फॉलोअर

१९ मार्च २०२५

miss you धनंजय


धनंजय शिवाय फिकी पिकी रंगपंचमी...😓


आजची रंगपंचमी आपल्याला गेल्या वर्षी खेळलेल्या रंगपंचमीची आठवण करून देत आहे.गेल्या वर्षी आपण अमिताभ बच्चन प्रेमींनी एकत्र येऊन पाॅकेट कॅफे मध्ये एक छोटासा कार्यक्रम 'रंग बरसे' आयोजित केला होता. रंगपंचमीची गाणी म्हणत, ऐकत सर्व जण रंगात न्हाऊन गेलो. आपण खूप आनंद लुटला होता. कमी वेळात जास्त मजा आली होती. कार्यक्रम संपल्यावर ना धनंजय राजमाने यांनी आणलेला गॉगल घालून आपण सर्वांनी फोटो काढले होते, आठवतय का? या कार्यक्रमाची गावभर चर्चा झाली होती. याही वर्षी असाच कार्यक्रम करण्याचं नियोजन केले होते. याही वर्षी रंगपंचमी कार्यक्रम व्हावा म्हणून सर्वात जास्त आग्रह होता तो धनंजय राजमाने यांचा.

धनंजय आपल्यातील अतिशय गौरवशाली कलाकार, गायक आणि सच्चा अमिताभ बच्चन प्रेमी. त्यांनी हा कार्यक्रम गेल्या वर्षी प्रमाणे होण्यासाठी मला खूप वेळा फोन केला होता. आपण हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं पण होतं. संभाजी शेवाळे दाजी यांनासुद्धा त्यांनी फोन केला होता. शेवटी धनंजय यांच्या आग्रहाखातर या कार्यक्रम घेण्यासाठी मी पॉकेट कॅफेचे धनंजय माने यांना फोन करून कल्पना दिली होती.

सकाळची वेळ ठरली होती. धनंजय राजमाने कराओके सेट घेऊन येणार होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होतं. आज धनंजय माने आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय यावर्षी रंगपंचमी सुनीसुनी, फिकी पिकी आहे. धनंजय यांच्याशिवाय यावर्षी कसा बर रंग लावावा वाटेल ?

गेल्या वर्षी रंग बरसे कार्यक्रमात आपल्यातील एक बच्चन प्रेमी दिवंगत राहुल खोचीकर यांच्या स्मरणार्थ एबीपी संजय शिंदे मेहेरबान यांनी शोले चित्रपटातील गाणे म्हटले होते 'ये दोस्ती हम नही छोडेंगे' 
अतिशय भावूक वातावरणात हे गाणं त्यांनी सादर केलं होतं. ते ऐकताना राहुलची खूप आठवण आली होती. आज पुन्हा हे गाणे ऐकताना धनंजय राजमाने यांची खुप आठवण येते.

धनंजय, धनूशेठ, धनुदादा..
धनंजय बच्चन....

तू आम्हाला सोडून जायला नाही पाहिजे होतं... तू आम्हाला अजून हवा होतास.. तुझी खूप गाणी आम्हाला ऐकायची होती.. तुझ्यासोबत आम्हाला खूप फिरायचं होतं.. तुझ्यासोबत आम्हाला कराओके गाण्याचा कार्यक्रम घ्यायचा होता... तुझ्यासोबत आम्हाला परदेश दौरा करायचा होता... तुझ्यासोबत आम्हाला अमिताभ बच्चन यांचे अनेक कार्यक्रम घ्यायचे होते... तुला घेऊन पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना भेटायला जायचं होतं... तुझ्यासोबत आम्हाला आयुष्यातील अनेक रंग उधळायचे होते... !

पण आज तू आमच्यासोबत नाहीस.. तू आम्हाला धोका दिलास... तू असं का केलंस...? नियतीच्या मनात जरी वेगळं असलं तरी नियती एवढी निष्ठूर कशी होऊ शकते ? धनंजय तुझ्या सारखा सच्चा अमिताभ बच्चन प्रेमी, सच्चा मनमिळावू आणि निष्पाप मित्र आपल्यातून जाणं ही माझी फार मोठी हानी आहे. खूप वाईट वाटतंय.. धनंजय राजमाने तुमच्या मुळे ओगलेवाडी मध्ये थांबायला एक जागा होती, स्पेस होता. आता ओगलेवाडी मध्ये आम्ही कुणासाठी थांबू ???. 

धनंजय, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमात तू तुझं वेगळंपण टिकवलं होतंस. एकदा नमक हलाल चित्रपट लावलेला होता तेव्हा तू 'शहेनशहा' मधील अमिताभ बच्चन यांचा गेटअप करून आलेला होता. परवा 11 ऑक्टोबरला कालिया चित्रपट आपण प्रभात मध्ये लावलेला होता. कालिया चित्रपटातील कैदी नंबर 602 मेकअप करून तू आला होतास. तुला घेऊन हथकडी घातलेली पोज घेऊन आपण प्रभात मध्ये फोटो काढले होते.बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमात तू काही तरी वेगळे करायचा. ग्रुप मधील सर्वांना तू तुझ्या घरी गाणे ऐकायला बोलावलं होतं, ग्रुप मधील सर्वांना तुझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी बोलावलं होतं. ग्रुप मधील सर्वांनी तुझ्या घरी यावं, तुझं गाणं ऐकावं, त्यांनी एखादं गाणं सादर करावे अशी तुझी खूप इच्छा असायची. बच्चन प्रेमी मित्रांना तू अनेकदा लग्नाची, वाढदिवसाची पार्टी दिली होतीस. तु सर्वांना जपलं होतं, सगळे जण तुझ्या गाण्यावर, बच्चन वेडे पणावर प्रेम करत होते. तुझ्यासारखा सच्चा मित्र आणि दिलदार खरच मिळणार नाही. तेरे जैसा यार कहा...कहा ऐसा याराना !


!

मिस यु धनंजय....!


 *_सतीश मोरे सतिताभ आणि* 
*अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप सर्व सदस्य_* 

 _सोबत... संजय शिंदे यांनी सादर केलेलं गीत_

२६ फेब्रुवारी २०२५

खेळ मांडला


*चाकावर खेळ मांडला..* 
*व्यवस्थेचा...शिक्षणाचा आणि परिस्थितीचा...!*

सायंकाळी चारची वेळ असेल.. माझं काम आटोपून शेतात पाच मिनिटं जाऊन यावं म्हणून करवडीला गेलो होतो. शेतात जाऊन आलो, बाहेर रस्त्यावर उभा राहिलो. शेतासमोरच मोकळ्या जागेवर एका साखर कारखान्याची टोळी (फड) होती. या फडामध्ये झोपड्या (खोपा) मांडल्या होत्या. अर्थातच टोळीतील तोडकरी कुटुंब शेतात ऊस तोडायला गेले होते. 

या कष्टकरी कुटुंबाचा दिनक्रम आपल्यासारख्या पोट सुटलेल्या लोकांसारखा नसतो.  लेकरांवर त्यांचं फार प्रेम असतं. पण पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे चार पासून ही कुटुंब कामावर जातात. कामावर जाताना सारा स्वयंपाक करून ठेवला जातो. लहानग्या पोरा बाळांना कामावर नेता येतं किंवा कधी कधी नेता येत नाही. ती पोरं भगवान भरोसे त्या झोपड्यामध्ये सोडून ही कुटुंबं ऊस तोडायला जातात. मग या चिमुकल्या पोरांची जबाबदारी पडते त्यातल्या त्यात आठ दहा वर्षाच्या मोठ्या मुलांवर.  

अशीच अकाली पालकत्व आलेली दोन मुलं आणि एक मुलगी या फडावर होती. या तीन मुलांच्याकडे एकच काम होतं त्या झोपड्यांमध्ये असलेल्या छोट्या छोट्या मुलांची काळजी घ्यायची, त्यांना खाऊ घालायचं, त्यांना आधार द्यायचा, त्यांना खेळवायचं. हे काम त्यांनी चोख पार पाडलं होतं. खोपीमध्ये जे काय आहे ते खाऊन ही पोरं आता एक झोप काढून बाहेर पडली होती. सूर्याची प्रखर किरणे हळू कमी होऊ लागली होती आणि याच कालावधीत ही छोटी मुले झोपडी बाहेर आली. आणि  त्यांनी एक खेळ मांडला.

 शहरांमध्ये आपण व्हील चक्र, जायंट व्हिल किंवा मोठा झोपाळा पाहिला असेल. पण या शेतमजुरांच्या मुलांना कुठून मिळणार असला  झोपाळा ? एवढे पैसे कुठे आहेत त्यांच्याकडे? त्यांना जत्रेत जायला मिळेल? ? मुलांना घेऊन जत्रेला जावं ,त्यांना गोड गोड खाऊ घालावं, त्यांना जत्रेत फिरवावं? चिरमुरे द्यावेत? एवढा वेळ कुठे आहे त्यांच्या पालकांकडे ? मुलांना खाऊ घालण्यासाठी काम केले पाहिजे, कष्ट केले पाहिजे या एकाच उद्देशाने त्यांचे पालक शेतात ऊस तोडणी करत होते. 

तिथे एक बैलगाडी उभी होती. तर दुसरीकडे बंद पडलेली एक बैलगाडी होती. या बैलगाडीचे चाक काढलेले होते. बैलगाडीचे चाक एका उंचीवर मांडून यांच्या आई-वडिलांनी तिथे एक चक्र तयार केलेले होते. या चक्रावर बसून मग या मुलांनी खेळ मांडला. तिथे चार पाच छोटी छोटी मुलं होती . त्यांच्या अंगावर साधे कपडेही नव्हते. ही मुलं या चकरावर बसली. त्यांच्यातला एक थोरला मुलगा ते चक्र गोल गोल फिरवत होता. दुसरी एक मुलगी त्या छोट्या छोट्या मुलांना त्या चक्रावर बसवत होती आणि मग खेळ सुरू झाला..

काय आनंद होता या गोष्टींमध्ये काय सांगू...! ‌ किती निष्पाप मुलं होती ती.. इवलीसी...आहे त्या गोष्टींमध्ये आनंद मानत तो आनंद लुटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. गोल गोल चक्र फिरल्यानंतर एक छोटीशी मुलगी खाली पडली. तिला उचलून एका मुलाने उभे केले. पुन्हा खेळ सुरू झाला. ती मुलं ओरडत होती, कोणी रडत होती, कोणी हसत  होती,आनंद लुटत होती आणि मी शांतपणे ते पाहत होतो.

लहानपणी असा खेळ आम्ही पण केलेला होता. पण तोडकरी कुटुंबातील मुलांचा हे खेळ पाहून मन हेलावलं. यातील एका दोघा मुलांना विचारलं तुम्ही शाळेत जाता का ? दोघांनी एका सुरात एकच उत्तर दिले.. 'आम्हाला शाळा काय माहित नाही .. शाळेत आम्ही कधी गेलोच नाही. '... ऊस तोडणी कामगारांची मुले जर शाळेत जात नसतील तर त्यांना भविष्य कसे चांगले असणार...? त्यांनी पण आपल्या आई-वडिलांच्या मागे  फक्त ऊस तोडत बसायचे काय ?

सोबतचा हा व्हिडिओ पाहताना जेवढा आनंद होत होता, तेवढेच ही मुलं शाळेत जात नाहीत  हे ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येत होते...! काय करू शकतो आपण या मुलांसाठी ...?  बाजूला आलो आणि लेखणीच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली...!तुम्हाला भेटायला दोन दिवसानंतर पुन्हा येतो... असं वचन देऊन तिथून निघालो....!

आपण काय करू शकतो का या मुलांसाठी ? ज्यांच्या अंगावर कपडेही नाहीत... ज्यांना शिक्षण काय माहित नाही... ज्यांना पुस्तकं वह्या काय असतं याची माहितीही नाही...!

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ*
9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...