्तांकन माझ्या काळातील आणि आता सीनियर वार्ताहरांनी त्यावेळी केले होते. 

हे सर्व सांगण्याचे कारण न्यायालयाचे कामकाज कशाप्रकारे चालते, न्यायालय कशाप्रकारे निकाल देते, याचा मला आलेला अनुभव, मी केलेली निरीक्षणं तुम्हाला सांगणे तेवढाच आहे. कोणताही खटला जेव्हा कोर्टासमोर येतो तेव्हा न्यायालय समोर आलेले पुरावे पाहून निर्णय देते, ही झाली एक बाजू. मात्र अनेकदा हे पुरावे खरे खोटे असू शकतात. हे पुरावे सरकारी वकील मांडतात तर आरोपीचे वकील दुसरे पुरावे सादर करू शकतात. अशा परिस्थितीत निकाल देताना अनुभव आणि दीर्घ अभ्यासाच्या जोरावर न्यायाधीश निकाल देत असतात. मात्र या मी अभ्यासलेल्या वरील खटल्याचा अभ्यास करता किंवा संदर्भ देऊन मला एक गोष्ट सांगावी वाटते, ती म्हणजे न्यायालय फक्त पुरावे पाहून निकाल देत असतात असे नव्हे तर एखाद्या खटल्या विषयी, गुन्ह्याविषयी समाजात निर्माण झालेली अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती याचाही न्यायालय अभ्यास करत असतं. पुरावे खरे असले किंवा नसले, हे पुरावे कोर्टात टिकले किंवा नाही टिकले तरी एखाद्या खटल्या विषयी जनतेमध्ये उठाव झाला असेल तर न्यायालय समाजाचा विचार नक्की करते. एखाद्या प्रकरणाविषयी समाजात विरुद्ध वातावरण तयार झालेले असेल तर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम न्यायालयावर किंबहुना निकालावर होतो. याचा अर्थ न्यायालय समाज काहीही बोलतोय म्हणून निकाल देते असा नव्हे. मात्र सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक दबाव या दोन्ही गोष्टीचा न्यायालय नक्की विचार करते.

महाराष्ट्र शासनाच्या सत्ता संघर्षाबाबत लागलेल्या निकालावरून वरील माझे मत शंभर टक्के खरे आहे असे मला वाटते. महाराष्ट्र शासन सत्ता बदलाबाबत सुप्रीम कोर्टात गेल्या सहा महिन्यापासून युक्तिवाद सुरू आहे. 16 आमदार अपात्र आहेत का ? बहुमत चाचणी प्रक्रिया योग्य होती का? हे सरकार घटनाबाह्य आहे की ती कायदेशीर मार्गाने निर्माण झालेले आहे? याबाबत न्यायालयासमोर सुनावणी झाली. मात्र या दरम्यान जी सामाजिक परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झाली, जे वातावरण निर्माण झाले, याचा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावर नक्कीच परिणाम आणि दबाव निर्माण झाला असावा. त्यामुळे हा निकाल देताना समतोल साधण्याचा न्यायालयाने प्रयत्न केला आहे असे एकूण दिसते. या निकालावरून सर्वांना खुश करून समाजालाही न्याय देवता किती खंबीर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे असे मी धाडसाने म्हणेन. सामाजिक परिस्थिती आणि दबावामुळे किती परिणाम होतो याचे, हा निकाल उत्कृष्ट उदाहरण आहे.

०६ मार्च २०२३

बच्चन होणं इथं सोपं असतं!

बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र
रातंदीन झगडावं लागतं !

अमिताभ व्हायला,
सामोरे जावे लागते ..
संघर्षाला,संकटाला
अपयशाला,अपमानाला 
आजार आणि अपघाताला सुद्धा !
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र
रातंदीन झगडावं लागतं !

सातत्य, समग्र, समरस होऊन
नवीन काही तरी द्यावं लागतं,
अभिनय करता करता,
व्यक्तीमत्व होऊनच जगावं लागतं.
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र
रातंदीन झगडावं लागतं !

प्रसिद्धी,यश आणि वलयाचं
अमृत जिरवावं लागतं,
बदनामी, तिरस्कार आणि अपयशाचं
जहर तितकंच पचवायला लागतं !
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र 
रातंदीन झगडावं लागतं !

बच्चन होणं 
तर सहज असतं ,
मिरवायला थोडंच कष्ट लागतं?
बापझाद्याचं नाव घेऊन
सन्मानाचं दान इथं
सहज पदरी पडतं !
नाव कमवायला मात्र 
पदोपदी झगडावं लागतं !
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र 
रातंदीन झगडावं लागतं !

हुरळून जाऊन एका यशानं
प्रसिद्ध होणं सोपं असतं,
कौतुक अन् पुरस्काराने भाराऊन
एका रात्रीचा स्टार होणं 
फार अवघड नसतं,
बच्चन होणं इथं 
सोपं असतं,
अमिताभ व्हायला मात्र
रातंदीन झगडावं लागतं !

@सतीश वसंतराव मोरे 
 सतिताभ
०६.०३.२०२३


१५ फेब्रुवारी २०२३

कमी मध्ये समाधान


'कमीमध्ये समाधान असतं'

बसमधून प्रवासाला निघालो आहे .खचाखच भरलेल्या एसटी बसमध्ये आपणास कसातरी प्रवेश मिळतो. 'ओ जरा पुढे सरका की' म्हणत कशीबशी उभे रहायला जागा मिळते. लोखंडी पाईपला टेकायला मिळतं,थोडा आराम मिळतो. प्रवास सुरू होतो. शेजारच्या बाकड्यावर तिघेजण बसलेले असतात. कडेच्या व्यक्तीला आपण विनंती करतो 'पाव्हणं जरा सरा की '. आपण जणू त्याची प्रॉपर्टी लिहून मागितली आहे असे वाटून तो थोडं तोंड वाकड करतो, जरा सरतो. त्या कोपऱ्यावरील जागेवर आपण अंग चोरुन कसंबसं बसतो. त्या छोट्याशा जागेतही शरीराला आणि मनाला हायसं वाटतं. बस पुढे धावत असते. दुपारची वेळ असल्यामुळे थोडी डुलकी लागते. कमी जागा असूनही आपण त्या जागेत ऍडजेस्ट होऊन आरामात प्रवास करतो. पुढे हळूहळू एसटीतील गर्दी कमी होत जाते. एक एक करून प्रवासी उतरू लागतात.आता त्या बाकड्यावर आपण फक्त एकटेच राहतो. संपूर्ण बाकडं आपल्यासाठी रिकामं असते, प्रवास पण अजून बाकी असतो. मात्र त्या बाकडयावर आपल्याला पडावं वाटत नाही, पडलो तरी झोप लागत नाही. याचं कारण शोधलं तर एक लक्षात येईल की ' उपलब्धता कमी असते तेव्हा त्यामध्येही समाधान असतं '. आपल्या गरजा जेव्हा मर्यादित असतात तेव्हा आपल्या आपण आहे त्यात ऍडजेस्ट करून घेत असतो. जेव्हा त्या गरजा पुऱ्या होतात तेव्हा आपण ऍडजेस्ट न करता 'कुछ और' च्या नशेत आणखी सुख शोधायला लागतो आणि ते तिथं मिळत नाही. कमी मध्ये समाधान असतं, हा मंत्र कायम लक्षात ठेवा. अनेक अनुभव आले आहेत, तुम्हालाही आले असतील!

सतीश वसंतराव मोरे सतिताभ
१५.०२.२०२३..शिर्डी प्रवासात

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...