फॉलोअर

०४ मार्च २०२०

बायको पुढे काय बोलायचं?



बायको जेंव्हा बोलत असते,
तेव्हा मी का बरं बोलायचं ?

बायको जेंव्हा सांगत असते,
तेव्हा मी का बरं काय सांगायचं ?

बायको जेंव्हा समजावत असते
तेव्हा मी का बरं काय समजावयाचं ?

बायको जेंव्हा रागावत असते,
तेव्हा मी का बरं काय रागवायचं?

बायको जेंव्हा रुसलेली असते,
तेव्हा मी का बरं काय रुसायचं?

बायको जेंव्हा काही मागत असते
तेव्हा मी का बरं काय मागायचं ?

बायको जेंव्हा व्यक्त होत असते,
तेव्हा मी काय बरं व्यक्त व्हायचं ?

बायको जेंव्हा ... करत  असते
तेव्हा मी का बरं...काय करायचं ?


04.03.2020

२९ फेब्रुवारी २०२०

नयन मज भावले

नयन भावले


तुझे डोळे
तुझं रुप

तुझे डोळे
तुझं लावण्य

तुझे डोळे
तुझं कौतुक

तुझे डोळे
तुझं अस्तित्व

तुझे डोळे
तुझं वावरणं

तुझे डोळे
तुझं बोलणं

तुझे डोळे
तुझे वावरणं

तुझे डोळे
तुझं सौंदर्य

तुझे डोळे
तुझ्या भावना

तुझे डोळे
तुझं सावरणं

तुझे डोळे
तुझं कारुण्य


तुझे डोळे
माझं सर्वस्व


@ सती
29 फेब्रुवारी 2020

२८ फेब्रुवारी २०२०

दिल है छोटा

छोटी सी आशा


🤏दिल है छोटा,
प्यार है बेशुमार !

🤏दिल है छोटा,
नाता है हृदय का !

🤏दिल है छोटा,
वादा है जनमका !

🤏 दिल है छोटा
बंधन है अतुट रिश्तोंका !

🤏दिल है छोटा,
आशा भी है छोटी !

🤏दिल है छोटा,
हमे आॅखो  में रखना !


🤏दिल है छोटा,
धडकनोंमे समा जाना !

🤏दिल है छोटा
सजना साथ निभाना !

🤏दिल है छोटा
दिल में बसाकें रखना ! 


🧓 *सती*

२५ फेब्रुवारी २०२०

राहुल..... तू हुल दिलीस...!


राहुल..... तू हुल दिलीस...!
     
     2001 साली पुढारीमध्ये वार्ताहर म्हणून कामास सुरुवात केल्यानंतर त्यावेळी युवक काँग्रेसमध्ये पहिल्या फळीमध्ये कार्यरत असलेल्या नईम कागदी, झाकीर पठाण, फिरोज कागदी, जितेंद्र ओसवाल आणि राहुल खोचीकर यांच्याशी माझी पहिल्यांदा ओळख झाली. त्यावेळी काँग्रेस पक्ष जोमात होता. त्यातल्या त्यात युवक काँग्रेसच्यावतीने सतत कार्यक्रम होत होते. या कार्यक्रमात भेटीदरम्यान वरील चारही मित्रांशी माझी ओळख झाली. पुढे या ग्रुपमध्ये काही जण वेगळ्या पक्षात गेले. पक्षीय पातळीवर मतभेद झाल्यानंतर हे चौघे वेगळे झाले असते तरीही या चौघांशीही माझी मैत्री वाढत गेली. आमच्या सर्वांच्यामध्ये एक कॉमन दुवा होता, तो म्हणजे समविचार आणि अमिताभ बच्चन. पुढे ही मैत्री अधिकच घट्ट झाली. 
     राहुल खोचीकर यांच्या कुटुंबाशी घरगुती नाते निर्माण होण्याचे कारण त्यांचे वडील प्रकाश खोचीकर (सर). सरांची आणि माझी साहित्य विषयावर सतत चर्चा होत होती. या दरम्यान राहुलबाबत माझे सरांशी बोलणे व्हायचे. आमचा राहुल तुमच्यासोबत असतो, त्यामुळे आम्हाला काळजी वाटत नाही. मात्र त्याला नोकरी किंवा उद्योगाविषयी समजावून सांगा, असे सर मला नेहमी म्हणायचे. मी ही राहुलला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ऐकून घेईल तो राहुल कसला? ‘मला नोकरी करायची नाही. आहे यात मी समाधानी आहे.’, ‘उद्योगातून पैसे मिळतात’ असे तो मला नेहमी म्हणायचा.
     राहुल आणि मी गेल्या वीस वर्षांत शंभरहून अधिक छोट्या-मोठ्या सहलींसाठी बाहेरगावी फिरून आलो आहे. करवडी येथील रस्त्याकडेच्या शेतात पिंपरणीच्या झाडाखाली बसून वनभोजन करणे हा राहुलचा आणि माझा आवडता छंद. अनेकदा दुपारी राहुलच्या घरातून डबा घेऊन आम्ही शेतात जाऊन जेवलो आहे. माझ्या परस्पर राहुलसुद्धा सहकुटूंब जाऊन त्याने तेथे वनभोजनाचा आनंद लुटला आहे. राहुलच्या पत्नी अमृता यांच्या पायाचे एक बोट अनेक दिवस दुखत होते. राहुलने माझ्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर मी त्याला करवडीला जाऊन आमचे बंधू अण्णांना भेटायला सांगितले. अण्णांनी किरकोळ घरगुती उपचार करून दहा मिनीटांतच अमृता वहिनींचे दुखणे संपविले. तेव्हापासून त्या दोघा पती-पत्नीचा आमच्या करवडीच्या घराशीही आणखी संबंध वाढला.
     पावसाळा सुरु झाला की जुलै-ऑगस्ट महिन्यात कोयनानगर किंवा चांदोली येथे आम्ही गेलो नाही असे कधीच झाले नाही. बुलेटवर बसून आम्ही दोघांनी अनेकदा पर्यटनाचा आनंद लुटला आहे. असेच एकदा कारमधून आम्ही चांदोलीला ट्रिपला गेलो होतो. आमच्यासोबत आणखी दोन मित्र होते. चांदोलीवरुन परत येताना शेडगेवाडी फाट्यावर आल्यावर आपण असेच गणपतीपुळ्याला जाऊया... बघुया कोणाचे धाडस होतंय? असा शब्द टाकल्यानंतर नाही...हो म्हणत आम्ही सर्वजणच तिकडे जायला तयार झालो. अंगावरच्या कपड्यानिशी गणपतीपुळ्यामध्ये रात्री 10 वाजता पोहोचलो. देवस्थान कमिटीच्या नवीन निवासस्थानावर जाऊन मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी अंघोळ केल्यानंतर अंग पुसायला टॉवेल नसल्यामुळे रुममधील बेडशीटनेच अंग पुसण्याची आयडिया राहुलचीच. दुसर्‍या दिवशी जाखादेवीमार्गे आम्ही कराडला परत आलो. कोयनानगरच्या पंचधातू बोगद्यामार्गे कोळकेवाडी धरणाकडे जाणे ही आमची आवडती ट्रिप होती. मध्यंतरी एकदा कोयना धरणातील पाणी पूर्ण आटल्यानंतर डॉ. सुश्रूत पुराणिक यांच्यासमवेत आम्ही कोयना धरणाच्या आत जाऊन केलेली सहल अविस्मरणीय होती. राहुलने 550 नंबरची बुलेट घेतल्यानंतर ही बुलेट पहिल्यांदा तुम्हा चालवायची.. अशी राहुलने अट घातली होती. माझे बुलेट न चालवण्याचे कारण राहुलला माहित होते. तरीही त्याने गळ घातल्यानंतर मी आणि माझा मुलगा पियुष याने राहुलच्या बुलेटवरुन केलेली अकरा मारुती यात्रा अविस्मरणीय होती.


     मंत्रालयात कसा प्रवेश करायचा? याचं ज्ञान मी पत्रकार असूनही किंवा माझ्याकडे अधिस्विकृती पत्रिका असुनही मला नव्हते. मात्र मुंबईसह राज्याच्या अनेक शहरांत मित्र परिवार असलेल्या राहुलमुळे पहिल्यांदा मी मंत्रालयात गेलो. मंत्रालयाच्या कोणत्या मजल्यावर कोणाचे ऑफिस आहे? मंत्री कुठे राहतात? आमदार निवासवर कसे रहायचे? कोणाची चिठ्ठी आणायची? एवढेच नव्हे तर मुंबईला गेल्यानंतर मांदेली फ्राय मासा कुठे खायचा? यांसारख्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी राहुलनेच मला शिकवल्या. 2010 मध्ये मला दिल्लीला जाण्याचा योग आला. त्यावेळी दिल्लीमध्ये कोणा-कोणाला भेटायचे? महाराष्ट्र सदनवर बुकिंग कसे करायचे? ना. पृथ्वीराज चव्हाण यांचे घर कुठे आहे? याची माहिती मला राहुलने दिली होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढारीच्या कामानिमित्त मंत्रालयात अनेकदा जाण्याचा मला योग आला. या काळात कोणती फाईल कोठून कशी जाते, कोणाला भेटायचे, फायलीची माहिती कोठून काढायची, वर्षा बंगल्यावर प्रवेश कसा मिळवायचा? हे मला राहुलनेच शिकवले. कराड ते मुंबई अशा आमच्या 50 हून अधिक ट्रिपा झाल्या असतील. या सर्व कालावधीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारण या विषयीची माहिती मला राहुलकडूनच मिळत गेली. चिंतन ग्रुपचे अभिनंदन थोरात, विनोद तावडे, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, संजय पाटील हे जेव्हा जास्त प्रकाशात नव्हते तेव्हापासूनच राहुलचे त्यांच्याशी संबंध होते. प्रत्येक वर्षी 31 जुलैला  या मान्यवरांचे राहुलला वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग कार्ड किंवा मेसेजेस यायचे. हे मी स्वतः पाहिले आहे.
   
 संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा काय असतो? कुठे जाऊन दर्शन घ्यावे?  हे मला 2014 साली सर्वप्रथम राहुलने दाखवले. नातेपुते हे राहुलचे आजोळ. नातेपुतेमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो. या मुक्कामाच्या ठिकाणी राहुल मला पहिल्यांदा घेऊन गेला. पुढे 2015 साली मी पहिल्यांदा पंढरीची वारी केली. तेव्हा राहुलच्या मामांच्या घरी आम्ही मुक्काम केला. या काळात राहुलच्या मामांच्या घरी सर्व नातेवाईक जमले होते. लग्न होऊन अनेक वर्षे होऊनही मुल-बाळ होत नसल्यामुळे दर्शनासाठी आणि माऊलींकडे मागणे मागण्यासाठी राहुल  सहकुटुंब आले होते. त्यावेळी राहुल आणि अमृता वहिनीं यांनी राहुलचे पप्पा (बापू) आणि गौरीताई, आई यांच्यासमोर बोलताना माऊलींच्या कृपेने येत्या वर्षभरात तुमच्या घरी पाळणा हलेल, मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो, असे मी त्यांना सांगितले होते. पुढील वर्षभरात राहुलला मुलगी झाली. या मुलीचे नाव झेंडू ठेवले. झेंडुच्या बारशावेळी राहुलने कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व निमंत्रितांना झेंडुच्या फुलाचे रोपटे भेट दिले होते. अशा कल्पना फक्त राहुललाच सुचू शकतात.
      माऊलींच्या दर्शनामुळे राहुलच्या घरात पाळणा हलला, अशी श्रद्धा गडद झाली आणि त्याबरोबरच राहुलच्या कुटुंबियांचेही आमच्याशी संबंध वाढत गेले. पुढे प्रत्येक वर्षी वारीमध्ये नातेपुतेमध्ये मला भेटायला माझे सर्व कुटुंबिय यायचे. ते राहुलच्या मामाच्या घरीच थांबायचे. राहुलचा मामेभाऊ मंगेश याने 2019 च्या वारीमध्ये नातेपुते येथील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीचे महादेव मंदिर आम्हाला दाखविले होते.
राहुलचा सर्वच विषयांत अतिशय खोल असा अभ्यास होता. विधानसभा - लोकसभा निवडणुकांपासून नगरपालिका-महापालिका निवडणुकीत कोण जिंकणार? याचा अचूक अंदाज राहुलकडे असायचा. कारण त्याचे नेटवर्क अनेक शहरांमध्ये पसरले होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुलने मी ही लायन्समध्ये यावे, अशी इच्छा व्यक्त करुन मला सदस्य व्हायला भाग पाडले. पुढे लायन्स क्लबच्या अनेक बैठकींमध्ये अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या. या दरम्यान राहुलच सर्वांना भारी पडायचा. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्याने राज्यभर अनेक परिषदांमध्ये भाग घेतला. त्याही ठिकाणी त्याने अनेक बक्षिसे मिळवली होती. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणेच अमिताभ बच्चन हा राहुल आणि माझ्यामधील समान धागा होता.
     

              2015 मध्ये मी व्हॉटसअ‍ॅपवर अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुप स्थापन केला. यात पहिल्या पाचमध्ये राहुलचा समावेश होता. नंतर आमचा ग्रुप वाढत गेला. आज आमच्या ग्रुपमध्ये 77 सदस्य आहेत. मात्र ठार बच्चनवेडा असलेल्या हातावर मोजण्यासारख्या सदस्यांमध्ये राहुलचा नंबर पहिला आहे. अमिताभ बच्चन यांच्या सर्व चित्रपटांतील गाणी, डायलॉग राहुलला पाठ होते. दोन वर्षांपूर्वी आमच्या ग्रुपचा गाण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल आणि प्रबोध पुरोहित यांनी केले होते. सूत्रसंचलनामध्ये राहुल आणि नईम कागदी यांचा हात कोणीच धरु शकत नाही, असा माझा विश्वास आहे. कोणत्याही कार्यक्रमात या दोघांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रम उठत असे.  अमिताभ बच्चन यांना 2018 साली मी भेटून आल्यानंतर राहुलने मला घट्ट मिठी मारली होती. माझा हात हातात घेऊन या हातात अमिताभ बच्चन यांनी हात दिला होता. तो हात त्याने हातात घेतला होता. ‘सरजी, तुम्ही एकटेच बच्चनला भेटून आला. आम्हाला पण भेटायला न्यायलाच पाहिजे. काही पण करा’ अशी गळ त्याने घातली होती. पुढे बच्चनप्रेमींच्या एका गेट-टुगेदरमध्ये राहुल आणि मी एकत्रित गाणी गायली. गेल्या वर्षीही 4 सप्टेंबरला आमच्या बच्चनप्रेमी ग्रुपचे 53 सदस्य घेऊन मी केबीसी सेटवर गेलो. अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर काय वाटले? याबाबत राहुलने लिहिलेल्या अनुभवामध्ये ‘सरजींच्यामुळे मला अभिनयाचा देव पाहता आला’ अशी कृतज्ञता त्याने व्यक्त केली होती.
     राहुल आमच्यापासून आता दूर गेला आहे. तो आता परत येणार नाही. आजपासून राहुल पुढारी ऑफिसमध्ये येऊन पेपर वाचत बसणार नाही. आजपासून रोज राहुलचे माहितीपर मेसेजेस येणार नाहीत. ही गोष्टच पटत नाही. पण राहुल आपल्यापासून दूर गेला आहे.. हे खरं आहे. पण राहुलचे असे एकाकी जाणे न पटणारे आहे. ईश्वर असा निष्ठूर का होतो? मृत्यूपूर्वी एखादी संधी का देत नाही? असा प्रश्न पडतो. सोमवारी सकाळी उठल्यानंतर राहुल आणि अमृता वहिनी दोघेही  मुलीला सोडायला शाळेत गेले होते. शाळेतून परत आल्यानंतर राहुलला अस्वस्थ वाटू लागले. रात्रभर झोप लागली नाही म्हणून.. आराम करतो म्हणून राहुल झोपला. मात्र पुन्हा उलटी झाल्यानंतर तो उठून बसला. यादरम्यान चक्कर आली म्हणून खाली पडला आणि बेशुद्ध झाला. अमृता वहिनींनी शेजार्‍यांच्या मदतीने त्यांना पहिल्यांदा गुजर हॉस्पिटलमध्ये नंतर कराड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात दाखल केले तेव्हाच डॉक्टरांनी अमृता वहिनींना पेशंट गेला आहे.. असे सांगितले. मात्र त्यावेळी धाडसाने परिस्थितीला सामोरे जात त्यांनी आम्हा सर्व मित्र मंडळींना फोन केले... कळवले. राहुलचे वडिल मुंबईला असल्यामुळे ते कराडला येईपर्यंत दिवस जाणार होता. तोपर्यंत अमृता वहिनींना घरी जाण्यास सांगितले. मात्र घरात राहुलची आई पण होती. राहुल गेला आहे... हे जर आईंना कळले तर त्या माऊलीला कोण सांभाळणार? असा विचार आल्यानंतर आम्ही अमृता वहिनींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनीही दुपारी तीनपर्यंत आपल्या भावना दाबून ठेवल्या. तीनच्या सुमारास राहुलची बहिण गौरीताई पुण्याहून आल्यानंतर सर्व कुटूंब एकत्र आले. यावेळी गौरीताई, अमृता वहिनी आणि राहुलच्या आईने फोडलेला हंबरडा काळीज चिरवटून टाकत होता. सहाच्या सुमारास राहुलचे वडील मुंबईहून आल्यानंतर अंत्ययात्रा निघाली. तत्पूर्वी सर्वच कुटुंबाला बसलेला धक्का उपस्थितांना हेलावून गेला. राहुलदादा.. तु आम्हाला फसवलंस असं राहुलची आई सारखं-सारखं म्हणत होती. तर माझा दादा मला परत द्या.. हा गौरीताईचा हंबरडा सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत होता. मरेपर्यंत साथ देणार.. असे तुम्ही वचन दिलं होतं.. मग का आम्हाला सोडून गेलात..झेंडुनं आता कुणाला बाबा म्हणायचं.? हा अमृता वहिनींचा सवाल आणि त्यावेळी निरागस झेंडुच्या डोळ्यांतून गालापर्यंत आलेला आणि आटलेला एक अश्रुचा थेंब .. पुढे काय? असा सवाल करीत होता.


     राहुल.... खरंच तु सर्वांना हुल दिलीस. तुझं जाणं आम्हाला परवडणारं नाही. पण सायंकाळी जेव्हा गौरीताई पुन्हा भेटली. तेव्ही तिने माझ्या बापूंना आणि आईला या पुढे रोज भेटायला येत जा.. आता आमचा राहुलदादा येणार नाही, असे मला निक्षून सांगितले. होय.. गौरीताई राहुल जरी गेला असला तरी राहुलच्या कुटुंबाला, आई-वडिलांना अमृता वहिनी व दोन्ही मुलांना आम्ही कधीही अंतर देणार नाही. जे-जे करणे शक्य आहे. त्यासाठी आमचा अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुप, लायन्स क्लबमधील मित्र, राहुल मित्र परिवार आणि मोरे कुटुंब सतत पाठीशी राहणार आहे.
     पण राहुल तु एक धडा देऊन गेलास... तु मला नेहमी म्हणायचास.. ‘मला काहीही होत नाही.. मी शंभर वर्षे जगणार आहे. एक दिवस माझा येणार आहे. जुनं घर पाडून तिथे चिरेबंदी वाडा मला बांधायचा आहे. माझ्याकडे पैसे आल्यानंतर सगळ्यांना जे-जे हवं ते मी त्यांना देणार आहे.’
     राहुल.. तुझी ही स्वप्नं आता पूर्ण होणार नसली तरी स्वप्नं पाहण्यात वेळ घालवू नका. कारण मृत्यू अटळ आहे. तो मृत्यू स्वप्नांचा चुराडा करणारा आहे. हे तु आम्हाला शिकवून गेलास. तुझ्या आठवणी कायमच स्मरणात राहतील. जेव्हा-जेव्हा चर्चा होतील, तेव्हा-तेव्हा इथे राहुल असता तर... राहुलचं जिंकला असता, असे आम्हाला वाटत राहील. ‘बाप के कंधे पर बेटे का जनाजा’ हा शोले चित्रपटातील संवाद काल बापुंच्याकडे पाहिल्यानंतर सतत आठवत होता. मात्र त्याचवेळी ‘जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी.. मौत मेहबूबा है.. साथ लेकर जाएगी’ असे मुकद्दर का सिकंदर सांगत होता. आनंद मरा नहीं.. आनंद मरते नहीं... हा काळजाचा ठोका चुकविणारा आनंद चित्रपटातील संवाद राहुलच्या आनंदमय आठवणी देत राहील..!

०७ जानेवारी २०२०

It matters nothing without Facebook and WhatsApp

*फेसबुक,व्हाट्सअप* 
*बंद केल्यावर*
*काही फरक पडत नाही*

@ *सतीश वस़ंतराव मोरे*
karawadikarad.blogspot.com



Please Please Please

*Read these images*

मला अनेकांनी विचारले ८० दिवस फेसबुकवर रजा का घेतली होती, याचे एक कारण आणि उत्तर या इमेजेस मध्ये आहे.


साधारण एक तींन महिन्यापूर्वी मी वीवो एक नवीन फोन घेतला. हा फोन तुम्ही रोज फेसबुक किंवा व्हाट्सअप वर किती वेळ दिला याची माहिती देतो. एक दिवस माझ्या असे लक्षात आले की माझा दिवसभरातील दोन तास वेळ फेसबुक वर जातो आणि चार तास वेळ व्हाट्सअपवर जातो. *दिवसातील सहा सात तास मी ऑनलाईन वर असतो*.

त्याचदिवशी फेसबुक आणि व्हाट्सअप बंद केले तर काय होईल असा विचार मी केला आणि माझा व्हाट्सअप नंबर सकाळी एकदा आणि रात्री एकदाच पाहायचा असे ठरवले. तसेच 11 ऑक्टोबरला फेसबुक अकाउंट अॅप सुद्धा  मोबाईलवरून डिलीट करून टाकले.

*फेसबुक बंद केल्यानंतर काय त्रास होतो? काय कमी पडते ?काय माहिती मिळते किंवा मिळत नाही ?मी कुठे कमी पडतो? याचा मी थोडासा अभ्यास केला.* पण मला कसलाच त्रास झाला नाही, त्यामुळे सलग 80 दिवस फेसबुक बंद ठेवले.

 दरम्यान डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे फोटो आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि आणि पुन्हा मी फेसबुकवरती दाखल झालो.

त्यादिवशी *30 डिसेंबर रोजी मी व्हाट्सअप दिवसातून फक्त पंधरा मिनिटं वापरायचा असा निश्चय करून 98 811 91 302 व्हाट्सअप नंबर फक्त रोज सकाळीच पाहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून फक्त रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे मी व्हाट्सअप पाहतो*. अनेकांचे 24 तासात आलेले मेसेज पंधरा मिनिटांत पाहतो आणि त्यानंतर शक्य असेल त्यांना उत्तर देतो. तसेच पॉझिटिव्ह मेंटल एटीट्यूड (सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह व्हाईब्स्स) चा एक चांगला मेसेज वेबसाईट वर शोधून काढून तो सर्वांना फॉरवर्ड करतो. आणि व्हाट्सअप असलेला मोबाईल बंद करून घरात ठेवून कामाला जातो.

गेले आठ दिवस मी फक्त सकाळी 15 ते 20 मिनिटे व्हाट्सअप वापरतो, याचा मला कसलाही तोटा झालेले नाही. फेसबुक आणि व्हाट्सअपवर वेळ खूप घालवतात, अशा सर्व जणांना मी या निमित्ताने सांगू इच्छितो, कि फेसबुक आणि व्हाट्सअप हे सर्वस्व नाही, यांचे तोटे मी सांगण्याची गरज नाही. माझ्या मित्रांना आणखीन एक गोष्ट सांगायची आहे 80 दिवस फेसबूक बंद केल्यामुळे किंवा व्हाट्सअप आठ दिवसांमध्ये बंद केल्यामुळे मला फायदाच होत गेला आहे, कसलेही नुकसान झाले नाही.

 मला ज्यांची गरज असते असे लोक मला फोन करतात, मला ज्यांची आवश्यकता आहे त्यांना मी फोन करतो.कोणतीही बातमी चुकलेली नाही, न्युज सोर्स कमी पडलेला नाही. एक-दोन बातमी किंवा माहिती मला कमी मिळाली असेल मात्र *मला व्हाट्सअप बंद (कमी )करण्याचा गेल्या दहा दिवसात कसलाही तोटा झालेला नाही.*

दोन महिन्यापूर्वी माझ्या मुलीने देवयानीने अशाच प्रकारे मला एक चिमटा घेताना *पप्पा तुम्ही सतत मोबाईलवर असता, माझ्या कडे बघत जा जरा,अशी विनवणी केली होती*. त्यामुळे ती माझ्यापासून दूर जाते की काय अशी मला भीती वाटू लागली होती. मात्र गेल्या काही दिवसात देवयानी सोबत मी गप्पा मारायला मला अधिक वेळ मिळतो, तिच्यासाठी वेळ देऊ शकतो आहे. *तसेच महत्त्वाचे म्हणजे या दोन महिन्यात अतिशय सुंदर अशी दोन पुस्तके  वाचून पूर्ण झाली आहेत.*

 होय, व्हाट्सअप आणि फेसबुक वरती नियंत्रण करू शकलो नाही तर या *फोटोमध्ये किंवा इमेजेस मध्ये दाखवलेल्या व्यक्तीप्रमाणे आपली अवस्था व्हायला वेळ लागणार नाही*.


*सतीताभ*

9881191302

२६ जुलै २०१९

Unब्लॉक and Bloक Friends

 Unब्लॉक and Bloक Friends

सर्व लोकांचे व्हाट्सअँप DP
बघण्याइतका रिकामा नक्कीच नाही मी !
पण आज जरा वेळ मिळाला, तेव्हा तुमचा नंबर डीपी पहायला गेलो.
DP बघत बसलोय अन् तुमच्या नावावर क्लिक करणार नाही हे शक्य तरी आहे का ?
काहीश्या कारणाने
किंवा
आपल्या मतभेदाने,
कुणीतरी काडी टाकल्यामुळे,
तुम्ही ब्लॉक केलेला
माझा नंबर
तुमच्याकडे सेव्ह आहे,
हे मी दुसऱ्या नंबरवरून मेसेज टाकला
म्हणून माझ्या लक्षात आले.
मग मी आपला सहलीचा
एक वर्ष जुना फोटो तुम्हाला टाकला.
(Google photoने आठवण करून दिली)
तुमचा DP बघुन तुम्ही बदलला आहे
असं नक्कीच वाटतंय. पण छान दिसत आहात.
असो बदल हा निसर्गाचा नियम आहे.
नातं तोडलं,भेटणं टाळलं
तरीही तुम्ही माझ्या आवडी-निवडी
अजुनही जपता.
अधून मधुन माझी आठवण काढता !
चार चौघात काहीतरी छानसं बोलता !
मला पाहून न पाहिल्यासारखे करत दुर जाता !
अनोळखी व्यक्ती दिसल्यासारखा चेहरा करता! खुप बरं वाटतं ना तुम्हाला !
तरीही हे बघुन
माझ्या नाजूक मनाला दिलासा मिळतो,
धन्यवाद!
मला 'ब्लॉक' करावं आणि
मी तुम्हाला कधीही मॅसेज करू नये,
इतका कठोर मी आजवर कधीच बोललो नाही.
असो.
व्यवहार आणि वैयक्तिक नातं वेगळं असावे,
हे तुम्हीच सांगीतले होते,
ते मी जपतोय,जपणार!
आजही रोज एक मेसेज तुम्हाला पाठवतो.
तुम्हाला दिसत नाही
कारण मला ब्लाँक केलंय ना तुम्ही!
पण मला समाधान वाटते,
तुम्हाला मेसेज पाठवण्याचा!
तुम्ही मला कायम अनब्लॉकं ठेवावं,
अशी माझी कधीच इच्छा नाही,नसेल.
अनब्लॉक नकोय मला !
मला तुमच्या-माझ्या नात्यातली
स्पेस कायम जपायची आहे.
मात्र जेव्हा वाटेल तेव्हा जवळ या,
घट्ट मिठी मारू !
वरवरंचं प्रेम मला कधीच रुचत नाही,
जे करायचं ते खुलं तुम्हीच शिकवलं आहे.
तुमची इच्छा असेल तर
असु दे ब्लाँक !
ब्लॉक असताना निर्माण होणारी
ती प्रेमाची ओढ मला अनुभवायला आवडेल.
चला तर मग...
करा block...
भेटू आठवणींत रोजंच !
©सतिताभ

१३ जुलै २०१९



कृतज्ञता हाच खरा देव

धन्यवाद वाचक माऊलींनो

एकादशी दिवशी झालेल्या तृप्तमय विठ्ठल दर्शनामुळे खूप खुश होतो.पहाटे सहाला भक्त निवास येथे आल्यानंतर आराम केला,बारा वाजता तयार झालो त्यानंतर पंढरीचा फेरफटका मारण्यासाठी पुन्हा बाहेर पडलो. पुन्हा एकदा विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा घातली. दरम्यान नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्व पालख्यातील दिंड्या पंढरपुरात आल्या होत्या.नगरप्रदक्षिणा हा पालखी सोहळाचा सर्वात शेवटचा भाग असतो,ती झाल्यानंतर हा पालखी सोहळा पहिला टप्पा संपतो. त्यानंतर प्रत्येक दिंडीतील प्रमुख काही लोकांना विठ्ठल रुक्मिणी समितीच्यावतीने विठ्ठल दर्शनाचा लाभ दिला जातो,थेट प्रवेश दिला जातो.नगरप्रदक्षिणा वेळेला अनेक दिंड्या आणि एकादशीला लाखो वारकरी असल्यामुळे रस्ते तुडुंब भरले होते. सोलापूर जिल्हा पोलिसांनी वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला मात्र त्यांनाही शेवटी मर्यादा होत्या. त्यामुळे काही ठिकाणी विशेषता विठ्ठल मंदिराच्या समोरील चंद्रभागा घाटा समोरील भागात थोडीशी ढकलाढकली झाली. काही वारकऱ्यांना दम लागला, त्यातच अडकून पडल्यामुळे अनेक जण घामाघूम झाले.मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही, हे माऊलींचे वारकऱ्यांवरील प्रेम म्हणावे लागेल.

चंद्रभागा तीरावर लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता, डोळ्यात साठवून हा सोहळा घेतला. आज एकादशी होती त्यामुळे उपवास होता, चहापाणी घेतले. त्यानंतर पुढारीच्या पंढरपूर कार्यालयात गेलो. सिद्धार्थ ढवळे हे अनेक वर्षापासून पुढारीचे पंढरपूर ते कार्यालय प्रमुख आहेत अतिशय चांगला माणूस असून पंढरपुरात पुढारी वाढवण्यासाठी ढवळे यांनी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहे. त्यांना नवनाथ पोरे यांची चांगली साथ लाभली आहे. पुढारी कार्यालयात बसून चहापाणी घेतला. वारीची चर्चा केली. त्यानंतर बाजारपेठेत येऊन प्रसाद  खेळणी वगैरे खरेदी केली.  या दरम्यान अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे पंढरपूरचे सदस्य विजय जगताप भेटले.

दोन वाजता वेदांत भक्त निवासवर पोहोचलो.आता परतीचे वेध लागले होते. बॅगा भरल्या आणि साडेतीन वाजता पंढरपूर सोडले. खरंतर पंढरपूर आणि माऊलींचा सोहळा सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती.वारीत असेच चालावे ,आपण या भक्ती सोहळ्यामध्ये समरस होऊन जावे, सोहळा संपूच नये, असे वाटत होते. मात्र कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात. माऊली सोहळा एक टॉनिक आहे.हे टॉनिक वर्षभरासाठी पुरते, हे टॉनिक घेऊन आता आपल्या कामाला लागायचे होते,घरी जायचे होते. येताना वारी मार्गावरूनच नातेपुतेपर्यंत आलो होतो उलटा प्रवास केला. वाखरी, भंडीशेगाव ,वेळापूर, माळशिरस, नातेपुते आणि परत सातारा जिल्ह्यात प्रवेश करून शिंगणापूर,दहिवडी, वडूज मार्ग कराडला पोहचलो. लेकीने घट्ट मिठी मारून पप्पांचे स्वागत केले.


पंढरीची वारी यावेळची खरंच वेगळी होती,खूप आनंद देऊन गेली.या वारीदरम्यान दिवसभर घडलेले सर्व प्रसंग, आलेले अनुभव,पाहिलेली मंदिरे असो वा भेटलेले लोक असो,सर्वांच्या बाबत जेवढं लिहिता येईल तेवढे लिहिले आहे. आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.आपण हे सर्व अतिशय मनापासून वाचलं ,मला प्रतिक्रिया दिल्या. आपण जे चांगलं पाहिलं ते दुसऱ्याला सांगावं, आपण जे चांगले ऐकले ते दुसऱ्याला सांगावं,आपल्याला माऊली कृपेने जे ज्ञान मिळते , ते दुसऱ्यांनाही सांगावं. ज्ञान देण्यानं वाढते. कोणतीही चांगली गोष्ट द्यायला पाहिजे. मी ते शेअर केले. मला जे पाहायला मिळाले ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. आपणही ते मनापासून पाहिलं, वाचलं, ऐकलं. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. असेच प्रेम माझ्यावर राहू द्या.

यावर्षी वारीमध्ये दैनिक पुढारी मधून सलग 19 दिवस 'देव माझा विठू सावळा' या मालिकेतून लिखाण केले आहे. यामध्ये वेगळे विषय मांडण्याचा माझ्या परिने प्रयत्न केला आहे. आपण पुढारीमध्ये याचे वाचन केले, मला प्रतिक्रिया पाठवून दिल्या. मी आपला ऋणी आहे. या मालिकेसाठी कराड अर्बन बँकेने प्रायोजकत्व स्वीकारल्याबद्दल मी मी बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष सुभाषराव एरम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांचाही ऋणी आहे.



दैनिक पुढारीने यावर्षी मला एक वेगळी जबाबदारी दिली होती. सध्याचा जमाना ऑनलाईनचा आहे, फेसबुक व्हाट्सअपचा आहे. लोकांना घडलेल्या बातम्या लगेच पहायच्या असतात, ऐकायचं असतं याचा विचार करून पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे चिरंजीव पुढारी चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी पुढारी ऑनलाइन वेब पोर्टल मोठ्या दिमाखाने ॲक्टिव केले आहे. पुढारी ऑनलाइन चॅनेल युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून अतिशय लोकप्रिय झाला आहे. युट्युबवर पुढारीचे 84 हजार सदस्य आहेत. फेसबुक वर सुद्धा पुढारी वेब पेज अतिशय लोकप्रिय आहे. पुढारीच्या बातम्या लिंकच्या माध्यमातून ताज्या बातम्या लगेच वाचकांच्या पर्यंत मोबाईल वरून पाठवल्या जातात. याचाच भाग म्हणून पंढरीची वारी पुढारीच्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी समुह सरव्यवस्थापक अनिल  पाटील आणि  एजीएम राजेंद्र मांडवकर यांनी या वर्षी माझ्याकडे वेगळी जबाबदारी दिली होती. मी ऑनलाईन, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नवीन आहे ,पहिल्यांदाच बुम माईक हातात घेतला.

सुरवातीचे दोन-तीन दिवस चुका झाल्या. हळूहळू सुधारणा होत गेली.याकामी आमच्या वेबचे प्रमुख अभ्युदय रेळेकर यांनी चांगले मार्गदर्शन केले, ऑनलाइन टीम मधील अनेकांनी वेळेवेळी फोन करून माईक कसा धरायचा, सुरुवातीला काय बोलायचे, शेवट कसा करायचा  व्हिडिओ कसा करायचा याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे हळूहळू सुधारणा होत गेल्या आणि आपल्यापर्यंत चांगले व्हिडिओ चांगले विषय पोहचवू शकलो. गेल्या 18 दिवसात 50 वेगवेगळ्या स्टोरी आपल्यापर्यंत पुढारी ऑनलाइनच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत. या सर्व स्टोरी व्हिडिओ तयार करताना माझ्या सोबत असणारे वारकरी रणजीत पाटील, विजय शेलार, प्रकाश पाटील आणि माणिक पाटील यांनी वेळोवेळी खूप सहकार्य केले, मी त्यांचा ऋणी आहे. वेगवेगळ्या विषयावर 50 नवीन व्हिडिओ स्टोरी देताना पंढरीच्या वारीतील वैशिष्ट्य मांडण्याचा प्रयत्न केला, आपणास तो आवडला असेल ! कॅमेरा समोर आणि माईक हातात घेऊन बोलण्याची फार सवय नव्हती मात्र माऊली कृपेने सर्व होत गेले. या स्टोरी फेसबुक आणि यू ट्यूब ऑनलाइन वरती अतिशय हिट झाल्या आहेत. तरडगाव मधील एका स्टोरीला 8000 हून अधिक लोकांनी पाहिले आहे. प्रत्येक स्टोरी किमान पाचशे लोकांनी पाहिले आहे. हे पुढारीच्या लोकप्रियतेचे यश आहे,माऊली नामाची जादू आहे, पंढरीच्या वारीचा महिमा आहे !

पंढरीची वारी आळंदी पासून सुरू झाली आणि पंढरपुरात संपली. या भक्तीच्या सागरात अनेक जण भेटले. अनेकात देव दिसला, वारी यशस्वी पूर्ण होण्यासाठी अनेकांनी हात पुढे केला, सहकार्य केले. या सर्वांचा मी ऋणी आहे. 👏

भेटू लवकरच😌
तोपर्यंत राम कृष्ण हरी !







karawadikarad.blogspot.com

माऊली सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...