2001 साली पुढारीमध्ये वार्ताहर म्हणून कामास सुरुवात केल्यानंतर त्यावेळी युवक काँग्रेसमध्ये पहिल्या फळीमध्ये कार्यरत असलेल्या नईम कागदी, झाकीर पठाण, फिरोज कागदी, जितेंद्र ओसवाल आणि राहुल खोचीकर यांच्याशी माझी पहिल्यांदा ओळख झाली. त्यावेळी काँग्रेस पक्ष जोमात होता. त्यातल्या त्यात युवक काँग्रेसच्यावतीने सतत कार्यक्रम होत होते. या कार्यक्रमात भेटीदरम्यान वरील चारही मित्रांशी माझी ओळख झाली. पुढे या ग्रुपमध्ये काही जण वेगळ्या पक्षात गेले. पक्षीय पातळीवर मतभेद झाल्यानंतर हे चौघे वेगळे झाले असते तरीही या चौघांशीही माझी मैत्री वाढत गेली. आमच्या सर्वांच्यामध्ये एक कॉमन दुवा होता, तो म्हणजे समविचार आणि अमिताभ बच्चन. पुढे ही मैत्री अधिकच घट्ट झाली.
राहुल खोचीकर यांच्या कुटुंबाशी घरगुती नाते निर्माण होण्याचे कारण त्यांचे वडील प्रकाश खोचीकर (सर). सरांची आणि माझी साहित्य विषयावर सतत चर्चा होत होती. या दरम्यान राहुलबाबत माझे सरांशी बोलणे व्हायचे. आमचा राहुल तुमच्यासोबत असतो, त्यामुळे आम्हाला काळजी वाटत नाही. मात्र त्याला नोकरी किंवा उद्योगाविषयी समजावून सांगा, असे सर मला नेहमी म्हणायचे. मी ही राहुलला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ऐकून घेईल तो राहुल कसला? ‘मला नोकरी करायची नाही. आहे यात मी समाधानी आहे.’, ‘उद्योगातून पैसे मिळतात’ असे तो मला नेहमी म्हणायचा.
राहुल आणि मी गेल्या वीस वर्षांत शंभरहून अधिक छोट्या-मोठ्या सहलींसाठी बाहेरगावी फिरून आलो आहे. करवडी येथील रस्त्याकडेच्या शेतात पिंपरणीच्या झाडाखाली बसून वनभोजन करणे हा राहुलचा आणि माझा आवडता छंद. अनेकदा दुपारी राहुलच्या घरातून डबा घेऊन आम्ही शेतात जाऊन जेवलो आहे. माझ्या परस्पर राहुलसुद्धा सहकुटूंब जाऊन त्याने तेथे वनभोजनाचा आनंद लुटला आहे. राहुलच्या पत्नी अमृता यांच्या पायाचे एक बोट अनेक दिवस दुखत होते. राहुलने माझ्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर मी त्याला करवडीला जाऊन आमचे बंधू अण्णांना भेटायला सांगितले. अण्णांनी किरकोळ घरगुती उपचार करून दहा मिनीटांतच अमृता वहिनींचे दुखणे संपविले. तेव्हापासून त्या दोघा पती-पत्नीचा आमच्या करवडीच्या घराशीही आणखी संबंध वाढला.
पावसाळा सुरु झाला की जुलै-ऑगस्ट महिन्यात कोयनानगर किंवा चांदोली येथे आम्ही गेलो नाही असे कधीच झाले नाही. बुलेटवर बसून आम्ही दोघांनी अनेकदा पर्यटनाचा आनंद लुटला आहे. असेच एकदा कारमधून आम्ही चांदोलीला ट्रिपला गेलो होतो. आमच्यासोबत आणखी दोन मित्र होते. चांदोलीवरुन परत येताना शेडगेवाडी फाट्यावर आल्यावर आपण असेच गणपतीपुळ्याला जाऊया... बघुया कोणाचे धाडस होतंय? असा शब्द टाकल्यानंतर नाही...हो म्हणत आम्ही सर्वजणच तिकडे जायला तयार झालो. अंगावरच्या कपड्यानिशी गणपतीपुळ्यामध्ये रात्री 10 वाजता पोहोचलो. देवस्थान कमिटीच्या नवीन निवासस्थानावर जाऊन मुक्काम केला. दुसर्या दिवशी अंघोळ केल्यानंतर अंग पुसायला टॉवेल नसल्यामुळे रुममधील बेडशीटनेच अंग पुसण्याची आयडिया राहुलचीच. दुसर्या दिवशी जाखादेवीमार्गे आम्ही कराडला परत आलो. कोयनानगरच्या पंचधातू बोगद्यामार्गे कोळकेवाडी धरणाकडे जाणे ही आमची आवडती ट्रिप होती. मध्यंतरी एकदा कोयना धरणातील पाणी पूर्ण आटल्यानंतर डॉ. सुश्रूत पुराणिक यांच्यासमवेत आम्ही कोयना धरणाच्या आत जाऊन केलेली सहल अविस्मरणीय होती. राहुलने 550 नंबरची बुलेट घेतल्यानंतर ही बुलेट पहिल्यांदा तुम्हा चालवायची.. अशी राहुलने अट घातली होती. माझे बुलेट न चालवण्याचे कारण राहुलला माहित होते. तरीही त्याने गळ घातल्यानंतर मी आणि माझा मुलगा पियुष याने राहुलच्या बुलेटवरुन केलेली अकरा मारुती यात्रा अविस्मरणीय होती.
मंत्रालयात कसा प्रवेश करायचा? याचं ज्ञान मी पत्रकार असूनही किंवा माझ्याकडे अधिस्विकृती पत्रिका असुनही मला नव्हते. मात्र मुंबईसह राज्याच्या अनेक शहरांत मित्र परिवार असलेल्या राहुलमुळे पहिल्यांदा मी मंत्रालयात गेलो. मंत्रालयाच्या कोणत्या मजल्यावर कोणाचे ऑफिस आहे? मंत्री कुठे राहतात? आमदार निवासवर कसे रहायचे? कोणाची चिठ्ठी आणायची? एवढेच नव्हे तर मुंबईला गेल्यानंतर मांदेली फ्राय मासा कुठे खायचा? यांसारख्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी राहुलनेच मला शिकवल्या. 2010 मध्ये मला दिल्लीला जाण्याचा योग आला. त्यावेळी दिल्लीमध्ये कोणा-कोणाला भेटायचे? महाराष्ट्र सदनवर बुकिंग कसे करायचे? ना. पृथ्वीराज चव्हाण यांचे घर कुठे आहे? याची माहिती मला राहुलने दिली होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढारीच्या कामानिमित्त मंत्रालयात अनेकदा जाण्याचा मला योग आला. या काळात कोणती फाईल कोठून कशी जाते, कोणाला भेटायचे, फायलीची माहिती कोठून काढायची, वर्षा बंगल्यावर प्रवेश कसा मिळवायचा? हे मला राहुलनेच शिकवले. कराड ते मुंबई अशा आमच्या 50 हून अधिक ट्रिपा झाल्या असतील. या सर्व कालावधीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारण या विषयीची माहिती मला राहुलकडूनच मिळत गेली. चिंतन ग्रुपचे अभिनंदन थोरात, विनोद तावडे, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, संजय पाटील हे जेव्हा जास्त प्रकाशात नव्हते तेव्हापासूनच राहुलचे त्यांच्याशी संबंध होते. प्रत्येक वर्षी 31 जुलैला या मान्यवरांचे राहुलला वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग कार्ड किंवा मेसेजेस यायचे. हे मी स्वतः पाहिले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा काय असतो? कुठे जाऊन दर्शन घ्यावे? हे मला 2014 साली सर्वप्रथम राहुलने दाखवले. नातेपुते हे राहुलचे आजोळ. नातेपुतेमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो. या मुक्कामाच्या ठिकाणी राहुल मला पहिल्यांदा घेऊन गेला. पुढे 2015 साली मी पहिल्यांदा पंढरीची वारी केली. तेव्हा राहुलच्या मामांच्या घरी आम्ही मुक्काम केला. या काळात राहुलच्या मामांच्या घरी सर्व नातेवाईक जमले होते. लग्न होऊन अनेक वर्षे होऊनही मुल-बाळ होत नसल्यामुळे दर्शनासाठी आणि माऊलींकडे मागणे मागण्यासाठी राहुल सहकुटुंब आले होते. त्यावेळी राहुल आणि अमृता वहिनीं यांनी राहुलचे पप्पा (बापू) आणि गौरीताई, आई यांच्यासमोर बोलताना माऊलींच्या कृपेने येत्या वर्षभरात तुमच्या घरी पाळणा हलेल, मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो, असे मी त्यांना सांगितले होते. पुढील वर्षभरात राहुलला मुलगी झाली. या मुलीचे नाव झेंडू ठेवले. झेंडुच्या बारशावेळी राहुलने कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व निमंत्रितांना झेंडुच्या फुलाचे रोपटे भेट दिले होते. अशा कल्पना फक्त राहुललाच सुचू शकतात.
माऊलींच्या दर्शनामुळे राहुलच्या घरात पाळणा हलला, अशी श्रद्धा गडद झाली आणि त्याबरोबरच राहुलच्या कुटुंबियांचेही आमच्याशी संबंध वाढत गेले. पुढे प्रत्येक वर्षी वारीमध्ये नातेपुतेमध्ये मला भेटायला माझे सर्व कुटुंबिय यायचे. ते राहुलच्या मामाच्या घरीच थांबायचे. राहुलचा मामेभाऊ मंगेश याने 2019 च्या वारीमध्ये नातेपुते येथील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीचे महादेव मंदिर आम्हाला दाखविले होते.
राहुलचा सर्वच विषयांत अतिशय खोल असा अभ्यास होता. विधानसभा - लोकसभा निवडणुकांपासून नगरपालिका-महापालिका निवडणुकीत कोण जिंकणार? याचा अचूक अंदाज राहुलकडे असायचा. कारण त्याचे नेटवर्क अनेक शहरांमध्ये पसरले होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुलने मी ही लायन्समध्ये यावे, अशी इच्छा व्यक्त करुन मला सदस्य व्हायला भाग पाडले. पुढे लायन्स क्लबच्या अनेक बैठकींमध्ये अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या. या दरम्यान राहुलच सर्वांना भारी पडायचा. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्याने राज्यभर अनेक परिषदांमध्ये भाग घेतला. त्याही ठिकाणी त्याने अनेक बक्षिसे मिळवली होती. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणेच अमिताभ बच्चन हा राहुल आणि माझ्यामधील समान धागा होता.
2015 मध्ये मी व्हॉटसअॅपवर अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुप स्थापन केला. यात पहिल्या पाचमध्ये राहुलचा समावेश होता. नंतर आमचा ग्रुप वाढत गेला. आज आमच्या ग्रुपमध्ये 77 सदस्य आहेत. मात्र ठार बच्चनवेडा असलेल्या हातावर मोजण्यासारख्या सदस्यांमध्ये राहुलचा नंबर पहिला आहे. अमिताभ बच्चन यांच्या सर्व चित्रपटांतील गाणी, डायलॉग राहुलला पाठ होते. दोन वर्षांपूर्वी आमच्या ग्रुपचा गाण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल आणि प्रबोध पुरोहित यांनी केले होते. सूत्रसंचलनामध्ये राहुल आणि नईम कागदी यांचा हात कोणीच धरु शकत नाही, असा माझा विश्वास आहे. कोणत्याही कार्यक्रमात या दोघांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रम उठत असे. अमिताभ बच्चन यांना 2018 साली मी भेटून आल्यानंतर राहुलने मला घट्ट मिठी मारली होती. माझा हात हातात घेऊन या हातात अमिताभ बच्चन यांनी हात दिला होता. तो हात त्याने हातात घेतला होता. ‘सरजी, तुम्ही एकटेच बच्चनला भेटून आला. आम्हाला पण भेटायला न्यायलाच पाहिजे. काही पण करा’ अशी गळ त्याने घातली होती. पुढे बच्चनप्रेमींच्या एका गेट-टुगेदरमध्ये राहुल आणि मी एकत्रित गाणी गायली. गेल्या वर्षीही 4 सप्टेंबरला आमच्या बच्चनप्रेमी ग्रुपचे 53 सदस्य घेऊन मी केबीसी सेटवर गेलो. अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर काय वाटले? याबाबत राहुलने लिहिलेल्या अनुभवामध्ये ‘सरजींच्यामुळे मला अभिनयाचा देव पाहता आला’ अशी कृतज्ञता त्याने व्यक्त केली होती.
राहुल आमच्यापासून आता दूर गेला आहे. तो आता परत येणार नाही. आजपासून राहुल पुढारी ऑफिसमध्ये येऊन पेपर वाचत बसणार नाही. आजपासून रोज राहुलचे माहितीपर मेसेजेस येणार नाहीत. ही गोष्टच पटत नाही. पण राहुल आपल्यापासून दूर गेला आहे.. हे खरं आहे. पण राहुलचे असे एकाकी जाणे न पटणारे आहे. ईश्वर असा निष्ठूर का होतो? मृत्यूपूर्वी एखादी संधी का देत नाही? असा प्रश्न पडतो. सोमवारी सकाळी उठल्यानंतर राहुल आणि अमृता वहिनी दोघेही मुलीला सोडायला शाळेत गेले होते. शाळेतून परत आल्यानंतर राहुलला अस्वस्थ वाटू लागले. रात्रभर झोप लागली नाही म्हणून.. आराम करतो म्हणून राहुल झोपला. मात्र पुन्हा उलटी झाल्यानंतर तो उठून बसला. यादरम्यान चक्कर आली म्हणून खाली पडला आणि बेशुद्ध झाला. अमृता वहिनींनी शेजार्यांच्या मदतीने त्यांना पहिल्यांदा गुजर हॉस्पिटलमध्ये नंतर कराड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात दाखल केले तेव्हाच डॉक्टरांनी अमृता वहिनींना पेशंट गेला आहे.. असे सांगितले. मात्र त्यावेळी धाडसाने परिस्थितीला सामोरे जात त्यांनी आम्हा सर्व मित्र मंडळींना फोन केले... कळवले. राहुलचे वडिल मुंबईला असल्यामुळे ते कराडला येईपर्यंत दिवस जाणार होता. तोपर्यंत अमृता वहिनींना घरी जाण्यास सांगितले. मात्र घरात राहुलची आई पण होती. राहुल गेला आहे... हे जर आईंना कळले तर त्या माऊलीला कोण सांभाळणार? असा विचार आल्यानंतर आम्ही अमृता वहिनींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनीही दुपारी तीनपर्यंत आपल्या भावना दाबून ठेवल्या. तीनच्या सुमारास राहुलची बहिण गौरीताई पुण्याहून आल्यानंतर सर्व कुटूंब एकत्र आले. यावेळी गौरीताई, अमृता वहिनी आणि राहुलच्या आईने फोडलेला हंबरडा काळीज चिरवटून टाकत होता. सहाच्या सुमारास राहुलचे वडील मुंबईहून आल्यानंतर अंत्ययात्रा निघाली. तत्पूर्वी सर्वच कुटुंबाला बसलेला धक्का उपस्थितांना हेलावून गेला. राहुलदादा.. तु आम्हाला फसवलंस असं राहुलची आई सारखं-सारखं म्हणत होती. तर माझा दादा मला परत द्या.. हा गौरीताईचा हंबरडा सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत होता. मरेपर्यंत साथ देणार.. असे तुम्ही वचन दिलं होतं.. मग का आम्हाला सोडून गेलात..झेंडुनं आता कुणाला बाबा म्हणायचं.? हा अमृता वहिनींचा सवाल आणि त्यावेळी निरागस झेंडुच्या डोळ्यांतून गालापर्यंत आलेला आणि आटलेला एक अश्रुचा थेंब .. पुढे काय? असा सवाल करीत होता.
राहुल.... खरंच तु सर्वांना हुल दिलीस. तुझं जाणं आम्हाला परवडणारं नाही. पण सायंकाळी जेव्हा गौरीताई पुन्हा भेटली. तेव्ही तिने माझ्या बापूंना आणि आईला या पुढे रोज भेटायला येत जा.. आता आमचा राहुलदादा येणार नाही, असे मला निक्षून सांगितले. होय.. गौरीताई राहुल जरी गेला असला तरी राहुलच्या कुटुंबाला, आई-वडिलांना अमृता वहिनी व दोन्ही मुलांना आम्ही कधीही अंतर देणार नाही. जे-जे करणे शक्य आहे. त्यासाठी आमचा अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुप, लायन्स क्लबमधील मित्र, राहुल मित्र परिवार आणि मोरे कुटुंब सतत पाठीशी राहणार आहे.
पण राहुल तु एक धडा देऊन गेलास... तु मला नेहमी म्हणायचास.. ‘मला काहीही होत नाही.. मी शंभर वर्षे जगणार आहे. एक दिवस माझा येणार आहे. जुनं घर पाडून तिथे चिरेबंदी वाडा मला बांधायचा आहे. माझ्याकडे पैसे आल्यानंतर सगळ्यांना जे-जे हवं ते मी त्यांना देणार आहे.’
राहुल.. तुझी ही स्वप्नं आता पूर्ण होणार नसली तरी स्वप्नं पाहण्यात वेळ घालवू नका. कारण मृत्यू अटळ आहे. तो मृत्यू स्वप्नांचा चुराडा करणारा आहे. हे तु आम्हाला शिकवून गेलास. तुझ्या आठवणी कायमच स्मरणात राहतील. जेव्हा-जेव्हा चर्चा होतील, तेव्हा-तेव्हा इथे राहुल असता तर... राहुलचं जिंकला असता, असे आम्हाला वाटत राहील. ‘बाप के कंधे पर बेटे का जनाजा’ हा शोले चित्रपटातील संवाद काल बापुंच्याकडे पाहिल्यानंतर सतत आठवत होता. मात्र त्याचवेळी ‘जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी.. मौत मेहबूबा है.. साथ लेकर जाएगी’ असे मुकद्दर का सिकंदर सांगत होता. आनंद मरा नहीं.. आनंद मरते नहीं... हा काळजाचा ठोका चुकविणारा आनंद चित्रपटातील संवाद राहुलच्या आनंदमय आठवणी देत राहील..!





भावनेनं ओथंबलेलं शब्दांकन ��
उत्तर द्याहटवाहृदयाला चटका लावून गेलं ��
अजुनही विश्वास बसत नाही कि आपला राहुल आपल्याला सोडून गेला ....
उत्तर द्याहटवानिशब्द........
भावपूर्ण श्रद्धांजली
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाअतिशय दुर्देवी घटना! राहुलजी एक हरहुन्नरी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक मित्र हरपला आहे
उत्तर द्याहटवा1 नंबर शब्दांकन
उत्तर द्याहटवाGreat n heart touching tribute to unforgettable memories of Rahul.
उत्तर द्याहटवाSo beautifully expressed.
"Anand mara nahi.. Anand marte nahi"
So True Satish ji.
May his soul rest in eternal peace..
डोळे पाणावले . छान शब्दांत वर्णन
उत्तर द्याहटवाउज्ज्वल ज्याची पहा प्रभावळ,
उत्तर द्याहटवादूर मनोऱ्यात..
तो देव आता नाही उरला,
शब्दांच्या गाभाऱ्यात......
लेखनाने मन हेलावून टाकलात... भावपुर्ण श्रद्धांजलि
उत्तर द्याहटवासतीश सर,
उत्तर द्याहटवामाझा राहुल राहिला नाही, यावर विश्र्वासच बसत नाही....
पोरके पण काय असते, ते जाणवू लागलेय....
सर अतिशय मन विषण करणारी घटना आहे ही. प्रारब्ध कुणालाच चुकलेले नाही.
उत्तर द्याहटवा