निसर्गवारी*
_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१३ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आजही आमची निसर्गवारी होती घारेवाडी फाटा ते धुळोबा मंदिरापर्यंत. मात्र शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व माझे सहकारी चंद्रजीत पाटील यांनी धुळोबा मंदिरानजीक असणाऱ्या डोंगरावरील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करु या,असे सुचवले.आम्ही सकाळी सहा वाजता एकत्र येऊन साडेसहापर्यंत धुळोबा मंदिरासमोर पोहोचलो. जाताना घारेवाडी गावातील अतिशय सुंदर अतिशय सुंदर मंदिर पाहिले. या मंदिर परिसरात असणारा उंच पिंपळवृक्ष आणि त्याशेजारी ग्रामस्थांनी तयार केलेला पार ,बाग, वृक्षारोपण खरंच पाहण्यासारखे आहे.आम्ही शिवम अध्यात्मिक केंद्राच्या रस्त्याने पुढे निघालो,आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे दुरूनच इंद्रजीत देशमुख यांनी तयार केलेल्या भव्य अध्यात्मिक स्मारकाला आम्ही दुरूनच नमस्कार केला आणि वर मंदिरात पोचलो.
कोरोना संकटामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीनिमित्त आळंदी ते पंढरपूर या पायी वारीस राज्य शासनाने परवानगी नाकारली आहे. आळंदी ते पंढरपूर हे अंतर सुमारे २२१ किलोमीटर इतके आहे. त्यामुळेच तालुक्यातील विविध भागात दररोज ६ किलोमीटर पायी चालत जाऊन २ जुलै ते २० जुलै या कालावधीत २२१ वडाच्या झाडे लावण्याचा संकल्प माझ्या सहीत, सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील (नाना), कराड नगरपालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, युवा उद्योजक गौतम करपे, डॉ. अमित खाडे, संदीप सूर्यवंशी,अभिजित सुर्यवंशी यांनी केला आहे.
१ जुलैला सह्याद्रि कारखान्यावर वृक्षारोपण करून सुरूवात केल्यानंतर निसर्ग वारीचे मंगळवारी सकाळी धुळोबा डोंगर येेथे आगमन झाले. या परिसरात आज मी खूप दिवसांनी गेलो होतो.अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर असून तिथे गेल्यानंतर खाली डोंगराच्या कुशीत दिसणारे शिवम केंद्र,भव्य पाझर तलाव आणि निसर्गाने उधळण केलेली रंगसंगती पाहून खूप आनंद झाला.
श्री धुळोबा डोंगरावर १६ मोठी झाडे लावायची होती, ती खाली उतरवली. महादेव मंदिर केवळ अडीच किलोमीटर आहे असे आम्हाला सांगण्यात आले, मात्र हे मंदिर कुठेही दिसत नव्हते. धुळोबाला नमस्कार करून आम्ही चालावयास सुरुवात केली, हरिपाठ सुरू केला.अतिशय सुंदर असा हा ट्रेक होता. निसरड्या रस्त्यातून, घनदाट झाडीतून तर कधी पठारावरुन चालताना मजा येत होती.
दोन दिवसांपासून सुरू झालेला पाऊस आणि त्यामुळे निसरडी बनलेली पायवाट तुडवत शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे रणजित शिंदे, ब्रिजेश रावळ, मुकूंद पोतदार उर्फ बंटी भैय्या, नंदू खडतरे, गणेश पवार यांच्यासह मदतीसाठी आलेले किल्ले सदाशिवगडचे दुर्गसेवक आबासाहेब लोकरे, संदीप मुळीक, राहुल जाधव, पकंज पांढरपट्टे, नरेंद्र मुळीक, चंद्रजीत पाटील यांनी अडथळ्यांवर मात करत सर्व झाडे धुळोबा डोंगर पायथ्यापासून डोंगरावर नेली.या कामी कराडमधील खांबे वॉच कंपनीचे विश्वास खांबे आणि कराडमधील श्रीकृष्ण एंटरप्रायझेसचे हरेश पटेल, महेंद्र पटेल, अशोक पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले होते. पटेल बंधू तर सर्वात अगोदर सकाळी सहा वाजताच घारेवाडीत पोहचले होते.
सर्व मावळे वरती मंदिरापर्यंत पोहचले होते मात्र ट्रेकिंगचा अनुभव नसल्यामुळे आम्ही राम कृष्ण हरी ,छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशी घोषणा देत हळू वरती मार्गक्रमण करत होतो.आज आमच्या सोबत ओगलेवाडी येथील व्यापारी माझे मित्र धनंजय राजमाने सहभागी झाले होते. आम्ही प्रत्येकाने सोबत एक झाड,पाण्याचा कॅन घेतलेला होता. दम लागला की अनेक वेळा थांबावं लागलं. मधूनच रिमझिम पाऊस येत होता. रस्ता घसरटी असल्यामुळे एकमेकाला शाब्दिक आधार देत आम्ही चालत राहिलो. पुढे विस्तीर्ण पठारावर आल्यानंतर संपूर्ण परिसर अतिशय सुंदर दिसू लागला. कोळेवाडी, शिंदेवाडी, तुळसण, तारुख ही गावे इवलीशी दिसत होती. समोर असणारा आगाशिवगड, वसंतगड आम्हाला वाकुल्या दाखवत होता. मधूनच बारीक पाऊस येत होता. डोंगरावर धुके येत होते.या निसर्ग वारीतील हा पावसाचा आमचा पहिला अनुभव. प्रत्येक वर्षी वारीमध्ये पाऊस येतोच, मात्र गेली काही दिवस आला नव्हता. आज मात्र आम्हाला पावसाने गाठलेच. रिमझिम पावसात मधूनच सूर्यप्रकाश दर्शन झाले आणि हा परिसर अजूनच खुलून दिसायला लागला.
आठच्या सुमारास आम्ही महादेव मंदिरासमोर पोहचलो. मंदिरा समोर मोठ्या दिमाखाने फडकत असलेल्या भगव्या झेंड्याला आम्ही वाकून नमस्कार केला. त्या ठिकाणी अगोदरच गेलेले शिवराय ट्रेकिंगचे मावळे वृक्षारोपणाची तयारी करत होते. आमचे रणजीत नाना पाटील त्यांना मदत करत होते. डोंगरावर पोचल्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. छोटेखानी मंदिरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही जाऊन उभे राहिलो. पाऊस थांबत नसल्याने पावसात सर्व मावळ्यांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केले. आज वृक्षारोपण करण्याचा आनंद फार वेगळाच होता. डोक्यावर जोरदार पाऊस पडत होता, हवा वाहत होती. सगळे पावसात भिजत असुनही कुणाचे लक्ष पावसाकडे नव्हते, सगळ्यांचे लक्ष्य एकच होते झाडे लावायची, झाडे लावायची आणि झाडे लावायची. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणून आम्ही याठिकाणी आणलेली पाच वडाची झाडे लावली तर शिवराय ट्रेकिंग ग्रूपने इतर अकरा झाडे लावली.
*आता शिवराय ट्रेकिंग ग्रुप कराडबद्दल थोडसं*
... हा ग्रुप सन २०१२ साली अस्तित्वात आला. किल्ले लिंगाणा, कळसुबाई शिखर यांच्यासह राज्यातील गडकोटांची भ्रमंती व संवर्धन कार्यात हा ग्रुप अग्रेसर आहे. कराड तालुक्यातील सह्याद्रीच्या विविध डोंगर रांगा तुडवत असताना हा ग्रुप धुळोबा डोंगरावर गेला होता. त्यावेळी तेथील श्री शंभू महादेव मंदिराची अवस्था पाहून या ग्रुपच्या मावळ्यांना खूप वाईट वाटलं आणि या ठिकाणी नव्याने मंदिर उभारण्याचा निर्धार शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या मावळ्यांनी २०१९ साली केला होता. केवळ निर्धार न करता ग्रुपमधील मावळ्यांनी स्वतःच्या खर्चातून मंदिराची उभारणी करण्याचे ध्येय बाळगत १९ नोव्हेंबर २०१९ रोजी मंदिराच्या जिर्णोद्धारास प्रारंभ केला होता. धड पायी चालता येत नाही अशा अवघड पायवाटेने २० ते २५ किलोचे ओझे वाहून विटा, वाळू, खडी, सिमेंट पायथ्यापासून डोंगरवर नेत शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या मावळ्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानसह दुर्गसेवकांना शिवराय ट्रेकिंग ग्रुप नेहमीच मोलाची मदत करतो. किल्ले सदाशिवगड दुर्गसेवकही शिवराय ट्रेकिंग ग्रुपला धुळोबा डोंगरावरील शंभू महादेव मंदिर परिसराच्या विकासासाठी श्रमदान करून मोलाची मदत करतात आणि मंगळवारी हेच पहावयास मिळाले. सर्वांचे परिश्रम पाहून अवाक् झाल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही.
मंगळवारी निसर्ग वारीसाठी निवडलेल्या एका एका झाडाचे वजन जवळपास १५ ते १६ किलो इतके होते. इतके वजन अंगावर घेत निसरड्या वाटेवरून पावसात भिजत पायथ्यापासून सर्व मावळ्यांनी झाडे डोंगरावर नेल्याने आम्हाला मावळ्यांच्या अथक परिश्रमाची जाणीव झाली. कारण पायवाटेने मोकळे असूनही आम्हाला धड चालता येत नव्हते. एकमेकांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळेच शिवराय ट्रेकिंग ग्रुपसह किल्ले सदाशिवगड दुर्गसेवकांच्या परिश्रमाला कोणत्या शब्दात दाद द्यायची ? हेच आम्हाला उमजत नव्हते.
झाडं लावून आम्ही सर्वांनी जय शिवाजी...जय भवानी, राम कृष्ण हरी असा जयघोष करत मोठ्या उत्साहात फोटोमध्ये आठवणी टिपल्या. या ठिकाणी शिवराय ट्रेकिंग ग्रुपने वृक्ष संगोपनासाठी किल्ले सदाशिवगड दुर्गसेवकांच्या मदतीने ठिबक सिंचन केले आहे. त्यामुळे आम्ही लावलेल्या ५ वडाच्या झाडांसह अन्य १६ झाडांचे नक्की संगोपन होणार याचा आम्हाला विश्वास आहे.
ही झाडे लावून परत येताना जो प्रवास होता तो आयुष्यात कधीही न विसरण्यासारखा आहे. गड, टेकडी चढून जाणे एकवेळ सोपे असते मात्र उतरणे फार मोठे दिव्य असते. उंच टेकडीवरून खाली येताना आम्हाला खुप काळजी घ्यावी लागली. नुकताच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. अशा या निसरड्या रस्त्यातून एकमेकाचा हात धरत आम्ही खाली उतरू लागलो. आज शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे मावळे आमच्यासोबत नसते तर घसरगुंडी करत, जखमी होऊन आम्हाला खाली यावे लागले असते. मात्र या मावळ्यांनी आम्हा सर्वांना हात दिला,आमची काळजी घेतली आणि सुखरूप आम्हाला खाली आणले. माऊलींनी आमच्या सर्वांसाठी ही अतिशय चांगली व्यवस्था केली होती. हा अर्धा तासाचा प्रवास खरंच अविस्मरणीय असा होता.
साडेनऊच्या सुमारास आम्ही धुळोबा मंदिरात पोहचलो. सारे पावसात चिंब भिजलेले होतो, कपडे सुकवली. येथे बसून थोडा आराम केला. सभागृहात बसून आम्ही भडंग चहा घेतला आणि सर्वांचा निरोप घेऊन आम्ही परत यायला लागलो.
येताना चचेगांव येथील कुमार पाटील आटकेकर यांच्या फार्म हाऊस मध्ये आम्ही इडली सांबर प्रसाद घेतला. कुमार पाटील यांनी आमचे अतिशय आनंदाने स्वागत करत पाहुणचार केला. माऊलींना नमस्कार करून आम्ही अकरा वाजता कराडात परत आलो.
आजची वारी ट्रेकिंग वारी होती. आज खुप आॉक्सिजन आणि आनंद मिळाला. धुळोबाच्या डोंगरावर खरंच एकदा गेले पाहिजे आणि या डोंगरावरून पुढे अडीच किलोमीटर असणाऱ्या महादेव मंदिराकडे पण आपण नक्की जाऊन या. हा ट्रेक करताना आपल्यासोबत हा भाग माहित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाणे हे आपल्या हिताचे ठरेल.
जय शिवाजी...
जय भवानी
जय धुळोबा.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*