सतिताभची ‘अमिताभ स्वप्नपूर्ती’
अभिनयाच्या देवाला भेटायचं म्हटलं तर देवाच्या आवडीचं काम करायचं असतं. देवाला भेटायची इच्छादेखील तेवढीच तीव्र असावी लागते. तसा योग पण यावा लागतो आणि सुदैवाने तो योग जुळून आलादेखील. कराडमध्ये अमिताभ बच्चनप्रेमी समूहाने स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य, अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुपचा उद्देश, उद्दिष्ट याबाबत आम्ही तयार केलेली पुस्तिका अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत व्हॉटस् अॅपवर पोहोचली. ती पुस्तिका तयार करताना त्यामध्ये आम्ही केलेल्या कामांबरोबरच आम्ही अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम का करतो? आम्ही फक्त अमिताभ बच्चन यांचे फॅन नसून त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे अनुयायी आहोत. पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील अमिताभ सुद्धा आम्हाला आवडतो. याबाबत सविस्तर माहिती आम्ही मांडली होती.
ही पुस्तिका पंकज चव्हाण यांच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी आणि दीपक प्रभावळकर त्या क्षणाची वाट पाहत होतो, तिथे जाण्याचा रस्ता खुला झाला.सातारा येथील गेट-टुगेदर झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची सर्व तयारी झाली होती. शेवटी अभिनयाच्या या देवापर्यंत निरोप पोहोचला आणि देवाचा सांगावा आला. 26 ऑ्नटोबर 2018 रोजी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना भेटावयास आपली वेळ दिली आहे, असा निरोप आम्हास मिळाला. आम्ही हवेतच तरंगू लागलो. ज्याची इतक्या वर्षांपासून उत्सुकतेने वाट बघत होतो, तो क्षण जवळ आलेला पाहून आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.

आता चर्चा सुरु झाली की, अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं? अमिताभ बच्चन कसे दिसतील? पडद्यावर, टिव्हीवर त्यांना अनेकदा पाहिलंय. प्रत्यक्ष ते कसे आहेत? त्यांना सप्रेम भेट काय द्यायची ? काय बोलायचं? असे अनेक विचार मनात येऊ लागले. अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुपची माहिती पुस्तिका आम्ही तयार केली होती. या पुस्तिकेमध्ये दोन पानांवर बच्चनप्रेमी समूहाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे फोटो घेतले होते. या ठिकाणी एक फोटो छोटा करून तेथे अमिताभ बच्चन यांची ऑटोग्राफ घ्यायला जागा ठेवावी, असा विचार मनात आला. प्रत्यक्ष भेटल्यानंतर ही पुस्तिका अमिताभ बच्चन यांना द्यायची आणि त्याच जागेवर अमिताभ बच्चन यांनी सही करावी, अशी विनंती करायची असा विचार मनात आला. दीपक प्रभावळकर यांनी अमिताभ बच्चन यांना छत्रपतींची शिवमुद्रा भेट द्यावी, असे सुचवले त्यानुसार विहे (ता.पाटण) येथील विक्रमसिंह पाटील यांच्याकडून त्यांनी शिवमुद्रा तयार करून घेतली. साताऱ्याहून येणाऱ्या पंकज चव्हाण आणि त्यांच्या इतर मित्रांनी सुद्धा अमिताभ बच्चन यांना द्यावयाची गिफ्ट घेण्याचे ठरवले. त्यानुसार सर्व तयारी झाली. पंचवीस तारखेला मुंबईला जायला आम्ही निघालो.
प्रभावळकर अगोदरच मुंबईमध्ये मुक्कामी होते. प्रवासात अमिताभ बच्चन हा एकच विचार डो्नयात होता. आजपर्यंत अनेक वेळा मुंबईला गेलेलो आहे. खाजगी कामासाठी, कार्यालयीन कामासाठी मात्र आज एका वेगळ्याच उद्देशाने मुंबईला निघालेलो आहे. होय..! अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी निघालेलो आहे. त्यांना भेटण्यासाठी 35 हून अधिक वर्षे वाट पाहिली. तो दिवस आज उजाडला आहे. तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला होता. रात्री अकरा वाजता मुंबईत पोहोचलो. बांद्रामध्ये एका हॉटेलवर मुक्काम केला. रात्री झोपण्याचा प्रयत्न केला, मात्र भेटीच्या विचाराने लवकर झोप लागली नाही. अमिताभ बच्चन यांच्याशी काय बोलायचं? याची तयारी केली असल्यामुळे झोपेतून उठून बसलो आणि त्याची पुन्हा उजळणी केली. सकाळी नऊ वाजता गोरेगाव फिल्म सिटी येथे पोहोचायचे होते. सहा वाजताच उठून सर्व तयारी करून साडेसात वाजता गोरेगावच्या दिशेने निघालो.
पाऊणे नऊ वाजता गोरेगाव फिल्म सिटीमध्ये प्रवेश केला. चित्रपटमहर्षि दादासाहेब फाळके फिल्म सिटीचा बोर्ड पाहून फार आनंद झाला. रस्त्याला अनेक बोर्ड लावले होते. टीव्ही सिरीयल्स्चे शूटिंग ज्या ठिकाणी चालते हीच ती जागा. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बोर्ड पाहून मुलांची आठवण झाली. अनेक चित्रपटाचे, सिरियल्स्चे शूटिंग होते हीच ती जागा. ज्या सिरीयलचे शुटींग सुरू असते त्या शूटिंगचा बोर्ड बाहेर लावलेला असतो. असे अनेक फलक रस्त्याकडेला पहायला मिळाले. ‘कौन बनेगा करोडपती’चे शूटिंग स्टुडिओ नंबर पंधरामध्ये होते. 15 नंबर स्टुडिओच्या दारात पोहोचलो आणि समोर अमिताभ बच्चन यांचे मोठे पोस्टर पाहून आनंदाला पारावर उरला नाही.

नऊ वाजता फिल्म सिटीमध्ये रिपोर्टिंग आहे, असा निरोप होता. मात्र प्रत्यक्ष दहा वाजता स्टुडिओमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती तिथे गेल्यानंतर मिळाली. आमच्याकडे अजून एक तास होता. इतकीवर्षे अमिताभ बच्चन यांना पाहण्याची वाट पाहत होतो. आता फ्नत आणखी एक तास वाट पहायची होती. तो एक तास मात्र लवकर जात नव्हता. अकरा वाजता प्रवेश पासाचे वाटप झाल्यानंतर मी स्टुडिओत प्रवेश केला. तिथे समजले अजून एक तासानंतर शूटिंग सुरू होणार आहे. सेटमॅ्नस वाहिनीच्यावतीने पाहुण्यांसाठी या दरम्यान चहा-पाणी, नाश्ता, जेवणाची सोय करण्यात आली होती.
थोडं खाऊन घेतलं. साडे अकराच्या सुमारास सुरुवातीला स्पर्धकांचे नातेवाईक, त्यानंतर ऑनलाइन प्रवेश मिळालेले भाग्यवान लोक यांना टप्प्याटप्प्याने स्टुडिओत सोडण्यात आले. तत्पूर्वी या सर्वांचे मोबाईल, पर्स व इतर साहित्य जमा करुन घेतले. कडक तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडण्यात आले. प्रत्येकाच्या हातावर तुम्ही कुणाच्या माध्यमातून आला आहात याबाबत लिहिण्यात आले होते. सर्वात शेवटी आमचा नंबर आला. आमच्या हातावर एस. जी. म्हणजे संजय गांधी यांचे खास निमंत्रित पाहुणे असा उल्लेख करण्यात आला होता. संजय गांधी हे ‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेचे निर्माते आहेत. खास निर्मात्यांच्या कोट्यातून आम्हाला या ठिकाणी प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे आमची छाती फुगली.
सुमारे बाराच्या सुमारास आम्ही केबीसीच्या सेटवर प्रवेश केला आणि तो सेट पाहून आमचे डोळे दिपूू लागले. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम टिव्हीवर पाहत होतो. या कार्यक्रमाचा सेट फक्त टीव्हीमध्येच पाहिलेला होता. आज प्रत्यक्षात पाहायला मिळाला, पण आजचा सेट मात्र जरा वेगळाच वाटत होता. आम्ही ज्या दिवशी तिथे गेलो होतो, त्यादिवशी धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या भागाचे चित्रीकरण करण्यात येणार होते. त्यामुळे सेटवर त्या दिवशीच दिवाळी साजरी करण्यात आली होती. .
संपूर्ण सेट रांगोळीने सजवण्यात आलेला होता. आकाशकंदील, छोटे-छोटे दिवे आणि लाईटचा झगमगाट यामुळे पूर्ण सेट उजाळून गेला होता. होय..! तो दिवस आमच्यासाठी दिवाळीच होती. साधु संत येती घरा। तोची दिवाळी दसरा।। असे म्हटले जाते. आम्ही स्वत:हूनच साधु संतांच्या घरी पाहोचलो होतो. माझ्यासाठी गेल्या 35 वर्षांत वेगवेगळ्या प्रसंगात चित्रपटातील वेगवेगळ्या संवादाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करणारा साधू, संत आणि देव हा अमिताभच होता आणि आम्ही त्यांच्या भेटीला गेलो होतो. त्यांच्या घरी गेलो होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी ही दिवाळीच होती.
‘कौन बनेगा करोडपती’च्या सहनिर्माते, त्या ठिकाणी असणारा प्रशिक्षित टेक्निशियन स्टाफ यांनी सुरुवातीला आम्हाला काय करायचे आणि काय नाही यावर सूचना दिल्या. थोडीफार रंगीत तालीमही करुन घेतली. हे सर्व झाल्यानंतर अंधार होईल, अचानक लाईट जातील आणि समोरून अमिताभ बच्चन येतील अशी आमची भावना झाली होती. आम्ही अमिताभ बच्चन यांच्या एन्ट्रीच्या दिशेने नजर लावून वाट पाहत होतो, मात्र टेक्निकल स्टाफ आमच्याशी गप्पा मारत असतानाच अचानक अमिताभ बच्चन धावतच सेटवर आले. पंचाहत्तरी पार केलेला हा तरणाबांड सदाबहार महानायक सेटवर आला तोही धावत. आमचे तर हृदय बंद पडायची वेळ आली होती. समोरच अमिताभ बच्चन उभे होते सर्वांना हाय-हॅलो करत होते. माझे डोळे दिपून गेले होते. अतिशय नम्रपणे त्यांनी सर्वांना अभिवादन करताना बैठिए..बैठिए..असे सांगत स्टाफशी चर्चा सुरू केली.
काय बोलावं हे कळत नव्हतं, काय करावं हे सुचत नव्हतं. फक्त अमिताभ बच्चन यांना बघतच राहिलो... बघतच राहिलो...बघतच राहिलो. त्यांचा तो उत्साह त्यांचा ते जबरदस्त डॅशिंग पर्सनालिटी आणि आवाजातील धमक याने आम्हाला मोहून टाकलं. नंतरच्या साडेतीन तासांत दोन स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यांना अमिताभजींनी प्रश्न विचारले. हा सर्व भाग 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला आहेत. तो आपण पाहिला असेलच. त्यामुळे याविषयी काय सांगायचं.

अमिताभ बच्चन यांचा सेटवरील वावर अगदी सहज होता. ज्या महानायकाने 50 वर्षे भारतीय सिनेसृष्टीवर अखंड राज्य केले आहे. त्यामुळे निर्माण झालेले वलय आणि मोठेपण याचा लवशेषही त्यांच्या वागण्यात दिसून आला नाही. स्पर्धकांशी व उपस्थित लोकांशी अधूनमधून संपर्क करताना त्यांच्यामध्ये असलेला विनम्रपणा वारंवार दिसून आला. माणूस मोठा झाला की, त्याने अजून विनम्र व्हायचे असते तरंच त्याचे मोठेपण सिद्ध होते, हे अमिताभजी यांना पाहून या साडेतीन तासांत अनुभवायला आले. गुजरातच्या अहमदाबाद येथून आलेला यशराजसिंग या स्पर्धकाशी गप्पा मारताना किंवा राजस्थानच्या लखनसिंह यांच्याशी बोलताना अमिताभजी यांनी त्यांना सहज बोलावयाला भाग पाडलं.
समोर अमिताभ बच्चन बसल्यानंतर बोलताना कोणताही तणाव येऊ नये म्हणून अमिताभजी यांनी स्वत:हून त्यांची काळजी घेतली. हॉट सीटवर बसवताना त्या स्पर्धकाचा केलेला सन्मान आपण सारेजण पाहतोच पण अधूनमधून त्या स्पर्धकाला तहान लागली आहे का? पाणी हवे आहे का? असे विचारून अमिताभजी यांनी भारतीय संस्कृतीत आदरातिथ्य काय असते, हे दाखवून दिले.
स्पर्धेच्या सुरुवातीलाच हा भाग धनत्रयोदशी दिवशी प्रसारित होणार असल्याने आयुष्यात धन आणि संपत्तीची माणसाला गरज आहे, मात्र संपत्ती ही सर्वश्रेष्ठ नाही. ‘धन जीवन की गती है.. धन जीवन का इंधल है’ असे सांगताना ‘ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे’ आणि ‘ज्ञानाच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी बुद्धी हा लॉगिन वर्ड आहे तर बुद्धीमत्ता ही पासवर्ड आहे’ हे ही सांगायला ते विसरले नाहीत.
कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी स्पर्धकांची माहिती व इतर स्क्रिप्ट निर्मात्याकडून येते. तेच अमिताभ वाचून दाखवतात. मात्र प्रश्नोत्तरानंतर मधल्या काळात ज्या गप्पा होतात. त्यातून अमिताभजी यांचं साधंपण आणि मोठेपण खरंच दिसून आलं. मारुती सुझुकी कंपनीची मारुती 800 ही गाडी एकेकाळी भारतात लोकप्रिय होती.
या वाहनाच्या संदर्भात एक प्रश्न आल्यानंतर अमिताभजींनी यशराजसिंग या युवकाला तुम्ही कधी ही गाडी चालविली आहे का? असा प्रश्न विचारला आणि स्वत:चाही अनुभव सांगितला. राजेश खन्ना सुपरस्टार असताना ते स्टँडर्ड हेल नावाच्या आलिशान गाडीतून येत असत. त्यांच्या गाडीकडे पाहून मलाही त्या गाडीत बसावेसे वाटत असे. माझी परिस्थिती चांगली झाल्यानंतर मी सुरुवातीला मारुती 800 गाडीच घेतली होती. पण जेव्हा परिस्थिती बिघडली तेव्हा ती गाडी विकावी लागली. हे सुद्धा अमिताभजींनी तितत्याच सहजतेने सांगितले.
मारुती 800 कारमध्ये बसण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात कोण बसलंय याकडे फारसे कोणी पाहत नाही आणि कोणी तुम्हाला ओळखत नाही, असा चिमटाही त्यांनी घेतला. अतिउच्च पदावर गेलेला कोणताही व्य्नती आपल्यावर वाईट दिवस आले होते, मी रस्त्यावर आलो होतो, दिवाळखोर झालो होते हे सांगायला कचरतो. मात्र अमिताभ बच्चन यांनी आयुष्यातील वाईट प्रसंग आणि वाईट काळ खूप काही शिकवून जातो असा संदेशच जणू या उदाहरणातून दिला.
सध्या आरोग्यविषयक जागरुकता वाढली आहे. स्पर्धक यशराजसिंह याने 102 किलो वजन कमी करून 70 पर्यंत कसे आणले? हे त्याच्याच तोंडून काढून घेताना अमिताभजींनी सकाळचा नाश्ता किंवा जेवण एकट्याने बसून करायचं असतं. दुपारचं जेवण सोबतीला एक माणूस घेऊन करायचं असतं तर रात्री जेवायचंच नसतं, असा संदेश देताना आपल्या प्रकृतीचे रहस्यही उलगडले.
अमिताभ बच्चन यांची निरीक्षण कला किती उंच आहे याचा अनुभव जेव्हा लाईफलाईनसाठी नियु्नत तज्ञ व्य्नती पत्रकार मुकेश यांना व्हिडीओ कॉल केला तेव्हा अनुभवला.
मुकेश यांच्या पाठीशी एक मंदिराचे चित्र होते. हे चित्र नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचे आहे काय? असा सवाल अमिताभजी यांनी मुकेश यांना केल्यानंतर त्यांनी होय..!, असे उत्तर देताना आमचे वृत्तवाहिनीचे आशिया विभागीय कार्यालय असल्याने हा फोटो येथे लावल्याचे त्यांनी सांगितले. याच ठिकाणी महान या चित्रपटातील ‘प्यार में दिल पे मांर दे गोली’ या गाण्याचे शुटींग झाले असल्याचे सांगत अमिताभजी यांनी नेपाळला अनेकदा गेल्याचे सांगितले.
समोरच्या व्य्नतीचा आदर कसा करायचा? हे खरंच अमिताभजी यांच्याकडून शिकावं. राजस्थान येथील लखन सोलुंकी नावाचा युवक स्पर्धक म्हणून हॉट सिटवर आल्यानंतर त्याच्या नावाचे स्पेलिंग पाहून मी तुम्हाला ‘लखन’ नावाने हाक मारु की ‘लाखन’ नावाने हाक मारु, हे अमिताभजींनी ज्या नम्रतेने विचारले, ते पाहून एखाद्याचे नाव चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यास तो दुखाऊ शकतो, याची किती काळजी अमिताभजी घेतात हे मला अनुभवण्यास मिळाले. कमी शिक्षण झालेल्या लखन सोलंकी दबकत-दबकत प्रश्नांची उत्तरे देत असल्याने त्याला मनमोकळा करण्यासाठी अमिताभजींनी त्यांच्या नोकरीशी संबंधित माहिती विचारून खुलं केलं. वनविभागात काम करणाऱ्या लखनने 70 हजार झाडे लावली आहेत. हे सांगितल्यानंतर इतकी झाडे लावल्याबद्दल अमिताभजींनी त्यांचे ज्या शब्दांत केले, असे कौतुक त्याने क्वचितच कधीतरी अनुभवले असेल.
निसर्गाविषयी अमिताभ बच्चन यांचे असलेले प्रेम यातून दिसलेच. यापुढे जाऊन झाडे ही सजीव आहेत. प्रत्येकाने झाड लावले पाहिजे. आपण झाड लावल्यानंतर त्या झाडाला मुलाप्रमाणे नावही दिले पाहिजे, असे सांगत झाडाचे नाव लखन ठेवा असे त्यांनी लखन यांना सुचवले. साडेतीन तासांच्या या शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून एकही चूक झाली नाही. एकदाही रिटेक घ्यावा लागला नाही. टे्निनकल टीमकडून झालेल्या चुकांमुळे दोन सीन पुन्हा चित्रित करण्यात आले. मात्र 77 वर्षीय अभिनयाची कार्यशाळा असलेल्या अमिताभजी यांच्याकडून एकही चूक झाली नाही. यावरून अमिताभजी किती परिपूर्ण व परिप्नव आहेत याचा आम्हाला अनुभव आला. अमिताभजी यांचे मेकअपमन व इतर टे्निनकल स्टाफ अधूनमधून त्यांच्याकडे यायचा. त्यांनाही अमिताभजींनी चिमटे घेतले. ‘खाली.. पिली बीच में आते हैं.. मैं अच्छा दिख रहा हुं’ असे सांगताना त्यांची विनोदबुद्धी सेटवर हास्य उमटवून गेली.

तीन तास शुटींग झाल्यानंतर वुटरचा आवाज आला. शुटींग संपलं आणि सर्वांनीच सुस्कारा सोडला. आता अमिताभजी यांना भेटायचं. शुटिंगच्या सेटवर पाऊणेदोनशे लोक होते. या सर्वांच्या जवळ जाऊन अमिताभजी यांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्यासोबत फोटो काढले. प्रत्येकाला अमिताभजी यांच्यासोबत फोटो काढायचा होता. मात्र या सर्वांसोबत फोटो काढताना अमिताभजी यांच्या चेहऱ्यावर कसलाही राग दिसला नाही.. दिसली ती फ्नत नम्रता. ‘ना तू थकेगा कभी.. ना तु रुकेगा कभी’ ही पं्नती अमिताभजी यांना तंतोतंत लागू पडते. एकेकाकडे फोटो काढून अमिताभजी आमच्या बाजूला आले. खुर्चीवर बसून आम्ही सेटवरील नियमाप्रमाणे सामुहिक फोटो काढून घेतले. आता वेळ आली होती अमिताभजी यांच्याशी बोलण्याची..
श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांच्यावतीने सातारा भूषण या पुरस्काराची प्रतिकृती देण्यासाठी पंकज चव्हाण यांनी अमिताभजी यांच्याशी चर्चा केली. यावेळी अमिताभजी यांचा चेहरा एकदम खुलला. मी साताऱ्याला येऊ शकलो नाही. मला साताऱ्याला यायला आवडले असते. ‘मुझे छत्रपती उदयनराजें से बहुत स्नेह हैं’ असे नम्रपणे सांगत त्यांनी हा पुरस्कार स्विकारला. समोर असलेल्या कॅमेरामनने याचे फोटो काढा आणि मला द्या, असे सांगितले. अमिताभजींचे हे वा्नय ऐकून आमची छाती अजून फुलली. हे सन्मानचिन्ह देताना अमिताभजींच्या खांद्याला खांदा लाऊन मी उभा होतो. आमच्यासोबत सातारचे काही मित्र आणि दीपक प्रभावळकरही होते. त्यानंतर सातारच्या मित्रमंडळी परिवाराच्यावतीने छत्रपती शिवरायांची मूर्तीही अमिताभजी यांना भेट देण्यात आली.
छत्रपतींची मूर्ती पाहून अमिताभजींनी ‘यह बहुत सन्मानी राजा थे’ अशी प्रतिक्रिया दिली. याही वेळेला अमिताभजी यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मी सोडली नाही. आता माझा नंबर आला होता. अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुपच्यावतीने तयार केलेली माहिती पुस्तिका मी अमिताभजी यांच्या हातात दिली. या पुस्तिकेतील सर्व पाने अमिताभजींनी उघडून पाहिली. या दरम्यान आमचा ग्रुप काय करतो? कराड शहरात आम्ही स्वच्छता अभियान कसे राबवले हे मी अमिताभजींना सांगितले. फोटो असलेल्या एका ठिकाणी आम्ही रिकामी जागा ठेवली आहे, त्या ठिकाणी आपण आपला अॅटोग्राफ द्यावा, अशी विनंती मी अमिताभजी यांना केली. त्यांनीही पुस्तिका हातात ठेऊन घेतली. माझे मित्र दीपक प्रभावळकर यांनी अमिताभजी यांना शिवमुद्रा भेट दिली. या शिवमुद्रेविषयी सविस्तर माहिती घ्यायला अमिताभजी विसरले नाहीत.

आपल्या पप्पांचे अमिताभजी बच्चन यांना भेटण्याचे स्वप्न साकार होणार आहे, हे पाहून माझी मुलगी देवयानी हीने वहीच्या कागदावर शुभेच्छा लिहून दिल्या होत्या. तो कागद मी अमिताभजी यांच्या हातात दिला. अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुपने तयार केलेला 786 बॅचसुद्धा त्यांनी अतिशय नम्रपणे स्विकारला. मी इच्छा व्य्नत केल्याप्रमाणे त्या माहितीपुस्तिकेवर त्याच ठिकाणी अॅटोग्राफ करुन ती पुस्तिका मला परत मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देवयानीने दिलेल्या शुभेच्छा संदेशावरही अॅटोग्राफ देऊन तो कागद मला परत मिळाला. खरंच ही माझ्यासाठी फार मोठी भेट होती.
अमिताभ बच्चन यांना फ्नत पाहण्याची इच्छा होती. ती पूर्ण व्हायला 35 वर्षे लागली. मात्र एवढी वर्षे वाट पाहिल्याचे फळ मिळाले ते म्हणजे अमिताभजींसोबत साडेतीन तास थांबता आले. इच्छा होती काही क्षण डोळे भरुन पाहण्याची. पण पूर्ण झाली साडेतीन तास निवांतपणे पाहण्याची. त्या सोबतीला अमिताभजी यांना जवळून पाहता आले. त्यांच्याशी बोलता आले. त्यांच्याशेजारी उभे राहून फोटो काढता आले. त्यांना हात लावता आला. त्यांची अॅटोग्राफही मिळाली. आमच्या बच्चनप्रेमी ग्रुपला आपणास भेटावयाचे आहे, अशी इच्छाही मी त्यांच्यासमोर बोलून दाखवली. त्यास त्यांनी हसून प्रतिसादही दिला.
जे मागावं ते मिळतंच.. फ्नत ते मनापासून मागावं लागतं. स्वप्न ही पहायचीच असतात. स्वप्ने पाहिली तरच पूर्ण होतात. अमिताभ भेट ही माझ्यासाठी स्वप्नवत होती. या भेटीत मिळालेला आनंद ही माझ्यासाठी सर्वोत्तम पारितोषिक होते. हा ठेवा माझ्यासाठी आयुष्यभर जपून ठेवावा असाच आहे. सेटवरून बाहेर पडल्यानंतर मी फ्नत माझ्या जवळच्या घरच्या दोन व्य्नितंशी बोललो. त्यानंतर मला बोलताच येत नव्हतं. इतका हर्षवायू माझ्यात ओसंडून वाहत होता. अमिताभ बच्चन यांच्या भेटीविषयी अजून कितीही लिहीलं तरी शब्द कमीच पडणार आहेत.
(उत्तरार्ध)
सतीश वसंतराव मोरे, कराड.
सतिताभ
+ 91 98 8119 1302, + 91 97 6556 6202