यशवंत विचारांची शिदोरी
दादांची न थांबणारी पावलं
यशवंत विचारांच्या मुशीत आणि शरद पवारांच्या राजकीय तालमीत अजित पवार यांचे नेतृत्व घडले.
यशवंतराव चव्हाण साहेबांवरील त्यांची निष्ठा आणि आदर प्रत्येक वर्षी प्रकर्षाने दिसायचा. २५ नोव्हेंबर, चव्हाण साहेबांचा स्मृतिदिन असला की अजितदादा प्रीतिसंगमावर हमखास उपस्थित असायचे. २५ नोव्हेंबरला कराडमध्ये येऊन चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण करणे, हा अजित पवार यांचा न चुकणारा कार्यक्रम होता.राजकारणाच्या धकाधकीतही मूल्ये, विचार आणि परंपरा जपणारा नेता म्हणून त्यांचे हे व्यक्तिमत्त्व कायम लक्षात राहणारे आहे.
प्रीतिसंगमावर वेळेअगोदरच पोहचले
२०१२ किंवा २०१३ सालची गोष्ट असेल. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कराड येथे मुक्काम होता. प्रीतीसंगमावरील समाधीस्थळी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन होणार होते. त्यामुळे प्रीतीसंगम परिसरात सकाळपासूनच धामधूम होती. कराडकर मोठ्या संख्येने अभिवादनासाठी उपस्थित होते.मात्र ठरलेल्या वेळेआधीच, म्हणजे सव्वा सात वाजताच अजित पवार यांचे आगमन झाले. (खरं तर हीच त्यांची खासियत). प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी थेट चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले आणि नंतर बाहेर येऊन कृष्णा–कोयना संगमाकडे पाहत काही काळ उभे राहिले. आम्ही सर्व पत्रकार तिथेच होतो.त्यावेळी दादांचे लक्ष सैदापूरच्या दिशेने, कृष्णा नदीकाठावर उभारलेल्या स्मशानभूमीच्या शेडकडे गेले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले—“हे शेड कोणी बांधले? नदीकाठाची ही जमीन जलसंपदा विभागाची आहे. त्यांना परवानगी कोणी दिली?” अजितदादा कुठल्याही गोष्टीची सखोल माहिती घेतात, चौकशी करतात, हे अधिकारी जाणून होते. त्यामुळे ते क्षणभर गडबडले आणि निरुत्तर झाले.
प्रशासनावर पकड : विश्रामगृहाचा अनुभव
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराड विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते व अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांचा ताफा त्या ठिकाणी उपस्थित होता.भूमिपूजनाच्या ठिकाणी पोहोचताच अजित पवार यांनी विश्रामगृहाचे ड्रॉइंग मागवून घेतले.“कशा पद्धतीने इमारत उभारणार? एवढा खर्च करता, तर प्लॅन योग्य आहे का?”अशी विचारणा करत त्यांनी आराखड्यातील काही त्रुटीही अधिकाऱ्यांना समजावून सांगितल्या.आम्ही पत्रकार हे दुरून पाहत होतो. प्रशासनावरील त्यांची पकड आणि विविध क्षेत्रांतील अचूक ज्ञान याचा तो एक जिवंत अनुभव होता.
पत्रकार परिषद आणि एक हसरा क्षण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी सर्व सूत्रे हातात घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून ते 13 सप्टेंबर 2023 रोजी कराडला यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिवादनासाठी आले होते. यावेळी प्रीतीसंगमावर पत्रकार परिषद झाली. पक्ष वेगळा झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ताण-तणाव जाणवत होता मात्र तरीही त्यांनी चव्हाण साहेबांचे अभिवादन करून या पुढील काळात शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा पुढे नेण्यासाठी साठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. शेवटच्या टप्प्यात मी हळूच एक प्रश्न विचारला—“दादा, तुमच्या नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी कधी होणार?” दादांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि हसत म्हणाले,“लवकरच करतो…आणि तुला विचारून करतो!” क्षणात पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. दादांचा हा सहज, मोकळा संवाद आजही लक्षात आहे.
पुरस्कार, प्रोत्साहन शब्द आणि कायमची शिदोरी
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण आदर्श पत्रकारिता लेखन स्पर्धेत मला सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. सातारा जिल्हा परिषदेत मोठ्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण झाले.मी व्यासपीठावर पुरस्कार घ्यायला गेलो तेव्हा अजित पवार यांनी शुभेच्छा देताना म्हटले—
“यश मिळवणे सोपे असते; पण ते टिकवणे अधिक अवघड असते. लिहीत राहा.” खासदार श्रीनिवास पाटील यांनी “हा आमच्या कराडचा पत्रकार आहे” अशी ओळख करून दिल्यावर दादांनी,“होय, मी त्यांना ओळखतो,” असे सांगितले. यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत मला यशवंतराव चव्हाण आदर्श पत्रकारिता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.पुण्यात झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास मंत्री रघुवंश प्रसाद सिंह, ना. अजित पवार आणि ना. आर. आर. पाटील उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना विलासराव देशमुख यांनी त्यांच्या खास शैलीतील हिंदीत या पुरस्काराचा अर्थ सांगितला. त्यावर अजित पवार यांनीही थोड्या मोडक्या-तोडक्या हिंदीत,“इन्होंने महाराष्ट्र में यह अभियान घर-घर तक पहुँचाने का बहुत बड़ा काम किया है,”अशी शाबासकी दिली. यापुढे जाऊन आर आर आबांनी आबांनी 'इन्होंने चांगल्या चांगल्या बातम्या छाप्या है' असे सांगितले. त्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
चुक प्रांजळपणे कबूल करणारा नेता
अजित पवार हे स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात.
एखादे वाक्य, बोलीभाषेतील साधेपणा—यामुळे कधी वाद निर्माण होतो; पण त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा आणि निर्णयक्षमता याबाबत शंका उरत नाही.धरणात पाणी नाही तर ...करायचे का ?असा एक वाक्य ते बोलून गेले होते .यावरून दादांना फार मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आपली झालेली चूक त्यांना उमगली आणि ते सर्व कार्यक्रम रद्द करून 14 एप्रिल 2013 रोजी ते अचानकपणे कराडला आले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी शेजारी त्यांनी आपण केलेल्या चुकीची कबुली दिली आणि दिवसभर मौन व्रत धारण करून आत्मक्लेष केला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी दीर्घ वेळ घालवला. आम्ही पत्रकार दिवसभर त्या परिसरात बसून होतो. आत्मकेश आंदोलनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कराडच्या पत्रकारांचे आभार मानले. तो क्षण आजही माझ्या स्मरणात ताजा आहे.
माझ्या आठवणीतला एक बोलका क्षण…
कराड येथे माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा होता. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अजितदादांनी नानांच्या घरी सकाळचा नाश्ता केला. सभोवताली कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मी एकमेव पत्रकार उपस्थित होतो. त्याच वेळी अजितदादांनी अगदी सहज, मिश्किल आणि थेट शैलीत नानांना एक प्रश्न विचारला —“तुम्ही आणि बाबा वेगळे का झालात?”हा प्रश्न कोणत्याही राजकीय टीकेसाठी नव्हता. तो प्रश्न ऐकून क्षणभर उपस्थितांमध्ये शांतता पसरली, आणि लगेचच हास्याची लकेर उमटली. कारण अजितदादांची देहबोली, आवाजातील सहजपणा आणि चेहऱ्यावरचा भाव हा प्रश्न केवळ राजकारणापुरता मर्यादित नसल्याचे स्पष्ट करत होता. त्यावर आनंदराव पाटील नाना यांनीही प्रसंगावधान राखत, तितक्याच मिश्किलपणे उत्तर दिले. त्यांच्या उत्तरात कोणतीही कटुता नव्हती. तो संवाद ऐकताना असे जाणवले की राजकारणातील मतभेद हे कायमचे वैर नसतात; काळ, परिस्थिती आणि भूमिका बदलत जातात, मात्र नाती आणि स्मृती तशाच राहतात.या छोट्याशा प्रश्नोत्तरात अनेक अर्थ दडलेले होते.
साताऱ्यात पोहोचेपर्यंत काम झाले पाहिजे…
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सकाळच्या वेळी न्याहारीसाठी अजितदादा पवार आले होते. ही माहिती कळताच कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी तिथे जमली. आम्ही पत्रकारही तेथे उपस्थित होतो. वातावरणात उत्सुकता होती, पण त्याहून जास्त अपेक्षा होत्या—कारण अजितदादा म्हणजे काम होण्याची आशा.न्याहारी आटोपून अजितदादा बाहेर पडत होते. गाडीत बसण्याच्या आधीच त्यांच्याजवळ एक सर्वसामान्य नागरिक आला. त्याने जिल्हा परिषदेतले एक काम बराच काळ प्रलंबित असल्याची तक्रार केली आणि हातातला अर्ज दादांच्या समोर धरला.अजितदादांनी तो अर्ज नीट वाचला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला आणि थेट शब्दांत सांगितले. त्यानंतर सोबत असलेल्या पीएला स्पष्ट सूचना दिल्या—
“आज संध्याकाळी मी साताऱ्यात पोहोचेपर्यंत हे काम झाले पाहिजे. आणि काम पूर्ण झाल्याची माहिती मला कळवली पाहिजे.”हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सादिक इनामदार यांनीही ऐकले. मी स्वतःही तिथे होतो. तो प्रसंग पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—दादांसाठी हा फक्त अर्ज नव्हता, तर एका सर्वसामान्य माणसाची अपेक्षा होती.
सायंकाळी सादिक इनामदार यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की अजितदादांनी सांगितलेले ते काम पूर्ण झाले आहे आणि संबंधित व्यक्तीला त्याची माहिती देण्यात आली आहे.
हा प्रसंग मला आजही आठवतो. कारण सत्ता, पद किंवा अधिकार यांचा उपयोग स्वतःसाठी नव्हे, तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी तळमळीने करणारा नेता किती दुर्मीळ असतो, हे त्या दिवशी पुन्हा एकदा जाणवले. शासकीय यंत्रणेला गरज पडल्यास धारेवर धरून काम करून घेण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती—हीच अजित पवार यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.
अजित पवार यांच्याबरोबर आलेले हे क्षण, हे अनुभव
एक पत्रकार म्हणूनच नव्हे, तर एक कराडकर म्हणूनही माझ्यासाठी कायमचे आहेत. सदैव वेळ पाळणारे दादा वेळेअगोदरच गेले. घड्याळाला कुठे चांगले दिवस आले असताना घड्याळाची वेळ चुकली. दादांच्या कामाचा उरक, दादांचा स्पष्टवक्तपणा आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुढच्या काही वर्षात होणारी प्रगती तुम्हा आम्हा सर्वांना पाहायची होती. पण नियतीला हे मान्य नव्हतं. सत्ताधाऱ्यांपेक्षा प्रशासन वरचढ होत असताना प्रशासनावर वचक असणारा नेता जाणं, महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. असे नेते पुन्हा घडण्यासाठी दोन-तीन दशके जातात. महाराष्ट्राची अनेकदा राजकीय हानी झाली आहे. अजित दादांच्या जाण्यामुळे त्यात आणखी भर पडली.
सतीश मोरे पुढारी कराड
९८८११९१३०२