फॉलोअर

१७ मे २०१९

आज दूरसंचार दिवस

📡☎📲📡☎📲📡
➖➖➖➖➖➖➖
☑ १७ मे जागतिक दूरसंचार /


दुरसंदेशवहन दिन आणि माहिती दिन......

➖➖➖➖➖➖➖
🔺 _१७ मे १८६५ या दिवशी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून १७ मे हा दिवस जागतिक दूरसंदेशवहन दिवस म्हणून १९७३ पासून साजरा केला जाऊ लागला. पुढे २००५ साली जागतिक माहिती समाज शिखर परिषदेत १७ मे या दिवसाला ‘जागतिक माहिती दिन’ म्हणून मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर २००६ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार मंडळाच्या सभेत हा दिवस *‘जागतिक दूरसंदेशवहन आणि माहिती समाज दिवस’ (World Telecommunication and Information Society Day)* म्हणून साजरा  करण्याचा ठराव ६८ सभासद देशांच्या समितीने जाहीर केला._
🔲🔲🔲
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश दळणवळणाच्या क्षेत्रातील इंटरनेट आणि तत्सम नवीन तंत्रज्ञानाचे जागतिक महत्व अधोरेखित करणे आणि या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन बदलांविषयी सामाजिक जागरुकता निर्माण करणे त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानातील निरनिराळ्या प्रणालींचे एकसुत्रीकरण करणे हा आहे. त्याचबरोबर या दिनाच्या निमित्ताने दळणवळणाची विविध साधने, माध्यमे, त्याबाबतची राष्ट्रांची धोरणे, तंत्रज्ञानामधील फरक, विविधता, त्यांची जोडणी आणि इंटरनेट, टेलिव्हिजन, फोन यांच्या वापराने देशा-देशांमधील अंतरे कमी करणे अभिप्रेत आहे. दळणवळणाच्या या सर्व आधुनिक सोयी-सुविधा दूरवरच्या दुर्गम भागातील मागासलेल्या खेड्यापाड्यांमधील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीची धोरणे, योजना तयार करणे हा देखील या दिवशी आखलेल्या अनेक कार्यक्रमांचा एक भाग आहे.
🔲🔲🔲
दूरसंदेशवहन म्हणजे एका ठिकाणाहून काही अंतरावरच्या दुसऱ्या ठिकाणी एखादा संदेश वाहून नेणे. फार प्राचीन काळापासून संदेशवहनाची कला माणसाला अवगत होती. पूर्वी हे काम विविध माध्यमातून केले जाई. कधी एका ठिकाणी धूर करून त्याद्वारे दुसऱ्या ठिकाणच्या लोकांना इशाऱ्याचे संदेश दिले जात तर कधी ढोल-नगारे वाजवून, हातवारे करून किंवा हातात धरलेल्या वस्तूंच्या किंवा झेंड्यांच्या विशिष्ट हालचाली करून संदेशाची देवाण-घेवाण करणे किंवा प्रकाशझोतांच्या सहाय्याने संदेश पाठवणे, सूचना देणे अशी माध्यमे संदेशवहनासाठी वापरली जात. पुढे यात सुधारणा होत जाऊन तंत्रज्ञानाचा विकास होऊन टपाल, तारायंत्र, दूरध्वनी, फॅक्स त्याबरोबरीनेच बिनतारी संदेशवहन जसे आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि आजच्या आधुनिक काळात उपग्रहाद्वारे संदेशवहन, संगणक, इंटरनेट, इ-मेल अशासारखी माध्यमे अस्तित्वात आली आहेत. नवी साधने आली की आधीची त्या ओघात नाहीशी होतात, बंद पडतात.
🔲🔲🔲
*भारतात एके काळी अत्यंत प्रभावी असलेले तारायंत्र (telegraph) हे माध्यम मोबाईल, इंटरनेट, इ-मेल यांच्या प्रभावामुळे नुकतेच बंद झाले.*
🔲🔲🔲

🔺 *तारायंत्राचा शोध -*

सॅम्युएल मोर्स हा खरं तर एकोणिसाव्या शतकातील एक प्रख्यात अमेरिकन चित्रकार. त्याने अनेक जागतिक कीर्तीच्या व्यक्तींच्या, राजकारण्यांच्या तसबीरी चितारलेल्या होत्या. १८२५ साली अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर, फ्रेंच सेनानी, जनरल लाफायेत याचे पोर्ट्रेट काढण्याची संधी त्याला मिळाली. सूर्यास्ताच्या भव्य पार्श्वभूमीवर या चित्राचे काम भरात असताना मोर्सला त्याची बायको आजारी असल्याचे त्याच्या वडिलांचे पत्र मिळाले. काढत असलेले चित्र अर्धवट टाकून मोर्स तातडीने न्यू हेवन येथील आपल्या घरी परतला. पण त्याला उशीर झाला होता. त्याच्या पत्नीचे केव्हाच निधन झाले होते आणि तिचा दफन विधीही आटोपण्यात आला होता. पत्नीच्या आजारपणाची आणि निधनाची बातमी त्याला फार उशिराने मिळाली होती. त्या काळी जलद दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. एका ठिकाणाहून दुसरीकडे संदेश पोहोचविण्यास त्या काळात फार वेळ लागत असे. लांब अंतरांवर त्वरित संदेश पोहोचविण्यासाठी काहीतरी उपाय शोधण्याचा त्याने मनाशी निश्चय केला. आपली चित्रकला त्याने बाजूला सारली आणि तारयंत्र विकसित करून त्याद्वारे संदेश पाठवण्यासाठी मोर्स लिपी तयार केली. या लिपीमध्ये डॉट (●) आणि डॅश (━) या विद्युत स्पंदनांचा (electric pulses) वापर केला होता. या दोन प्रकारच्या सिग्नल्ससाठी यंत्राच्या ‘कट्ट’ आणि ‘कड’ या तारायंत्रामधून निघणाऱ्या ध्वनीचा उपयोगदेखील संदेश पाठविण्यासाठी केला गेला. संदेश पाठविण्याची ही पद्धत जगभर स्वीकारली गेली.
🔲🔲🔲
सुरुवातीला तारायंत्रांचा वापर युद्धविषयक बातम्या कमी वेळात पाठविण्यासाठी केला गेला. आधी या बातम्या घोडे, गाड्यांचा वापर करून टपालाद्वारे पाठविल्या जात. हे काम फार वेळखाऊ आणि धोकादायक असे. तारायंत्रांमुळे हे काम सोपे जलद आणि निर्धोक झाले. पुढे महत्वाचे संदेश जलद पाठविण्यासाठी नागरी सेवेत तारायंत्रे वापरात येवू लागली. या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविण्याची सोयही उपलब्ध झाली.
🔲🔲🔲

🔺 *भारतीय तार सेवा*

भारतात तारायंत्राचे युग एकोणविसाव्या शतकाच्या मध्यावर भारत पारतंत्र्यात असताना अवतरले. भारतात १८५१ साली ‘ट्रान्सइंडिया टेलिग्राफ’ या नावाने पहिल्या तारायंत्राची स्थापना करण्याचे काम सुरु होऊन तीन वर्षांनी म्हणजे १८५४ साली हे काम पूर्ण झाले. पहिली जवळ जवळ तीस वर्षे भारताच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यासंबंधीची माहिती गोळा करणे आणि त्वरित संदेश पाठवून ती आंदोलने, उठाव चिरडण्यासाठी आणि भारतावर आपला एकछत्री अंमल कायम राखण्याकरिता तारायंत्र हे ब्रिटीश सरकारसाठी एक महत्वाचे साधन बनले होते. हे माध्यम एवढे प्रभावी होते की स्वातंत्र्य लढ्याचा बिमोड करण्याचे ब्रिटीश सरकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तारलाईन्स तोडणे, उध्वस्त करणे आणि ब्रिटीशांची दळणवळण यंत्रणा खंडित करणे हा क्रांतिकारकांच्या लढ्याचा एक प्रमुख भाग होऊन बसला होता.
🔲🔲🔲
त्यानंतर पुढे १८८५ साली भारतीय तारायंत्र अधिनियम-१८८५ हा कायदा ब्रिटीश सरकारने भारतात लागू केला. या अधिनियमानुसार तारायंत्र, दूरध्वनी, दळणवळण, रेडिओ या सेवांच्या वापरावर सरकारी नियंत्रण आले. यामुळे तारायंत्रांच्या जोडणीसाठी केबल्स टाकणे, जागोजागी तारकेंद्रांची उभारणी करणे, दूरध्वनी केंद्रांची स्थापना, विशिष्ट परिस्थितीत खाजगी फोन टॅप करणे, खाजगी जमिनींचे अधिग्रहण करणे अशासारखे अधिकार सरकारला मिळाले आणि तारायंत्रांचे जाळे झपाट्याने भारतभर पसरले.
🔲🔲🔲
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तार व टपाल खात्याच्या कामकाजात अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि तारयंत्रणा जास्त सक्षम आणि लोकाभिमुख झाली. आजची एसएमएस, इ-मेल, मोबाईल फोन इत्यादी सेवांचे काम पूर्वी तार व टपाल खात्याची पोस्टकार्ड आणि तार या दोन सेवा चोख करीत असत. त्यातही तार या विषयाबद्दल सर्वसामान्यात भीती आणि उत्सुकता अशी संमिश्र भावना असे. अत्यंत गरजेच्या, तातडीच्या आणि आणीबाणीच्या प्रसंगी तार पाठवली जात असे. त्यामुळे एखादी तार आली की ती उघडून पाहीपर्यंत घरातले वातावरण गंभीर होई. कधी तारेमधून आनंदाची, गोड बातमीही समजे तर कधी परीक्षेचा निकाल कळवण्यासाठी तारेचा वापर केला जाई. लष्करातील आपल्या पोस्टींगची किंवा बदलीची वाट पहात असलेल्या जवानांसाठी ‘तार’ ही एक मोठीच उत्कंठेची बाब होती. शिवाय रजा मिळविण्यासाठी ‘. . स्टार्ट इमिजीयटली’ या तारेचीही हे जवान आतुरतेनी वाट बघत.
🔲🔲🔲
*भारतीय पुरावे अधिनियमांतर्गत (Indian Evidence Act) ‘तार’ ही सेवा पंजीकृत झालेली असल्यामुळे कागदोपत्री पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यासाठी या तारांचा वापर वकील लोक मोठ्या प्रमाणात करीत. बॉलीवूडदेखील या गोष्टीपासून लांब राहिले नव्हते. ‘शहरसे (किंवा गांवसे) तार आया है ।’ हे वाक्य हमखास प्रत्येक जुन्या सिनेमातील टर्निंग पॉईन्ट ठरत असे.*
➖➖➖➖➖➖➖
📡☎📲📡☎📲📡

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...