फॉलोअर

२९ जुलै २०१७

त्यासीं म्हणे जो आपुला

त्यासी लोक म्हणती आपुले...!




वटवृक्षाखाली एखादं रोपटं लावलं तर त्या वृक्षाच्या छायेमुळे ते रोपटं वाढत नाही कोमजतं किंवा खुंटतं हा निसर्ग नियम आहे. खरंतर त्या रोपट्याला वटवृक्षाच्या सावलीमुळे सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि त्यामुळे प्रकाश संष्लेषणाची क्रिया होत नाही. त्यामुळे ते रोपटं वाढत नाही, हे झालं ते रोपटं न वाढण्याचं शास्त्रीय कारण ! पण त्या रोपट्याच्या मनात थोड्या वेगळ्या दिशेने जायची इच्छा झाली तर ते सूर्यप्रकाशाकडे वळतं, ते रोपटं वेगळा मार्ग काढतं, मोठं होतं. आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबाबत असंच म्हणाव लागेल. 

पी.डी.पाटील नावाचा वटवृक्ष कराड नगरीचं वैभव आहे. या वटवृक्षाने विकासाचा डोंगर उभा करताना सहमतीचे राजकारण करून 42 वर्षे कराडचा कारभार केला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे वारसदार पी.डी.साहेबांनी कराड शहर आणि त्यानंतर कराड उत्तरमधील विकासकामासाठी आयुष्य झोकून दिले. पी.डी.साहेबांच्या घरात शिस्तीचा प्रचंड पगडा त्यांच्या कुटुंबियांवर होता. अनुशासन, समर्पण आणि अचूकता साहेबांच्या नसानसात भिनलेली होती. त्यांना समाजकारणासाठी खूप वेळ द्यायला लागत असल्यामुळे कुटुंबियांसाठी खूप कमी वेळ देता आला. तरीही सर्व मुलांच्यावर चांगले संस्कार करताना पी.डी.साहेबांनी स्वत:च्या उच्च पदाचा फायदा कधीच मुलांना घेऊ दिला नाही. बाळासाहेबांना आपले राजकीय वारसदार म्हणून निवडताना पी.डी.साहेबांनी सर्व मुलांचे अचूक निरीक्षण केले होते. 

1992 साली सह्याद्रि कारखान्याच्या संचालकपदी बाळासाहेब पाटील यांना घेतल्यानंतर साहेबांनी त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी दिली. संस्थापक चेअरमनचा मुलगा म्हणून मान, सन्मान न देता कारखान्यात काम करताना काहीतरी शिका असा सल्ला साहेबांनी दिला. 1997 साली बाळासाहेब पाटील चेअरमन झाले. तेव्हा त्यांची झालेली भेट मला आजही आठवते. सफारी ड्रेस आणि कोरलेली दाढी असा एक सामान्य पेहराव असलेले बाळासाहेब पाटील 1997 साली माझ्या लग्नाला आले होते. साधेपणा आणि समोर आलेल्या माणसाचे सर्व म्हणणे ऐकून घेणे ह्या गुणामुळे बाळासाहेब हळूहळू सर्वांच्या मध्ये प्रिय होऊ लागले. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर त्यांनी बारकावा कसा असावा आणि कसा करावा हे कृतीतून दाखवून दिले.

राज्यातील इतर सर्व साखर कारखान्याच्या परिसरात गेल्यानंतर साखर कारखाना जवळ आला आहे याची जाणीव 1 कि.मी. अंतर असतानाच येते. पण याला अपवाद सह्याद्रि राहिला. याचे कारण पर्यावरण पूरक आणि प्रदुषण विरहित तंत्रज्ञान सह्याद्रिवर बाळासाहेबांनी आणले. बाळासाहेबांचे कारखान्यावर स्वत:हूनही अधिक प्रेम आहे. रात्री-अपरात्री कितीही वाजता जाग आली तर ते कारखान्यात फोन करून माहिती घेतात. कारखान्यातील कोणतीही मशिनरी कोणत्या ठिकाणी आहे, त्या मशिनरीची पूर्ण माहिती बाळासाहेबांना आहे. कोणत्याही विभागातील मशिनरीची माहिती असल्यामुळे कशाप्रकारचा बिगाड झाला हे समोरच्याने सांगितल्यानंतर त्याच्यावरील उपाय बाळासाहेबांच्याकडे तयार असतो. 

कारखान्यात सर्व नवीन तंत्रज्ञान बाळासाहेबांच्या दूरदृष्टीतून आलेले आहे. संगणकीकरण स्विकारणारा सह्याद्रि हा राज्यातला पहिला कारखाना असेल. ऊस नोंदणी कार्यक्रम संगणकीकृत करून सह्याद्रिने राज्यात नवा आदर्श घालून दिला. ऊस किती वाजता कारखान्यावर आला, किती टनेज झाले याचा संदेश सभासदांना पाठवण्याची सोय सह्याद्रिने पहिल्यांदा सुरू केली. त्यामुळे किती ऊस गेला यासाठी कारखान्यावर हेलपाटे घालण्याचे कारण सभासदांना उरले नाही. ऊस दरातही सह्याद्रि नेहमीच अग्रक्रमावर राहिला तो बाळासाहेबांच्या सुक्ष्म नियोजनामुळे. संचालक मंडळ आणि त्यांचे नातेवाईक यांच्यावर चहापाणी, वाहने, सहली हा खर्च इतर कारखान्यामध्ये नेहमी चर्चेचा विषय असतो. सह्याद्रि याला अपवाद आहे. वायफळ खर्च टाळून कमीतकमी खर्चात कारखाना चालवण्याचा सह्याद्रि पॅटर्न राज्यभर प्रसिद्ध आहे. बाळासाहेब पाटील यांनी पी.डी.साहेबांच्या सोबत आणि त्यांच्या पश्‍चात सह्याद्रि कारखाना अतिशय काटकसरीने चालविल्यामुळे यावर्षी राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून सह्याद्रिने नंबर पटकावला आहे. 

बाळासाहेब पाटील यांचे राजकारण आणि त्यांच्या विरोधकांचे राजकारण यात जमिन अस्मानचा फरक आहे. कराड तालुक्यातील इतर कारखानदारांची, लोकप्रतिनिधींची कार्यकर्ता सांभाळण्याची आणि कार्यकर्ता तयार करण्याची स्टाईल फार वेगळी आहे. एखाद्या गावात बाळासाहेबांची सह्याद्रिच्या सभासदांसाठी सभा किंवा बैठक असेल तर कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी नियोजन करतात. सभेच्या वेळी हे सर्व लोक खाली सामान्य नागरिकामध्ये, सभासदामध्ये बसलेले असतात आणि गावातील ज्येष्ठ नागरिक, सभासद, कारखान्याचे संचालक किंवा इतर लोकप्रतिनिधी व्यासपीठावर असतात. तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधींच्या बाबतीत बरोबर याच्या उलटे चित्र असते. यामुळेच गावागावात बाळासाहेब पाटील यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे.

पी.डी.पाटील यांच्यानंतर सर्वांना विश्‍वासात घेणारा, होणार आहे तेच सांगणारा, खोटी आश्‍वासन देऊन समोरच्यांना झुलवत न ठेवणारा, स्पष्टोक्ता नेता म्हणून बाळासाहेब पाटील यांची ओळख आहे. गावागावात युवक वर्गामध्ये ते लोकप्रिय आहेतच शिवाय ज्येष्ठ नागरिकामध्ये त्यांना सन्मानाचे स्थान आहे. आबा, नाना, काका, दादा अशा टोपण नावाने ज्येष्ठांना बोलावून त्यांच्या घरात एकरूप होणारा नेता अशी खासियत बाळासाहेबांची ओळख आहे. 

पहिल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब चांगल्या मताने निवडून आले. यामागे पी.डी.साहेबांची पुण्याई होती. मात्र दुसर्‍या निवडणुकीत जोरदार लढत होऊनही केवळ संयमामुळे बाळासाहेब त्यातून बाहेर पडले. वैयक्तीक, खालच्या स्तरावर जाऊन दुसर्‍या निवडणुकीवेळी प्रचार झाला. मात्र नियोजित प्रचार आणि शेवटच्या क्षणी पी.डी.साहेबांनी घेतलेली एंट्री यामुळे ते दुसर्‍यांदा विजयी झाले. निवडणूक निकालानंतर कराड विमानतळावर आर.आर.पाटील यांच्या समवेत ते मुंबईला निघाले होते. त्यावेळी आर.आर.पाटलांनी त्यांना दिलेला सल्ला आम्ही ऐकला होता. ‘पहिली निवडणूक सोपी असते. दुसरी निवडणूक फार अवघड असते यातून बाहेर पडला की पुढच्या निवडणुका सोप्या होत जातात’. आर.आर.पाटलांचा हा राजकीय अभ्यास किती खरा होता याचा प्रत्यय बाळासाहेब पाटील यांना तिसर्‍या निवडणुकीवेळी आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट डावलूनही समोरच्या उमेदवाराला 41 हजाराच्या मताधिक्याने पराभूत करून ते विधानसभेत गेले. या निवडणुकीवेळी पुन्हा एकदा बाळासाहेबांचा संयमी प्रचार कामी आला. तिकीट डावलल्यानंतर अर्ज भरण्यावेळी शिवाजी स्टेडियम समोर झालेल्या सभेत काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे ते ठरवूनच गेले होते. याबाबत निवडक कार्यकर्त्यांबरोबरच काही पत्रकारांशी त्यांची चर्चा झाली होती. चौथ्या निवडणुकीत बाळासाहेबांनी समोर दोन उमेदवार असतानाही त्यांनी केवळ संयमी राजकारणाच्या जोरावर त्यांना पराभूत केले.

संयमी राजकारणाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून जिल्ह्यातील सर्व आमदार बाळासाहेबांना मान देतात. कितीही अडचणी आल्यातरी संयम न ढळू देता आणि तत्वांशी बांधिल राहून कराड उत्तर मतदारसंघात निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळे, सह्याद्रि साखर कारखान्याच्या माध्यमातून तयार झालेला कुटुंबप्रेमी सह्याद्रि सभासद वर्ग आणि रोजगाराचे जाळे यामुळे बाळासाहेब पाटील सतत विजय मिळवत गेले आहेत.

बाळासाहेब पाटील यांच्या विषयी खूप लिहिता येईल. त्यांच्या वक्तशीरपणा आणि सभ्यता याचा खूप जवळून अनुभव अनेकांनी घेतला आहे.
अनंत चतुर्थी दिवशी कराडच्या प्रसिद्ध गजानन हॉटेलमध्ये बाळासाहेबांसमवेत आलेला अनुभव शेअर करायलाच हवा. कराडचा फेरफटका मारून विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे का पहायला मी बाहेर पडलो. मित्रासमवेत दत्त चौकात आलो. चहा पिऊन उठणार तेवढ्यात आमदार बाळासाहेब पाटील हॉटेलात आले. आमदारसाहेब आल्यावर हॉटेलचे मालक, वेटर यांच्याबरोबरच नाष्टा करायला बसलेल्या सर्वांचीच लगबग सुरू झाली. 

सुरूवातीच्याच कक्षात टेबलावर नाष्टा करत दोन युवक बसले होते, त्याच्यासमोर साहेब आणि गंगाधर जाधव बसले. काय देणार खायला असे विचारून साहेबांनी पोहे न टाकता मिसळची ऑर्डर दिली. दरम्यान समोर बसलेल्या दोघांची साहेबांनी चौकशी केली. त्यांनी ओळख करून दिली. वडुजच्या त्या दोघांना कळलेच नाही समोरची व्यक्ती कोण आहे. दरम्यान कराडचे आमदार आपल्या सोबत, चौकातील छोट्या छोट्या हॉटेलात नाष्टा करायला बसलेत याचे त्यांना आश्चर्य वाटले. गप्पा मारत नाष्टा झाला. ते दोघे जायला निघाले तेव्हा त्यांना बाळासाहेबांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. वडूजला आमच्या घरी या असे निमंत्रण देऊन दोघे बाहेर पडले.

नाष्टा करून बाहेर पडलो. येतो म्हणून साहेबांना नमस्कार केला, पण थांबा, काय गडबड आहे, असे म्हणत गंगाधर जाधव यांच्या खताच्या दुकानात मला घेऊन गेले. तिथे पण खते, बियाणे याची माहिती घेताना नवीन कुठला शाळू आला आहे असे विचारून बियाणे पिशवी हातात घेऊन पाहिली. दरम्यान दत्त चौकातील नंदकुमार गणेश मंडळांने तयारी झाली आहे असा निरोप दिल्यानंतर आम्ही सारेजण उठलो. साहेबांच्या हस्ते मिरवणूक नारळ फोडण्यात आला. पालखी खांद्यावर घेऊन साहेब थोडे अंतर चालले. कराडच्या नवीन झांज पथकाने सुद्धा नारळ फोडण्याची विनंती केली. पथकातील युवकांची आस्थेने चौकशी केली, सर्वाना नमस्कार करून साहेब तेथून निघाले.

या दिवशी बाळासाहेब पाटील यांच्या लोकसंपर्काचे पैलू पहायला मिळाले. पी.डी.पाटील साहेबांचे राजकीय वारसदार म्हणून लोक त्यांना का मान देतात हे अनुभवायला आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...